मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Tuesday, 4 April 2023
सरदार त्रिंबकजी डेंगळे
त्रिंबकजी डेंगळे पाटील
सरदार त्रिंबकजी डेंगळेंचे उत्तरआयुष्य
सरदार त्रिंबकजी डेंगळेंचे उत्तरआयुष्य
ब्रिटिश सत्तेविरुद्ध दीर्घकाळ संघर्ष करणाऱ्या पेशव्यांचे कारभारी त्रिंबकजी डेंगळेंचं नंतर काय झालं ?, त्यांना इंग्रजांनी कुठे ठेवलं?, त्यांचे कैदेतील दिवस कसे होते ?, त्यांचा मृत्यू कधी व कसा झाला? या सर्व प्रश्नांचा ससंदर्भ घेतलेला वेध …
3 जून 1818 ला श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी अशीरगडाजवळील ‘धुळकोट’ येथे जनरल माल्कमसमोर शरणागती पत्करली व पेशवाईचा परिणामी मराठेशाहीचा अस्त झाला. शेवटपर्यंत त्रिंबकजींनी पेशव्यांची साथ सोडली नव्हती. त्यावेळी अशीरगडावर असणाऱ्या त्रिंबकजींना पकडण्यासाठी कर्नल डोव्हटनने फौज पाठवली. किल्लेदार यशवंतराव लाडांच्या मदतीने त्रिंबकजी अशीरगडावरून पळाले व दक्षिणेत आले. इंग्रजांनी त्रिंबकजींचा शोध सुरू केला व त्याला शोधून देणाऱ्यास इनाम जाहीर केले.
त्रिंबकजी त्याची सासुरवाडी अहिरगाव (ता.निफाड, जि.नाशिक) येथे गुप्तपणे राहत असल्याची खबर अहिरगावचा पाटील जयाजी याने 28 जून 1818 ला मालेगावला इंग्रजांना दिली. त्यावेळी कॅप्टन ब्रिग्ज खानदेशात होता, त्याने कॅप्टन स्वान्स्टनला त्रिंबकजींना पकडण्यासाठी धाडले. स्वान्स्टनच्या नेतृत्वाखालील 800 घोडेस्वारांच्या फौजेने दुसऱ्या दिवशी (29 जून 1818) भल्या सकाळी चांदवड मार्गे अहिरगाव गाठले व त्रिंबकजींना कैद केले. त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली. त्यांना प्रारंभी चांदवड व नंतर ठाणे येथील तुरुंगवजा किल्ल्यात कैदेत ठेवण्यात आले (जिथून ते सप्टेंबर 1816 ला मोठ्या शिताफीने निसटले होते). काही महिने त्रिंबकजी ठाण्याच्या तुरुंगातच होते परंतु तेथूनही त्यांची गुप्तपणे सुटका करण्याची काही कारस्थानं इंग्रज सरकारच्या कानावर आली, त्यामुळे त्यांना मराठी मुलखात ठेवणे धोक्याचे वाटून त्यांना कलकत्त्याला पाठवण्याचे सक्त आदेश कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरलने एलफिस्टनला दिले. 5 एप्रिल 1819 ला त्रिंबकजींनी ठाणे सोडले व मुंबईहून त्यांना समुद्रमार्गे बोटीने कलकत्त्याला नेण्यात आले व त्यानंतर त्यांची रवानगी ‘चुनार’च्या किल्ल्यात करण्यात आली.
चुनार किल्ला काशीपासून 30 किमी अंतरावर असून सध्याच्या उत्तरप्रदेश राज्यातील मिर्झापुर जिल्ह्यात आहे. गंगेच्या दक्षिण तीरावर वसलेला हा भारतातील एक पुरातन किल्ला असून तत्कालीन बंगाल प्रांतात असणाऱ्या या किल्ल्याचा वापर इंग्रजांनी अनेक राजकीय कैद्यांना ठेवण्यासाठी केला होता. 1819 ते 1829 अशी तब्बल दहा वर्षे त्रिंबकजी चुनारच्या किल्ल्यात कैदेत होते. तेथेच त्यांचा 16 ऑक्टोबर 1829 ला दुर्दैवी मृत्यू झाला.
