विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label धार -देवास-पवार. Show all posts
Showing posts with label धार -देवास-पवार. Show all posts

Wednesday, 10 April 2024

धार पवारांविषयी सविस्तरपणे

 


धार पवारांविषयी सविस्तरपणे
कुलदेवता
शहाण्णवकुळी क्षत्रिय मराठ्यांमध्ये प्रत्येक कुळाचे ठराविक असे कुलस्वामी (कुलदैवत) तसेच कुलस्वामिनी (कुलदेवता) असते. मराठ्यांचे ‘कुलस्वामी’ हे प्रामुख्याने ‘शिव’ स्वरुपात असतात तर कुलस्वामिनी ही ‘शक्ती’ स्वरुपात असते.
शहाण्णवकुळी क्षत्रिय मराठा ‘पवार’ हे मुळचे धारच्या प्राचीन राजपूत क्षत्रिय ‘परमार’ राजवंशाचे वंशज असल्यामुळे धार जवळील ‘उज्जैन’ येथील ‘श्रीमहाकालेश्वर’ हा या पवार घराण्याचा मूळ ‘कुलस्वामी’ आहे. तसेच धार येथील ‘श्रीमहाकालिका’ माता हि ‘पवार’ घराण्याची मूळ ‘कुलस्वामिनी’ आहे.
उज्जैन येथील ‘श्रीमहाकालेश्वर’ हे जग प्रसिद्ध देवस्थान १२ ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. ‘श्रीमहाकालेश्वर’ मुळचे प्राचीन मंदिर ‘परमार राजवंशाने’ बांधले होते. तसेच धारच्या ‘श्री कालिका’ मातेचे मुळचे प्राचीन मंदिर सुद्धा परमार राज वंशाने बांधले होते. पुढे मराठा शाही मध्ये सदर श्री कालिका मातेच्या मंदिराचे जीर्णौद्धार करण्यात आला.
अशा प्रकारे ‘श्रीमहाकालेश्वर’ आणि ‘श्रीमहाकालिका’ हे पवारांचे मूळ कुलस्वामी – कुलस्वामिनी आहेत. परंतु पुढे धारहून महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्यानंतर बऱ्याचशा मराठा पवारांमध्ये मूळ कुलदेवता-कुलदेवी बदलले जाऊन येथील प्रचलित स्थानिक देवता किंवा ग्रामदेवता यांना कुलदेवता किंवा कुलस्वामिनी मानल्याचे आढळते. त्यामुळेच महाराष्ट्रातील मराठा पवार घराण्यांमध्ये ‘खंडेराय-भवानी’, ‘भैरव(भैरी)-भवानी’, ‘ज्योतिबा-भवानी’ आणि तसेच ईतर प्रसिद्ध देवी-देवता कुलस्वामी-कुलस्वामिनी म्हणुन मानले जातात.
अशा प्रकारे परंपरेने चालत आलेल्या आपल्या मूळ कुलस्वामी-कुलस्वामिनी यांचे स्मरण ठेऊन प्रत्येक मराठा पवार यांनी त्यांचे पूजन केले पाहिजे.
मराठा पवारांचे गोत्र
शहाण्णवकुळी क्षत्रिय मराठ्यांच्या परंपरेने चालत आलेल्या वैशिष्ठ्यांमध्ये ‘पवार’ कुळी संदर्भात माहिती पुढील प्रमाणे.
मुख्य कुळी : पवार
वंश : सुर्यवंश
गोत्र : वसिष्ठ
वेद : ॠग्वेद
गादी : धार नगरी
देवक : तलवारीची धार
कुलदेवता : ‘श्रीमहाकालेश्वर- श्रीमहाकालिका’, ‘खंडेराय-भवानी’, ‘भैरव(भैरी)-भवानी’, ‘ज्योतिबा-भवानी’
उपकुळे : निंबाळकर, विश्वासराव. दळवी, ढवळें, गुढेकर, देशमुख, पाटील, वाघ, बागवे, जगदाळे, धारराव, घोसाळकर, बने, धनावडे, सावंत ( पटेल ), राऊळ, पंडित, तळवटकर, झुंझारराव, औषधराव, मुकुटराव, धारराव, दुधाने, जगदाळे
महाराष्ट्रातील ९६ कुळी क्षत्रिय मराठा घराणे
महाराष्ट्रातील ९६ कुळी क्षत्रिय मराठा घराणे हे प्राचीन क्षत्रिय राजघराण्याचे वंशज आहेत. या ९६ कुळी क्षत्रिय मराठ्यांमध्ये पवार घराणे हे एक मुख्य कुळी म्हणुन गणले जाते. हे पवार घराणे प्राचीन क्षत्रिय राजपूत परमार राजवंशाची एक शाखा आहे. या प्राचीन क्षत्रिय राजवंशाचा उदय राजस्थानातील आबू पर्वत येथे झाला. तेथून हा राजवंश मध्य भारतातील उज्जैन व धारा नगरी येथे आला व पुढे आपल्या पराक्रमाने भारतातील चक्रवर्ती सम्राट पदाचा मानकरी झाला. या प्राचीन क्षत्रिय राजवंशाचे मुख्य सत्ताकेंद्र अथवा राजधानी धारानगरी म्हणजेच आजचे धार हे होते.
मध्यभारतातील माळवा प्रांतातील हि धारानगरी परमार राजवंशाच्या कालखंडात एक संपन्न व सुसंस्कृत नगर म्हणुन प्रसिद्ध होते. धार येथील या प्रसिद्ध परमार राजवंशाच्या शाखा महाराष्ट्रात विवध कालखंडात आल्या व येथेच स्थायिक झाल्या. महाराष्ट्रात आल्यावर परमार राजवंशाला पवार संबोधू जावू लागले. तसेच धार येथून आल्यामुळे त्यांना धारचे पवार ही म्हटले जावू लागले.
इसवी सन १३ व्या शतकानंतर महाराष्ट्रातील प्राचीन क्षत्रिय राजघराण्यांचा ९६ कुळांचा एक गट अस्तित्वात आला. त्यामध्ये त्याकाळात महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या उत्तरेतील क्षत्रिय राजघराण्यांचा हि समावेश झाला. अशा प्रकारे प्राचीन क्षत्रिय राजवंशी परमार पासुन जसे पवार त्याचं प्रमाणे सोलंकी पासुन साळुंखे, चालुक्य पासुन चाळके, चौहान पासुन चव्हाण, शिलाहार पासुन शेलार, यादव पासुन जाधव, शिसोदिया पासुन भोसले, मौर्य पासुन मोरे, कदंब पासुन कदम, सेन्द्रक पासुन शिंदे, शंखपाला पासुन सकपाळ, राणा पासुन राणे, सुर्वे वैगरे मराठ्यांच्या ९६ कुळ्या अस्तित्वात आल्या.
९६ कुळी मराठा हि संकल्पना अस्तित्वात येण्याचा कालखंड हा १४ व्या शतका नंतरचा आहे. त्यापूर्वी हि सर्व राजघराणी क्षत्रिय राजपूत अथवा क्षत्रिय म्हणूनच ओळखली जात.
धारच्या या पवार म्हणजेच धार पवार घराण्याचे महाराष्ट्रात आगमन हे साधारणपणे १० व्या शतका नंतरचे आहे. त्यापूर्वी पवारांची एखाद दुसरी शाखा धारवरून महाराष्ट्रात आल्याच्या नोंदी इतिहासत सापडतात. परंतु धारमधुन पवारांच्या वेगवेगळ्या शाखेचे महाराष्ट्रात झालेले स्थलांतर हे इसवी सन १३०५ नंतरचे आढळते. कारण इसवी सन १३०५ मध्ये अल्लाउद्दिन खिलजीने धार येथील परमरांचा पराभव केला व तेथील परमारांची सत्ता संपुष्टात आणली. म्हणजेच १४ व्या शतकात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतांत जसे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा, विदर्भ आणि इतरत्र पवारांच्या शाखा उदयास आल्या आणि तेथेच स्थयिक झाल्या.
मराठ्यांच्या इतिहासात प्रमुख धार पवार घराण्याच्या ज्या एका शाखेचा प्रामुख्याने उल्लेख येतो तो ती म्हणजे मूळ पुरुष साबूसिंह परमार अथवा पवार यांपासून उदयास आलेली हि शाखा. धार पवारांची हि शाखा त्यामानाने काहीशी उशिराच म्हणजे इसवी सन १७ व्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात आल्याची नोंद मिळते.
धार पवार या शाखेचे प्रमुख वास्तव्य नगर जिल्ह्यातील सुपा या गावी होते. तेथूनच या शाखेचा विस्तार पुणे जिल्ह्यातील मलठण, वाघाळे, कवठे, हिंगणी, गणेगाव, पाथरे, अमदाबाद, चितेगाव तसेच जळगाव जिल्ह्यातील नगरदेवळे येथे झाला.
याच शाखेतील शूरवीरांनी मध्य प्रदेशातील धार व देवास येथे पवार घराण्याची पुनर्स्थापना करून मराठ्यांची धार व देवास हि संस्थाने अस्तित्वात आणली.
साबूसिंह पवार यांच्या पासुन उदयास आलेल्या धार पवार ह्या घराण्याच्या शाखेने स्वराज्य स्थापना तसेच स्वराज्याचा विस्तार या कार्यामध्ये मोलाची कामगिरी करून धार पवार घराण्याचा ठसा ईतिहासात उमटविला आहे.
