विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 28 August 2026

ग्वाल्हेर दरबारचे सरदार जहागिरदार





 ग्वाल्हेर दरबारचे सरदार जहागिरदार

ग्वाल्हेरचे जहागीरदार आणि सरदारांचा इतिहास खूप मोठा आहे. श्रीमंत महादजी शिंदे यांना ग्वाल्हेर आणि राजस्थानमध्ये मराठा दौलत उभारण्यात अनेक सरदारांनी मोठी साथ दिली. यातील बहुतांश सरदार सातारा,पुणे,नगर भागातील होते. त्यामध्ये शितोळे,फाळके, महाडिक, माहुरकर आणि जाधव हे बलाढ्य सरदार प्रथम श्रेणीचे होते. याशिवाय महाडिक, जाधव, फाळके, आंग्रे,,काटे,मोरे,सुर्वे,पाटणकर,रोमण, मोहिते,शिर्के,गायकवाड,खानविलकर, अकोलकर,खर्डेकर,भोसले,गुजर,लगड,सूर्यवंशी,इंगळे,भोईटे,धुमाळ,साळुंखे,पवार,जगताप भापकर,हांडे,कडु,घाटगे,गाढवेआणि घोरपडे हे देखील प्रबळ सरदार होते. हे सर्व सरदार महादजी शिंदे यांच्या काळापासून ग्वाल्हेरच्या लष्कर भागात राहतात. या फौजेमध्ये बर्गे, मोहिते, आव्हाड, जाधव, कदम आणि निंबाळकर असेही सरदार होते.
महादजी शिंदे यांनी उत्तम प्रशासनासाठी आपले राज्य अनेक जहागिरीत विभागले होते. त्यांनी एकूण १०८ जहागीरदारांना त्यांच्या दर्जानुसार जहागिरी दिल्या होत्या. या जहागीरदारांना मानाचे पोशाख, पालखी आणि छत्री अशी मानचिन्हे राज्याकडून दिली जात असत आणि या बाबतीत स्पष्ट अशा लेखी आज्ञा दिल्या जात असत. सन १९१३ च्या शिंदे दरबाराच्या एका नोंदीनुसार ग्वाल्हेर राज्यात ३५ सरदार प्रथम दर्जाचे तर ६४ सरदार दुसऱ्या श्रेणीचे होते, ज्यांच्यासाठी लिखित सनद नव्हती. तिसऱ्या श्रेणीमध्ये ९ जहागीरदार होते जे मोठ्या जहागीरदारांच्या अखत्यारीत असत आणि त्यांच्या बाबतीत बदल होऊ शकत असे.
शिंदेशाही इतिहासाची साधने या साधनांमधून शिंद्यांच्या जुन्या सरदारांची अनेक नावे समोर येतात, ज्यांनी उत्तर आणि दक्षिण भारतात मोठी कामगिरी बजावली. महादजी शिंदे यांच्या काळात फौजेचे मुख्य सेनापती आणि मुत्सद्दी म्हणून जिवाजी बल्लाळ ऊर्फ जिवबादादा केरकर यांनी काम पाहिले. त्यांच्यासोबत लखबादादा लाड आणि जगन्नाथ राम ऊर्फ जगोबा बापू हे लष्करी मोहिमा गाजवणारे प्रमुख शूर सरदार होते. या जुन्या सरदारांमध्ये रामाजी अनंत दाभोळकर हे उच्चपदस्थ कारभारी होते, तर बाळोबा तात्या पागनीस हे आग्रा भागातील व्यवस्था पाहणारे अनुभवी मुत्सद्दी होते. महादजी शिंदे यांचे एकनिष्ठ साथीदार राणेखान भाई आणि त्यांचे पुत्र साहेबखान हे फौजेचे प्रमुख नेतृत्व करत असत.
उत्तर भारत आणि मेवाड प्रांतात मराठेशाहीचा अंमल राखण्यात अंबूजी इंगळे, विठोजी इंगळे आणि बाळाजी इंगळे या सरदारांचा मोठा वाटा होता. दिल्ली, रेवाडी आणि मेवाती भागात खंडेराव हरी आणि खंडेराव आप्पा हे कारभार पाहत होते. आग्रा व दिल्लीच्या संरक्षणाची जबाबदारी रायाजी पाटील, रामाजी पाटील जाधव आणि लाडोजी देशमुख शितोळे या सरदारांवर होती. याशिवाय वेगवेगळ्या मोहिमांमध्ये शिवाजी विठ्ठल विंचूरकर, माधवराव चंद्रचूड, बाळाजी जांबगावकर, बहिरजी ताकपीर आणि बळवंतराव धोंडदेव हे अधिकारी कार्यरत होते. कोटा येथील प्रसिद्ध दफ्तरचा कारभार लालाजी बल्लाळ गुलगुले हे वकील पाहत असत. शिंदेशाहीच्या बक्षी घराण्यातील शिवबा नाना, बाळाजी राम ऊर्फ बाळाभाऊ बक्षी, नारायणराव बक्षी आणि यशवंतराव भाऊ या शेणवी वीरांनी लष्कराची आणि जामदारखान्याची व्यवस्था सांभाळली. या सर्व सरदारांच्या आणि अधिकाऱ्यांच्या बळावरच महादजी शिंदे यांनी उत्तर भारतात मराठ्यांचे मोठे वैभव उभे केले.
संदर्भ- मराठी रियासत
शिंदेशाही इतिहासाची साधने
दौलतराव शिंदे कार्य आणि कर्तृत्व काळ
अलिजाह बहाद्दर महादजी शिंदे

