मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Wednesday, 13 January 2021
।। राष्ट्रमाता मातोश्री जिजाऊआईसाहेब ।।
राजेजाधव आणि राजेभोसले यांचे कौटुंबिक, राजकीय संबंध, त्यामागील इतिहास
पोस्टसांभार : Raj Prabhavati G Jadhav
राजमाता जिजाऊ जन्म स्थान, सिंदखेड राजा, बुलढाणा
Saturday, 22 August 2020
स्वराज्यजननी जिजामाता
Tuesday, 18 August 2020
💐 माँसाहेब 💐
Saturday, 8 August 2020
माय लेकरू हृदयभेट :-
माय लेकरू हृदयभेट :-
औरंगजेबासारख्या साक्षात मृत्यूच्या कराळ दाढेत अडकले शिवराय परत यावेत म्हणून आऊसाहेबांनी काय काय म्हणून केलं नसेल. स्वतःच्या पोटचा गोळा दूर आहे, प्राणापेक्षा प्रिय नातूही दुरावलाय. अन्न-पाणी तरी गोड लागत असेल काय
त्या माऊलीला?
आणि अश्यात एक दिवस वर्दी येते, काही बैरागी आले आहेत. भेटायची इच्छा नसताना आऊसाहेब त्यांना भेटल्या असतील. मायबाप विठू-माऊलीच्या पताक्याच्या भगव्या रंगात रंगलेल्या, तुकारामांच्या अभंगांत तल्लीन झालेल्या, खांद्यावर शहाजी राजांनी स्वराज्यासाठी दिलेला भगवा घेतलेल्या सगळ्या बैराग्यांना वरवरचं भेटून परतीला निघालेल्या आऊसाहेबांना त्यातल्याच एका बैराग्यानं आर्त हाक मारली असेल, "माँसाहेब, आम्हाला न भेटताच परत जाताय."
अचानक शिवबाचा आवाज ऐकून काय वाटलं असेल आऊसाहेबांना?
कानात पंचप्राण गोळा झाले असतील आऊसाहेबांच्या. क्षणार्धात मागे वळून बैराग्यांच्या गर्दीतून शिवबांना शोधलं असेल. डोळ्यातल्या झर-झर झरणाऱ्या आसवांनी शिवबाला जलाभिषेक घातला असेल त्यांनी. चेहऱ्यावरून- केसांवरून- पाठीवरून मायेचा हात फिरवला असेल. जंगलात हरवलेलं पाडस परत भेटल्यावर हरिणी जशी सैरभैर होते तशी काहीशी अवस्था झाली असेल आऊसाहेबांची. "शिवबा" म्हणून हंबरडा फोडून शिवबा राजांना कडकडून हृदयाशी धरलं असेल त्यांनी. जशी यशोदा कृष्णाला धरायची, सीतामाई लव-कुशाला धरायची. केवढा भारलेला असेल तो क्षण, तमाम मराठी जणांनी स्वतःच्या हृदयात कोरून ठेवावा असाच हा क्षण
आऊसाहेबांच्या डोळ्यात आसवांचा फुटलेला बांध, शिवबाला त्यांनी मारलेली कडकडून मिठी. आऊसाहेबांच्या एक कापरा हात महाराजांच्या हृदयावर तर एक खंबीर हात शिवरायांच्या पाठीवर. राजांच्याही डोळ्याच्या कडांमध्ये उमळुन आलेल्या गोदा-कृष्णा. सगळं कसं एकदम जिवंत.
या चित्रात मागे दोन व्यक्ती थांबलेल्या दिसताहेत. कोण आहेत ती दोन पात्रं ?
आऊसाहेबांच्या मागे थांबलेल्या आहेत त्या पुतळाराणी सरकार आणि शिवबांच्या मागे थांबलेला रांगडा वीर, पण आऊसाहेब- शिवबाराजे भेटीचा अनुपम देखावा पाहून सदगतीत झालेला वीर म्हणजे महाराजांना आग्र्याहून स्वराज्यात सुखरूप आणणारा गुप्तहेर खात्याच्या प्रमुख बहिर्जी नाईक. डोळ्यातून ओघळणारे आनंदाश्रू लपवण्यासाठी पुतळाराणीसरकारांचा नकळत पदराला गेलेला हात, दोन्ही हाताच्या मुठी जोडून स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या माता-पुत्रांना भरल्या डोळ्यांनी नमन करणारे बहिर्जी नाईक. मागे दिसणारी राजगडाची डौलदार राजसदर, मशालींच्या जर्द लालपिवळ्या प्रकाशातला हा भावविभोर प्रसंग आज महाराष्ट्र अनुभवू शकतोय.