धार पवारांच्या ह्या शाखेतील साबुसिंह व त्यांचे पुत्र कृष्णाजी पवार यांनी शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर राहून आपला पराक्रम गाजविला. कृष्णाजींचे पुत्र बुवाजी, रायजी व केरोजी यांनी शिवकालाच्या उत्तराधार्त तसेच पुढे छत्रपती राजाराम महाराजांच्या कालखंडात मोठा पराक्रम गाजवून मराठ्यांच्या मोगल बादशाह औरंजेबाच्या विरुद्धच्या लढाईत मोलाची कामगिरी बजावली. यामध्ये बुवाजी पवार यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या पुढे महाराजांनी विश्वासराव हा मनाचा खिताब दिला.
बुवाजी पवारंचा पुत्र काळोजी व संभाजी यांनी छत्रपती शाहू महाराजांना साथ देत थेट मध्यभारतातील मांडवगड येथ पर्यंत धडक दिली होती. काळोजींचे पुत्र तुकोजीराव, कृष्णराव, जिवाजी व मानाजी यांनी पहिल्या बाजीरावा पेशव्यांसोबत उत्तरेतील मोहिमात पराक्रम गाजवून देवास येथे आपले ठाणे प्रस्थपित केले. तसेच संभाजी पवार यांचे पुत्र उदाजीराव, आनंदराव, व जगदेवराव यांनी सुद्धा उत्तरेमध्ये मध्यभारतात मराठ्यांचे वर्चस्व स्थापित केले व धार हे पवारांचे प्रमुख ठाणे म्हणुन प्रस्थापित केले. अशा प्रकारे पवारांच्या प्राचीन राजधानीचे ठिकाण त्यांच्याच वंशजांनी पुढे ४०० वर्षानंतर आपल्या पराक्रमामुळे मिळविले.
धार पवारांच्या प्रमुख शाखेव्यातारिक्त आजूनही वेगवेगळ्या शाखा उदयास आल्या व आपल्या पराक्रमाने वतन वैगरे संपादन करून महाराष्ट्रात विस्तारित झाल्या. धार पवारांच्या काही शाखांची माहिती खालील दिल्याप्रमाणे
१] निंबाळकर : हे घराणे मुळचे धारचे पवार घराणे आहे. यांचा मूळपुरुष निंबराज पवार यांनी इसवी सन १३ व्या शतकात सातारा जिल्ह्यातील फलटण येथे निंबळक गाव वसविले. याच गावाच्या नावावरून त्यांना निंबाळकर असे उपनाव प्राप्त झाले. या घराण्याला नाईक हि पदवी मिळालेली असून इतिहासत नाईक- निंबाळकर या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी यांचे पूर्वपार नाते संबंध आहेत.
२] विश्वासराव : शिवकाळात प्रसिद्ध असणारे हे घराणे मुळचे धार पवार. विश्वासराव हि पदवी ह्या घराण्याला मिळालेली आहे. शिवनेरीचे किल्लेदार विजयराव विश्वासराव याच घराण्यातील होते. या घराण्याकडे कर्नाळा किल्ल्याची सुद्धा जबाबदारी होती. या घराण्याचे वंशज सध्या कर्नाळा किल्ल्या जवळील कल्हे या गावात वास्तव्य करून आहेत तसेच राजापूर तालुक्यामध्ये झर्ये या गावात सध्या वास्तव्य करून आहेत.
३] ढवळे : या घराण्याचा मूळ पुरुष राजा रणधवल याने इसवी सन १४ व्या शतकात सातारा जिल्ह्यात ढवळ हे गाव वसविले. राजा रणधवल हा मूळच्या परमार राजवंशाचीच एक शाखा होय. अशाच प्रकारे ढवळे गावच्या पवारांना ढवळे हे उपनाव प्रात्प झाले. याच पवार घराण्यातील वंशज पुढे जाऊन नांदवळ या गावी जाऊन स्थायिक झाले. पुढे जाऊन ते नांदवळचे पवार महणून प्रसिद्ध झाले. या पवार घराण्याने नाईक-निंबाळकर यांचे सरदार म्हणुन पराक्रम गाजविला. पुढे ते अक्कलकोट येथील भोसले घराण्याचे सरदार म्हणुन तर कधी पेशव्यांचे सरदार म्हणुन पराक्रम गाजविला.
४] गुढेकर : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहे या गावी प्राचीन काळी जे पवारांचे घराणे होते त्यांना पुढे गुढेकर हे नाव प्राप्त झाले. या पवार घराण्याने प्रथम देवगिरीच्या यादव या घराण्याचे सरदार म्हणुन काम केलेले आढळते. पुढे जाऊन विजयनगर चे सम्राट यांचे सुद्धा सरदार म्हणुन नावलौकिक मिळविल्याची नोंद इतिहासात आढळते.
५] सावंत : सावंत हि पदवी असल्यामुळे अनेक मराठा सरदारांना हि पदवी मिळालेली आढळते. त्याचप्रमाणे हि पदवी पवार धार पवार घराण्याच्या एका शाखेला मिळालेली आढळते. या पवार घराण्याचा मूळ पुरुष सावंतराय हा असून त्यांचे मुळचे वास्तव्य रायगड जिल्याालतील माणगाव तालुक्यामध्ये गोवेले या गावी होते. शिवकाळात या गोवलकर सावंतांचा उल्लेख आढळतो.
६] तसेच सावंत पटेल हे सिंधुदुर्ग येथील भिखंडे येथे एक सावंत घराणे उदयास आले जे मुळचे धार पवार आहेत. या कुळाचा मूळपुरुष लखम पवार हे होते.
७] पंडित : रत्नागिरी जिल्ह्यातील तुरुंबव या गावी पंडित या घराण्याचे वास्तव्य आहे. हे घराणे मुळचे धार पवार आहेत. या गावात शारदा देवीचे (सरस्वती मातेचे) मंदिर आहे. बहुदा सरस्वती मातेचे भक्त असल्यामुळे अथवा विद्वत्तेमुळे या धार पवार घराण्याला पंडित हे उपनाव प्राप्त झाले असावे.
८] बागवे : हे घराणे मुळचे धारचे त्यांचे मुळचे वास्तव्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भासुरे ह्या गावी होते.
महाराष्ट्रातील विवध भागात स्थायिक झालेल्या मुळच्या धार पवारांविषयी जाणून घेवूया
कोकणातील धार पवार : कोकणामध्ये प्रामुख्याने सर्वच जिल्ह्यात धार पवार घराणी वास्तव्य करून आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यामधील गुहागर तालुक्यामधील पवार साखरी व ईतर गावे, मंडणगड तालुक्यातील शावली गाव, खेड तालुक्यातील गावे, रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने रायगड किल्ल्याच्या परिसरात आढळतात जसे महाड तालुक्यात बिरवाडी, पाचाड, कोंझर, माझेरी, कोकरे, फौजी आंबवडे, नांदगाव, कुर्ले, चोचींदे तसेच पोलादपूर तालुक्यामध्ये तुर्भे गावी हि ठिकाणे आढळतात. हि धार घराणी शिवकाळात उदयास आल्याची नोंद इतिहासात आढळते.
पश्चिम महाराष्ट्रातील धार पवार
सातारा जिल्ह्यातील फलटण, पवारवाडी, चितळी, नांदवळ, ढवळ, वाई, इत्यादी ठिकाणी धार पवारांचा विस्तार झालेला पाहायला मिळतो.
पुणे, नगर जिल्ह्यातील धार पवार यांच वास्तव्य प्रामुख्याने पुण्यातील मालठण येथे सापडते. याच बरोबर धार पवारांच्या उदयास आलेल्या ईतर शाखा वाल्हे, भांबुर्डे, शेडाणी, खामगाव, भोर, धारंबा आणि इत्यादी ठिकाणी वास्तव्य करून राहिल्या. नगर जिल्ह्यातील धार पवारांच्या सुपे गावातील प्रमुख शाखे व्यतरिक्त पवारांच्या ईतर शाखा इतरत्र जाऊन स्थायिक झाल्या.
खान्देशातील पवार : नाशिक, जळगाव, धुळे जिल्ह्यातहि धार पवारांच्या शाखेचा उदय झाल्याच्या नोंदी इतिहासात आढळतात. तसेच इतरत्र म्हणजे पाचोरा, अमळथे या ठिकाणी हि धार पवारांचे वास्तव्य पहावयास मिळते.
अशाप्रकारे शिवपूर्व काळात, शिवकाळात, पेशवाई या विवध कालखंडामध्ये महाराष्ट्रातील धार पवारांनी पाटीलकी, देशमुखी, खोती, किल्लेदारी, सरदारी ते थेट जहांगिरी, सरंजामदार, आणि संस्थानिक पर्यंतची महत्वाची वतने संपादन करून महाराष्ट्रातील विविध भागात वास्तव्य करून आपल्या धार पवार घराण्याचा नावलौकिक वाढविला.

