विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 5 September 2026

सीपीआर हॉस्पिटलला प्रमिला राजेंच्या कर्तुत्वाची चमकती किनार .

 या प्रमिला राजे म्हणजे कोण ?


सीपीआर हॉस्पिटलला प्रमिला राजेंच्या कर्तुत्वाची चमकती किनार .
सुधाकर काशीद .
या ना त्या निमित्ताने सीपीआर हॉस्पिटल चे नाव किंवा संदर्भ कोल्हापूरकरांच्या तोंडात रोज येतोच . सी.पी .आर . हॉस्पिटल म्हणजे छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल हे काहीजणांनाच माहिती आहे .कारण एखाद्या शब्दाचा अपभ्रंश झाला की मूळ शब्दच विसरला जातो. नेमके तसेच सीपीआर बाबतीत झाले आहे .
सी .पी .आर .म्हणजे छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल हे काहींना माहीत असले तरी या प्रमिलाराजे कोण हे मात्र राजघराण्याचा परिवार व नातेवाईक मंडळी यांच्या पुरतेच माहित आहे . पण या प्रमिला राजे कोण हे या नव्या पिढीला माहीत होण्याची गरज आहे. कारण राजघराण्याचा घटक म्हणून त्यांची जत सांगली, कोल्हापूर व मध्य प्रदेशातील देवासच्या इतिहासात एक खूप चांगली वेगळी अशी नोंदआहे.
प्रमिला राजे या सांगली जिल्ह्यातील जतचे रामराव उर्फ आबासाहेब डफळे यांच्या कन्या. एक ऑगस्ट 1910 रोजी त्यांचा जन्म झाला त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जत येथे झाले . त्यांचा विवाह 30 डिसेंबर 1926 रोजी युवराज विक्रमसिंह पवार देवास संस्थान यांच्याशी झाला .त्यांना चार मुले शालिनी राजे,कृष्णाजीराव,विजयाराजे व उर्मिलाराजे ही चार मुले .
1941 साली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात विक्रम सिंह महाराजांना रणांगणावर जावे लागले .त्यावेळी त्यांनी देवास संस्थानचा प्रभारी कारभार रिजंट म्हणून प्रमिला राजे यांच्यावर सोपवला .रिजंट म्हणून काम करताना त्यांनी संस्थांनच्या आर्थिक उलाढालीवर विशेष लक्ष केंद्रित केले .त्यांच्याच काळात त्यांनी आपल्या संस्थांनला कर्जमुक्त केले .1941 ते 1943 हा त्यांचा देवासच्या काळातील रिजंट असलेला काळ इतिहासात वेगळी नोंद करणारा ठरला . एक रुपयाला सात शेर गहू आणि दहा शेर ज्वारी रयतेला देण्याची जबाबदारी त्यांनी अगदी नियमीत पार पाडली .
