विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 6 August 2026

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

 


अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्मरणात ठेवले जाते. याच वर्षी मराठा सैन्याने पंजाब जिंकून अटक (आजचा पाकिस्तान) येथील किल्ल्यावर भगवा फडकावला. "अटकेपार झेंडे रोवले" ही म्हण याच ऐतिहासिक घटनेतून उदयास आली. हा केवळ एका किल्ल्याचा विजय नव्हता, तर मराठा साम्राज्याच्या लष्करी सामर्थ्याचा, दूरदृष्टीचा आणि अखिल भारतीय प्रभावाचा सर्वोच्च क्षण होता.
या अभूतपूर्व मोहिमेचे प्रमुख नेतृत्व रघुनाथराव पेशवे (राघोबादादा) यांच्याकडे होते. अहमदशाह अब्दालीने उत्तर भारतावर केलेल्या आक्रमणांनंतर पंजाब पुन्हा जिंकण्याचा निर्णय मराठ्यांनी घेतला. रघुनाथरावांनी उत्तर भारतात मोठी मोहीम उभारून दिल्ली, सरहिंद आणि पंजाबवर मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने अफगाण सत्तेला मोठा धक्का दिला.
या मोहिमेतील सर्वात पराक्रमी सेनानी म्हणजे तुकोजीराव होळकर. मल्हारराव होळकरांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी पंजाब मोहिमेत मोठे योगदान दिले. वेगवान घोडदळाच्या साहाय्याने त्यांनी शत्रूच्या फौजांचा पाठलाग केला आणि पंजाबमध्ये मराठ्यांचे नियंत्रण मजबूत केले.
साबाजी शिंदे (साबाजीराव शिंदे) हे अटकेच्या विजयाशी सर्वाधिक जोडले जाणारे नाव आहे. उपलब्ध ऐतिहासिक स्रोतांनुसार, १४ जुलै १७५८ रोजी अटक किल्ल्यावर मराठा सैन्याचा ताबा मिळाल्यानंतर साबाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा निशाण फडकविण्यात आले. त्यामुळे "अटकेपार भगवा फडकवणारे सरदार" म्हणून त्यांचे नाव इतिहासात विशेष गौरवाने घेतले जाते.
तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे यांच्याबरोबरच गोपाळराव बर्वे यांनीही पंजाब मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी स्थानिक प्रशासन उभे करणे, रसद व्यवस्थापन आणि जिंकलेल्या प्रदेशांवर नियंत्रण राखणे यासाठी मोठे योगदान दिले.
या मोहिमेत मराठ्यांना पंजाबमधील शीख मिसलांचे सहकार्यही लाभले. विशेषतः अदीना बेग खान याच्याशी झालेल्या करारामुळे मराठा सैन्याला पंजाबमध्ये पुढे जाणे सोपे झाले. तथापि, अटक किल्ला जिंकण्याचे श्रेय मराठा सैन्याच्या लष्करी कारवाईलाच दिले जाते.
मल्हारराव होळकर हे या काळातील मराठा साम्राज्याचे सर्वात अनुभवी सेनानी होते. जरी अटक किल्ला जिंकण्याच्या अंतिम मोहिमेत त्यांची प्रत्यक्ष भूमिका मर्यादित होती, तरी उत्तर भारतात मराठा सत्ता उभारण्यात आणि पंजाब मोहिमेची पायाभरणी करण्यात त्यांचे योगदान अत्यंत मोठे होते.
अटक जिंकल्यानंतर मराठा सैन्याने सिंधू नदीपर्यंत आपले नियंत्रण प्रस्थापित केले. काही मराठा तुकड्या सिंधू नदी ओलांडून पुढे गेल्याचे उल्लेख काही समकालीन व उत्तरकालीन स्रोतांत आढळतात. यामुळेच "अटकेपार झेंडे रोवले" ही संज्ञा प्रचलित झाली. तथापि, मराठा साम्राज्याने त्या पलीकडील प्रदेशावर दीर्घकालीन प्रशासन स्थापन केले होते, असे समकालीन पुरावे दर्शवत नाहीत. त्यामुळे इतिहासकार या विजयाचे वर्णन लष्करी सामर्थ्याच्या सर्वोच्च विस्ताराच्या रूपात करतात.
अटक जिंकल्यानंतर मराठा साम्राज्याची सीमा दक्षिणेतील तंजावरपासून उत्तरेतील पंजाबपर्यंत पसरली होती. हा मराठा इतिहासातील भौगोलिक विस्ताराचा सर्वोच्च टप्पा मानला जातो. मात्र हे वर्चस्व फार काळ टिकले नाही. अहमदशाह अब्दालीने १७५९ मध्ये पुन्हा भारतावर आक्रमण केले, आणि पुढील घडामोडींचा शेवट १४ जानेवारी १७६१ च्या तिसऱ्या पानिपतच्या युद्धात झाला.
इतिहासकारांच्या मते, अटक विजय हा केवळ मराठ्यांच्या शौर्याचा परिणाम नव्हता. त्यामागे उत्कृष्ट घोडदळ, वेगवान हालचाली, प्रभावी नेतृत्व, स्थानिक मित्रशक्तींशी केलेले राजकीय करार आणि दीर्घकालीन उत्तर भारतातील धोरण यांचा महत्त्वाचा वाटा होता.
अटकेच्या विजयाशी संबंधित प्रमुख मराठा सरदारांमध्ये रघुनाथराव पेशवे, साबाजी शिंदे, तुकोजीराव होळकर, गोपाळराव बर्वे आणि मल्हारराव होळकर यांचा विशेष उल्लेख केला जातो. याशिवाय हजारो मराठा सैनिक, घोडेस्वार, शिलेदार आणि तोफखान्यातील जवान यांनी या ऐतिहासिक मोहिमेत अतुलनीय पराक्रम गाजवला.
म्हणूनच अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार हे केवळ एका किल्ल्याचे विजेते नव्हते; ते मराठा साम्राज्याच्या अखिल भारतीय सामर्थ्याचे, अद्वितीय लष्करी धैर्याचे आणि दूरदर्शी नेतृत्वाचे प्रतीक होते. अटकच्या तटावर फडकलेला भगवा आजही इतिहासाला सांगतो. सह्याद्रीत जन्मलेले स्वराज्य, योग्य नेतृत्व आणि शौर्याच्या बळावर सिंधूच्या तीरापर्यंत पोहोचू शकते