त्रिंबकजींचे चुनारगडावरील कैदेतील जीवन कसे होते यासंबंधीची माहिती बिशप हेबरच्या प्रवासवृत्तात मिळते. कलकत्त्याला बिशप असणारा रेजिनाल्ड हेबर याने 1824-26 दरम्यान भारतदौरा केला होता. काशीहून अलाहाबादला जात असताना तो चुनारगडवर आला होता. तेव्हा त्याने 11 सप्टेंबर 1824 ला त्रिंबकजींची भेट घेतली होती. त्याच्या प्रवासवर्णनातील काही भाग मी मराठीत अनुवादित केला आहे, तो पुढीलप्रमाणे-
त्रिंबकजी
राहत असलेल्या ठिकाणचे वर्णन करताना हेबर म्हणतो, ‘चुनार किल्ल्यावरच्या
त्या मुुख्य अंतर्गत वर्तुळात आणि अगदी उंच ठिकाणावर दोन अंतर्गत तटबंदी
आहेत. ज्यात गव्हर्नर हाऊस, हॉस्पिटल व राज्य कारागृह आहे जेथे सध्या
सुप्रसिद्ध मराठा सरदार त्रिंबकजी (डेंगळे) याचे वास्तव्य आहे. ब्रिटिश
सत्तेचे दीर्घकाळ कट्टर शत्रू (असलेला) आणि वऱ्हाड, दख्खन व माळवा प्रांतात
दंगे भडकवणारा. तो खूप कडक बंदोबस्तात आहे. त्याच्यावर युरोपियन तसेच देशी
शिपायांच्या पहारा आहे. पहारेकऱ्यांच्या कधीही त्याला नजरेआड जावू दिले
जात नाही. त्याच्या शयनकक्षाला तीन मोठ्या जाळीदार खिडक्या असून त्या
व्हरांड्यात उघडतात, जी पहारेकऱ्यांची खोली आहे. इतर बाबतीत त्याला चांगली
वागणुक मिळते. दोन मोठ्या व हवेशीर खोल्या एक छोटीशी उंच खोली जिथे त्याचे
देवघर आहे आणि पिंपळाच्या सान्निध्यात असलेली छोटीशी बाग. जिथे त्याने खूप
चांगल्या प्रकारे बाल्सम (तेरडा) व इतर फुलझाडे लावली आहेत. त्याच्या
स्वतःच्या चार नोकरांना त्याच्याजवळ जायला परवानगी आहे, परंतु किल्ला
सोडताना आणि परत येताना त्यांची नेहमी झाडाझडती घेण्यात येते आणि रात्री ते
तिथे असायलाच हवेत (असा नियम आहे).’
त्रिंबकजीच्या भेटीचे वर्णन करताना हेबर म्हणतो, ‘तो काहीसा बुटका, तरतरीत व चिडचिडा दिसणारा व्यक्ती आहे. जेव्हा मी त्याला पाहिले त्याने मळके सूती धोतर घातलेले असून लाल रंगाची किनार डोक्यावरून व खांद्यावरून निष्काळजीपणाने टाकलेली होती. कर्नल अलेक्झांडरने मला त्याची ओळख करून दिली. तो सभ्यतापूर्वक मला सामोरे गेला. त्याने बंधुभावपूर्वक मला देण्यासाठी काही सुंदर फुले तोडून आणली. त्यानंतर त्याने मला त्याची बाग व देवघर दाखवले आणि काही सामान्य संवादानंतर मी त्याच्यातला एक अनोखा योद्धा अनुभवला जेव्हा तो हसून मला म्हणाला, ‘तुम्हाला माझी ओळख इतरत्र करून द्यायला आनंद झाला असता.’ मी त्याला अभिवादन केले व तेथून निघालो.’
पुढे तो म्हणतो, ‘तो आता, माझ्या मते पाच वर्षांपासून कैदेत आहे आणि
आयुष्यभर इथेच राहण्याची शक्यता आहे किंवा त्याचा आश्रयदाता बाजीराव
असेपर्यंत. तो त्याच्या सद्यस्थितीसाठी बॉम्बेचे गव्हर्नर एल्फिन्स्टन
यांना जबाबदार धरतो. तो म्हणतो, ‘एल्फिन्स्टन माझा सर्वात चांगला मित्र आणि
सर्वात वाईट शत्रू आहे.”
त्रिंबकजीविषयी चिंता व्यक्त करताना हेबर
म्हणतो, ‘त्याचं जीवन आता उदास, नीरस आणि कंटाळवाणं झालंय. त्याची पूर्ण
करमणूक म्हणजे त्याच्या देवाची पूजाअर्चा, बागकाम व नोकरांसोबतच्या गप्पा.