Tuesday, 2 April 2024

नगरदेवळेकर पवार घराणे📜🌾🛑

 










नगरदेवळेकर पवार घराणे📜🌾🛑
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात जळगाव ते चाळीसगाव या मध्य रेल्वेमार्गावर नगरदेवळा रेल्वे स्टेशन आहे. जळगाव पासून ७० कि.मी. अंतरावर तर चाळीसगावकडून ३५ कि.मी. अंतरावर असलेले नगरदेवळा हे गाव रेल्वे स्थानकापासून ५ कि.मी. अंतरावर आहे. अग्नावती नदीकाठी वसलेले देवळांचे नगर म्हणजे नगरदेवळा अशी या गावाच्या नावाची उत्पत्ती सांगणाऱ्या या गावात धार येथील पवार यांच्या वंशजांचा गढीवजा कोट आहे. मराठेशाहीच्या उत्तरकाळात पेशव्यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या अनेक वतनदारांनी आपल्या वतनात भुईकोट व गढ्या बांधल्या. यातील बरेच भुईकोट वाडे हे खाजगी स्वरूपाचे असुन त्यांचा उपयोग महसूल जमा करण्यासाठी व स्वसंरक्षणसाठी होत होता. वतने खालसा झाल्याने खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने आज बहुतांशी गढी कोट उध्वस्त होत चालले आहेत. स्थानिकांची या वास्तुबाबत असलेली उदासीनता देखील या गढीकोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे.
आंतरजाल व इतर कोणत्याही पुस्तकात नगरदेवळा या गढीची माहिती सापडत नसल्याने या किल्लेवजा गढीची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. साधारण बारा एकरमध्ये पसरलेला नगरकोट त्याच्या आत तीन एकरात गढीवजा कोट व त्याच्या आत खासे पवार यांचा वाडा अशी या कोटाची रचना आहे. बारा एकरात पसरलेला हा नगरदुर्ग आज पुर्णपणे नष्ट झाला असुन त्याच्या तटबंदीत असलेल्या पाच बुरुजापैकी केवळ एक फत्ते बुरुज आज शिल्लक आहे. फत्ते बुरुजाशेजारी गावाच्या वेशीचा दरवाजा आजही शिल्लक असुन हा दरवाजा फत्ते दरवाजा म्हणुन ओळखला जातो.
या दरवाजाशिवाय या नगरदुर्गाला गणेश दरवाजा,गाळण दरवाजा व भडगाव दरवाजा असे तीन वेगवेगळे दरवाजे होते. या नगरदुर्गाच्या आत असलेल्या गढीची तटबंदी आजही काही प्रमाणात शिल्लक असुन उर्वरित तटबंदी गढीच्या आत असलेल्या वस्तीने गिळंकृत केली आहे. गढीच्या तटबंदीत चार टोकाला चार बुरुज व गढी अंतर्गत टेहळणी अथवा झेंडा बुरुज असे एकंदरीत पाच बुरुज असुन या गढीचे आज केवळ मारुती बुरुज व झेंडा बुरुज असे दोनच बुरुज शिल्लक आहेत.
गढीची तटबंदी साधारण १५ फुट उंच असुन तटाबुरुजाचा खालील भाग काळ्या दगडात तर वरील चर्या विटांनी बांधल्या आहेत. गढीचा पुर्वाभिमुख मुख्य दरवाजा आजही शिल्लक असुन या दरवाजाच्या वरील बाजूस नगारखाना तर आतील बाजुस घोड्याच्या पागा पहायला मिळतात. दरवाजाच्या आतील बाजुने तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर मुख्य वाडयाकडे जाताना वाटेच्या डाव्या बाजुस चौथऱ्यावर बांधलेली काही जुनी घरे आहेत. या घरांच्या दगडी चौथऱ्यावर काही झीज झालेली शिल्प तसेच कोरलेली नक्षी पहायला मिळते. घरांच्या रांगेत पुढे एक भली मोठी विहीर असुन या विहिरीचे पाणी आजही वापरात आहे.
येथुन पुढे आपण गढीतील मुख्य वाडयाकडे येतो. वाडयाला स्वतंत्र अशी तटबंदी असुन या तटबंदीला कमानवजा दरवाजा आहे. या दरवाजाच्या अलीकडे उजवीकडील वाट झेंडा बुरुजाकडे जाते. झेंडा बुरुजाची उंची ३५ फुट असुन बुरुजावर जाण्यासाठी आतील बाजुने गोलाकार पायऱ्या आहेत. बुरुजावर एक खोली असुन ध्वजस्तंभ आहे. या ध्वजस्तंभाला बळी देण्याची प्रथा होती पण २०१२ पासुन हि प्रथा बंद झाली आहे. बुरुजावर सज्जा बांधलेला असुन गढीमधील हे सर्वात उंच ठिकाण आहे. येथुन गढीचा अंतर्गत परीसर, नगरदेवळा शहर व दूरपर्यंतचा प्रदेश दिसतो.
बुरुज पाहुन झाल्यानंतर कमानवजा दरवाजातुन आपण राजे पवार यांच्या चौसोपी वाड्यासमोर येतो. दुमजली असलेला हा वाडा सध्या विद्यार्थ्यांचे वसतीगृह असुन त्या अनुषंगाने त्यात बदल करण्यात आले आहेत. वाड्याच्या लाकडावर सुबक आणि रेखीव अशा मुर्ती कोरलेल्या असुन दरवाजाची द्वारपट्टी पूर्णपणे लाकडात कोरलेली आहे. वाडयाच्या आवारात एक विरगळ तसेच प्राचीन मंदिराचा मुर्ती कोरलेला अवशेष उघडयावर पडलेला आहे. या शिवाय वाडयाच्या आवारात एक कबर असुन आरसे महाल,सदर,पागा इत्यादी उध्वस्त झालेल्या वास्तुंची जोती पहायला मिळतात. या उध्वस्त वास्तुंचे तळखडे आजही तेथे पडलेले आहेत. यातील सदरेखालील तळघर भुयारी मार्गाने आरसे महाला खाली असलेल्या तळघराशी जोडलेले आहे. या तळघरातुन कधीकाळी गढीबाहेर पडण्याचा मार्ग होता पण सध्या तो बंद झाला आहे.