त्यांचे पती विक्रम सिंह महाराजांना 1947 ला कोल्हापूर संस्थानात दत्तक घेण्यात आले . व त्यांचे नामकरण शहाजी महाराज झाले . दत्तक विधान समारंभानंतर प्रमिला राजेही कोल्हापूर संस्थांच्या महाराणी बनल्या .मात्र त्यांनी त्यानंतर ही काही काळ देवास संस्थांनचे रिजंट म्हणून कारभार पाहिला .दत्तक विधानामुळे कोल्हापूर संस्थांनच्या महाराणी बनलेल्या प्रमिला राजेंना त्याच वेळी देवास संस्थांनचाही कारभार पाहण्याचा मान मिळाला .
अतिशय धार्मिक व प्रेमळ वृत्तीच्या प्रमिला राजे यांनी 1961 मध्ये शहाजी महाराजांच्या सोबत आफ्रिका,युरोप,अमेरिका,जपान या देशांचा दौरा केला .1962 ला शहाजी महाराज व प्रमिला राजे यांनी नागपूरकर भोसले घराण्यातील दिलीपसिंह यांना दत्तक घेतले व त्यांचे नामकरण शाहू असे केले .हेच आत्ताचे आपले खासदार श्रीमंत शाहू छत्रपती .
प्रमिला राजे यांचे माहेर जत (जिल्हा सांगली ) येथील डफळे घराण्यातील .त्यांना विजयसिंह भाऊसाहेब व भैय्यासाहेब हे तीन भाऊ विजयसिंह लष्करात लेफ्टनंट कमांडर होते . भैय्यासाहेब हे भारतीय नौसेनेत अधिकारी होते .व निवृत्तीनंतर राज्य परिवहन मंडळाचे प्रमुख अधिकारी होते .
प्रमिला राजे या अतिशय विनम्र स्वभावाच्या होत्या .सेवकांनाही हो असा मान देऊन त्या बोलत होत्या .मुलींच्या शिक्षणाबद्दल त्या फार आग्रही होत्या . महाराणी इंदुमती देवीनी स्थापन केलेल्या मुलींच्या शाळेच्या कारभारात त्या लक्ष घालत होत्या .त्यांच्या वेगळ्या अशा कामगिरीचा अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल म्हणजेच कोल्हापूरच्या सरकारी दवाखान्याला छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल असे नाव देण्यात आले .आणि प्रमिला राजेंना गौरविण्यात आले . मात्र हळूहळू छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल या नावाचा शॉर्टकट "सीपीआर हॉस्पिटल "असा झाला .आणि नव्या पिढीने तर प्रमिलाराजे या कोण हे समजून घेण्याचा प्रयत्न अगदी फार थोडा केला .
आता काही दिवसापूर्वी या हॉस्पिटलचे जतन व संवर्धन अतिशय कौशल्याने केले आहे छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटलची ही वास्तू पुन्हा नव्या दिमाखाने उभे आहे . त्यानिमित्ताने प्रमिला राजे हॉस्पिटल हे नाव लोकांच्या जरूर तोंडात आहे .पण या प्रमिला राजे कोण हे नव्या पिढीपर्यंत पोहोचल्यास प्रमिला राजे हॉस्पिटलला एक नव्या ओळखीची किनार आपोआपच जोडली जाणार आहे .