हल्ली तो त्याच्या हिशोबात फारच व्यस्त असतो. त्याच्या स्वयंपाक्याने
त्याचे तूप चोरल्यामुळे त्याने केवढातरी आरडाओरडा केला होता. काय त्याच्या
नशिबाने ही वेळ त्याच्यावर आणली की एक खुनी, दंगेखोर व खोटारडा व्यक्ती
म्हणून त्याला आता जगावं लागतंय. मला आशा आहे की मला त्यांच्याप्रती
सहानुभूती व्यक्त करता येईल.’
कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्रिंबकजींनी स्वकर्तुत्वावर पेशवाईत स्वतः चे वेगळे स्थान निर्माण केले. बाजीरावांचे विश्वासू व पुढे पेशव्यांचे कारभारी बनले. मराठेशाहीच्या उत्तरार्धात त्यांनी शिंदे, होळकर, भोसले, पेंढारी इ.ना इंग्रजांविरुद्ध एकत्र आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्रिंबकजींचं वाढतं वर्चस्व इंग्रजांना असह्य होऊ लागलं. गंगाधरशास्त्री खूणप्रकरणाशी त्यांचा संबंध जोडून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं. ठाण्याच्या तुरुंगातून पलायन केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी भिल्ल, रामोशी इ. ना संघटित केले व इंग्रजांविरुद्ध उठाव केले. मोठ्या फौजेनिशी पेशव्यांना मिळून 1817-18 च्या इंग्रज-मराठा लढायांत पराक्रम गाजवला. आष्टीच्या लढाईनंतर अनेक मराठी सरदारांनी पेशव्यांची साथ सोडून दिली. अशावेळी निष्ठावंत त्रिंबकजी अखेरपर्यंत पेशव्यांसोबत होते. धुळकोटला नाईलाजाने पेशव्यांना इंग्रजांसमोर शरणागती पत्करावी लागली व बापू गोखलेंनी 5 नोव्हेंबर 1817 ला ब्रिटिश रेसिडेंसीवर हल्ला करून सुरू केलेला हा दीर्घकाळापर्यंत चाललेला संघर्ष समाप्त झाला. इंग्रजांनी ‘त्रिंबकजींना आम्ही केवळ जीवदान देऊ शकतो’ असे सांगितले. पेशव्यांनी ब्रम्हावर्ताची वाट धरली. इतर अनेक मराठमंडळींच्या जहागिऱ्यांना इंग्रजांनी अभय दिले, सरंजाम कायम ठेवले. मात्र आयुष्यभर त्रिंबकजींना येथून हजार किलोमीटर दूर चुनारच्या किल्ल्यावर कारावासात राहावं लागलं. शिवछत्रपतीस्थापित मराठी राज्य वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या त्रिंबकजींचा संघर्ष इतिहासाच्या पडद्याआड राहिला ही खरोखरचं मोठी शोकांतिका आहे.
त्रिंबकजींचा मृत्यू कसा झाला?
मृत्यूपूर्वी त्रिंबकजींना दुर्धर
आजारांनी ग्रासले होते. त्यांनी कलकत्त्याला गव्हर्नर जनरलकडे विनंती केली
होती की मला येथून काशीला जावू द्यावे. तिथे मरण आल्यास मोक्ष मिळतो असे
आमच्या धर्मात म्हणतात, परंतु ती याचिका फेटाळण्यात आली होती. त्यानंतर
काही दिवसांनी 16 ऑक्टोबर 1829 ला चुनारगडावर त्रिंबकजींचा मृत्यू झाला.
लेखन- © सुमित अनिल डेंगळे.
संदर्भ-
1. History of Mahrattas – James Grant Duff
2. Bajirao ll and the East India Company – Pratul Chandra Gupta
3. The Asiatic Journal & Monthly register for british and foreign India, China and Austrelia -1835
4. Narrative of a Journey through the Uppar Provinces of India from Culcutta to Bombay (1824-25) – Bishop Reginald Heber
सरदार त्रिंबकजी डेंगळे
सरदार त्रिंबकजी डेंगळे
सरदार त्रिंबकजी डेंगळे
आज दिनांक 16 ऑक्टोबर 2019, सरदार त्रिंबकजी डेंगळे यांची 190 वी पुण्यतिथी.