नगरदेवळाचे संस्थानिक कै . श्रीमंत बाळासाहेब पवार यांनी त्यांच्या तलवारी, कट्यारी, खंजीर, गंजिफा, भांडी, नाणी, अशा अनेक वस्तु उत्तर महाराष्ट्र विदयापीठाला दिल्या तिथे पुरातत्त्व लेखाभिगा संग्रहालय निर्माण करण्यात आले आहे. त्यात विष्णुचे दशावतार कोरलेली एक दुर्मिळ तरवार आहे. याशिवाय गावाजवळ असलेल्या छत्रीबाग परिसरात पवार घराण्यातील काही व्यक्तींच्या समाधी पहायला मिळतात.
मध्यभारतातील प्राचीन धारानगरी म्हणजेच आजचे धार हे परमार राजवंशाच्या काळात एक संपन्न नगर म्हणुन प्रसिद्ध होते. धारच्या या परमार राजवंशात राजा भोज सारखा पराक्रमी सम्राट होऊन गेला. माळवा प्रांतात असलेले परमार घराण्याचे राज्य इ.स.१३०५ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर लयास गेल्यावर धारच्या परमार घराण्याचे वंशज निरनिराळ्या प्रांतात जाऊन स्थायिक झाले. त्यातील एक शाखा महाराष्ट्रात आली व पवार म्हणुन उदयास पावली.
प्राचीन राजधानी धार येथून आल्यामुळे हे घराणे धार पवार म्हणून इतिहासात प्रसिद्धिस आले. साबुसिंग पवार हे या पवार घराण्यातील मूळ पुरुष म्हणुन ओळखले जातात. साबुसिंग पवार यांनी घोडेस्वार व पायदळ बाळगुन अहमदनगर जवळ हंगे गावाच्या रानात आपले ठाणे बनविले. इ.स.१६५८ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याणवर स्वारी केली त्यावेळी साबुसिंग महाराजांसोबत होते. पुढे त्यांनी अहमदनगर सुभ्यात सुपे गाव वसविले व या गावची पाटीलकी मिळवली. साबुसिंग यांना कृष्णाजी नावाचा पुत्र होता. महाराजांनी विजापूरकरांच्या मुलखावर केलेल्या स्वाऱ्यात कृष्णाजी पवार सामील होते. अफझल खानच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजलखान ह्याच्याबरोबर झालेल्या झटापटीत कृष्णाजी पवार यांचे नाव पुढे येते. कृष्णाजी पवारांच्या कामगिरीवर महाराजांनी त्यांना कणगी व करणगाव इनाम दिले.
कृष्णाजी पवारांच्या मृत्युनंतर त्यांचे तीन पुत्र बुबाजी, रायाजी व केरोजी शिवाजी महाराजांच्या सेनेत सामील झाले. संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्येनंतर मराठेशाहीवर कोसळलेल्या संकटात ज्या मराठा सरदारांनी मोगलांशी झुंज दिली त्यात या पवार बंधुंचे नाव दिसुन येते. राजाराम महाराजांनी टाकलेल्या विश्वासामुळे बुबाजी व केरोजी यांच्या फौजानी मोगलांच्या वऱ्हाड आणि गंगाथडी मुलखात घौडदौड करून चौथाई वसुल करत मोगल फौजेस हैराण करून सोडले व मराठ्यांचा दरारा वाढवला.
इ.स. १६९४ मध्ये सेनापती संताजी घोरपडे मोंगलाची रसद लुटताना मोंगल सरदार हिम्मतखान याने घेरले असता बुवाजी पवार यांनी आपल्या फौजेसह हि कोंडी फोडत संताजी घोरपडे यांची सुटका केली. या कामगिरीमुळे राजाराम महाराजानी जिंजीहून महाराष्ट्रात परत आल्यावर बुबाजीस विश्वासराव हा किताब व सरंजाम तर केरोजीस सेनाबारासहस्त्री हि पदवी व वस्त्रे दिली. इ.स.१६९९ मध्ये खानदेश मोहिमेवर असता मोगलांनी बुबाजीस जिवंत पकडुन आशिरगडावर भिंतीत चिणुन ठार मारले.
या तिन्ही भावांची घराणी सुप्यात असलेले बुबाजीचे मोठे पवार घराणे विश्वासराव रायाजी यांचे वाघाळे तर केरोजी यांचे नगरदेवळे ह्या नावाने प्रसिद्धीस आली. इ.स. १७०३ पासून मराठ्यांनी खानदेश व माळवा येथे स्वाऱ्या करत चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मिळवत मराठयांचा दरारा बसवला यातील प्रमुख सरदारात बुवाजी पुत्र काळोजी व संभाजी विश्वासराव व तसेच केरोजी पुत्र धीराजी,रायजी पुत्र मलोजी पवार ह्यांच्या कर्तुत्वाचा विशेष उलेख होतो. काळोजींचे पुत्र तुकोजीराव, कृष्णराव, जिवाजी व मानाजी यांनी पहिल्या बाजीराव पेशव्यांसोबत उत्तरेतील मोहिमात पराक्रम गाजवून देवास येथे आपले ठाणे वसवले .
संभाजी पवार यांचे पुत्र उदाजीराव, आनंदराव, व जगदेवराव यांनी मध्य भारतात मराठ्यांचे वर्चस्व गाजवत धार हे पवारांचे प्रमुख ठाणे म्हणुन प्रस्थापित केले. अशा प्रकारे पवारांच्या प्राचीन राजधानीचे ठिकाण त्यांच्याच वंशजांनी पुढे ४०० वर्षानंतर आपल्या पराक्रमामुळे मिळविले.
खानदेशातील जळगाव जिल्ह्यात नगरदेवळा येथे केरोजी पवार घराण्याच्या एका शाखेला जहागिरी मिळाल्यामुळे तेथे व आसपासच्या प्रदेशात पवार घराण्याचा विस्तार झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर संस्थाने खालसा होईपर्यंत नगरदेवळा संस्थान पवार घराण्याच्या अंमलाखाली होते. आजही नगरदेवळा येथे पवार राजघराणे वास्तव्य करून आहे. ( टिप- सदर लेखातील माहितीचे संकलन नगरदेवळा येथील शिक्षक संजीव बावस्कर सर यांनी केलेले असुन शब्दांकन सुरेश निंबाळकर यांनी केले आहे.)
(✍️ आपणांस ही पोस्ट कशी वाटली, लाईक करा कमेंट करा, आवडल्यास अशीच शेअर करा .🙏😊 )
🛑🌾 संजीव बावसकर
नगरदेवळे
जळगाव.