दि.६ ऑगस्ट १७६० रोजी श्रीमंत सदाशिवरावभाऊ पेशव्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यातील दिवाणखान्याचे चांदीचे छत फोडले..!!"

 "


दि.६ ऑगस्ट १७६० रोजी श्रीमंत सदाशिवरावभाऊ पेशव्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यातील दिवाणखान्याचे चांदीचे छत फोडले..!!"

दि.२ ऑगस्ट १७६० रोजी मराठ्यांनी दिल्लीचा लाल किल्ला अब्दालीच्या सैन्याकडून जिंकून घेतला. दिल्ली हाती पण दिल्लीत मराठ्यांना फारशी रसद मिळाली नाही, त्यामुळे रसदेच्या अभावी फौजेचे हाल सुरू झाले. अब्दालीच्या फौजेने अंतर्वेदीतील मुलुख व्यापला असल्याने दिल्ली शहरात धान्याचा व घासदाण्याचा पुरवठा होईना, मराठ्यांच्या सैन्यास उपवास पडू लागले.
दिल्लीच्या मुक्कामांत अडीच-तीन लाख रूपये बुंदेल्यांकडून मिळाले. पण त्यानी फारसा फरक पडला नाही. त्यामुळे फौजेचा थकलेला पगार देण्यासाठी नाणी पाडण्याकरिता चांदी उपलब्ध व्हावी म्हणून भाऊसाहेबांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यातील दिवाण-इ-खास महालाचे चांदीचे छत फोडण्याचे ठरवले. त्या छतास बोटभर जाडीचा चांदीचा पत्रा असून वर सोन्याचे काम केलेले होते.
दि.६ ऑगस्ट १७६० रोजी भाऊसाहेबांनी ते छत फोडले आणि त्या चांदीतून ९ लाख रुपये उपलब्ध केले. पण त्यावरही नजीबाने उगा कांगावेखोरपणा करून 'सदाशिवरावभाऊने शाही तख्तास फोडून त्याची अप्रतिष्ठा केली' वगैरे कोल्हेकुई चालू केली. पण वास्तविक पूर्ण छत भाऊसाहेबांनी फोडले नसून त्या छताचा काही भाग या आधीच वझीर गाझिउद्दीनखानाने काढला होता. नंतर बाकी असलेले छत नाईलाजाने भाऊसाहेबांना तोडावे लागले. ह्या ९ लाखापैकी काही रुपये भाऊसाहेबांनी सरदारांस दिले, बाकी फौजेस वाटले तेणेकरुन पुढे सुमारे एक महिना गुजराण झाली.
त्यावेळेस मराठ्यांना भासलेल्या आर्थिक चणचणीचे दुर्दैवी वर्तमान पुढच्या काळात म्हणजे सप्टेंबर १७६० मध्ये भाऊसाहेबांनी पाठवलेल्या एका पत्रात दिसून येते, त्यात भाऊसाहेब म्हणतात - 'पातशाही किल्ल्यांत दिवाणखान्यास रुप्याचें छत होते, त्यास वजिराने पूर्वीच थोडकेसे काढले होते, बाकी आम्ही काढले त्याचे नऊ लक्ष रुपये निघाले, त्यामुळें महिनाभर स्थित राहिली. सावकार व लोक सर्व तरते बुडते पाहतात. दिल्लीच्या किल्ल्याचा खर्च, पातशहाच्या जातीचा (फौजेचा) खर्च, त्यांचा शागीर्दपेशा वगेरे खर्च वाढले. पुढे फौज ठेवावी लागते त्याचाही विचार लिहून पाठवावा.'
काळकर्ते शिवरामपंत परांजपे हे या घटनेचा राजकीय अर्थ अगदी चपखलपणे मांडताना म्हणतात - 'बिहार, ओरिसा, लाहोर, अयोध्या, गुजराथ, वऱ्हाड, विजापूर, गोवळकोंडा आणि दौलताबाद या सर्व ठिकाणच्या हिंदु प्रजेला जखडून टाकण्यासाठी गुलामागिरीच्या शृंखला येथेच घडविल्या जात होत्या. अखंड भारतातील लोकांची अंतःकरणे चावून चावून रात्री झोप येऊ न देणारे, साप आणि विंचू याच वारुळातून बाहेर पडत होते. असे हे तख्त म्हणजे मोगलाई सत्तेची मूर्तिमंत प्रतिमा होती. तीच्यावर आघात करून भाऊसाहेबांनी महम्मद गझनी, तैमुरलंग, नादिरशहा, अब्दाली.. अशी वाढत जाणारी माळ तोडून टाकली आणि दिल्लीचे तख्तच नव्हे तर हिंदुस्थानच्या गुलामगिरीच डोकेच फोडून टाकले..'
© स्वराज्यसेवक
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संदर्भ :
१) मराठी रियासत : पेशवा बाळाजीराव नानासाहेब
[स.१७४९-१७६१] - गोविंद सखाराम सरदेसाई
२) पेशवे घराण्याचा इतिहास - प्रमोद ओक
३) महाराष्ट्राचा इतिहास : मराठा कालखंड (भाग २) : १७०७ ते १८१८ - वि. गो. खोबरेकर
४) काळातील निवडक निबंध : भाग ४ - शिवराम महादेव परांजपे
५) दिनविशेष - प्रल्हाद नरहर जोशी
६) ऐतिहासिक पोवाडे : भाग १ - यशवंत नरसिंह केळकर

