विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label छत्रपती राजारामराजे भोसले. Show all posts
Showing posts with label छत्रपती राजारामराजे भोसले. Show all posts

Sunday, 5 June 2022

छत्रपती राजाराम महाराज आणि पोर्तुगीज

 

छत्रपती राजाराम महाराज आणि पोर्तुगीज
पोस्तसांभार :: इतिहास अभ्यासक मंडळ ( चेतन दादा )


औरंगजेबाच्या दक्खन स्वारीत एकीकडे छत्रपती संभाजी राजे धारातीर्थी पडले तर दुसरीकडे स्वराज्याची राजधानी रायगड मुघलांच्या ताब्यात गेला. महाराणी येसूबाईंनी यावेळी संपूर्ण छत्रपती घराणे मुघलांच्या ताब्यात न जाऊ द्यायचा निर्णय घेतला आणि छत्रपती राजाराम महाराज आणि ताराऊंना रायगडावरून बाहेर पाठवले, छत्रपती राजाराम महाराज पन्हाळ्यावर आले, इथेही पडलेल्या वेढ्यातून निघून त्यांनी जिंजी कडे जाण्याचे निश्चय केला. छत्रपती राजाराम महाराजांच्या मागे केवळ मोगल नव्हते तर त्यांचा मागे पोर्तुगीज सुद्धा होते. छत्रपती राजाराम महाराजांची ही मोहीम अत्यंत धोकादायक होती. खूप मोठी जोखीम त्यांनी उचलली होती.
पोर्तुगीजांची ह्या दरम्यानची दोन पत्र उपलब्ध आहेत. पहिलं पत्र १२ मे १६८९ रोजी बहादूरखानास लिहल होत. ह्या पत्रात "छत्रपती राजाराम महाराज हे गोवामार्गे कर्नाटकात निसटू नयेत म्हणून गोव्याच्या हद्दीवर पहारे बसविण्यात येत आहेत", असे आश्वासन गोव्याचा व्हॉइसरॉय दों रुद्रीगु द कॉशत" देतो. दुसरे पत्र ३ सप्टेंबर १६८९ रोजी पुन्हा बहादूरखानास लिहले होते. त्यात पोर्तुगीज "छत्रपती राजाराम महाराज ह्यांच्या हालचालीवर पाळत ठेवत असून, पहारे दुप्पट करण्यात येत आहेत" अशा आशयाचे आहेत.
इतका आणीबाणीचा प्रसंग असताना सुद्धा महाराज सुखरूप जिंजी वर पोहचले. दुसरीकडे पोर्तुगीजांची छत्रपती राजाराम महाराजांच्या विरोधात कारवाई चालूच होती. त्या संदर्भात १५ ऑगस्ट १६९० रोजी अब्दुल राजा खानास दिलेल्या पत्रावरून कळते. हे पत्र नवीन व्हाइसरॉय दों मिगेल बंद आल्मैद ह्याने लिहले आहे त्यात तो असे लिहतो की, " छत्रपती राजाराम महाराज ह्यांना सामील झालेल्या मणेरी व साखळी येथील देसायांचा आपण बंदोबस्त करतो".
पोर्तुगीज असुदे किंवा इंग्रज जेव्हा जेव्हा स्वराज्यावर संकट आले त्यावेळी हे परकीय शत्रू नेहमी मराठ्यांचा विरोधातच उभे राहिले. छत्रपती राजाराम महाराजांनी ह्या परिस्थिती सुद्धा स्वराज्य राखलं. एक मोठा लढा त्यांनी दिला आणि अखेर त्यांची प्राणज्योत सिंहगडावर ३ मार्च १७०० रोजी मालवली.
छत्रपती राजाराम महाराज ह्यांना ३२२ व्या पुण्यतिथी दिनी निमित्त विनम्र अभिवादन🙏💐
संदर्भ -
१) ताराबाईकलीन पत्रे खंड १