‘बाजीरावास पुष्कळ कुटिल मंत्री होते पण त्या सर्वांत त्रिंबकजी डेंगळे हा श्रेष्ठ होता. वास्तविक त्रिंबकजी हा अत्यंत शूर, धाडसी, हजरजबाबी, कल्पक व कर्ता असा पुरुष होता. पेशवाईच्या गादीची इतकी हलाखी झाली हे त्याला पाहावत नसे; या सर्वाला कारण इंग्रज हे त्यांच्या मनाने घेतले होते. इंग्रजांच्या वैराचा स्पर्श त्याला लागला नसता किंवा नाना फडणीसासारख्या मुत्सद्याच्या पदरी तो असता तर इतिहासात त्याचे मोठे नाव झाले असते.’
- ‘History of mahrattas’- James grant Duff
- ‘Bajirao II and the East India Company’- Pratul Chandra Gupta
- ‘John briggs in Maharashtra’- Arvind Deshpande
- ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’-राजवाडे (खंड 4)
- ‘मराठे व इंग्रज’- न.चिं.केळकर
- ‘महाराष्ट्रातील स्वातंत्र्यलढे’- वि.गो.खोबरेकर
त्रिंबकजी डेंगळे यांच्या पराक्रमी सुटकेचा साक्षीदार असणारा ‘ठाण्याचा किल्ला’
त्रिंबकजी डेंगळे यांच्या पराक्रमी सुटकेचा साक्षीदार असणारा ‘ठाण्याचा किल्ला’
लेखन ::सुमित अनिल डेंगळे
आज जिथं ठाण्याचं मध्यवर्ती कारागृह आहे तोच ठाण्याचा किल्ला. हेच ते ठिकाण जिथून 1816 सालच्या 12 सप्टेंबरला इंग्रजांच्या तावडीतून शेवटच्या पेशव्यांचे कारभारी त्रिंबकजी डेंगळेंनी इतिहासप्रसिद्ध पलायन केलं. खाडीच्या काठी उभा असलेला, भक्कम तटबंदी लाभलेला, पोर्तुगिजांनी बांधलेला हा कासवाच्या आकाराचा किल्ला खरोखरचं अप्रतिम आहे.
ग्रँट डफ (मराठ्यांचा आद्य इतिहासकार) आपल्या History of Mahrattas (Vol.3, Page no. 377) या ग्रंथात म्हणतो त्याप्रमाणे ‘त्यावेळी या घटनेला लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचं रूप दिलं आणि त्रिंबकजींची प्रसिद्धी मराठी मुलुखात फार मोठ्या प्रमाणावर वाढली, इतकी की पेशव्यांच्या कारभारीपदी असतानाही पूर्वी त्यांना मिळाली नसेल.’ यावरून या घटनेचं महत्त्व लक्षात येण्यासारखं आहे. तसचं ग्रँट डफ हा त्रिंबकजींचा समकालीन होता हेसुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे.
815 साली त्रिंबकजी डेंगळे यांच्यावर बडोद्याचे वकील गंगाधरशास्त्री पटवर्धन यांच्या पंढरपूरला झालेल्या खुनाचे आरोप इंग्रजांकडून ठेवण्यात आले. इंग्रजांनी त्रिंबकजींची मागणी पेशव्यांकडे केली. आधी वसंतगड (कराडजवळ) इथं पेशव्यांनी त्यांना ठेवलं, पण त्यावर इंग्रजांचं समाधान झालं नाही. त्रिंबकजी आमच्याच कैदेत असावे असं म्हणून एल्फिन्स्टननं (पुण्याचा इंग्रज रेसिडेंट) पेशव्यांवर दबाव आणायला सुरुवात केली. इंग्रजांच्या वाढत्या वर्चस्वाला आव्हान निर्माण करणाऱ्या आणि पेशव्यांचा सरदार, सल्लागार, कारभारी असणाऱ्या त्रिंबकजींना दूर करण्याची आयती संधी इंग्रजांना मिळाली. मग वेल्लोर, श्रीरंगपट्टणम, चुनार व कलकत्ता ही ठिकाणं त्यांना ठेवण्यासाठी इंग्रजांकडून ठरवली गेली. पेशव्यांची त्याला मान्यता नव्हती. शेवटी कंपनी सरकारच्या मुलुखात असणारा ठाण्याचा किल्ला हे ठिकाण निश्चित केलं गेलं. त्यांना वसंतगडाहून ठाण्याला आणण्यात आलं. वर्षभर ते इथं कैदेत होते. 12 सप्टेंबर 1816 च्या भल्या पावसाच्या रात्री त्यांनी किल्ल्यातून मोठ्या शिताफीनं पलायन केलं. हे खुनाचे आरोप व अटक सगळं संशयाच्या आधारावर होतं. चौकशी म्हणता म्हणता इंग्रज तेव्हाही आणि नंतर त्यांचं राज्य आल्यावरही ठोस पुराव्याच्या आधारे हा खून त्रिंबकजींनी केला हे सिद्ध करू शकले नाहीत. आजवर हा खून गूढ आणि अनाकलनीयच राहिला आहे. असो.