बहाळ येथील ऐतिहासिक गढी वारसा 📜 ✍🏻भाग 3 ✍🏻

 













बहाळ येथील ऐतिहासिक गढी वारसा 📜
✍🏻भाग 3 ✍🏻
आता आपण गढीच्या दुसऱ्या भागावर जाणार आहोत. गढीवर प्रवेश करताना डाव्या हाताला असलेला परिसर बराच रुंद व सपाट आहे. इतिहासात प्रसिद्ध असलेले सारजादेवी मंदिर याच भागात आहे. किंचितशी चढण चढत असतांना पक्क्या विटा जमिनीत गाडल्याचे जागोजागी दिसते. या विटांची लांबी रुंदी 18 बाय 12 इंच आहे तर जाडी चार सेंटीमीटर पर्यंत आहे. अशा विटा कुठेच आढळत नाहीत.या पोस्टचा पूर्वार्ध आपण वाचला नसेल तर या लिंकला भेट देऊ शकता.👇🏻
वर चढल्यावर समोर दृष्टीस पडते यादव कालीन प्राचीन मंदिर! इ.स. 1222 मध्ये या मंदिराचे बांधकाम करताना मंदिराच्या परिसराचा पाया मजबूत दगडी चिर्यांनी बंदिस्त केलेला दिसतो.या पायाची रुंदीच पाच फुटांपेक्षा जास्त आहे. मंदिराच्या बाह्यभागात बऱ्याच अंतरापर्यंत पक्क्या दगडांचा मजबूत पाया ठळकपणे नजरेत भरतो.यावरून हे सिद्ध होते की त्याकाळी येथे देखील पक्के बांधकाम केले असावे.
येथील माती कमालीची पांढरीशुभ्र आहे. गढीच्या पायथ्याशी असलेल्या बहाळ कसबे या गावातील घरे आतमध्ये घुसल्यासारखी वाटतात.( नशीब, पुरातत्व खात्याने लोखंडी पोलचे कुंपण घातले.)
यादवकालीन सारजा मंदिर परिसरात प्रवेश करतांनाच उजव्या हाताला दोन ध्वस्त मंदिरांचे अवशेष समोर दिसतात. दगडी तुळया, नक्षीदार खांब, भिंतींचे लांबलचक पाषाण, अर्धवट उभ्या असलेल्या भिंती, मोठमोठ्या पाषाण शिळा यांचा प्रचंड ढिगारा पाहताना मन विषण्ण होते. सुंदर रेखीव काम केलेल्या या अवशेषांवरुन नजर फिरवताना मनाला वेदना होतात. या कलाकृती घडवतांना कारागिरांच्या पिढ्यांनी रक्त आटवले, जीवापाड मेहनत करून हे सौंदर्य फुलवले, त्याचा अक्षरशः ढिगारा झालेला पाहताना पूर्वजांना किती यातना होत असतील ?
हे कारागीर केवळ पोटार्थी काम करणारे होते काय ? केवळ गवंडीकाम करणारे बिगारी होते काय ? मोलमजुरी करून उदरनिर्वाह साधणारे होते काय? तर नाही, ते स्थापत्यशास्त्र विषयात पारंगत होते.प्रत्येक दगडाची अचूक मोजमापे घेऊन त्याचे ताशीव पाषाणात रूपांतर करणे हे केवळ पोटासाठी काम करणाऱ्या मजूर लोकांचे काम नाही. कला व विज्ञान विषयाचे उत्तम ज्ञान त्यांना होते. आपण वाचत आहात संजीव बावसकर लिखित पोस्ट. हाच वारसा परदेशात राहिला असता तर त्या लोकांनी व सरकारने तळहाताच्या फोडासारखा जपला असता. आपल्याकडे प्राचीन लेण्या व मंदिरे यांना लागलेले ग्रहण काही केल्या सुटायचे नाव घेत नाही. सगळीकडे खूप काही उद्ध्वस्त झाले आहे.
या मंदिराचा आवाका बघता केवळ आता दिसत आहेत तेवढ्या चार दगडांवर मंदिर उभारले गेले नसेल. येथील बरेचशे चौकोनी ताशीव कोरीवकाम केलेले पाषाणच नाहीसे झाले आहेत, हे स्पष्टपणे जाणवते. या उद्ध्वस्त मंदिरापासून शंभर फुटाच्या अंतरावर असलेले सारजा मंदिर पाहताना मन हेलावून जाते. या मंदिराचा केव्हा एकदा उकिरडा होतो याची जणू आपण वाटच पाहत आहोत असे दिसते. मंदिराचे शिखर कधीच गायब झाले आहे.
कधीकाळी या मंदिराला तीन शिखरे असावीत.कदाचित शिखररचना पक्क्या विटांमध्ये केली असावी. आज सभागृह, गर्भगृह व सभागृहाच्या डाव्या व उजव्या बाजूला असलेली दोन उपगर्भगृहे हे अवशेष रुपात शिल्लक आहेत. मंदिराच्या तळखड्याची रचना श्रीयंत्रासारखी आहे. बाहेर आलेले चार मुख्य चौकोन त्यांच्या आतील उपचौकोन अशी भौमितिक संरचना मंदिराची आहे. श्रीयंत्रात बाहेरच्या बाजूला असलेल्या चौकोनांना भूपुर असे म्हणतात. मंदिराच्या बाह्यसीमा भूपुरसदृश्य आहेत.वरील शिखररचना कशी असेल हे आज सांगता येत नाही. परंतु मंदिराचे निर्माण शास्त्रशुद्ध पद्धतीने केले असावे.हे मात्र ठामपणे सांगता येते.
आज सभागृह आठ स्वतंत्र खांबांवर कसेबसे तग धरून आहे. त्याच्या छतावर माती व दगड गोट्यांचा ढिगारा आहे. सभागृहाच्या दोन्ही भिंती पाषाणचिऱ्यात उभारल्या असल्या तरी त्या भिंतींच्या फटीत दगडधोंडे माती कोसळली आहे. त्यामुळे पाषाण सांध्यांमध्ये दोन- दोन फुटांचे अंतर वाढले आहे. सांध्यांमध्ये पडलेल्या या अंतराने चिरे केव्हा निघतील याची भरवसा नाही. आज आहे त्या परिस्थितीत याचे संवर्धन केले नाही तर या मंदिराचा देखील ढिगारा व्हायला वेळ लागणार नाही. पुरातत्व विभागाने यात जातीने लक्ष घालून योग्य ती पावले उचलावी ही कळकळीची विनंती!