साम्राज्यवादी धूर्त इंग्रज आणि श्रीमंत महादजी शिंदे सरकार

 


साम्राज्यवादी धूर्त इंग्रज आणि श्रीमंत महादजी शिंदे सरकार

​व्यापारासाठी या देशात आलेल्या इंग्रजांनी तराजू बाजूला ठेवून जेव्हा राजकारणात भाग घेतला, तेव्हा त्यांचा हा छुपा साम्राज्यवाद आणि धोका छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखला होता. महाराजांनी इंग्रजांना जशास तसे उत्तर देत त्यांची वखार लुटली, ६ इंग्रज अधिकाऱ्यांना वासोटा किल्ल्यावर कैदेत ठेवले, स्वतःचे आरमार उभारले आणि १६७९ सालच्या सागरी युद्धात इंग्रजांचा निर्णायक पराभव करून इशारा दिला की, खबरदार! गाठ मराठ्यांशी आहे. पण पुढच्याच वर्षी महाराजांचे अकाली निधन झाले आणि इंग्रजांचे नशीब बलवत्तर ठरले.
​महाराजांनंतरच्या काळात छत्रपती संभाजी महाराजांनी आणि संपूर्ण मराठेशाहीने पोर्तुगीज, इंग्रज आणि मुघलांना पळता भुई थोडी केली. पुढे याच लढ्याची दूरदृष्टी ठेवून, अठराव्या शतकात श्रीमंत महादजी शिंदे यांनी भारताचे इंग्रजांपासून दीर्घकाळ रक्षण केले.
​इंग्रजांचे आधुनिक युद्धतंत्र मोडून काढण्यासाठी महादजींनी मराठ्यांची पारंपरिक युद्धपद्धती बदलून कवायती फौज (आधुनिक पद्धतीने प्रशिक्षित सैन्य) तयार केली. स्वतःचे तोफा, बंदुका आणि दारूगोळा तयार करण्याचे कारखाने सुरू केले. महादजींच्या या तोफखान्याची इंग्रजांमध्ये प्रचंड दहशत होती. याच सुसज्ज प्रबळ घोडदळ आणि तोफखान्याच्या बळावर त्यांनी पहिल्या इंग्रज-मराठा युद्धात इंग्रजांचा निर्णायक पराभव केला. महादजींनी इंग्रजांना सालबाईचा तह करण्यास भाग पाडले आणि तो पाळला जावा यासाठी दोन इंग्रज अधिकाऱ्यांना ओलीस म्हणून आपल्या ताब्यात ठेवले.
​इंग्रजांना त्यांच्याच भाषेत नमवण्याचे हे सर्व श्रेय महादजी शिंदे सरकारचे होते. महादजी एवढ्यावरच थांबणार नव्हते,इंग्रजांचे या देशातून समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांनी थेट त्यांच्या मुख्य केंद्रावर, म्हणजेच बंगालवर आक्रमण करण्याची मोठी मोहीम आखली होती. पण पुन्हा एकदा नशिबाने मराठ्यांचा हात सोडला आणि महादजींचे अकाली निधन झाले. महादजींच्या जाण्याने इंग्रजांना नशिबाने पुन्हा हात दिला आणि भारताचा इतिहास बदलला.

