संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१
कारखेलच्या जंगलात भूमिगत असलेल्या संताजीच्या पाळतीवर नागोजी माने होता. ज्याने आपल्या कुळाचे क्षास्त्रतेज दाखवून शत्रूच्या रुधीराचा अभिषेक आपल्या मातृभूमीला केला, त्या संताजींना आज भूमिगत होऊन वावरावे लागत आहे. तरी आपल्या ब्रिदाला कलंक लागू दिला नाही. आज त्यांच्या मागावर परकीय व स्वकीयही होते.
नागोजी माने जळभावी घाट ओलांडून पूर्वेला उतरला आणि कारखेल गावातून संताजींबद्दल विचारपूस करू लागला. पण गावकऱ्यांनी त्याला दाद दिली नाही. मग पर्यंती गावाजवळील डोंगरावर चढला. त्याच्याबरोबर सात-आठ माणसे होती. संपूर्ण डोंगर चिक्कार वृक्षांनी व्यापला होता. मोक्याची जागा पाहून प्राण डोळ्यात आणून सावज टिपण्यासाठी बसला.
कारखेलच्या परिसरात पर्यंती गावाजवळ एक जलौघ खळखळ वाहत होता. नागोजीने विचार केला, संताजी जंगलात कुठेही असला तरी, पाण्यासाठी ओढ्यावर त्याला यावंच लागेल. नागोजीने पूर्ण रात्र जीव मुठीत घेऊन काढली. दुसरा दिवस उजाडला. बाजूच्या झाडीतून सळसळ ऐकू आली, तसा नागोजी माने सावध होऊन कान टवकारले. एक मानवाकृती दबकत दबकत कानोसा घेत पुढे पुढे जात होती. तसा नागोजीही आकृतीच्या मागे अंतर ठेवून सावधतेने जाऊ लागला.
ती मानवाकृती ओढ्याच्या काठावर आली. इकडे तिकडे पाहत कपडे काढले. नागोजीने ओळखले, ती व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपली शिकार संताजी घोरपडेच आहे.
संताजींनी मेरु स्वामींचा अनुग्रह घेतल्यापासून सूर्योदयाची अंघोळ कधी चुकवली नव्हती. एवढे संकटे, एवढा वनवास पदरी आलात तरी मेरु स्वामींच्या महामंत्रानेच आपल्याला आधार दिला ही त्यांची पक्की धारणा होती. संताजी पाण्यात उतरले. त्याचवेळी नागोजी माने ओढ्या काठी येऊन लपून बसला. आंघोळ झाल्यावर संताजी नेहमीप्रमाणे ओंजळीत पाणी घेऊन सूर्याला अर्ध्य देण्यासाठी पूर्वाभिमुख उभे राहिले. ओठातून आपोआप मंत्राचे शब्द उमटले.... ॐ नमो... संताजी देहभान विसरले. मंत्राचे शब्द आपोआप ओठातून बाहेर पडत होते. संताजी बाह्य जगाचे भान विसरले. आणि हीच संधी साधून नागोजी माने पुढे झाला आणि संताजीच्या मानेवर तलवारीचा प्रहार केला. पाण्यात उष्ण रक्ताची धार मिसळली. आत्मा परमात्मात विलिन झाला.
लाख वेळा तलवारीच्या वारांना सामोरी गेलेली पहाडी छाती शेवटपर्यंत अभंगच राहिली. "लढून मरावं, मरून जगावं" ही वडिल म्हाळोजींची शिकवण! संताजी आयुष्यभर लढले आणि परमेश्वराची आराधना करत या शूरवीराचा आत्मा परमात्म्यात विलीन झाला... कायमचा...
संताजीच्या हत्येचा वृत्तांत जिंजी दरबारात कळला मात्र! महाराणी ताराबाईंचा कंठ्ठ दाटून आला. महाराजांनी संताजींना एकाकी पाडले नसते तर हा मराठ्यांचा मोहरा असा स्वकीयांनीच लयाला धाडला नसता.
सदरेवर छत्रपती महाराज सुन्न मनाने एकटक महाद्वाराकडे पाहत होते. महाराजांचं मन व्याकूळ झाले. त्यांना खरं काय ते कळून चुकलं. संताजी मोगलांना फितूर झाला नव्हता. तसे असते तर बादशहाने नागोजीला हाताशी धरून खुन करायला लावलेच नसते. बादशहाला नागोजी सारख्यांची गरज नव्हती. त्याला शूर सरदार हवे होते. संताजी त्याला मिळाले असते तर, औरंगजेबाने दख्खनची सुभेदारी नक्की बहाल केली असती आणि त्याने तसे प्रयत्नही केले होते. पण संताजी लोभाला बळी पडले नव्हते.
संताजींनी एवढी लूट केली की ते आपली कोठारे भरू शकला असते. पण जे काही मिळाले ते त्यांनी रायगड, पन्हाळा, जिंजीच्या सरकारी खजिन्यात जमा करून, स्वराज्य उभारणीस हातभार लावला. संताजीने तन मन धन खर्च करुन अपूर्व मराठेशाही रुजवली, जगवली. एवढेच नाही तर, आणीबाणीच्या वेळेस छत्रपतींना परांगदा होण्याची वेळ आली तेव्हा, त्यांनी आपली समशेर पाजळून स्वराज्याचे रक्षण केले. राजाराम महाराजांचा कंठ दाटून आला. डोळे अश्रूंनी भरले. त्यांना आपली चूक उमगली.. पण वेळ निघून गेली होती.
कारखेलच्या घाटात संताजीचा वध केल्यावर काही अंतरापर्यंत नागोजीने त्यांच धड आणून तेथेच टाकले आणि त्या शूरवीराचे शिर बादशहाला नजर करण्यासाठी मोठ्या दिमाखात मिरवत घेऊन गेला.
देशाभिमानी मराठ मावळ्यांना संताजींच्या हत्येची खबर मिळताच त्यांनी कारखेलचे जंगल धुंडाळून संताजी घोरपडेंचं धड शोधून कुरुंदवाडला आणले आणि कृष्णा-पंचगंगेच्या पवित्र संगमावर संताजींच्या पार्थिवावर विधिपूर्वक अंत्यसंस्कार केले.
तिकडे बादशहाच्या छावणीत भाल्याच्या टोकावर संताजीचे शिर घेऊन धिंड निघत होती.
ज्यांच्या हयातीत नुसत्या धसक्याने त्यांच्या आजूबाजूलाही फिकायला कोणी धजावत नव्हते, तेच त्यांचे निस्तेज शिराची टिंगल टवाळी करू लागले. मानोजी माने, गाजीउद्दीन फिरोजजंग संताजीच्या हत्येचे श्रेय आपल्या पदरात घ्यायला बादशहाच्या दरबारात धडपडत होते. पण नियतीने ते कोणालाही लाभू दिले नव्हते.....
खरं म्हणजे नागोजीच्या तलवारीचा घाव पडायच्या आधीच मेरु स्वामींनी दिलेला महामंत्र आळवीत परमात्म्याशी एकरूप झाले होते.
अशा या महान कर्तुत्वान पराक्रमी व शेवटी एकाकी पडल्यालेल्या वीराला कोटी कोटी प्रणाम!!
संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख
नमोस्तुते!
स मा प्त





.jpg)
.jpg)
.jpg)