सभागृहाच्या आतमध्ये भिंतीवर डाव्या बाजूला एक शिलालेख आहे. एकसंध दगडावर कोरून त्याला भिंतीत बसवला गेला आहे. (त्याची माहिती पहिल्या पोस्टमध्ये दिली आहे.)आजही तो शिलालेख सुस्थितीत आहे परंतु मंदिराची दुरावस्था बघता तो फार काळ टिकेल असे वाटत नाही. गर्भगृह वितानावरील एक अर्धचंद्राकृती व एक गोलाकार शिखरशिळा केव्हाच कोसळली आहे. त्यामुळे गर्भगृहात दगडगोटे मातीचा खच पडला आहे.
कधीकाळी जेथे पवित्र मंत्रोच्चाराच्या उद्घोषात विधिवत पुजा संपन्न होत असेल तेथे आज अक्षरशः उकिरडा झाला आहे. दुर्दैवाचे दशावतार कशाला म्हणतात हे अनुभवायचे असेल तर एकदा या वास्तूकडे बघावे.
मंदिरात आज एकही मुर्ती नाही. कारण मंदिराची अशी स्मशानावस्था पाहता येथील मूर्ती बहाळ पेठ भागातील रथ गल्लीत नव्याने बांधलेल्या मंदिरात हलवण्यात आल्या असाव्यात. या मुर्ती कधी व कोणी हलवल्या हे माहित नाही. नेमक्या इथे किती व कोणत्या मूर्ती होत्या याची कल्पना येत नाही, परंतु तीन गर्भगृहे पाहता तीन मूर्ती असाव्यात. मंदिराची हळूहळू होत असलेली दुरावस्था बघता पुजाऱ्यांनी हा निर्णय घेतला असावा.
तेराव्या शतकात समृद्ध संपन्न वैभव पाहिलेल्या या मंदिराने अनेक सत्ता स्थित्यंतरे अनुभवली. यादवसत्तेच्या ऱ्हासानंतर मंदिराचेही वैभव संपत गेले. कालौघात मंदिराच्या कपाळी देखील वनवास आला. संपन्न असा हा वारसा हळूहळू लय पावत गेला. परकीय सत्ता आक्रमकांच्या काळात मुर्त्यांची विटंबना होऊ नये म्हणून त्यांना पेठ भागात हलविण्यात आले असावे. आज मंदिर खंडहर रुपात कसेबसे तग धरुन उभे आहे. हे दृश्य पाहताना मन गलबलून जाते.
सभागृहाच्या बाजूला असलेल्या उपगर्भगृहांचे वितान बर्यापैकी शाबूत आहे. ही उपगृहे नेमकी कोणत्या देवतांसाठी होती हे आज सांगता येत नाही. आज त्यांचा दुरुपयोग होत असेल तर तेही नाकारता येत नाही. मंदिरापासून हाकेच्या अंतरावर सय्यद चाँदशाहवली बाबा नावाचा पीर दर्गा आढळतो. हा अगदी अलीकडच्या काळातील आहे. त्याविषयी पुराव्यांऐवजी कपोलकल्पित कथाच जास्त आहेत. का? कधी? कसा? कुणी?.... अनेक प्रश्न निरुत्तरित आहेत. दर्ग्याचे बांधकाम ज्या टेकडीवर केले आहे त्याच्या पायथ्याशी प्राचीन मंदिराच्या पायथ्याचे दगड दिसतात. दर्ग्याला केलेले तारेचे कुंपण, वरतून पत्र्याची शेड, दर्ग्याची रंगरंगोटी सगळे शिस्तबद्ध केलं आहे. इथून सारजा मंदिर मरणासन्न झालेल्या गाईसारखे किलकिले डोळे करत करूण नजरेने आपल्याकडे पाहते. ते भग्नावशेष पाहतांना वैषम्य वाटते आणि लाजही.
एकंदरीत गढी परिसरातून फेरफटका मारताना मनाची खुप घालमेल होते. हजारो वर्षांची मानवी संस्कृतीचे अवशेष आपल्या पोटात सांभाळणारा हा गढी वारसा आज स्मशान झाला आहे. पुरातत्व विभागाने तत्परतेने परिसराला कुंपण घातले, गढीची माती बचावली पण आजही तिच्या माथी असलेला वनवास संपलेला नाही. एकेकाळी नांदता असलेला हा परिसर आज शापित असल्यासारखा वाटतो. इतिहासाप्रति असलेली आपली उदासीनता किती भयानक आहे, यासारखे दुसरे विदारक उदाहरण नाही.
मंदिर हे कधीही केवळ धार्मिक दृष्ट्या बघू नये. त्या काळातील स्थापत्य, पाषाणशिळा घडवतांना, चढवतांना, उभारतांना वापरलेले तंत्रज्ञान, त्या काळातील स्थापत्य विज्ञान, स्तंभ घडवतांना, मंदिर उभारतांना तयार केलेली भौमितिक संरचना या सर्वांचा अभ्यास व्हायला हवा. प्राचीन मंदिरांना धार्मिक चौकटीत बंदिस्त करून हा वैज्ञानिक वारसा आजही आपण काळाच्या पडद्याआड दुर्लक्षित करीत आहोत.
पुरातत्व विभागाने यात जातीने लक्ष घालून यांच्या संवर्धनासाठी पावले उचलावीत. त्याचे पुनर्निर्माण करणे शक्य नसले तरी भिंतींना आधार देण्यासाठी पोलादी कठडे उभारले तर अजूनही नवीन पिढ्यांसाठी हे स्मारक सुरक्षित राहील. लोकप्रतिनिधींना कळकळीची विनंती की पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करून हा प्रश्न धसास लावावा.शासकीय अनुदान व लोकांना विश्वासात घेऊन नवीन मंदिर उभारण्यासाठी वापरण्यात येणारा लाखोंचा निधी इकडे वर्ग केला, त्यांना हे महत्त्व पटवून दिले तर आठशे वर्षांपूर्वीचा समृद्ध वारसा नवीन पिढीसाठी दीपस्तंभ ठरेल. यात तीळमात्र शंका नाही.
( क्रमशः )
पुढील भाग लवकरच !😊
🛑🌾© संजीव बावसकर
नगरदेवळे
जळगाव
9975281275
( आपणांस ही पोस्ट कशी वाटली, जरूर कळवा. कृपया वरील लिखाणाशी छेडछाड न करता असेच पाठवा.)