सुभेदार राणोजी शिंदे म्हणजेच शिंदे घराण्याचे संस्थापक






 सुभेदार राणोजी शिंदे म्हणजेच शिंदे घराण्याचे संस्थापक. ते अत्यंत कर्तबगार आणि शूर सेनानी होते. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात त्यांनी स्वतःच्या बळावर बलाढ्य सैन्य उभारले आणि त्यांच्याच पराक्रमामुळे उत्तर भारतात एक प्रबळ राज्यकर्ते म्हणून शिंदे घराणे उदयास आले.

दुर्दैवाने राणोजी शिंदे यांना केवळ ४६ वर्षांचे अल्पायुष्य लाभले. मराठेशाहीत अशा अनेक महान राज्यकर्त्यांना आणि योद्ध्यांना खूप कमी आयुष्य लाभले, जे पुढे जाऊन मराठा राज्याच्या ऱ्हासाचे एक मोठे कारण ठरले. अशा वेळी मनात नेहमी विचार येतो की, जर राणोजीसारख्या पराक्रमी पुरुषांना आणखी काही वर्षांचे आयुष्य लाभले असते, तर या देशाचा इतिहास नक्कीच काहीतरी वेगळा आणि अधिक सुवर्णमय असता.
थोरले बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा यांच्या अकाली निधनाचा खूप मोठा धक्का राणोजींना बसला होता. तरीही त्या दुःखातून सावरून पुढे नानासाहेब पेशव्यांच्या काळात त्यांनी मराठादौलतीची सेवा चालूच ठेवली आणि अनेक महत्त्वाचे राजकीय निवाडे केले. पुढे शुजालपूर परगण्यातील सुलतानपूर येथे मोहिमेवर असताना, आजारपणामुळे १९ जुलै १७४५ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधन तारखेबद्दल इतिहासकारांमध्ये काही मतभेद असले, तरी ही दुःखद बातमी कळताच पेशव्यांनी कण्हेरखेड येथे असणाऱ्या त्यांच्या थोरल्या राणीसाहेब निमाबाई यांना २१ जुलै १७४५ रोजी सांत्वन करणारे पत्र पाठवले.
त्याच तारखेच्या आणखी एका ऐतिहासिक पत्रानुसार, श्रीमंत राणोजींचे ज्येष्ठ पुत्र जयाप्पा यांनी वडिलांच्या स्मारकाबद्दल काही महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सुलतानपूर येथे, जिथे राणोजीरावांचे निधन झाले, तिथे एक सुंदर स्मारक चबुतरा बांधण्यात आला. त्यानंतर त्यांची रक्षा अत्यंत आदराने उज्जैनला आणण्यात आली. तिथे पवित्र क्षिप्रा नदीच्या काठावर सर्व धार्मिक विधी करून राजघाटावर वडिलांचे भव्य आणि देखणे स्मारक उभारण्यात आले. हे कार्य पूर्ण करून जयप्पा शिंदे स्वतः घराण्याचा कारभार पाहू लागले. या मोठ्या धक्क्याच्या अवघ्या एक वर्षानंतर,राणोजींच्या मातोश्री द्वारकाबाई यांचेही कण्हेरखेड येथे निधन झाले.
आपल्या संपूर्ण आयुष्यात राणोजींनी केवळ तलवारीच्या जोरावर मुघलांचे वर्चस्व संपवले नाही, तर उत्तर भारतात हिंदू धर्म आणि संस्कृतीचे रक्षण केले. त्यांनी माळवा आणि बुंदेलखंडच्या मोठ्या मोहिमा यशस्वी करून मराठ्यांचा दरारा निर्माण केला. पराक्रमासोबतच त्यांनी धार्मिक कार्याला मोठे प्राधान्य दिले. मुघलांच्या काळात दुर्लक्षित झालेल्या उज्जैन नगरीचा कायापालट करून त्यांनी,श्री ज्योतिबा मंदिर कोल्हापूर, श्री महाकालेश्वर मंदिर आणि काळभैरव मंदिराचा भव्य जीर्णोद्धार केला, तसेच तिथला ऐतिहासिक सिंहस्थ कुंभमेळा पुन्हा सुरू केला. उज्जैनमध्ये पाण्याचे घाट, विहिरी आणि अन्नछत्रे सुरू करून त्यांनी मोठा दानधर्म केला. आज क्षिप्रा नदीच्या काठावर उभी असलेली ही छत्री उत्तर भारतात मराठेशाहीचे वैभव आणि संस्कृती रुजवणाऱ्या एका महान आणि धर्मरक्षक संस्थापकाची जिवंत साक्ष आहे.