Sunday, 23 May 2021

वेढा जिंजीला - शिकस्त मोगलांना भाग ४

 वेढा जिंजीला - शिकस्त मोगलांना


भाग ४
राजाराम महाराज - झुल्फिकार खान
काही जाणकारांच्या मते झुल्फिकार खान जिंजीला आल्यावर थोडे महिन्यांनी राजाराम महाराज व झुल्फिकार खान ह्यांच्यात एक छुपा अलिखित सला होता.जरी काही ब्रिटीश आणि पोर्तुगीज कागदपत्रात ह्याचा उल्लेख आहे , तरी ह्याला इतिहासात कुठे ही वाचा नाही - पण काही घटना लक्षात घेण्यासारख्या आहेत. झुल्फिकार खान व वजीर असद खान हे शाहजादा शाहआलम चे समर्थक असावे असं दिसते - तो औरंगजेबानंतर बादशाह झाला तर त्याच्याकडून आपली वजिरी पक्की करायची असा हेतू असू शकतो. ह्या योजनेत राजाराम महाराजांसारख्या बलाढ्य छत्रपतींची मदत नक्कीच झाली असती. राजाराम महाराजांच्या दृष्टीने वरवर दाखवण्यासाठी वेढा चालू ठेऊन स्वराज्य बळकटीचे काम चालू ठेवण्यासाठी ही योजना चांगली होती. वर दिल्याप्रमाणे संताजी-धनाजी च्या हल्ल्यानंतर मोगली सैन्याला पूर्ण उद्ध्वस्त करण्याचा मोका होता - परंतु तसे न करता त्या वेळी सला करण्यात आला. झुल्फिकार खानाच्या जागी नवा मोगली सरदार येऊन जिंजीला धडकला असता, त्यापेक्षा होते ते स्वराज्यासाठी बरे होते. ह्याच घटने वरून कदाचित राजाराम महाराज- संताजी ह्यांचे भांडण झाले असावे. असा छुपा समजोता दोन्ही बाजूनी होता का नव्हता हे सिद्ध करायला काहीच संदर्भ नाहीत. पण जर ते खरे असले तर आपल्या मुत्सद्देगिरीने आणि खोटे असले तर आपल्या पराक्रमाने राजाराम महाराजांनी औरंगजेबाला ८ वर्ष चांगलीच चपराक दिली ह्यात शंकाच नाही.
शेवटी एवढेच म्हणीन की जिंजीला वेढा घालून राजाराम राजेंना पकडायचे असंख्य प्रयत्न करून शेवटी मोगलांच्या हाती पडली ती शिकस्त आणि फक्त शिकस्तच

वेढा जिंजीला - शिकस्त मोगलांना भाग ३

 वेढा जिंजीला - शिकस्त मोगलांना


भाग ३
अखेरचा प्रयत्न
ह्या नंतरची २-४ वर्ष झुल्फीकाराने थेट जिंजीच्या किल्ल्याला वेढा न घालता आपला मोर्चा सभोवतालच्या प्रदेशाकडे वळवला. मराठा फौजेनी त्याच्या फौजेची रसद वेळोवेळी मारून व खजिन्याचा पुरवठा अधून मधून रोखून त्याला हे करण्यास भाग पाडलं. त्याने २ वेळा तंजावर वर हल्ला केला - ह्या पैकी दुसऱ्या हल्ल्यात ४० लाख "चक्री"च्या मोबदल्यात त्याने सला केला. वेल्लोरला ही त्याच्या सैन्याचा वेढा पडला पण तिथे हि अपयश - धनाजींनी स्वतः जाऊन वेल्लोर ला पडलेला वेढा उठवला. परंतु असे दिसते की १६९४ च्या अखेरीपर्यंत जिंजीच्या आसपासचा बराचसा मुलुख झुल्फिकार खानाने काबीज केला होता. असे करून जिंजीच्या मराठा प्रशासनाला जेरीस आणण्याचा त्याचा प्रयत्न होता. शेवटी १६९७ मध्ये औरंजेबाने झुल्फिकार खानाला पत्र पाठवून जिंजी वरचा हल्ला आणखीन तीव्र आणि निर्वाणीचा करायचा फर्मान दिला. साधारण ऑगस्ट १६९७ मध्ये राजाराम महाराजांनी झुल्फिकार खानाशी तहाची बोलणी करण्यासाठी आपला पुत्र कर्ण बरोबर एक शिष्टमंडळ पाठवले.असे वाटते की अशी बोलणी करून मोगलांना गुंतवून ठेऊन हा वेळ तिथून निसटायची योजना पक्की करण्यात घालवण्यात आला. शेवटी ३० जानेवारी १६९८ ला महत्प्रयासानंतर एकदाचा जिंजी किल्ला घेण्यात झुल्फिकार खानाला यश आले. पण यशानंतर ही त्याच्या हातात आलं ते धुपाटणंच - राजाराम महाराज तर कधीच जिंजीहुन निसटून २६ जानेवारी १६९८ ला वेल्लोर ला पोचले होते. तिथून धनाजींनी त्यांना परत महाराष्ट्र्र भूमीत आणलं आणि राजे २२ फेब्रुवारी १६९८ ला खेळणा(विशाळगड) ला पोचले. झुल्फिकार खानाने १६८९ ला रायगड घेतला पण राजाराम राजे सापडले नाहीत , १६९८ ला जिंजी किल्ला घेतला पण राजाराम राजे सापडले नाहीत !! मध्ये त्याचं सैन्य ८ वर्ष मराठ्यांचा मार खात नुसतंच झुरत होतं.