अहिल्याबाईंनी स्वतःच्याच मुलीचा आंतरजातीय विवाह लावला होता.

 होय खरे आहे.


अहिल्याबाईंनी स्वतःच्याच मुलीचा आंतरजातीय विवाह लावला होता.

अहिल्याबाईंचा विवाह खंडेराव होळकर यांच्याशी झाला. त्यांना मालोजीराव आणि मुक्ताबाई ही दोन अपत्ये होती.
पती खंडेरावांच्या मृत्यूनंतर (१७५४) बारा वर्षांनी सासरे मल्हाराव होळकरांचा मृत्यू झाला (१७६६). त्यानंतर एकाच वर्षांनी राज्यकारभार पाहणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा देखील मृत्यू त्यांना पाहावा लागला (१७६७). मुलाच्या मृत्यूपश्च्यात अहिल्याबाई स्वतः राज्यकारभार पाहू लागल्या.
होळकरांच्या जहागिरी क्षेत्रात चोर आणि डाकुंनी हैदोस घातला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अहिल्याबाईंनी घोषणा केली कि "जो कोणी या दरोडेखोर डाकूंचा बंदोबस्त करेल त्या शूर व्यक्तीला वतनदारी देऊन त्याचा विवाह राजकन्या मुक्ताबाईंसोबत लावला जाईल. यावेळी जातपात बघितली जाणार नाही."
अहिल्याबाईंच्या घोषणेला साद देत यशवंत फणसे या युवकाने सैन्य हाताशी धरून दरोडेखोरांचा बंदोबस्त केला. यशवंत फणसे आदिवासी समाजातले. होळकरांच्या सैन्यात सैनिक म्हणून काम करत. घोषणेप्रमाणे अहिल्याबाईंनी रूढी परंपरा मोडत आपल्या मुलीचा विवाह यशवंत फणसे यांच्यासोबत लावून दिला.
आंतरजातीय विवाहांची प्रथा पुढील पिढीत देखील चालू राहिली. त्यांचे वंशज यशवंतराव होळकर (धनगर) यांचा विवाह कोल्हापूरच्या शाहू महाराजांची चुलत बहीण चंद्रप्रभा बाई घाटगे (मराठा) यांच्याशी झाला होता.

अनुबाई घोरपडे!

 इतिहासात डोकावलं तर पुरुष व्यक्तीमत्वांचा भरणा अधिक असल्याची बाब लक्षात येते. शिवरायांचे मावळे असो, लढणारे वीर मराठे असो वा पेशवाई… इथे वीरांच्या यशोगाथा मोठ्या प्रमाणावर वाचायला मिळतात. अर्थात त्या काळी स्त्रिया चुल आणि मुल यात अधिक रमणाऱ्या असल्या तरी वीरांगनांचाही इतिहास मोठा आहे. याच यादीतील एक महत्वाचं नाव म्हणजे


अनुबाई घोरपडे! घोरपड्यांची गादी सांभाळणाऱ्या आणि वेळप्रसंगी वाड्याबाहेर पडून मोहिमा लढणाऱ्या या विरांगनेचे पेशव्यांशी असलेलं खास नातं आजही अनेकांना ठाऊक नाही.