पोर्तुगीज लढाई व सेनासाहेबसुभा येसाजी शिंदे

 


पोर्तुगीज लढाई व सेनासाहेबसुभा येसाजी शिंदे

शिंदे हे महाराष्ट्रातील प्राचीन कुळ आहे. चालुक्य व शिलाहार या काळापासून त्यांचा उल्लेख मिळतो. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले तेव्हा शिंदे कुळानेही पिढ्यानपिढ्या रणांगणात लढून स्वराज्याची सेवा केली.
त्यातीलच एक पराक्रमी सरदार म्हणजे सेनासाहेबसुभा येसाजी शिंदे. ते मूळचे तोरगेळ गावचे होते. दुसरे छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर गादी) यांच्या काळात ते सिंधुदुर्गचे किल्लेदार होते. छत्रपतींनी त्यांना सेनासाहिबसुभा हा किताब दिला होता. त्यांच्या बहिणी जिजाबाई यांचा विवाह खुद्द छत्रपती संभाजी महाराजांशी झाला होता.
इ.स. १७६३ मध्ये गोव्याच्या पोर्तुगीजांनी सिंधुदुर्गावर मोठा हल्ला केला. त्यावेळी मराठ्यांमध्ये अंतर्गत कलह सुरू होता. तरीसुद्धा येसाजी शिंदे यांनी किल्ल्यातील शिबंदी व समुद्रातील मराठा जहाजांच्या मदतीने शत्रूला तोंड दिले. सिंधुदुर्गच्या तोफखान्याचा प्रभावी वापर करून त्यांनी पोर्तुगीजांच्या जहाजांवर जोरदार मारा केला. या लढाईत चार ते पाचशे पोर्तुगीज ठार झाले. मोठे नुकसान सहन न करता पोर्तुगीजांना माघारी फिरावे लागले.
या विजयाची साक्ष म्हणजे महाराणी जिजाबाई यांनी येसाजी शिंदे यांना पाठविलेले पत्र. दिनांक २१ नोव्हेंबर १७६३ रोजी लिहिलेले हे पत्र असे आहे
श्री शंभू प्रा ||
श्री मन्माहाराज मातुश्री आईसाहेब याणी चिरंजीव राजश्री येसाजी सिंदे सुभेदार यासी आज्ञा केली यैसीजे. सु|| आर्बा सितैन मया व अलफ. तुम्ही विनंतीपत्र पाठविले प्रविष्ट होऊन लेखनार्थ श्रवण जाहला. साहेबाची आज्ञा घेऊन निघालो ते गुरुवारी तडीस राहोन जंजिरातील कारभारी व नाइकवडी भृगुवारी येऊन जंजिरा घेऊन गेले म्हणोन लिहिले. त्यावरून संतोष जाहला. फिरंगी गोमंतकाहून आरमारसुद्धा येऊन जंजिरासी मातवर युध केले. साहेबाच्या सेवक लोकींही त्याचा मार सोसून आपणाकडील जंजिराकडील तोफानी मारगिरी करून पाचच्यारसेहे फिरंगी मारून नेस्तनाबूद केला. तन्मुले फिरंगी कांही लबडी मार न सोसे यास्तव हतधैर्य होत्साता पलायेन संपादिले जंजिऱ्याच्या लोकास येश आले. मदुर्मिची सर्त जाहली. असा आकस्मात दंगा कधीही न जाहला. आणि या प्रमाणेंं गलिमाचे पारिपत्येही केले नाही. साहेबी दोनी हजार स्वर व पाच हजार हशम तयार करून खासा स्वारी सित्ध जाहाली. तो भवानजी कदम यासमागमे किलाची खुशालीची विनंती पत्रे आली. त्यावरून स्वारी तहकुब जाहली. पुढे फौजे रवाना केली आहे ती ही येऊन पावली असल. तीर्थरूप कैलासवासी माहाराज राजश्री-छेत्रपती याचा हात (?) जंजिरा आहे त्याजवरी गची व कोनाडा बांधोन नैव्यद्य व पूजा चाले सारिखी करणे. याविसी अंतर न करणे जाणिजे र|| छ १५ माहे जमादिलावल लेखन सीमा.
येसाजी शिंदे यांनी केवळ सिंधुदुर्गाचे रक्षण केले नाही, तर मराठ्यांचा सागरावरचा दबदबा अजून एकदा सिद्ध करून दाखवला. समुद्रात पोर्तुगीजांची ताकद मोडून काढून त्यांनी स्वराज्याचा झेंडा उंचावला.