✍🏻बहाळ येथील ऐतिहासिक गढी वारसा📜 ✍🏻भाग - 2 ✍🏻

 














बहाळ येथील ऐतिहासिक गढी वारसा📜
✍🏻भाग - 2 ✍🏻
मराठा कालखंडात बहाळ हा एक स्वतंत्र परगणा होता. छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत मराठ्यांच्या उत्तरेत मोहिमा सुरू झाल्या आणि खानदेशातील अन्य प्रांतांप्रमाणेच बहाळ परगण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त झाले. थोरले बाजीराव पेशवे माळवा स्वारीवर जात असताना बहाळ येथे मुक्कामी थांबले याची नोंद मराठी रियासत या ग्रंथात आहे.
बहाळ येथील गढीवारसा या पोस्टचा पूर्वार्ध आपण वाचला नसेल तर या लिंकला अवश्य भेट द्या..https://m.facebook.com/story.php...
त्या वेळेस बहाळ परगणा नगरदेवळेकर सरदार पवार यांच्या अखत्यारीत होता. नगरदेवळे येथील पवार घराण्याचे संस्थापक केरोजी पवार यांचे सुपुत्र धीराजी पवार यांना तीन मुले होती.
1 शिवराव (पहिले)
2 केरोजी (दुसरे)
3 रामचंद्रराव
यांपैकी शिवराव पवार (पहिले) यांच्याविषयी माहिती उपलब्ध नाही.
केरोजी (दुसरे) व रामचंद्रराव पवार इ.स.1750 च्या कालखंडात मराठेशाहीच्या फौज सरंजामात यांची नावे आढळतात. त्यावेळेस भडगाव परगण्यातील नगरदेवळे व बहाळ परगणा पवार घराण्याकडे जहागीर म्हणून होता.
दि.29 सप्टेंबर 1775 मध्ये बारभाईचे सेनापती हरिपंत फडके यांनी आपल्या एका सरदाराला लिहिले आहे - " परगणे बहाल येथील जागिरीचा अमल राजश्री रामचंद्रराव पवार यांजकडे सरंजामास आहे...... यांस महालास काडीमात्र उपसर्ग लागो न द्यावा........"
(संदर्भ : पेशवे दफ्तर)
यावरून हे सिद्ध होते की रामचंद्रराव पवार यांना नगरदेवळे व्यतिरिक्त बहाळ येथील सरंजाम प्राप्त झाला होता.
केरोजी( दुसरे) हे बहाळ परगण्याचा कारभार पाहत असावे. त्यांच्याच काळात गढीवर किल्लेसदृश्य बांधकाम झाले. येथे एक शिलालेख यांनीच तयार करवून घेतला असावा.
केरोजी (दुसरे) केव्हा व कुठे मरण पावले याविषयी उल्लेख नाही. त्यांना पुत्रसंतती नव्हती. त्यांचे धाकटे भाऊ रामचंद्रराव यांना चार पुत्र होते. त्यांपैकी शिवराव (दुसरे) व केरोजी(तिसरे)यांना खानदेशातील सरंजाम असल्याबद्दल चा उल्लेख सन 1786-87 च्या फौज सरंजाम यादीत आढळतो.शिवराव (दुसरे) यांना नगरदेवळे तर केरोजी(तिसरे) यांना बहाळ परगण्याचा सरंजाम नाना फडणवीस यांनी वाटणी करून दिला.असा उल्लेख पेशवे दफ्तरात आहे.
बहाळ येथील गढीवरच्या भिंतीत असलेल्या शिलालेखात एक शिलालेख होता. त्यातील मजकूराचा सारांश असा- " सन 1769 मध्ये सरदार केरोजी पवार विश्वासराव हे बहाळ येथे जहागीरदार असतांना त्यांनी या गढीचे किल्लेसदृश्य बांधकाम केले. बहाळ प्रांताचे तत्कालीन फौजदार घनश्याम त्रिंबक यांच्या सहाय्याने वाघळीच्या उत्तरेकडील करमडु येथील कारागिरांकडून हे बांधकाम पूर्ण केले. शके 1691 मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी विरोधीनाम संवत्सर इसवीसन 6 डिसेंबर 1769 " ( शिलालेख वाचन संदर्भ : मराठेशाहीतील शिलालेख. संपादक: मो.ग. दीक्षित पृ.क्र. 56 साभार डॉ. भुजंगराव बोबडे)
बहाळ येथील गढीवर आढळणार्या दोन शिलालेखांपैकी यादवकालीन सारजा देवी मंदिरातील शिलालेख आज उपलब्ध आहे. परंतु गढीच्या भिंतीवरील शिलालेख मात्र तेथे आढळत नाही.(हा शिलालेख धुळे येथील वस्तू संग्रहालयात आहे असे कळते.)
पुढे इंग्रज आमदनीमध्ये दुसरे शिवराव पवार नगरदेवळेकर यांना कॅप्टन जॉन ब्रिग याने कंपनी सरकारातून दिनांक 28 मार्च 1820 रोजी सनद दिली. त्यानुसार त्यांना भडगाव परगण्यातील सोळा व बहाळ परगण्यातील चौदा गावे व सरदेशमुखीच्या सनदा दिल्या.बहाळ परगण्यातील चौदा गावे व सरदेशमुखी तनखा आठ हजार आठशे चौऱ्यांणव रुपये सव्वा तीन आणे असा सरंजाम दिला.
यावरून एक गोष्ट सिद्ध होते की ताम्रपाषाण कालखंडापासून अगदी इंग्रज आमदनी पर्यंत बहाळ परिसराचे अनन्यसाधारण महत्त्व होते. किंबहुना असे म्हणता येईल की बहाळ परिसर वगळून खानदेशचा इतिहास लिहिलाच जाऊ शकत नाही. इतके या परगण्याचे महत्त्व आहे.
आता आपण प्रत्यक्ष गढी परिसराचे अवलोकन करू या.आपण वाचत आहात संजीव बावसकर लिखित पोस्ट. बहाळ कसबे या गावात प्रवेश करण्याअगोदर चाळीसगाव रस्त्यालगतच तटबंदी व दोन भक्कम बुरुजांचे बांधकाम डोळ्यात भरते. हे बांधकाम कोणी केले ?कधी केले? याबाबत निश्चित माहिती नसली तरी केरोजी पवार जहागीरदार यांच्या आमदनीतच त्याचे निर्माण झाले असावे.
दोन्ही बुरुज आतून पोकळ आहेत. वरच्या बाजूला आतमध्ये हवा खेळती रहावी, म्हणून झरोके ठेवलेले दिसतात. पैकी एका बुरुजात भुयार असल्याचे समजते. तेथून भुयारी मार्ग दोन किलोमीटर लांब असलेल्या एका शेतातील पायबारव मध्ये निघतो. असे गावकरी सांगतात. कदाचित संकटकाळी गढीतून सुरक्षित बाहेर पडता यावे, यासाठी या भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली असावी, अशी शक्यता आहे.
गावात प्रवेश करताना वेशीच्या मजबूत दगडी भिंती आपले स्वागत करतात. गावातील बहुतेक घरे चिरेबंदी आहेत. घरांची दगडी ओटी, त्यावरील जोतरे,जोत्र्यांवरील सागवानी खांब, त्यावर असलेले सरे, सऱ्यांवरीलवरील नक्षीकाम केलेली विमाने, मोहठी सगळं कसं सजवून तयार केलेलं आहे. काळ बदलला. घरांचे वैभव गेले पण आजही त्या गतवैभवाच्या खुणा कशाबशा तग धरून आहेत. कापा गेल्या अन भोकं राहिली, अशी काहीशी अवस्था काही घरांची झाली आहे. गावकऱ्यांना गढीविषयी माहिती विचारल्यावर ते प्रथमतः आपल्याकडे संशयाने पाहतात. तुम्ही कोण? कुठून आलात? काय काम होतं ? कशाला आलात? अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू होते. आपल्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली तरी ते पुरेशी माहिती देत नाहीत. त्याला कारणेही भरपूर आहेत.