पेशवाईची नीव रचणारे बाळाजी विश्वनाथ यांचे थोरले सुपुत्र बाजीराव पेशवे हे सर्वानाच ज्ञात आहेत. पण याच पेशव्यांची धाकटी बहीण मात्र इतिहासाच्या काही मोजक्या पानांत हरवली आहे.
थोरले बाजीराव, नानासाहेब, राघोबादादा, नारायण राव, विश्वासराव…पेशवाईतील या वीरांमध्ये त्यांच्याइतकीच पराक्रमी, अनेक आघाड्यांवर लढणारी एक व्यक्ती म्हणजे थोरल्या बाजीरावांची धाकटी आणि लाडकी बहीण म्हणजे अनुबाई घोरपडे.
अनुबाई सहा वर्षांच्या असताना त्यांचा विवाह इचलकरंजीचे व्यंकटराव घोरपडे यांच्याशी झाला. पेशव्यांची ही लेक राजकारण, युद्धनिती यात रमली नसती तरच नवल! खऱंतर वयाची केवळ सहा वर्ष त्या पेशव्यांच्या अंगाखांद्यावर खेळल्या मात्र पेशव्यांमधील निडरता, चिकाटी हे गुण आपोआप त्यांच्यात रुजले.
लग्नानंतर सुरवातीला त्या संसारात रमल्या, मात्र त्यावेळीही दरबारातील राजकारण, समाजकारण यातही त्यांची रुची होती. मात्र त्यांच्या या आवडीला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन मिळालं ते पुण्यात आल्यावर!
व्यंकटराव मोहिमांवर असताना अनुबाईंना इचलकरंजीला करमत नसे, शिवाय इकडे पेशव्यांनाही धाकट्या बहिणीची आठवण येत असल्याने त्यांनी पुण्यातच त्यांच्यासाठी महाल बांधला, त्यामुळे वरचेवर पुणे स्वारी करणाऱ्या अनुबाई पुण्यातील राजकारण, दरबारी कामकाज यांकडे जातीनं लक्ष द्यायच्या.
नारायणराव आणि वेणुबाई या दोन आपत्यांच्या जन्मापर्यंत अनुबाईंचं आयुष्य सुरळीत सुरु होतं. पत्नी, आई अशा भुमिका त्या पार पाडत होत्या. मात्र काही काळानंतर त्यांच्या पतीचं क्षयरोगानं निधन झालं आणि त्यांच्यावर आभाळ कोसळलं.
वैधव्यामुळे त्या खचल्या मात्र इचलकरंजीच्या राजकारभाराकडे पहात त्यांनी आपले अश्रु गिळले. १७४५ साली मुलगा नारायणराव यांना गादीवर बसवत त्यांनी कारभार आपल्या हाती घेतला. मुलगा वयानं लहान असल्यानं महत्वाचे निर्णय, मोहिमांची आखणी, राजकारण या सर्वच बाबतीत त्या सक्रीय होत्या.
बंधू बाजीरावर यांच्या निधनानंथर त्यांनी पेशवाईतील आपल्या अनेक भाच्यांचा आधार दिला.
१७५६ साली सावनूर आणि धारवाडच्या मोहिमेत अनुबाई स्वतः रणी उतरल्या. ही मोहिम फत्ते झाल्यानंतरच त्या इचलकरंजी येथे पतरल्या. यावेळी त्यांच्या चातुर्याची तसंच युद्धनितीची महती थेट पुण्यापर्यंत पोहोचली होती. या मोहिमेत त्यांनी बेळगाव, बागलकोट, मिश्रीकोट, धारवाड यांसारखी अनेक महत्वाची ठाणी आपल्याकडे घेतली.
१७७५ च्या श्रीरंगपट्टमणच्या मोहिमेतही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली इचलकरंजीच्या सैन्याने पराक्रम गाजवला.
मात्र पराक्रमी अनुबाईंच्या मुलाने वेळोवेळी त्यांची निराशा केली. वारंवार तो मोहिम अर्धवट सोडून परतून यायचा, मात्र अनुबाई नेटाने मोहीम पुर्ण करायच्या.
अनुबाईंचे शौर्य पाहून नानासाहेब पेशव्यांनी धरावाडचा संपूर्ण परिसर अनुबाईंच्या ताब्यात दिला. यानंतर त्यांनी विविध मोहिमांव्दारे धारवाडचा संपूर्ण परिसर इचलकरंजी संस्थानाशी जोडला.
इतकंच नाही, तर पेशव्यांच्या मोहिमांमध्येही अनुबाई त्यांना विविध पद्धतीने मदत करायच्या.
एकीकडे शत्रुशी लढणाऱ्या अनुबाईंना घरात मात्र जिंकता येत नव्हतं. व्यसनी, हेकेखोर मुलापुढे त्यांचा निभाव लागत नव्हता. मात्र असं असलं तरी अशा मुलाच्या हाती सत्ता येऊ द्यायची नाही हा पण त्यांवी अखेरपर्यंत जपला.
मुलाच्या निधनानंतरही दुःख करत न बसता रयतेकडे पाहून त्यांनी नातवाला गादीवर बसवलं, आणि प्रत्यक्ष सत्तेची दोरही त्यांनी आपल्याच हाती ठेवला. १७४५ पासून तब्बल ३८ वर्ष त्या इचलकंजीची राज्यकर्ती म्हणून काम पहात होत्या.
अखेरिस घरातील कारवायांना कंटाळून त्यांनी राजसंन्यास घेतला आणि काशीस प्रयाण केलं. १७८३ साली तुळापुर येथे निधन झालं.
पेशव्यांची लेक ही एवढीच ओळख मर्यादित न ठेवता स्वतंत्र राज्यकर्ती, पतीच्या पश्चात त्याचं राज्य सांभाळणारी अर्धांगिनी, तहाच्या राजकारणातील मु्स्सद्दी शासक अशा विविध आघाड्यांवर लढणाऱ्या या पेशव्यांच्या वीर कन्या अनुबाईंविषयी फार मोजक्या लोकांना माहीत आहे. इतिहासकारांनी पण त्यांना मुख्य पटलावर आणण्याचा प्रयत्न केला नाही.
स्त्रोत :
इचलकरंजी संस्थान | Discover Maharashtra

महाराष्ट्राचे थोर सेनापती धनाजी जाधव

 