श्री काळभैरव मंदिर उज्जैन आणि सुभेदार राणोजी शिंदे

 


श्री काळभैरव मंदिर उज्जैन आणि सुभेदार राणोजी शिंदे

उज्जैन नगरीत असलेलं काळ भैरव मंदिर प्राचिन आणि श्रद्धेचं ठिकाण आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार मराठेशाहीच्या काळात राणोजी शिंदे यांनी केली. त्यांनी या मंदिराचा विस्तार करून मजबूत दगडी बांधकाम केले आणि हे एक भव्य धार्मिक स्थळ म्हणून उभे केले. उत्तर भारतात मुघलांचे वर्चस्व संपवून मराठ्यांनी आपला धर्म आणि संस्कृती राखली, त्याचेच हे एक उत्तम उदाहरण आहे.

राणोजी शिंदे यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर उज्जैन नगरीला तिचे जुने वैभव पुन्हा मिळवून दिले. मुघलांच्या काळात दुर्लक्षित झालेल्या या पवित्र भूमीचा त्यांनी कायापालट केला. राणोजींनी श्री काळ भैरव मंदिरा सोबतच जगप्रसिद्ध श्री महाकालेश्वर मंदिराचाही भव्य जीर्णोद्धार केला. या धार्मिक कार्यासोबतच त्यांनी उज्जैनमध्ये प्रसिद्ध सिंहस्थ कुंभमेळा पुन्हा सुरू केला, ज्यामुळे या नगरीला संपूर्ण भारतात पुन्हा एकदा धार्मिक आणि सांस्कृतिक राजधानीचे स्थान मिळाले. शिंदे सरकारांनी उज्जैनमध्ये पाण्याचे घाट,मठ आणि अन्नछत्रे सुरू करून मोठ्या प्रमाणावर दानधर्म केला.

या सर्व कार्यामुळे आज संपूर्ण उज्जैन नगरीवर मराठ्यांच्या स्थापत्यकलेची आणि संस्कृतीची स्पष्ट छाप पाहायला मिळते. काळ भैरव मंदिराचे संपूर्ण बांधकाम याच मराठा शैलीत झालेले असून ते खूप सुंदर आणि देखणे आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पाहिले की लगेच लक्ष वेधून घेते. मोठे काळे दगड वापरून तयार केलेले हे द्वार एखाद्या बळकट किल्ल्याच्या दरवाजासारखे वाटते. या दरवाजाच्या दगडांवर बारीक कोरीव काम केलेले असून, त्यातून त्या काळातील कारागिरांचे कसब दिसून येते.

प्रवेशद्वारातून आत गेल्यावर देखण्या दीपमाळा पाहायला मिळतात. दिव्यांच्या रांगा लावण्यासाठी या दीपमाळांवर खास जागा कोरलेली असून त्यांचे उंच बांधकाम खूप सुंदर दिसते. मंदिराच्या प्रांगणात पायऱ्या चढून वर गेल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. मंदिराचे छत, भिंती आणि खांब यांचे बांधकाम खूप मजबूत आहे. कुठेही बडेजाव किंवा चकचकाट न करता, साधेपणातून आलेला भारदस्तपणा या वास्तूत पाहायला मिळतो. भक्कम दगड, सरळ रेषांचा वापर आणि गडद रंगछटा यांमुळे मंदिराला एक वेगळाच डौल आला आहे.