Friday, 21 May 2021

वेढा जिंजीला - शिकस्त मोगलांना भाग २

 वेढा जिंजीला - शिकस्त मोगलांना


भाग २
१६९२-९३ : संताजी-धनाजी आणि कामबक्ष !!!!
१६९० च्या अखेरीपासून पुढचे ८ वर्ष झुल्फिकार खान जिंजीच्या भोवतालच्या प्रदेशातच ठाण मांडून होता. १६९१-९२ मध्ये मराठा फौजेनी मोगल सैन्यावर असंख्य हल्ले केले होते. ह्यात कर्नाटक प्रांतात मोगलांची दाणादाण उडवल्यानी झुल्फिकार खानाला बादशाही छावणीतून मिळणाऱ्या मदती/रसदी वर परिणाम व्हायला लागला. ह्याचा परिणाम म्हणून झुल्फिकार खानाने जिंजीहुन १२ कोस मागे फिरून तळ ठोकला(मस्सीर-आलमगिरी). त्याचे सैन्य एक प्रलंबित वेढा देण्याच्या स्थितीत नव्हते. ह्याची दाखल घेत औरंगजेबाने तातडीने वजीर असदखान आणि शाहजादा कामबक्षला झुल्फिकार खानाच्या मदती साठी धाडले.
कामबक्ष आणि असदखान येताच जिंजीला पुन्हा एकदा वेढा पडला. ह्यावेळी परिस्थितीचे महत्व जाणून रामचंद्रपंत अमात्य (जे महाराष्ट्रात स्वराज्याचा मुलकी आणि सैनिकी कारभार बघत होते ) ह्यांनी सरनोबत संताजी आणि धनाजींना १५ आणि १० हजार फौज बरोबर देऊन राजाराम महाराजांच्या मदतीस पाठवले. हे २ विजेचे लोळ २ बाजूंनी जिंजीच्या मोगली फौजेवर कडाडले. त्यात संताजींनी तर कहरच केला. जिंजीच्या मोगली सैन्याला रसद पुरवायची जबाबदारी अलिमर्दा खान ह्या सरदारा वर होती. संताजींनी त्याच्या ध्यानी-मनी ही नसताना त्याला कांचीपुरम जवळ गाठून तुफान तडाखा दिला. अलिमर्दा खान व बरीचशी रसद पकडली गेली - शिवाय "१५०० घोडे आणि ६ हत्ती पाडाव केले" अशी नोंद आहे. रसदे अभावी आता मोगल सैन्याची परिस्थिती बिकट होणार होती. हे एक संकट आले असताना दुसरीकडे तितकेच मोठे संकट मोगल फौजेवर कोसळले. धनाजींनी जिंजीच्या वेढ्याच्या पश्चिमी चौक्यांवर हल्ला चढवला. ह्या चौक्यांची जबाबदारी ज्याच्याकडे होती त्या इस्माईल खान मका ला धनाजींनी धरले. ह्या छाप्यात "५०० घोडे आणि २ हत्ती पाडाव केले" अशी नोंद आहे.वेढ्यातल्या ज्या चौक्यांवर हल्ले करण्यात आले तिथल्या काही मोठ्या तोफांना खिळे ठोकून निकामी करण्यात आले. ह्या २ हल्ल्यांमुळे वेढ्यातल्या सैन्याची अवस्था बिकट झाली असणार कारण तसे ही किल्ल्यातून त्यांच्या वर हल्ले होतच होते - आता बाहेरून ही २ तडाखे मिळाले.
हे सगळं चालू असताना मोगल छावणीत एक वेगळंच नाटक रंगलं होतं. झुल्फिकार खान व असद खान ह्या बाप-लेंकांना अशी खबर मिळाली की शाहजादा कामबक्ष ह्याने राजाराम महाराजांसोबत काही गोपनीय बोलणी चालू केली आहेत. असे वाटते की शत्रुसैन्यात फूट पडावी म्हणून मराठ्यांनी ही वावडी उठवली असावी - आणि खरंच तसे असेल तर ही खेळी प्रचंड यशस्वी झाली. ही बातमी खरी वाटायचं कारण पण होतं - काही असले तरी कामबक्ष एक डोळा नक्कीच मोगली तख्तावर ठेऊन असणार - राजाराम महाराजांविरुद्ध मोहिमेत थोडी ढील देऊन त्या बदल्यात त्यांच्याकडून बादशाह होण्याच्या स्वप्नात मदत मिळवायची अशी व्यवस्था असावी असे झुल्फिकार खानाला वाटले. त्या आशयाचे पत्र बाप-लेकाने लगेच औरंजेबाला पाठवलं - परिणामी मोगली निष्ठावंत सरदार दलपत बुंदेला ला कामबक्षच्या छावणीत ठेवण्यात आलं.अशी हूल उठवण्यात आली(बहुधा हूलच असावी) की कामबक्ष हा झुल्फिकार खान व असद खान ह्यांना अटक करायची योजना आखतोय.
संताजी-धनाजींचा झंझावात आणि त्यामुळे वेढ्यातल्या फौजेची झालेली बिकट अवस्था तसेच राजाराम महाराजांना पकडण्यात येत असलेलं अपयश - ह्या सर्वांचे खापर असद-झुल्फिकार ह्या पितापुत्रांनी सरळ काम्बक्षच्या डोक्यावर फोडलं. अशा परिस्थितीत त्यांनी एक कमालीचं पाऊल उचललं - त्यांनी जाऊन थेट कामबक्षला कैद केलं आणि औरंगजेबाकडे पाठवलं. फौजेची दयनीय अवस्था लक्षात घेऊन झुल्फिकार खानाने राजाराम महाराजांशी तहाची बोलणी उघडली. दोन्ही पक्षांमध्ये तह होऊन मोगल सैन्य परत माघारी तळावर वंदिवाश(सध्याचे वंदवासी, तमिळनाडू) ला निघून गेले. असे करून १६९२-९३ मध्ये झालेला हा वेढ्याचा प्रयत्न ही फसला.