भोपाळची लढाई

 

भोपाळची लढाई

Bajirao besieged the Nizam at Bhopal and defeated him. Treaty of Bhopal led to concession of Malwa
(७ जानेवरी) दिल्लीवरील स्वारीनंतर माघारी फिरणाऱ्या मराठ्यांचा मार्ग रोखण्यासाठी बादशहाने निजामाकडे मदत मागितली; परंतु बाजीरावाने भोपाळ येथे निजामाला वेढा घातला आणि त्याचा पराभव केला. भोपाळच्या तहामुळे माळव्याचा (नर्मदा आणि चंबळ नद्यांमधील प्रदेश) ताबा मराठ्यांना मिळाला; उत्तरेकडील प्रदेशाच्या रूपाने मराठ्यांची ही पहिलीच औपचारिक प्रादेशिक मिळकत ठरली.

हिंदवी स्वराज्य ते मराठा साम्राज्य - चरणी तत्पर जवळकर घराणे निरंतर

 


हिंदवी स्वराज्य ते मराठा साम्राज्य - चरणी तत्पर जवळकर घराणे निरंतर

🚩
सिंहगड म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेतील सर्वात जुना साक्षीदार. या किल्ले सिंहगडाच्या घेऱ्यामध्ये असंख्य घराण्यांनी आपल्या पराक्रमाने हिंदवी स्वराज्य ते मराठा साम्राज्य अशी अविरत सेवा केली.
छत्रपती शहाजीराजांच्या काळापासून या परिसरातील अनेक घराण्यांचे उल्लेख विविध गावांच्या महजरांमधून आढळतात. यातीलच एक पुरातन आणि मानाचे घराणे म्हणजे मौजे खानापूर येथील जवळकर घराणे.
१. खानापूरचे जवळकर - एक पुरातन वतनदारी
खानापूर येथील जवळकर घराण्याची वतनदारी ही पुरातन काळापासून आहे. येथील पाटीलकी परंपरेने जवळकर घराण्याकडे आहे.
ऐतिहासिक महजरांमधून संताजी पाटील जवळकर यांचा उल्लेख शिवकालीन कागदपत्रांमध्ये स्पष्टपणे आढळतो. तसेच खानापूरमधील जाधव घराण्यासोबतही या घराण्याचा निकटचा संबंध महजरांमधून दिसून येतो. सिंहगड परगण्याच्या महसूल आणि संरक्षण व्यवस्थेत या घराण्याचे योगदान अनन्यसाधारण आहे.
२. थोरल्या शाहू महाराजांकडून इनाम आणि सरंजाम
छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या काळात एकनिष्ठपणे सेवा केल्याबद्दल सरदार अंतोजीराव जवळकर यांना खास इनाम देण्यात आले. याबाबतचे मूळ मोडी दस्तऐवज आज आमच्या संग्रहात उपलब्ध झाले आहेत.
शिवाय अंतोजीराव जवळकर यांना लष्करी सरंजाम देखील बहाल करण्यात आला होता, याचेही पुरावे त्या कागदपत्रांमधून मिळतात.
३. ऐतिहासिक मोडी पत्र - थेट पुरावा
आम्हाला प्राप्त झालेल्या मोडी पत्रातील मजकूर पुढीलप्रमाणे -
"अंतोजी जवलकर यांची येकनिष्ठ पण सेवा करीत आहे त्यास मौजे आलंदी का. कडूस प्रांत पुणे येथे जमिन पड चावर येक ईनाम दिले पाहिजे."
मोडी लिप्यंतर : मा. श्री. शुभमराव भोसले (लऊळकर)
या एका ओळीवरून दोन महत्त्वाचे निष्कर्ष निघतात :
अ) जवळकर घराण्याचे मूळ गाव खानापूर असून त्यांना चोराची आळंदी (ता. खेड, प्रांत कडूस) येथे इनाम मिळाले.
ब) खानापूर आणि आळंदी येथील जवळकर हे एकाच भाऊबंदकीतील आहेत हे यावरून सिद्ध होते.
४. पुढील संशोधन
किल्ले सिंहगडाच्या घेऱ्यातील असंख्य घराण्यांचा अज्ञात इतिहास अजूनही बाहेर येणे गरजेचे आहे. या घराण्याकडे असलेली सरंजामी आणि इनामाची कागदपत्रे आम्हाला सापडली असून सदर सरंजामीमध्ये कित्येक गावांचा समावेश आहे. त्याची सविस्तर माहिती आम्ही लवकरच पुराव्यासह प्रसिद्ध करू.
तळटीप;-:-
या निमित्ताने सिंहगडाच्या पायथ्याशी स्वराज्यासाठी झटणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात वीरांना मानाचा मुजरा.
याबद्दल ऐतिहासिक मोडी कागदपत्रे आपल्या कडे उपलब्ध आहेत
विशेष आभार :- अक्षयराव जाधव खानापूरकर
आपला,
संतोष झिपरे
संस्थापक - राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद, महाराष्ट्र राज्य
९०४९७६०८८८

वीरजी व्होरा - शिवरायांनी केलेल्या सुरत लुटीचे सर्वात मुख्य टार्गेट असलेला हा असामी

 


वीरजी व्होरा - शिवरायांनी केलेल्या सुरत लुटीचे सर्वात मुख्य टार्गेट असलेला हा असामी.हा व्यापारी म्हणजे तत्कालीन भारताच्या सर्वात मोठ्या व्यापारी केंद्रातील सर्वात श्रीमंत माणूस होता.तेव्हाचा बिल गेट्स म्हणा हवं तर.