पूर्वी गावातील सर्व गुरेढोरे व शेळ्या चारण्यासाठी गढी परिसर गुरख्यांना हक्काचा होता. गुरे चारतांना काहींना चार-पाच नाणी सापडली आणि एका वेगळ्याच मार्गाने काही टोळ्या सक्रिय झाल्या. गुप्तधनाच्या आशेने अनोळखी लोकांनी गढीचा परिसर बऱ्याचदा पोखरून काढायला सुरुवात केली. त्यात काही स्थानिकांची देखील त्यांना साथ असतेच! त्यामुळे आलेली व्यक्ती कोणत्या उद्देशाने आली आहे याबाबत गावकऱ्यांच्या मनात संशयाचे वादळ निर्माण होणारच ..
गढी व परिसरात असलेली पांढरी शुभ्र माती हे गढीचे वैभव आहे. तेथील बरीचशी माती शेती शिवारात गेली. गढी परिसरात अतिक्रमण सुरू झाले. पायथाच खणायला सुरुवात झाली, तेव्हा कुठे पुरातत्त्व विभागाला जाग आली. त्यांनी संपूर्ण गढीच्या पायथ्याशी लोखंडी पोल गाडून मजबूत कुंपण घातले.त्याचा परीघ दोन किमी पर्यंत येईल. आता एक कर्मचारी कायमस्वरूपी पहाऱ्यासाठी म्हणून नियुक्त केला. (विभागाचे मनापासून धन्यवाद !!!) परंतु ही गढी प्राचीन स्मारक व पुरातत्त्वीय अवशेष आहे. हे सांगणारा नामफलक गढीपासून दोन किलोमीटर अंतरावर बहाळ पेठ भागात लावण्यात आला. तो आज रस्त्याच्या कडेला अडगळीत धूळ खात उभा आहे. त्याचे वाईट वाटले.
गढीवर प्रवेश करताना उजव्या बाजूने वर चढून गेल्यावर बहुळा देवी म्हणून एक मंदिर (ओटा व त्यावर पत्र्याची शेड) लागते. येथे दोन संगमरवरी दगडांवर कोरीव काम केलेल्या विलोभनीय मूर्ती आहेत. पैकी एक महिषासुरमर्दिनी तर दुसरी गणपतीची आहे. मूर्ती कामातील बारीक कलाकुसर व आयुधे खूपच बोलकी आहेत. बाजूला गणपतीची पाषाणमूर्ती आहे. ती मात्र बरीच प्राचीन असावी. ओट्याचे बांधकाम अलीकडच्या काळातील असले तरी मुर्त्यांचे अस्तित्व मात्र अगोदरपासून तिथेच असावे. मूर्त्यांच्या पायथ्याशी समाधी पादुका दिसतात. परंतु त्या पादुका कुणाच्या याविषयी समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
ओट्याच्या उजव्या बाजूला पंधरा फूट उंचीची व 20 फूट लांब अशी भिंत शेवटच्या आचका देत उभी आहे. तिचा बराच भाग नदीपात्राच्या दिशेने कोसळला आहे. मघाशी उल्लेख असलेले केरोजी पवार जहागीरदार यांनी गढीवर केलेले बांधकाम कदाचित हेच असावे. गढीला कोट बांधून येथे त्यांनी निवास व्यवस्था केली असावी.
या मंदिर ओट्यापासून सरळ चालत गेल्यास चुना व विटांच्या बांधकामाचे काही अवशेष आपले लक्ष वेधून घेतात. पक्क्या विटा व चुना यांमध्ये बांधलेला एक हौद आपल्याला चकित करतो. साधारणतः पंचवीस बाय पंचवीस लांबी रुंदी व दहा फूट खोली असलेल्या या हौदाचे प्रयोजन काय असावे ? हे कोडे लवकरच सुटते. चौकाच्या आसपास मातीच्या पाईप लाईनचे अवशेष चुन्यात गाडलेले दिसतात. चक्क चुन्यात गाडलेली मातीच्या पाईपांची पाईपलाईनच आपल्याला दिसून येते. मातीचे ' टी ' एल्बो ' यातून संपूर्ण गढी परिसरात पाइपलाइनने पाणी फिरवण्याची त्याकाळातील तंत्र पाहून आपण चक्रावून जातो.हैदराबाद गोवळकोंडा येथील मातीच्या पाईपलाईनचे कौतुक करतांना गाईडच्या तोंडाला फेस येतो, अन बहाळ येथील पाईपलाईन बाबत मात्र आजही आपण अनभिज्ञ आहोत.
येथील हौदाला स्थानिक लोक ' हत्ती हौद ' म्हणतात. पूर्वी येथे हत्तीची मोट होती. गिरणेतील पाणी हत्तींच्या साह्याने या हौदात ओतले जाई. व पाइपच्या साह्याने गढी परिसरात पोहोचवले जात असे. असे स्थानिक लोकांनी त्यांच्या वाडवडिलांकडून ऐकले आहे.
हत्ती हौदाच्या परिसरात चुना व विटांचे बांधकाम केलेले अनेक अवशेष आपल्याला दिसतात. पूर्वी येथे सिंहासन होते राजा व त्याचा परिवार संध्याकाळच्या वेळेस येथे बसून गिरणा काठाचे सौंदर्य न्याहाळत असे. अशीही माहिती स्थानिक लोकांकडून मिळाली.
हौदाच्या उजव्या बाजूला गिरणेचे विस्तृत पात्र व पलीकडचा टेकवाडे गाव बघतांना आपण विस्मित होतो. हौदाच्या डाव्या बाजूला दोन मोठ-मोठे खड्डे आढळून येतात. हे खोदकाम पुरातत्व विभागाने केले की स्थानिकांनी केले हे सांगता येत नाही. प्राचीन बांधकामाचे अवशेष जमिनीत गाडलेल्या भिंती, त्यावर असलेली मातीची पाईपलाईन डोक्यात अनेक कोडे निर्माण करून जाते.
या परिसरात आजही विपुल प्रमाणात मातीची खापरे आढळतात. पक्क्या विटांच्या भिंती जमिनीत आजही गाडल्या गेल्या आहेत. विटांची साईज 18 बाय 12 इंच आढळली. सामान्य विटांपेक्षा या विटा वेगळ्या आहेत.
हत्ती हौदावरून समोर गिरणा पलीकडच्या काठावरील टेकवाडे गाव दिसतो. या परिसरात ताम्रपाषाणकालीन सभ्यतेचे अवशेष सापडल्याचे वाचनात आहे. त्यात मृतांचे शरीर मातीच्या भांड्यात ठेवून वरतून मातीच्या भांड्याचे झाकण ठेवून दफनविधी करण्याची प्रथा होती असे आढळून आले आहे. कृषी व्यवसायाशी संबंधित अवजारे, धान्य साठवून ठेवण्याच्या जागा, मातीची कोठारे, मातीची भांडी, काचेचे तुकडे या परिसरात आढळले आहेत केवळ गढी परिसरच नव्हे तर आजूबाजूच्या शेतातील माती देखील पांढरी आहे.
कधी काळी हा संपूर्ण परिसर खूप मोठी मानवी वस्ती असल्याचे त्यातून सूचित होते. हत्तीहौदाच्या समोर पुन्हा एक उंच टेकडी आहे. बालेकिल्ल्यासारखी. हा गढीचा सर्वात उंच भाग आहे. येथे पोचल्यावर मोठमोठ्या पाषाण शिळा आढळतात. त्यांच्या मध्यभागी वीरगळ सारखी स्मृतीशिळा रोवलेली आहे. त्यावर चंद्र आणि सूर्य प्रतिमा ठळकपणे दिसतात.शिळेचा खालचा बाकीचा भाग मातीत गाडला गेला आहे.त्यामुळे त्याचा बोध होत नाही.
येथे एका प्राचीन मंदिराचे अवशेष दिसतात. नदीपात्रापासून या टेकडीची उंची हजार फुटांपर्यंत असावी. त्यामुळे सभोवतालचा विस्तृत प्रदेश सहजपणे डोळ्यांच्या कक्षेत सामावतो. उंच टेकडीवरून गढीच्या दोन भागांपैकी समोरचा भाग स्पष्टपणे दिसतो. त्यावर असलेली यादवकालीन सारजाई मंदिर ठळकपणे दिसते.आज या गढीचा संपूर्ण परिसर आज वेड्या बाभळींनी वेढला गेला आहे. त्यामुळे अभ्यासकांशिवाय या परिसरात कोणीही फिरकत नाही.
( क्रमशः )
पुढील भाग लवकरच !
🛑🌾©संजीव बावसकर
नगरदेवळे
जि. जळगाव
9975281275
(आपणांस ही पोस्ट कशी वाटली, जरूर कळवा. कृपया वरील लिखाणाशी छेडछाड न करता असेच पाठवा.)

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...