महाराष्ट्राचे थोर सेनापती धनाजी जाधव यांचे स्वराज्य घडण मध्ये अतिशय मोलाचे बलिदान आहे . संताजी घोरपडे नंतर औरंग्यास तोंड द्यायला मराठ्यांना धनाजी सारखा मोहरा मिळणे हि मोठी बाब . धनाजी जाधव हे जिजाबाईंचे खूप जवळचे नातलग. जिजाबाई यांचे वडील लखुजी जाधव आणि त्यांचे तीन मुलगे जेंव्हा निजामास भेटायला गेले तेंव्हा त्यांचा खून झाला . त्यात अचलोजी जाधव म्हणजे (लखुजी जाधव यांचा मुलगा) संताजी यास जिजाबाई नि स्वतःकडे आणले . त्यास वाढवले . हत्तीस काबूत आणण्यासाठी तो प्रसिद्द होते. त्यांचा मुलगा शंभू सिंग जाधव . याच शंभूसिंघ जाधव यांचा मुलगा म्हणजे धनाजी जाधव . शंभूसिंघ जाधव हे पावनखिंडी च्या युद्धात ३०० सैनिकासहित मरण पावले . महाराष्ट्राला तेथे बाजीप्रभू देशपांडेचे बलिदान लक्षात आहे पण त्याचवेळी शंभूसिंघ च बलिदान विसरतो .

१७०५ मध्ये धनाजी जाधव यांनी केलेली गुजरातची आक्रमण ला मराठी इतिहासात उल्लेख नाही .४ मार्च १७०६ रोजी धनाजी जाधवाने रतनपूरच्या लढाईत मोगलांचा पराभव केला.या युद्धानंतर मराठ्यांना गुजरातचे दार मोकळे झाले.इ.स.१७०१ पासून १७०५ च्या अखेरपर्यंत औरंगजेबाचा मुलगा शहजादा आझम हा गुजरातचा सुभेदार होता.गुजरातेहून आपली बदली करण्यात यावी अशी त्याने औरंगजेबाला विनंती केली.त्याप्रमाणे औरंगजेबाने काश्मीरचा सुभेदार इब्राहीमखान याची गुजरातेवर नेमणूक केली.तो येऊन रुजू होण्यास अवकाश असल्याने शहजादा आझम याने सुभेदार पदाचा ताबा गुजरातचा दिवाण अब्दुल हमीदखान यास देऊन यावे अशी औरंगजेबाने आज्ञा केली.त्यानुसार शहजादा आझम याने २५ नोव्हेंबर १७०५ रोजी अहमदाबाद सोडले.त्याच्या जागी ख्वाजा अब्दुलहमीदखान हा गुजरातचा हंगामी सुभेदार म्हणून काम पाहू लागलायाच काळात धनाजी ने गुजरातेत स्वारी केली . .पण अली महंमद याने १७६१ मध्ये फारसी भाषेत गुजरातचा इतिहास लिहिला.या ग्रंथाचे नावं मिराते अहमदी असे आहे. त्याचा हा फारसी ग्रंथ मुद्रित झाला असून त्याचे इंग्रजी भाषांतर उपलब्ध आहे.या ग्रंथात रतनपूरच्या लढाईचे वर्णन दिले आहे.[1]
धनाजी कदाचित मधुमेह असावा कारण पायाच्या असाध्य व्रण ( गॅन्गरीन ) झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असे रियासतकार म्हणतात.
धनाजी जाधवरावांच्या पुढच्या 2 पिढ्या निजामाकडून लढल्या. त्यांच्या नातवाचाही (रामचंद्र जाधव) माधवराव पेशव्यांनी राक्षसभुवन मोहिमेत पराभव केला आणि दौलताबादेत कैदेत टाकले.

"वेडात मराठे वीर दौडले सात …."

 


"वेडात मराठे वीर दौडले सात …."