- डच रेकॉर्ड्स प्रमाणे हा तत्कालीन जगातील सर्वात श्रीमंत माणूस होता.याची वैयक्तिक संपत्ती ८० लक्ष (तत्कालीन) रुपये होती,तर व्यापारी उलाढाल काही कोटींमध्ये होती. (तेव्हाचे १ कोटी आताचे सुमारे ७५०० कोटी )
- मराठा साम्राज्याचे तत्कालीन उत्पन्न १५-२० लाखांच्या आसपास होती, यावरून वीरजी व्होरा च्या प्रचंड संपत्तीचा अंदाज येतो.
- भारतात आग्रा, सुरत, भडोच, कोकण, गोवलकोंडा, म्हैसूर, मद्रास तर सुरतेमधून जाण्यार्या एकूण महसुलापैकी लाखो रुपयांचा महसूल केवळ वीरजी व्होरा एकटा भरत असे.सुमारे ७ देशांमध्ये याच्या व्यापारी शाखा होत्या.
- इस्ट इंडिया कंपनीला याने जवळपास १० लाख रुपये व्यापारासाठी दिले होते, तसेच मोगल, पर्शियन, आर्मेनियन, फ्रेंच, डच, हबशी, पोर्तुगीज, अफगाणी, इराणी व्यापार्यांना याने सावकारी कर्ज दिले होते.
- संपूर्ण भारत ४ वर्ष वापरू शकेल इतकी चांदी याच्या गोदामात असते, असे वीरजी व्होरा बद्दल बोलले जाई.
- शिवरायांनी वीरजी व्होरा आणि अन्य ४ व्यापार्यांना संरक्षणाची हमी दिली व सुरत वर हल्ला करणार नाही अशि ग्वाही दिली होती,परंतु वीरजीने हि मागणी मग्रुरीने धूडकावली आणि याचे परिणाम त्याला भोगावे लागले.
- सुरत लुटीच्या वेळी मराठ्यांनी त्याची सगळी गोदामे आणि पेढ्या फोडून साफ केल्या. त्या दिवशी सोने, चांदी, मोती, रत्ने वगळून सुमारे ३०० ते ५०० हशम हातात प्रत्येकी २ पोती घेऊन शामियान्यात दाखल झाले होते. वीरजी व्होराच्या घरातून सुमारे ६००० किलो सोने, २८ पोती भरून मोती, हिरे आणि माणके, सुमारे ५० लाख रुपये रोख असा भरमसाठ ऐवज... ऐवज कसला, साक्षात कुबेराचा खजिनाच जणू प्राप्त झाला होता.
- सुरत च्या लुटीमध्ये सर्वात मोठे नुकसान वीरजी व्होराचेच झाले,यातून सावरायला काही वर्ष गेली तोच शिवरायांनी सुरत वर दुसर्यांदा हल्ला केला यातून मग वीरजी सावरला नाही आणि अंथरुणाला खिळला.
- जगातील सर्वात शक्तिशाली मुघल साम्राज्याला कर्ज देणारा हा व्यापारी शिवाजी महाराजांनी दिलेल्या तडाख्यामुळे धुळीस मिळाला आणि याच धक्क्यात १६७५ साली मृत्यू पावला.
संदर्भ - इस्ट इंडिया कंपनी रेकॉर्ड्स.

माचनूरची माती सांगतेय इतिहास… औरंगजेबाची छावणी आणि संताजी घोरपडेंच्या पराक्रमाची साक्ष

 






माचनूरची माती सांगतेय इतिहास… औरंगजेबाची छावणी आणि संताजी घोरपडेंच्या पराक्रमाची साक्ष