त्रिंबकजींनी ठाण्यातून नेमकं कसं पलायन केलं याचं एक कथानक आपण ऐकलेलं असतं. ते असं,
त्रिंबकजींवर ठाण्याच्या तुरुंगात कडक पहारा असतो. पहाऱ्यावर ठेवलेले सर्वजण युरोपियन असतात. एक मराठी माणूस काही दिवसांनी किल्ल्याचा तुरुंग अधिकारी एल्ड्रिज यांच्या घोड्याच्या मोतद्दाराची (मोतद्दार म्हणजे घोड्याची निगा राखणारा) नोकरी धरतो. तो त्रिंबकजींना ऐकू जाईल अशा आवाजात रोज गाणी (पोवाडा) गात असायचा. तिथल्या युरोपियन मंडळींना त्यातलं काहीएक कळत नसायचं. त्रिंबकजीना मात्र त्यातून संदेश जायचा. अशा रीतीने पलयानाची योजना ठरली. त्रिंबकजींना रोज सकाळ व संध्याकाळी ठरलेल्या वेळेत शौचास नेलं जायचं. एके दिवशी संध्याकाळी त्यांना नेहमीप्रमाणे शौचालयात नेण्यात आलं. बाहेर तुफान पाऊस आणि अंधार होता. पहारेकरी बाहेर थांबले. त्रिंबकजी शौचालयात गेले. तिथून ते जवळच्या तबेल्यात उतरले, तिथल्या खिडकीचे गज आधीच काढून ठेवले होते. नंतर किल्ल्याच्या तटबंदीवर चढले. तिथून खाली उतरले. ठाण्याची खाडी पोहून पलीकडे गेले. तिथं त्यांची माणसं तयारीत होतीच. त्यांच्यासोबत ते रात्रीतून घाटावर म्हणजे इगतपुरी, सिन्नर भागात रवाना झाले.
उपरोक्त कथानक हे खरं आहेच. त्यावेळी इंग्रजांनी केलेल्या चौकशीतूनच ते समोर आलं. तो मोतद्दारसुद्धा त्या दिवसापासूनच गायब झाला. तो गात असलेल्या पोवाड्याच्या काही ओळीसुध्दा इंग्रजीत उपलब्ध आहे (बिशप हेबरने त्याची नोंद आपल्या प्रवासवर्णनात केली आहे). प्रसिद्ध कादंबरीकार ना. सं. इनामदार यांच्या ‘मंत्रावेगळा’ कादंबरीतही आपण हे कथानक वाचलं असेल. परंतु हे तितकच नाही, हा केवळ त्याचा एक वरवरचा आणि तात्कालिक भाग झाला. पुढे काही वर्षे गेल्यानंतर, म्हणजे मराठी राज्य जाऊन इंग्रजांचं राज्य आलेलं असतं तेव्हा इंग्रजांना या प्रकरणासंबंधी एक ‘क्लू’ मिळतो. केस रिओपन होते. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाते. मग बरच कायकाय बाहेर येतं.
हा पलायनाचा कट फार मोठा असून त्यात अनेक छोट्यामोठ्या व्यक्ती आणि घटना समाविष्ट आहेत. एक मराठा महिलेची (लक्ष्मीबाई ?) या सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते. मुंबईच्या ब्रिटिश सॉलिसिटरला दिलेली पन्नास हजार रुपयांची लाच, भिल्लांच्या टोळ्या किल्ल्यात घुसवण्याची योजना, ‘त्या’ महिलेने विकलेले आपले ऐंशी हजार रुपयांचे दागिने, त्रिंबकजींना रोज देण्यात येणाऱ्या दुधाच्या पेल्यातील तांब्याच्या डबीत असणारा संदेश, साधूच्या वेशात ठाणे परिसरात वावरणारे लोक असं बरंच काय काय थक्क करणारं त्यात आहे. एकंदरीत हे प्रकरण फार मोठं आणि रोमांचक आहे. त्रिंबकजींच्या ठाण्यातून सुटकेवर एखादा भन्नाट चित्रपट निघू शकेल हे तर नक्की. असो.