वेढा जिंजीला - शिकस्त मोगलांना भाग १

 वेढा जिंजीला - शिकस्त मोगलांना


भाग १
२५ मार्च १६८९ ला रायगडाला वेढा पडल्यावर राजाराम महाराज अत्यंत शिताफीने मोगलांना चकवून वेढ्यातून निसटले. प्रतापगड, वासोटा, पन्हाळा आणि तिथून कर्नाटक मधून मोगलरूपी जिवाच्या धोक्याशी झुंज देत साधारण १५ नोव्हेंबर १६८९ ला राजे जिंजीला पोचले. जिंजीला त्यांनी स्वराज्याची प्रशासकीय आणि राजनैतिक राजधानी बनवले. संभाजी महाराजांच्या दुर्दैवी बलिदानानंतर औरंगजेबाने लगेच रायगडाला वेढा घालायचे फर्मान काढले. शिवाजी महाराजांच्या सगळ्या कुटुंबाला अटक करून हे स्वराज्य कायमचे मिटवून टाकावे हा त्याचा हेतू. त्याच्या ह्या योजनेला राजाराम महाराज निसटून जिंजीला गेल्यामुळे एक सणसणीत चपराक मिळाली. रायगडाला ज्याने वेढा घातला त्याच झुल्फिकार खानाला औरंगजेबाने आता जिंजीला जाऊन राजाराम महाराजांना अटक करायची कामगिरी सोपवली. हा झुल्फिकार खान म्हणजे मोगली वजीर असद खानाचा मुलगा आणि औरंगजेबाने खास मर्जीतला सरदार.
१६९० - जिंजीला प्रथमच वेढा
जिंजीचा किल्ला हा सध्याच्या तमिळनाडू राज्यात आहे - चेन्नई पासून साधारण १५०-१६० कि.मी आणि वेल्लोर पासून साधारण १०० कि.मी. हा किल्ला ३ टेकड्यांवर मिळून वसला आहे - कृष्णगिरी, राजागिरी/अनंदगिरी आणि चांद्रयानदुर्ग. किल्ल्याचा एकूण पसारा खूप मोठा आणि तटबंदी मजबूत. शिवाजी महाराजांनी स्वतः जिंजीच्या किल्ल्याला हिंदुस्तानातील एक सर्वात अभेद्य किल्ला म्हणलं होतं. अशा हया जिंजीच्या किल्ल्याला पहिल्यांदी २९ ऑगस्ट १६९० ला झुल्फीकारखानानी वेढा घातला(मोगल इतिहासकारांच्या मते २३ नोव्हेंबरला झुल्फिकार खानाने जिंजी साठी प्रयाण केले - काही असो १६९० च्या अखेरीस तो जिंजीला येऊन वेढा घालायच्या कामाला लागला होता हे नक्की). ह्या वेढ्याची पूर्वसूचना राजाराम महाराजांना असावी कारण जसा वेढा पडायला लागला तसे महाराज स्वराज्याच्या कर्नाटक सुभ्यात निघून गेले. ह्याच वेळी जिंजीच्या मोगल छावणीतून काही मराठा सरदार(माणकोजी पांढरे, नागोजी माने आणि नेमाजी शिंदे) फुटून राजाराम राजेंना सामील झाले. ह्या घटनेमुळे वेढा पूर्ण करता आला नाही असे दिसते. राजाराम राजे फेब्रुवारी १६९१ ला जिंजीला परतल्याची नोंद आहे. १६९० ला चालू झालेला हा महाराजांना अटकेचा प्रयत्न - वेढा घालणे, वेढा उठवणे - हा थेट १६९८ पर्यंत चालू राहिला. ह्या काळात मोगल फौजेचे बरेच हाल झाले हे पुढच्या हकीकती वरून कळेल