🚩|| जय जिजाऊ||🚩
🚩||जय शिवराय।।
Saturday, 25 July 2020
❤️ जिजाऊंनी शिवरायांसाठी ठेवलेले 25 लाख होन ❤️
शिवरायांवर जिजाऊंचे फार प्रेम होते. जिजाऊंच्या संस्कारांनी शिवरायांना 'छत्रपती शिवाजी महाराज' केले होते. मुलगा कितीही मोठा झाला तरी आईची माया कधीच कमी होत नाही. ती नेहमी आपल्या मुलाची काळजी घेत असते.
महाराजांच्या राज्याभिषेकावेळी फार खर्च झाला होता. दान खूप दिले होते. सभासद म्हणतो 1 कोटी 42 लाख होन म्हणजे एक होनाची किंमत 3.5 रुपये धरल्यास 4,970,0000 रुपये एवढा खर्च राज्याभिषेकाचा झाला होता. त्यावेळी स्वराज्याच्या तिजोरीवर नक्कीच भार आला असणार.
जिजाऊंनाही त्याची चिंता असेलच. एक डच पत्र याची साक्ष देते.
दि. 3 ऑक्टोबर 1674 ला वेंगुर्लाहुन बताव्हिया ला एक पत्र लिहिले गेले. त्यात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकबद्दलची हकीकत होती. त्यात राज्याभिषेकाचे सविस्तर वर्णन त्याने केलेले होते. राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन करून आणि हकीकत सांगून पुढे तो लिहितो 'शिवाजीची आई 80 वर्षाची वयातीत म्हातारी होती. तरी राज्याभिषेकाला उपस्थित राहून 12 च दिवसांनी ती मरण पावली. तिने 25 लाख होन काहींच्या मते अधिकच आपल्या मुलाला मागे ठेवले'
12 दिवस सांगताना त्याची गल्लत झाली असावी. पण यात महत्वाचे हे की जिजाऊंनी शिवरायांना 25 लाख होन मागे ठेवले होते. शिवरायांना त्या पैशाची नक्कीच मदत झाली असणार. आईची माया कधी कमी होत नाही याचे हे उत्तम उदाहरण.
जिजाऊमाँसाहेब
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे
राज्याभिषेकाच्या प्रचंड गडबडीतही महाराजांचे पूर्ण लक्ष आई साहेबांकडे होते. आईसाहेब म्हणजे तर महाराजांचा प्राण होता. सर्वस्व होते. महाराजांचे दैवत होते. आई साहेबांची प्रकृती अतिशय नाजूक तोळामासा झाली होती. गडावरची थंड हवा, वारा त्यांना मानवेना म्हणून महाराजांनी खास त्यांच्यासाठी उत्तम वाडा पाचाड येथे बांधला होता. त्यांची राहण्याची व्यवस्था तेथेच केली होती. आईसाहेबांचे वय आता उताराकडे लागले होते. त्यांना आता काय हवे होते? त्यांना काहीही नको होते .पण महाराजांना मात्र त्या हव्या होत्या. सती निघालेल्या आईसाहेबांना पूर्वी महाराजांनी महत्प्रयासाने मागे फिरवले होते. त्यावर आता कित्येक वर्षे उलटून गेली होती.
रायगड सोडून राजे पाचाडला आले होते. जिजाऊंची प्रकृती पाहून राजांना शोक आवरत नव्हता. जिजाऊ म्हणाल्या," शिवबा, हा शोक तुम्हाला शोभत नाही. तुम्ही आता लहान नाही. स्वारी गेली तेव्हा सती जात होते. तुम्ही आम्हाला सांगितले, 'आमचा पुरुषार्थ बघायला कोणी राहिले नाही. मासाहेब तुम्ही जाऊ नका! तुमच आम्ही ऐकलं .आम्ही राहिलो, त्याचा आम्हाला आनंद झाला. खरोखरच तुमचा पुरुषार्थ आम्हाला पाहायला मिळाला. तुम्ही छत्रपती झालात, ते पाहायला मिळालं. राहिल्याचं सार्थक झालं. शिवबा आम्ही का जन्माला पुरलो? मुलांचे करते पण पहात ज्येष्ठांनी जावं, यातच जीवनाचे यश नाही का? आणि मी गेले तरी कुठे जाणार? देहाने गेले तरी मनाने इथेच आहे .आमच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी आणू नका. ते पाहून आमच्या मनाला दुःख होईल. राजे, तुमच्यात जीव पुरा जखडून गेला आहे. मागे पाहिलेत तरी तुमची सावली बनून आम्ही राहिलो आहोत, हे तुमच्या ध्यानी येईल." छत्रपती शिवरायांना घडवण्याचे सामर्थ्य फक्त जिजाऊंच्या मध्ये होते. आणि ते त्यांनी पार पाडले होते .