कुसुमाग्रजांच्या लेखणीतून आलेल्या आणि लता दिदींनी गायलेल्या या ओळी ऐकून अंगात जणू स्फुरण चढते. या ओळी ज्या सात विरांविषयी आहेत त्यातील आघाडीचे म्हणजे सरसेनापती प्रतापराव गुजर होय. कुडतोजी गुजर यांचा जन्म १६१५ साली भोसरे (ता. सातारा) या गावी झाला. मोघलांच्या जाचाला कंटाळून भोसरे गावाच्या सुरक्षेसाठी आणि महिलांच्या अब्रूला जपण्यासाठी कुडतोजी एकटे मुघलांच्या विरोधात लढत होते.
एकदा अशीच मुघलांची लुट दोन मोघलांच्या विरोधकांनी केली, विजय झाला परंतु आता हे धन कोणाचे यावरून वाद झाला. हे दोघे होते छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे कुडतोजी गुजर. महाराजांनी कुडतोजीना स्वराज्याच्या कल्पनेविषयी सांगितले, कुडतोजी काहीही मागेपुढे विचार न करता स्वराज्याच्या कामात रुजू झाले. हि अशी कथारूपी प्रतापरावांची आणि महाराजांची भेट सांगितली जाते, याचा ऐतिहासिक संदर्भ मात्र सापडत नाही. असो.
सरसेनापती प्रतापराव उर्फ कुडतोजी गुजर
म्यानातुनि उसळे तरवारीची पात !! वेडात मराठे वीर दौडले सात ....
कुडतोजी गुजर स्वराज्यात असताना त्यांनी अनेक पराक्रम केले. कुडतोजीचे प्रतापराव कसे झाले?
मिर्झाराजे स्वराज्यावर चाल करून आले. पुरंदरचा घेराव करण्याचा प्रयत्न मिर्झाराजांनी केला होता. दिलेरखान एखाद्या चिवट किड्यासारखा पुरंदरला घेराव करत चिटकून बसला होता. पुरंदरचा पाठीराखा वज्रगड पडला, महाराजांची चिंता वाढली. दोन वेळेस महाराजांनी पंतांना मिर्झाराजे जयसिंग यांच्याशी संभाषण करण्याचे सुचविले. तह करण्याचा विचार त्यांना सांगण्यात आला परंतु मिर्झाराजांनी दोनही वेळेस नकार दिला. पंतांसोबत दोन्ही वेळेस सोबतीला कुडतोजी गुजर होते. स्वराज्यावर खूप मोठे संकट होते, रयतेवर मिर्झाराजांचे सैनिक जुलूम करत होते. कुडतोजीरावाना हे बघवले गेले नाही, त्यांनी महाराजांना न सांगता त्यांनी एक धोक्याचे पाऊल उचलले.
मिर्झाराजे बुद्धिबळाचा खेळ संपवून आपल्या तंबूत जात होते. तंबू मध्ये एक मराठा सैनिक मिर्झाराजांवर वार करण्यासाठी पुढे आला, परंतु मिर्झाराजांच्या अंगरक्षकाने त्याला पकडले. चेहरा मिर्झाराजांच्या ओळखीचा होता. मिर्झाराजांनी ओळखले, मावळा होता कुडतोजी गुजर! स्वराज्यावर आलेले संकट एका घावात ठार करून परतून लावण्याचा हा कुडतोजींचा असफल परंतु धाडसी पहिला प्रयत्न होय.
मिर्झाराजांनी कुडतोजीना सोडण्यास सांगितले.मिर्झाराजांनी त्यांच्या या कृत्याची विचारणा केली, त्यांच्या लक्षात आले कि हि अशी अयशस्वी चाल शिवरायांची मुळीच नसणार, त्यांनी कुडतोजीना शिक्षा न करता त्यांची सन्मानाने पाठवणी केली. या पाठवणी मागे मिर्झाराजांचा उद्देश हा मावळ्यांना स्वतःकडे आकर्षित करून सामील करून घेण्याचा होता. परंतु महाराजांचा आपल्या स्वराज्याचा प्रत्येक मावळा महाराजांशी आणि स्वराज्याशी एकनिष्ठ होता. कुडतोजी मिर्झाराजांनी भेट दिलेल्या घोड्यावर बसून परतले. महाराजांच्या समोर हजार झाले, तोपर्यंत कुडतोजींचा पराक्रम महाराजांच्या कानावर आला होता.
महाराज कुडतोजींच्या या आतघाई पणा वर थोडेसे रागावले. स्वराज्याच्या कठीण काळात कुडतोजीरावांसारख्या वीराची स्वराज्याला गरज आहे, हे त्यांनी कुडतोजीना समजावून सांगितलं. कुडतोजीराव जाण्यासाठी निघाले असता महाराज म्हणाले जर शत्रू तुमच्या पराक्रमाची प्रशंसा करतोय तर आम्ही का नाही करावी?
कुडतोजींना त्या दिवशी या प्रतापाबद्दल प्रतापराव हे नाव देण्यात आले व कुडतोजीराव गुजर आता स्वराज्याचे प्रतापराव गुजर झाले. मिर्झाराजांचे संकट राजांनीयुक्तीने परतून लावल्यानंतर पन्हाळा किल्ला घेण्याच्या प्रयत्नात असताना, नेतोजीराव पालकर स्वराज्यातून बाहेर पडले असता सरसेनापती हे पद प्रतापरावांकडे आले. प्रतापराव स्वराज्याचे तिसरे सरसेनापती झाले.