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले माचनूर हे आज एक शांत गाव म्हणून ओळखले जाते. मात्र, या परिसराच्या मातीत मराठा-मुघल संघर्षाच्या काळातील अनेक ऐतिहासिक आठवणी दडलेल्या आहेत. सुमारे सतराव्या शतकाच्या अखेरीस दख्खन जिंकण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत आला होता. सोलापूर परिसरात त्याचा प्रदीर्घ मुक्काम राहिला आणि माचनूर परिसरात मुघल सैन्याची महत्त्वाची छावणी उभारण्यात आली होती.
मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे मुघल सैन्याला मोठा त्रास सहन करावा लागत होता. सरसेनापती संताजी घोरपडे आणि सेनापती धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्य अचानक हल्ले करून मुघलांची रसद आणि सैनिकी व्यवस्था विस्कळीत करत असे. माचनूरचा किल्ला आणि त्याच्या आसपासचा परिसर हा या संघर्षाचा महत्त्वाचा साक्षीदार ठरला. भीमा नदीच्या दोन्ही तीरांचा वापर करत मराठे रात्रीच्या वेळी अचानक छावणीवर धडक देत आणि पुन्हा सुरक्षितपणे माघारी परतत असल्याचे स्थानिक ऐतिहासिक संदर्भांत नमूद केले जाते.
या काळात संताजी घोरपडे हे मुघलांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरलेले मराठा सेनापती होते. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत त्यांनी धनाजी जाधवांसह मुघलांविरुद्ध प्रभावी लढा दिला. त्यांच्या वेगवान हालचाली, अचानक हल्ले आणि गनिमी काव्याच्या युद्धपद्धतीमुळे मुघल सैन्यावर मोठा दबाव निर्माण झाला होता. मराठी विश्वकोशातही संताजी घोरपडे यांच्यासह मराठा सरदारांनी मुघलांविरुद्ध केलेल्या संघर्षाचा उल्लेख आहे.
संताजी घोरपडे यांच्या आयुष्याचा शेवट मात्र अत्यंत दुःखद झाला. इ.स. १६९६ मध्ये त्यांची हत्या झाली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे शिर बादशहाकडे नेण्यात आल्याचे विविध ऐतिहासिक संदर्भांत नमूद आहे.
माचनूर परिसराशी जोडली जाणारी एक स्थानिक ऐतिहासिक परंपरा अशीही सांगते की, संताजींच्या मृत्यूनंतर त्यांचे शिर औरंगजेबाच्या छावणीच्या परिसरात आणण्यात आले होते. मात्र, हे नेमके माचनूर येथेच घडले, याबाबत उपलब्ध प्रमुख ऐतिहासिक स्रोतांमध्ये स्पष्ट आणि निर्विवाद नोंद आढळत नाही.

अंबोजी इंगळे यांचा गोसाव्यांवर विजय...!!

 


अंबोजी इंगळे यांचा गोसाव्यांवर विजय...!!

डिसेंबर १७९१ मध्ये महादजी शिंदे यांचे सरदार अंबोजी इंगळे यांचा मुक्काम चित्तोडगडजवळ होता. त्याच वेळी चित्तोडचे सुमारे पाच ते सात हजार गोसावी एकत्र जमून त्यांनी मराठा फौजेवर अचानक चाल केली.
दोन्ही बाजूंमध्ये तुंबळ लढाई झाली. या लढाईत मराठ्यांनी गोसाव्यांचा पराभव केला. सुमारे पाचशे गोसावी जखमी व ठार झाले, तर उरलेले शिकस्त खाऊन पळून गेले.
"चितोडकर गोसावी पांच सात हजार जमा होऊन, अंबोजी इंगळे यांजवर चालोन आले. परस्परें लढाई जाली. पांचशें गोसावी जखमी व ठार जाले. तदनंतर शिकस्त खाऊन पळोन गेले. इंगळेमजकुराचे फौजेचा मुक्काम चितोडगडनजीक आहे."
राजपुतान्यात मराठ्यांच्या फौजेला सतत अशा लढायांना सामोरे जावे लागत होते, याची ही समकालीन नोंद आहे.
संदर्भ : दिल्ली येथील मराठ्यांचीं राजकारणें (भाग २), संपादक – दत्तात्रय बळवंत पारसनीस, लेखांक ७३ (डिसेंबर १७९१).

महादजी शिंदे आणि दिल्ली दरबारातील मान...!!

 