आईसाहेबांची प्रकृती अत्यंत बिघडली. आयुष्याचा हिशेब संपत आला .वर्षे, महिने ,आठवडे ,दिवस संपले .आता अवघ्या काही तासांची थकबाकी राहिली.सूर्यपराक्रमी पुत्र जवळ असतानाही मृत्यूचे पाश पडू लागले .कोणाचेही ईथे काही चालत नाही .आई साहेबांनी डोळे मिटले! श्वासोच्छ्वास संपला!चैतन्य निघून गेले! आईसाहेब गेल्या! छत्रपतींचे छत्र मिटले गेले ! मराठ्यांचा राजा पोरका झाला! स्वराज्यावरचा आपला पहारा संपवून आईसाहेब निघून गेल्या. महाराज दुःखात बुडाले.आईवेड्या शिवबाच्या आईसाहेब गेल्या. शिवनेरीवर अंगाई गाणार्या, लाल महालात लाड करणार्या, राजगडावर स्फूर्ती देणार्या, आणि रायगडावर आशीर्वाद देणार्या आई कायमच्या निघून गेल्या.
राज्याभिषेकानंतर बाराव्या दिवशी म्हणजेच 17 जून 16 74 रोजी पाचाड येथे जिजाऊ साहेबांचे निधन झाले. वयाच्या सत्तराव्या वर्षापर्यंत खडतर पणे कृतार्थ जीवन जगलेल्या जिजाऊंना आलेल्या मृत्यूने महाराजांचे सर्वस्व हिरावून नेले. राजांच्या शोकाला तर पारावरच उरला नाही. त्यांच्या मनाचे सारे बांध फुटले.
धन्यती जिजाऊ माऊली ज्यांनी शिवरायांसारख्या एका महान वीराला जन्म दिला व धन्यते छत्रपती शिवाजीराजे ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण भारताची अस्मिता ठरलेल्या राजमाता जिजाऊसाहेबांची कूस खऱ्या अर्थाने सार्थकी ठरली .
Friday, 24 July 2020
।। राजमाता मातोश्री जिजाऊआईसाहेब ।।
प्राचीन भारताचा इतिहासात
काही स्त्रियांची नावे येतात. वैदिक परंपरेतल्या मैत्रेयी,गार्गी ते बौद्ध
संस्कृतीतल्या आम्रपाली पर्यंत.मध्ययुगात परकियांच्या आक्रमणामुळे स्त्री
वर्गावर बंधने घालण्यात आली.महाराष्ट्राचा विचार केला असता नेमक्या ह्याच
काळात महाराष्ट्राचा मनू बदलला..
शिवछत्रपतींचे अवघे आयुष्य म्हणजे
महाराष्ट्राचा स्वभावधर्म .मग त्यात महाराजांचे "स्त्रीदाक्षिण्य"
"न्यायप्रियता" नैतिकता सर्वच आले.जरा अधिक विस्ताराने विचार केला असता सहज
दिसून येईल कि शिवछत्रपतींचा -राजश्री
सिऊबाराजे ते छत्रपती श्री राजा शिवाजी हा प्रवास जिजाऊआईसाहेबांच्या भक्कम
आधारावर झाला.भोसले-जाधवराव ह्या दोन्ही घराण्यात राजकारण होतेच पण
वारश्याचा उपयोग "स्वराज्यलक्ष्मी "म्हणून प्रसन्न करण्यास जर कुणी केला
असेल त्या म्हणजे जिजाऊआईसाहेब....
महाराष्ट्राच्या दोन छत्रपतींच्या
स्वभावावर जिजाऊआईसाहेबांची छाप स्पष्ट दिसते.राधामाधवविलासचंपू ह्या
काव्यग्रंथाच्या लेखकाची जयराम पिंडे प्रतिभा बहरली ती अवर्णनीय अशीच..