प्रतापरावांचा पराक्रम हा महाराज आग्र्याला कैदेत असल्या पासून एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला. मोरोपंतानी बागलाण आणि नाशिक प्रांत लढवला तर प्रतापराव औरंगाबाद प्रांतात स्वराज्याचा विस्तार करत चालले होते. बागलाण प्रांतातील साल्हेर किल्ला मराठ्यांनी ताब्यात घेतला. साल्हेर म्हणजे कळसुबाई शिखरानंतर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर! साल्हेर म्हणजे जणू औरंग्याच्या साम्राज्यात घुसलेली तलवारच होती.
औरंगजेबाला काहीही करून आता स्वराज्यात हस्तक्षेप करायचा होता, त्यामुळे त्याने इकलासखान, दिलेरखान, बहलोलखान आणि सोबतीला बहादूरखान स्वराज्यावर चाल करून पाठवले. दिलेरखान आणि बहादूरखान बागलाण मध्ये येऊन दोन वेगवेगळ्या मार्गांनी स्वराज्यावर चाल करून गेले. इकलासखान आणि बेहलोलखान साल्हेरला वेढा देऊन बसले. साल्हेरचा वेढा फोडणे कठीण होते कारण बागलाण हा प्रांत स्वराज्याच्या गनिमिकाव्याला योग्य नाही. मैदानी मुलुख, डोंगरदऱ्या तशा नावालाच....
महाराजांनी आणि संपूर्ण स्वराज्याने मैदानी भागात लढलेली ही पहिली लढाई. सूर्यराव काकडे व मोरोपंत पिंगळे आणि औरंगाबाद हून प्रतापराव आणि आनंदराव मकाजी साल्हेरवर चाल करून आले. इथे मोठा पराक्रम झाला, इकलास खान चा दारूण पराभव झाला. प्रतापराव घोडदळाचे प्रमुख नेतृत्व करत होते, मुघलांच्या घोडदळाला पाठीवर घेत दूर घेऊन गेले. आनंदराव सोबतीला येताच त्यांनी मुघल घोडदळ कापून काढले. असंख्य मोघल सैन्य आणि मराठा सैन्य मारले गेले. मराठ्यांचा विजय झाला परंतु या लढाईत स्वराज्याचा कर्ण सूर्यराव काकडे मारले गेले.
बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला.
मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.
शिवाजी महाराजांना खबर पोहोचली,
“प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!”
आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. त्याकाळी मावळ्यांचा शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल.
महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी?
हा एकच प्रश्न कुडतोजींना दिवसरात्र सतावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा ..!! आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही.
अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे?
तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.
बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला.
त्या सात जणांनी मरणाला समोरा समोर ट्क्कर दीली. वास्तवीक पाहता एवढ्या मोठ्या सैन्यासमोर ते सात जण कीती टीकणार?? ते जास्त वेळ तग धरु शकले नाहीत. पण त्यांनी पाय मागेही फीरवले नाहीत व महाराष्ट्राच्या सात वीरांना वीर मरण आले. कुरतोडजी बरोबर असणारे हे सात वीर म्हणजेच सरदार विसाजी बल्लाळ, दिपाजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल, विठोजी होते. या सात जणांनी खानाच्या सैन्याशी निकराचा लढा दिला, मात्र सातही जणांना वीर मरण आले.
केवळ सात जण पंधरा हजार सैन्यावर चढाई करतात यातच सर्व काही आले. दुर्दम्य विश्वास, पराकोटिचे स्वामी प्रेम, शौर्य सार… सार काही. प्रतापरावांप्रमाणेच ते सहा सरदार ही, स्वामीनीष्ठ!
त्यातील एकाचेही पाय मरणाला भीऊन डगमगले नाहीत. की त्यांनी आपल्या सेनापतीला पराव्रुत्त करण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त स्वामींच्या एका कटाक्षाने हे वीर मरणाच्या स्वाधीन व्हायला तयार झाले.
प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार मरण पावले. महाराजांना अतीव दु:ख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली. मात्र शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं. पराक्रमाला एक नवं कोंदण मिळालं होतं.
प्रतापरावांचे स्मारक नेसरी या गावी आहे. त्यांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक नाही.. एका स्मारकाची सुरुवात भुईकोट किल्ला रूपाने सुरु झाली होती. परंतु ते काम अपूर्ण राहिले आहे. सध्या ते पडीक एक खंडहर अवस्थेत आहे.
एवढ्या महान व्यक्तिमत्वाचे स्मारक झाल्यास भोसरे गाव पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येईल. पर्यायाने गावाचा खूप मोठा विकास होईल.