महादजी शिंदे आणि दिल्ली दरबारातील मान...!!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक घटना मराठा इतिहासात विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण त्या घटनांनी स्वराज्याची पायाभरणी केली आणि मुघल सत्तेला मोठे आव्हान दिले. पुढे याच स्वराज्याचा विस्तार मराठा साम्राज्यात झाला. त्या विस्तारातील अनेक घटना महत्त्वाच्या असल्या, तरी १८ नोव्हेंबर १७७१ रोजी मुघल बादशहा शाह आलम (दुसरा) यांच्या दरबारात महादजी शिंदे यांना मिळालेला मान हा मराठा साम्राज्याच्या उत्तर हिंदुस्थानातील वर्चस्वाचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. कारण या प्रसंगातून दिल्लीच्या राजकारणात मराठ्यांचे स्थान किती उंचावले होते, हे स्पष्ट दिसते.
या घटनेचे महत्त्व समजून घेण्यासाठी पानिपतनंतरची परिस्थिती पाहणे आवश्यक आहे. १७६१ च्या पानिपत युद्धानंतर मराठ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अनेकांना मराठ्यांची ताकद संपली असे वाटत होते. पण पुढील दहा वर्षांत महादजी शिंदे यांनी उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचा प्रभाव पुन्हा निर्माण केला. दिल्लीतील राजकारणात त्यांचे महत्त्व वाढले आणि मुघल बादशहा शाह आलम दुसरा पुन्हा दिल्लीच्या गादीवर आला. त्या काळात बादशहा गादीवर असला, तरी दिल्लीची सत्ता आणि कारभार मराठ्यांच्या प्रभावाखाली चालत होता.
१८ नोव्हेंबर १७७१ रोजी शहजादा अकबर आणि मुघल लष्करातील मोठे सरदार स्वतः महादजी शिंदे यांच्या छावणीत त्यांचे स्वागत करण्यासाठी गेले. त्यानंतर शहजाद्याच्या नेतृत्वाखाली महादजी बादशहाच्या दरबारात हजर झाले. शाह आलम यांनी त्यांचे प्रेमाने आलिंगन केले आणि त्यांच्या पराक्रमाची भरभरून प्रशंसा केली. ही भेट साधी दरबारी भेट नव्हती. ती मराठा सामर्थ्याची उघड कबुली होती.
मुघल दरबाराची एक ठरलेली परंपरा होती. सिंहासनावर फक्त बादशहा बसत असे. बाकी सर्व राजे, नवाब, सरदार आणि सेनापती उभे राहूनच दरबारात उपस्थित राहत. बादशहाच्या तख्ताजवळ बसण्याचा अधिकार फार मोजक्या व्यक्तींना मिळत असे. हा दरबार शिस्त, मानमरातब आणि राजकीय स्थान यासाठी ओळखला जात होता.
याच दरबारात महादजी शिंदे यांना बादशहाच्या सुवर्ण तख्ताच्या जवळ बसण्याचा विशेष मान देण्यात आला. हा सन्मान एखाद्या सरदाराला दिला जाणारा नेहमीचा मान नव्हता. दिल्लीतील मराठ्यांचे वाढलेले वर्चस्व, महादजी शिंदे यांचा दरारा आणि मुघल सत्तेने स्वीकारलेले त्यांचे स्थान याचे हे स्पष्ट प्रतीक होते.
या प्रसंगाचा विचार करताना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण अपरिहार्य ठरते. एक काळ असा होता की हाच मुघल दरबार स्वराज्य संपवण्यासाठी मोहिमा पाठवत होता. आग्र्यात शिवाजी महाराजांना कैद करण्यात आले, स्वराज्यावर सतत आक्रमणे झाली आणि मराठ्यांचे अस्तित्व संपवण्याचे प्रयत्न झाले. पण शंभर वर्षांच्या आत चित्र पूर्ण बदलले. त्याच मुघल दरबारात शिवरायांच्या स्वराज्याचा शिलेदार महादजी शिंदे सन्मानाने तख्ताजवळ बसला आणि मराठेशाहीची मोहर हिंदुस्तानाच्या राजकारणावर उमटली.
या घटनेचा परिणाम केवळ दरबारापुरता मर्यादित नव्हता. दिल्लीतील राजकारणात मराठ्यांचा प्रभाव अधिक मजबूत झाला. उत्तर हिंदुस्थानातील अनेक राजे आणि सरदारांनी मराठ्यांचे नेतृत्व मान्य केले.
संदर्भ: Persian Records of Maratha History, Vol. I – Delhi Affairs (1761–1788), Jadunath Sarkar, Letter A 21b (November 1771), पृष्ठ ४७.

सीपीआर हॉस्पिटलला प्रमिला राजेंच्या कर्तुत्वाची चमकती किनार .

  या प्रमिला राजे म्हणजे कोण ? सीपीआर हॉस्पिटलला प्रमिला राजेंच्या कर्तुत्वाची चमकती किनार . सुधाकर काशीद . या ना त्या निमित्ताने सीपीआर ह...