Saturday, 22 August 2020

छत्रपती राजारामराजे भोसले (भाग क्रमांक:- २)

 

छत्रपती राजारामराजे भोसले (भाग क्रमांक:- २)
स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती राजारामराजेंचा ११ वर्षाचा झंझावात आणि त्यासाठी केलेले नियोजन....
मागील भागामध्ये आपण रायगड ते जिंजीचा थरारक प्रवास अनुभवला. आणि जिंजीतून स्वराज्याच्या तिसर्या छत्रपतींचा झंझावात सुरू झाला. परंतु एक खंत कायम वाटते की, या अद्वितीय इतिहासाला इतिहासकार आणि मराठी माणूस न्याय देऊ शकला नाही.
चहोबाजूंनी स्वराज्यावर आलेले संकट:-
छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीतून स्वराज्याची पुन्हा घडी बसवन्यास सुरवात केली. त्यावेळी स्वराज्याची अवस्था खूप बिकट होती. छत्रपती स्वराज्यापासून ८०० मैल दूर होते. स्वराज्याची राजधानी रायगड सहित वेगवेगळ्या ठिकाणी औरंजेबाच्या सैन्याने एकाच वेळेस अनेक आघाड्या उघडल्या होत्या. वतनदारीच्या लालसेने कित्येक सरदार मोघलांकडे झुकले होते. स्थानिक लोकांची फंदफितुरी, आणि स्वराज्यावर आलेले दुष्काळी संकट यात राजाराम महाराजांची अग्निपरीक्षा सुरू होती. त्यात अष्टप्रधान मंडळ विस्कळीत झालेले होते. जिंजीला तीन लक्ष होनांचा खजिना होता. परंतु मोघालंविरुद्ध आघड्या उभरण्यासाठी व रयतेला मोघाली आणि दुष्काळी संकटातून बाहेर काढण्यासाठी खजिना पुरेसा नव्हता.
छत्रपती राजाराम महाराज या संकटा पुढे डगमगले नाहीत. ते अत्यंत पराक्रमी, शांत धीरगंभीर स्वभावाचे व तसेच मुत्सद्दी राजकरणी होते. आपल्या ११ वर्षाच्या कारकिर्दीत घेतलेले निर्णय, आखलेल्या मोहिमा, आघाड्या, तह, गनिमीकावा आणि मोघलांची लूट , यामुळे स्वराज्य गिळंकृत करायचे, या औरंगजेबाच्या स्वप्नाला, त्यांनी खीळखीळ करून टाकलं.
स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजी:-
राजाराम महाराज जिंजी मध्ये पोहचताच त्यांनी राज्यकारभाराची विस्कळीत झालेली घडी व्यवस्थित बसविण्यास सुरवात केली. जिंजीत तख्त स्थापन करून राजाराम महाराजांनी जिंजीला स्वराज्याची राजधानी घोषित केले. या निर्णयामुळे औरंगजेबला पहिला धक्का बसला की, जरी रायगड मोघलांच्या ताब्यात आला तरी मराठ्यांचा राजा, त्यांचे तख्त शाबूत आहे.
अष्टप्रधान मंडळ नेमले:-
छत्रपती राजाराम महाराज जाणून होते, स्वराज्यावरचे हे संकट मोडून काढायचे असेल तर मात्तबर, निष्ठावान मंडळींची गरज आहे. आणि त्यांनी एक मजबूत फळी निर्माण केली
निळोपंत पिंगळे - पंतप्रधान (पेशवे)
रामचंद्रपंत - हुकूमत-पन्हा (अमात्य)
संताजी घोरपडे – सेनापती,
धनाजी जाधव - सेनापती (संताजी घोरपडे नंतर सेनापति हे पद धनाजी जाधवरावांकडे आले)
महादजी गदाधर - सुमंत
शंकराजी नारायण - सचिव
रामचंद्र त्रिंबक पुंडे - मंत्री
श्रीकराचार्य – पंडितराव
निराजी रावजी – न्यायाधीश
अष्टप्रधानांशिवाय आणखी काही कर्त्या व्यक्तींना त्यांनी सरंजामे दिली.
प्रल्हाद निराजी - प्रतिनिधी,
तिमाजी पिंगळे - जिंजीची सुभेदारी
सुंदर बाळाजी - कुनिमेडूची सुभेदारी