ठाण्याच्या तुरुंगातून पळाल्यानंतर त्रिंबकजींनी खानदेश व शंभू महादेवाच्या डोंगररांगांत भिल्ल, मातंग, रामोशी समाज संघटित केला. इकडे पेशवे आणि इंग्रज यांच्यातील वाद विकोपाला जाऊन त्यांच्यात तह होतो. त्यात त्रिंबकजींच्या कुटुंबीयांना जामीन म्हणून ठेवण्याची अट असते. इंग्रज त्रिंबकजींच्या कुटुंबीयांना ठेवतात ते ही ठाण्याच्याच किल्ल्यात.
त्रिंबकजी डेंगळे यांना पुन्हा एकदा इथं ठेवण्यात येतं. तिसऱ्या आंग्ल मराठा युद्धानंतर 1818 त जेव्हा सासुरवाडी अहिरगाव इथं त्यांना पकडलं जातं, त्यानंतर चांदवड, नगर आणि नंतर ठाण्याच्या तुरुंगातच पुन्हा आणलं जातं. पुन्हा सात आठ महिने ठाणे. तिथेही त्रिंबकजी शांत बसले नव्हते. पुन्हा पलायनाचे अनेक कट बाहेर आकार घ्यायला लागले होते. मग त्यांना तेथून हलवून मुंबई, समुद्रमार्गे कलकत्ता व नंतर काशीजवळील चुनार इथं नेण्यात आलं. जिथं दहा वर्षे कारावासात राहिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
ठाण्यावर 1530 ते 1737 या काळात म्हणजे तब्बल दोन शतकं पोर्तुगिजांचा अंमल होता. त्यांनीच मोक्याचं ठिकाण पाहून हा किल्ला बांधला. त्यासाठी तज्ज्ञ इंजिनीअर्स पोर्तुगाल मधून बोलवून घेतले. नंतर पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. 1782 च्या मराठे व इंग्रज यांच्यात झालेल्या सालभाईच्या तहाने किल्ला इंग्रजांकडे आला. मुंबई व आसपासचा प्रदेश हा कंपनी सरकारच्या बराच पूर्वी ताब्यात आलेला होताच, त्याला हा प्रदेश जोडला गेला. मग किल्ल्याचा तुरुंग म्हणून वापर इंग्रजांनी सुरू केला. त्रिंबकजी तसे इथले पहिले राजकीय कैदी. 1848 साली क्रांतिवीर राघोजी भांगरे यांना फाशी देण्यात आली ती इथंच. तसचं नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याच्या खूनप्रकरणी अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या तिघांना 1910 मध्ये इथं फाशी देण्यात आली. सावरकरांना अंदमानला पाठवण्याआधी इथं ठेवण्यात आलं होतं. 1942 च्या छोडो भारत आंदोलनादरम्यान तर स्वातंत्र्यसैनिकांनी तुरुंग खचाखच भरलं होतं.
कारागृह असल्याने किल्ला पाहण्यासाठी खुला नसतो. किल्ल्याचा काही भाग स्मारकाच्या रूपानं सर्वसामान्यांसाठी आगामी काळात खुला करून देण्याचाही प्रशासनाचा विचार आहे. काही काळापूर्वी तुरुंगात कैदेत असणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे फोटोज तिथे लावण्यात आले. त्रिंबकजी डेंगळे यांचाही फोटो त्यात होता. त्रिंबकजी डेंगळे यांचा तेथील फोटो कारागृह प्रशासनाने नंतर उपलब्ध करून दिला, तो पोस्टमध्ये जोडला आहे.
सुमित अनिल डेंगळे
संदर्भ-
- History of Mahrattas(Vol.3)- James Grant Duff
- Poona Residency Correspondence (Vol. 13)
- मराठी रियासत (खंड 8)- गो. स. सरदेसाई
- मराठी विश्वकोश- ठाणे किल्ला
Monday, 3 April 2023
पुण्यातला डेंगळे पूल
अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय
अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...
-
*बहिर्जी नाईक* शिवाजीराजेंचे गुप्तहेर _(आपल्या मुलांना माहिती असणे गरजेचे आहे. आजही CBI, CID अशी सरकारी खाती यावरच काम करतात.)_ बघायल...
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
°°°छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यंकोजी राजांना पत्र °°° छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस व्यंकोजीराजांना लिहिलेली चार पत...