जशी चंपकेशी खुले फ़ुल्लजाई ।
भली शोभली ज्यास जाया जिजाई ।
जिचे किर्तीचा चंबू जंबूद्विपाला ।
करी साऊली माऊलीसी मुलाला ।
शहाजी महाराजांच्या धामधुमीला हि जिजाऊआईसाहेब धैर्याने सामोर
गेल्या.महाराजांनी पोरसवदा वयात रांझेकर पाटलाला केलेल्या शास्तीच्या
निर्णयात आईसाहेबांची शिकवण स्पष्ट दिसते..आग्रा कैदेत हि स्वराज्याची
इंचभर जमिन न गमवता रांगणा स्वराज्यात आला...अफजल वधाच्या प्रसंगात
"संभाजीचे ऊसने फेडणे आहे "ह्या एका वाक्यात एक दुखावलेली आई स्पष्टपणे
जाणवते..अज्ञातदासानी पोवाड्यात लेकराच कौतुक केलं म्हणून त्याला सोन्याचा
तोडा घालणारी वत्सल माऊली दिसते...महाराजांनी मुधोळचे घोरपडे ज्या प्रथमिक
कारणामुळे उद्धवस्त केले त्या पतीच्या अपमानाचा सूड हि छत्रपतीस प्रेरणा
आऊसाहेबच होत्या...
पाषाणच्या पाटिलकीच्या कथल्यात कोन्हेर रुद्र ह्या
देशाधिकरीस महाराज म्हणतात ."स्वामी धाकुटपणापासून या देशात आहेत; मिरासदार
कोण ?गैर मिरासदार कोण हे जाणताती;माणसाचे माणूस वळखतात." महाराजांच्या
धाकुटपण ते थोरपण हा प्रवास आईसाहेबांच्या आईपणाच्या कर्तुत्वाचे पर्व
आहे."माणसाचे माणूस वळखतात" ह्या माणूस जोखण्याची प्रक्रिया हि
जिजाऊआईसाहेबांनीच घडवली.
जिजाऊआईसाहेबांच्या कर्तुत्वाचा प्रभाव
भोसल्यांच्या घराण्यात तीन पिढ्यात दिसतो महाराणी येसूबाई,महाराणी
ताराबाई,करवीर राजमाता जिजाबाई हि महाराष्ट्रातल्या जिजाऊपर्वाची अस्सल
उदाहरणे आहेत...
महाराजांचे चरित्रकार म्हणतात"शिवाजी आईच्या अर्ध्या
वचनात होता " त्या अर्ध्या वचनाने पूर्ण महाराष्ट्र घडवला,लेकी बाळींची
अब्रू जपली.आमच्या मर्दानी मनाच्या कोंदणात वसलेल्या ह्या मराठ्यांच्या
मातृदेवतेस पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...
-सचिन शिवाजीराव खोपडे देशमुख.
#बारा_मावळ_परिवार
महापराक्रमी 'स्वातंत्र्य सूर्य' निर्माण करणाऱ्या वीरांगना राजमाता जिजाऊ आईसाहेब
महापराक्रमी 'स्वातंत्र्य सूर्य' निर्माण करणाऱ्या वीरांगना राजमाता जिजाऊ आईसाहेब.
- निजामशाहीच्या दौलताबाद येथील दरबारात झालेली वडिलांची आणी भावांच्या हत्या पाहिल्या.
- आयुष्यभर पतीपासून दूर राहून पतीचा वियोग सहन केला.
- जेष्ठ पुत्र संभाजी राजे हे शहाजी राजांच्या जवळ बंगळुरास राहिल्यामुळे आयुष्यभर पुत्र वियोग सहन केला.
- जेष्ठ पुत्र संभाजी राजांची विजापूर दरबाराने षडयंत्र रचून केलेली हत्या पाहिली.
- विजापूर दरबाराने आपल्या पतीस अपमानित करून हातकड्या लावून साखळदंडाने बांधून नेलेले पाहिले.
- पतीच्या निधनानंतर म्हणजे शहाजी राजांच्या मृत्यूनंतरचा वियोग पाहिला.
- 'रात्रंदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग..' म्हणत जीवावर उदार होऊन रणांगण गाजविणारे कनिष्ठ पुत्र शिवाजी राजांचे महा-पराक्रम, साहस पाहिले.
- प्रसंगी स्वराज्यासाठी हातात तलवार घेऊन रणांगणावर जाण्याची धमक दाखविली. स्वराज्य रक्षिले, स्वराज्य वाढविले.
- छत्रपती शिवाजी महाराजांवर दिवस रात्र आलेली संकटे पाहिली.
जिजाऊ आईसाहेबांच्या पावन स्मृतीस समर्पित...
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर
अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय
अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...
-
*बहिर्जी नाईक* शिवाजीराजेंचे गुप्तहेर _(आपल्या मुलांना माहिती असणे गरजेचे आहे. आजही CBI, CID अशी सरकारी खाती यावरच काम करतात.)_ बघायल...
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
°°°छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यंकोजी राजांना पत्र °°° छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस व्यंकोजीराजांना लिहिलेली चार पत...






