परसोजी भोसले - ‘सेनासाहेबसुभाʼ परसोजी भोसले नागपूरकर यांना वऱ्हाडातील चौथाई व सरदेशमुखीचे वसुली अधिकार दिले;
खंडेराव दाभाडे -‘सेनाधुरंधरʼ हे पद व गुजरात, बागलाण प्रांतांचा सरंजाम दिला.
खंडो बल्लाळ - चिटणिशी कायम ठेवली.
सिधोजीराव नाईक निंबाळकर – सरलष्कर (गोदावरी तीरावरील भागाचा अम्मल)
नमाजी गायकवड – कोपळ्ळचा हवालदार
येसाजी मल्हार – कर्नाटक स्वारीचे उपसेनापती
मकाजी देवकाते – पंचहजारी सरदार
केशव रामन्ना – कर्नाटकचे सुभेदार
कान्होजी आंग्रे – आरमार प्रमुख
छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या राज्यकारभरास सुरवात केली. कर्नाटकातील वेगवेगळ्या ठाण्यांवर, किल्ल्यांवर विश्वासातील माणसांच्या नेमणुका केल्या. असे अनेक सेनानी राजाराम महाराजांनी एकत्र आणले. आणि जिंजीसारख्या दूर असलेल्या प्रदेशातून ओरंगजेबाविरुद्ध आघाड्या उघडल्या.
मावळ्यांच्या पराक्रमाचा मान सन्मान:-
छत्रपती राजाराम महाराजांनी मावळ्यांच्या पराक्रमाचा नेहमी योग्य किताब, पद, अतिरिकत्त हुद्दा, देऊन मान सन्मान केला. त्या संबधीचा औरंजेबाच्या मनात धडकी भरावनारा प्रसंग:
याच धामधुमीच्या वेळी एक धाडसी बेत आखण्यात आला. थेट औरंजेबाच्या छावणीवर हल्ला करायचा. कोरेगाव तुळपुरच्या जवळ मुघल छावणीवर संताजी घोरपडे यांनी आपले बंधू बहिर्जी आणि मोलोजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण यांच्यासोबत हल्ला केला व त्या छावणीचे सोन्याचे कळस कापून आणले. हा फार मोठा पराक्रम होता. मराठे आजून संपले नाहीत. हेच औरंजेबला समजवन्यासाठीचा केलेला जबरदस्त प्रहार होता. या कामगिरीवर प्रसन्न होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी किताब बहाल केले.
संताजी घोरपडे – मामलकत-मदार,
बहिर्जी घोरपडे – हिंदूराव,
मोलोजी घोरपडे – अमीर उल उमराव,
विठोजी चावण – हिम्मत बहाद्दर.
महाराष्ट्रात रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी मावळातील मोगलांनी घेतलेले किल्ले परत जिंकून घेतले. त्यात पन्हाळा किल्ला देखील परत मिळवून घेतला. या महिमेत परशुराम त्रींबक प्रसिद्धीस आले. त्यांना छत्रपती राजरामराजेंनी ‘सुभालष्करʼ व ‘समशेरजंगʼ हे किताब दिला.
या सर्व घडमोडींचा परिणाम रयतेच्या व मावळ्यांच्या खचलेल्या मनावर झाला. एक नवीन उभारी मिळाली. मराठ्यांच्या तलवारी मुघलांच धूळधाण करण्यासाठी प्रेरित झाल्या.
तेवढ्यात स्वराज्यावर नवीन संकट आले जिंजीवर झुल्फिकारखानाने हल्ला केला आणि जिंजीला वेढा दिला. महाराज परत अडचणीत आले. पण ते शिवपुत्र होते. त्यांनी गनिमीकाव्याचा वापर करून ८ वर्ष किल्ला लढवला व स्वराज्यात आघाडी देखील सुरू ठेवल्या.
जर पुढील पोस्ट मध्ये आपल्याला छत्रपती राजाराम महारजांच्या जिंजीच्या वेढा आणि स्वराज्यातील आघाडी या बद्दल माहिती हवी असेल तर कृपया कमेन्ट करून कळवावे.
संदर्भ :- शिवपुत्र छत्रपती राजाराम (डॉ. जयसिंगराव पवार)
व्याख्यान पराक्रमी मराठे (दुर्गमहर्षी प्रमोद मांडे)
शिवपुत्र राजाराम (डॉ. प्रमिला जरग)