उज्जैनमध्ये काळ भैरव यांना नगरचे सेनापती मानले जाते. अनेक भाविक येथे येऊन देवाकडे प्रार्थना करतात. या ठिकाणी आल्यावर मनातील वाईट विचार दूर होतात आणि भक्तांना एक नवी मानसिक ऊर्जा मिळते, अशी लोकांची श्रद्धा आहे.

हे मंदिर मराठ्यांच्या पराक्रमाचे आणि स्थापत्य कलेची मोठी साक्ष आहे. राणोजी शिंदे यांनी घेतलेल्या कष्टांमुळे आणि मराठ्यांच्या धार्मिक कार्यामुळेच हे मंदिर उज्जैनच्या इतिहासात आजही अतिशय मानाचे स्थान राखून उभे आहे.

#काळभैरव #मराठ्यांचा_इतिहास #राणोजी_शिंदे

#उज्जैन #महाकाल #इतिहासकर्ते #मराठा_साम्राज्य

सुभेदार राणोजी शिंदे यांचा गजराज - विराट

 



सुभेदार राणोजी शिंदे यांचा गजराज - विराट

वैभव आणि पराक्रमाचा मोठा इतिहास लाभलेल्या शिंदे राजवंशाने हिंदुस्थानच्या इतिहासपटलावर आपले नाव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे. श्रीमंत राणोजीराव शिंदे यांनी आपल्या अजोड शौर्याच्या जोरावर उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांच्या सत्तेचा पाया मजबूत केला. उत्तर भारताच्या विशाल मैदानी प्रदेशात आणि बदलत्या युद्धपद्धतीत मराठ्यांच्या फौजेमध्ये घोडदळासोबतच बलाढ्य हत्तींनाही मोठे महत्त्व आले. शिंदे सरकारच्या दरबारात पुढे जी बलाढ्य गजराजांची परंपरा निर्माण झाली, तिची खऱ्या अर्थाने सुरुवात राणोजी बाबांच्या काळातील एका अत्यंत खास आणि लाडक्या हत्तीपासून झाली, ज्याचे नाव होते विराट..
विराट हा नावाप्रमाणेच अत्यंत बलभीम आणि दणकट शरीराचा गजराज होता. तो सवारी पुरता मर्यादित नव्हता, तर अनेक ऐतिहासिक युद्धांमध्ये तो राणोजींचा सर्वात मोठा आणि विश्वासू साथीदार होता. रणभूमीवर शत्रूचे मोर्चे ढासळणारा हा विराट, प्रत्यक्ष व्यवहारात मात्र कमालीचा बुद्धिमान, शांत आणि तितकाच शिस्तबद्ध होता. राणोजी बाबांचा या आपल्या राजेशाही गजराजावर प्राणापलीकडे जीव होता.
शिंदे घराण्याच्या ऐश्वर्यात विराटचे स्थान खूप वेगळे आणि वरचे होते. त्याचा देखणा शृंगार, अंगावरील मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने आणि पाठीवरील जडजवाहिरांनी सजलेली शोभिवंत वस्त्रे यामुळे तो शिंदे शाही दरबारात नेहमी सर्वांचे मुख्य आकर्षण ठरायचा. जेव्हा तो दरबारात शाही थाटात उभा राही, तेव्हा लोक त्याला मोठ्या आदराने गजराज विराट म्हणून हाक मारत.शिंद्यांच्या दरबारात गजराजांना मानाचे स्थान मिळवून देण्याची सुरुवात याच विराट पासून झाली, असे म्हणण्यास हरकत नाही.