नागपूरचे राघोजी भोसले


 नागपूरचे राघोजी भोसले हे शिवाजी महाराजांचे चुलत आजोबा विठोजी भोसले यांचे वंशज नाही.

तस पहिला तर नागपूरचे भोसले संस्थान स्थापन केले राघोजी भोसले यांनी. खूप बंगाली आणि भारतीय लोक बंगाल वर अनन्वित हल्ल्यासाठी जसे मराठ्यांना जबाबदार धरतात.त्यांनी हे पण लक्षात ठेवले पाहिजे जिथपर्यंत मराठ्यांनी बंगाल मध्ये धडक मारली तीच भाग हिंदू चां राहिला आहे. जिथे मराठ्यांनी धडक मारले नाही तो सर्व भाग आज बांगलादेश झालंय . बांगलादेश मध्ये मुस्लिम करण वसाठी शिवाजी महाराजांच्या हातातून पळून गेलीला शाहिस्तेखान जबाबदार आहे.
मुळातच नागपूर शहराचा इतिहास देवगडचे गोंड राजे बख्त बुलंदशाह, त्यांचे पुत्र चांद सुल्तान व त्यानंतर राजे रघुजी भोसले यांच्या कारकीर्दीत बहरलेला आहे. १७४२ पासून भोसले राजवट सुरू झाली.
उदयपूर च्या रानांच्या वंशज असल्याचे ते सांगतात.(महाराणा प्रताप).पूर्वी अहमदनगर निजामशाही मध्ये ते सरदार होते.त्यांनां उमरावती व भाम गांवें इनाम होतीं. या घराण्याचा मूळ पूरुष मुधोजी व त्याचा भाऊ रुपाजी यांनीं पुणें जिल्ह्यांतील मौजे हिंगणी तर्फ पाटस येथील पाटिलकी खरेदी केली. हे दोघे शिवाजी महाराज यांच्या हाताखालीं फौजेंत होते. रुपाजीस अपत्य नव्हती;मुधोजीस सात मुले होती.
सात भावा मध्ये पारसोजी भोसले हे संभाजी महाराज च्या कटा मध्ये अण्णाजी दत्तो च्या बाजूला होते. पण संभाजी महाराजांची सरशी झाल्यावर त्याने खानदेशात निघून गेले.पण काही वर्षांनी राजाराम महाराज सत्तेवर आल्यावर पुन्हा ते परत आले . त्यावेळी परसोजि ने विदर्भात अमल बसवला.त्यावेळी राजाराम महाराज ने सेनासहेब सुभा हे पद निर्माण केलेते परासोजी साठी. राजाराम महाराजांच्या गंगा थाडीच्या प्रसिद्ध मोहिमेत पारासोजी भोसले होते.
ज्यावेळी शाहू महाराज आणि ताराबाईच्या संघर्ष झाला टायवेली परासिजी ने शाहू महाराजांची बाजू घेतली.जेंव्हा ताराबाईने काही लोकं शाहू महाराज तोतया आहे का नाही ते पाहायला जेंव्हा काही सरदार जेंव्हा शाहू महाराज बरोबर पंक्तीला आले होते त्यावेळी परासोजि भोसले चे मोठे भाऊ बापूजी भोसले त्या पंक्तीत जेवले होते.
शाहू महाराजांनी परासोजि भोसले यांचे सेनासहेब सुभा हे पद कायम केले .त्यावेळी परासोजि भोसले कडे 15000 फौज होती. त्यांना विदर्भ आणि गोंडवन चे सह जिल्हे शाहू महाराजांनी दिले.परासोजि भोसले 1809 मध्ये मरण पावला नंतर कान्होजी भोसले कडे जबाबदारी आली. पण तो आटिशाय तापट होता. बालाजी विश्वनाथ जेंव्हा सय्यद भावाणा मदत करायला दिल्ली का गेले तेंव्हा कान्होजी गेले नाही त्यावेळी त्यांचे चुलत भाऊ संताजी आणि राणोजी ल बाळाजी विश्वनाथ यांच्या बरोबर पाठवले. त्यात संताजी दिल्लीत मारला गेला. कान्होजी भोसले वर शाहू महाराज नाराज झाले. आणि त्याने पहिला रघुजी भोसले कडे जबाबदारी दिली.
पारासोजि भोसले चे मोठे भाऊ बापूजी भोसले यांचे मोठे मुलगे बिंबजी . आणि या बिंबाजी च मुलगा म्हणजे रघुजी प्रथम. मूळचे पुणे प्रांतातील हिंगणीचे. त्याचा जन्म पांडववाडी (वाई-सातारा जिल्हा) येथे झाला असावा. त्याचे वडील बिंबाजी त्याच्या लहानपणीच वारले. त्याचे संगोपन आई काशीबाई व आजी बयाबायी यांनी केले असे दिसते यांनीच नागपूरच्या भोसले संस्थानचा स्थापना केली. बंड्यापासूनी चांद्यापर्यंत हे स्वराज्य झाले त्यात राघोजी भोसले च पण हात आहे. त्यांनी ओडिशा बंगाल पर्यंत धडक मारली. भास्कर पंत कोल्हटकर हे त्यांचे मुख्य सरदार. पूर्ण बंगाल राघोजी आणि भास्कर पंत का घाबरट होते.
कान्होजी ला पुत्र नसल्यानें त्याने रघुजी आपल्याजवळ नेलें. कान्होजीस पुढें रामाजी नांवाचा पुत्र झाल्यावर, याच्यावरचें त्याचें खागा मर्जी झाली व नंतर तर दोघांत शत्रुत्व आलें. तेव्हां रघूजी हा कान्होजीवर रुसून देवगडच्या चांदसुलतान नांवाच्या गोंड राजाकडे १०० स्वारांसह गेला; तेथें कांहीं दिवस राहून, एलिचपूरच्या नबाबकडेहि थोडे दिवस राहिला आणि मग सातार्यास शाहूच्या जवळ गेला व गोविंदराव चिटणीस, फत्तेसिंग भोंसले व श्रीपतराव प्रतिनिधि यांच्या तर्फें त्यानें शाहूशीं चांगले संबंध राखले.. फतेसिंगाबरोबर कर्नाटकाच्या स्वारींत रघुजीनें जाऊन उत्तम पराक्रम केला. एकदां शाहूमहाराज शिकारीस गेला असतां, नेम चुकल्यानें वाघानें त्याच्यावर चाल केली, तेव्हां रघुजीनें मध्यें घुसून वाघास ठार केलें; रघुजीची बायको सुकाबाई व शाहूमहाराजांची धाकटी राणी सगुणाबाई या चुलतबहिणी होत्या; इत्यादि कारणानें शाहूची मर्जी रघूजीवर बसली व त्यास सेनासाहेबसुभा हें पद मिळालें
नागपूर त्यावेळी गोंडवन साम्राज्याची राजधानी होती जिथे देवगडच्या गोंड घराण्याचे राज्य होते. छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडचा गोंड राजा बख्त बुलंद शहा याने १७०२ साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली.बख्त बुलंद शहानंतर त्याचा मुलगा राजा चांद सुलतान देवगडच्या गादीवर आला. त्याने १७०६ साली त्याची राजधानी नागपुरास हलवली.
१७३९ साली राजा गोंड यांचे निधनानंतर त्यांच्या वर्षांमध्ये वाद उद्भवला. रघुजी त्यावेळी मराठ्यांच्या वतीने बेरार प्रांतात शासन करीतहोते. राजाच्या विधवाने मराठ्यांच्या वतीने रघुजींची मदत मागितली. रघुजींनी मध्यस्ती करून राजा गोंडच्या दोन पुत्रांना ज्यांना आधी राज्याबाहेर काढून बेरारला धाडण्यात आले होते, राज्य दिले. पण १७४३ मध्ये दोन भावात परत वाद उद्भवला. थोरल्या भावाने परत रघुजींना विनंती करून हस्तक्षेप करण्यास सांगितले. तेव्हा रघुजींनी थोरल्या भावयाविरोधातील बंडाळी मोडून काढली. पण कमी काळात दोनदा एवढ्या जवळ हाती आलेली सत्ता परत न करण्याचा मोह रघुजींना आवरला नाही आणि त्यांनी गोंड राजा बुरहान शानला, फक्त राजकीय बाहुले बनवून खरी सत्ता आपल्या हातात घेतली.

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...