वसईची मोहीम आणि राणोजी शिंदे

 


वसईची मोहीम आणि राणोजी शिंदे

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याचा विस्तार पुढे मराठ्यांनी उत्तर हिंदुस्थानापर्यंत नेला. या विस्ताराच्या प्रवासात मराठ्यांनी अनेक परकीय सत्तांना आपल्या पराक्रमाची जाणीव करून दिली. मराठ्यांच्या इतिहासातील अशीच एक शर्थीची लढाई म्हणजे इ.स. १७३७ ते १७३९ दरम्यान झालेली वसईची मोहीम. कोकण किनारपट्टीवर पोर्तुगीजांनी उभारलेली जुलमी सत्ता आणि स्थानिक हिंदू जनतेवर चालवलेला अत्याचार संपवण्यासाठी मराठ्यांनी ही निर्णायक मोहीम उभारली होती.
वसईचा किल्ला हा पोर्तुगीज सत्तेचा पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात बलाढ्य किल्ला मानला जात होता. समुद्राने वेढलेला, भक्कम तटबंदी आणि प्रचंड तोफखान्याने सज्ज असलेला हा किल्ला थेट हल्ल्याने जिंकणे जवळपास अशक्य मानले जात होते. मराठ्यांनी अनेक दिवस तोफांचा मारा केला, पण किल्ला दाद देत नव्हता. अखेर किल्ल्याची तटबंदी खिळखिळी करण्यासाठी जमिनीखालून भुयार खोदून सुरुंग लावण्याची योजना आखण्यात आली. हे कार्य म्हणजे अक्षरशः मृत्यूच्या दाढेत शिरण्यासारखे होते.
अशा या अत्यंत धोकादायक मोहिमेत सुभेदार राणोजी शिंदे स्वतः पुढे सरसावले. मराठ्यांनी वसईच्या तटाखाली एकूण १० ते १२ सुरुंग तयार केले होते. त्यापैकी तब्बल ५ मोठे सुरुंग राणोजी शिंद्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शत्रूच्या प्रमुख बुरुजाखाली यशस्वीरित्या लावले.
३ मे १७३९ रोजी हे सुरुंग उडवण्यात आले.स्फोटाने किल्ल्याचा बुरुज कोसळला आणि त्या भगदाडातून मराठ्यांचे सैन्य किल्ल्यात घुसले. पोर्तुगीज सैन्याचा निर्णायक पराभव झाला आणि अखेर वसईच्या किल्ल्यावर भगवा झेंडा फडकला. पश्चिम किनारपट्टीवरील पोर्तुगीजांच्या वर्चस्वाला हा मोठा धक्का होता.
राणोजी शिंद्यांच्या या शौर्याचे कौतुक स्वतः सेनापती चिमाजीअप्पांनी केले होते. वसई विजय मिळाल्यानंतर १२ मे १७३९ रोजी चिमाजीअप्पांनी छत्रपती शाहू महाराजांना पाठवलेल्या पत्रात राणोजींच्या हिंमतीचा आणि त्यांच्या पराक्रमाचा विशेष उल्लेख आढळतो.
वसईच्या मोहिमेत राणोजी शिंदे याच बरोबर शिंदे घराण्यातील इतर अनेक वीरांनीही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. साष्टीची बखरीत गुणाजी शिंदे, मोराजी शिंदे आणि महादजी शिंदे या वीरांची नावे स्पष्टपणे उल्लेखिली आहेत. हे सर्व सरदार वसई परिसरात मोर्चे लावून पोर्तुगीजांना खिंडीत पकडण्याचे काम करीत होते.
तसेच मोहिमेच्या पूर्वतयारीदरम्यान, इ.स. १७३० च्या सुमारास, कर्णाजी शिंदे यांनी माहुली आणि माहीम परिसरात केलेल्या लष्करी हालचालींचे संदर्भही पेशवे दप्तरात सापडतात.
संदर्भ-
१. वसईची मोहीम (साष्टीची बखर संदर्भ) - यशवंत नरसिंह केळकर
२.अलिजाह बहाद्दूर महादजी शिंदे (प्रकरण पहिले, पृष्ठ ६८-७१) - डॉ.पी.एन शिंदे सर

ग्वाल्हेर दरबारचे सरदार जहागिरदार

  ग्वाल्हेर दरबारचे सरदार जहागिरदार ग्वाल्हेरचे जहागीरदार आणि सरदारांचा इतिहास खूप मोठा आहे. श्रीमंत महादजी शिंदे यांना ग्वाल्हेर आणि राजस्थ...