छत्रपती राजारामराजे भोसले (भाग क्रमांक:- १)

 

छत्रपती राजारामराजे भोसले (भाग क्रमांक:- १)
आमचं नाव जरी राम असल तरी आम्ही भरत म्हणून राहू, कधी सिंहासन जरी आम्हाला मिळाल तरी आम्ही सिंहासनावर दादासाहेबांचे जोडे ठेऊ. शिवपुत्र छत्रपती राजारामराजे......
जन्मताना ते पालथे निपजले म्हणून सर्वजन चिंतित झाले असतां, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पातशाही पालथी घालेल असे भविष्य वर्तविले. प्रत्यक्षात जरी राजारामराजांनी पातशाही पालथी घातली नाही, तरी त्यांनी पातशहाला झुंजवत ठेवून यश मिळू दिले नाही, पातशाही खिळखिळी केली.
पूर्ण नाव:- राजारामराजे शिवाजीराजे भोसले.
वडील:- शिवाजीराजे शहाजीराजे भोसले.
आई:- सोयराबाई शिवाजीराजे भोसले.
जन्म:- २४ फेब्रुवारी १६७०
जन्मस्थान:- राजगड
बंधु:- छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले.
बहीण:-
१. सखुबाई - महादजी नाईक निंबाळकर (फलटण-सातारा) (जन्मदाती आई:- सईबाई)
२. राणूबाई - - अचलोजी जाधव (भुईंज-सातारा) (जन्मदाती आई:- सईबाई)
३. अंबिकाबाई- हरजीराजे महाडिक (तारळे-सातारा) (जन्मदाती आई:- सईबाई)
४. दीपाबाई - - विसाजी उर्फ विश्वासराव (जन्मदाती आई:- सोयराबाई)
५. कमळाबाई - जानोजी पालकर पुत्र, (शिरूर-पुणे) (जन्मदाती आई:- सकवारबाई)
६. राजकुवर - -गणोजी शिर्के (दाभोळ) (जन्मदाती आई:- सगुणाबाई)
पत्नी:-
१. जानकीबाई (गुजर)
२. ताराबाई (मोहिते)
३. राजसबाई (घाटगे)
४. अंबिकाबाई
५. सगुणाबाई
राजारामराजे पुत्र :-
१. शिवाजीराजे दुसरे (ताराबाई यांचे पुत्र)
२. संभाजीराजे दुसरे (राजसबाई यांचे पुत्र)
मंचाकरोहन:- १२ फेब्रुवारी १६८९
राजधानी:- किल्ले रायगड व जिंजी
राजमुद्रा:- छत्रपती राजाराम महाराज यांच्या दोन राजमुद्रा होत्या.
प्रतिपात चन्द्र्लेखेव वर्धीष्णू विश्ववंदिता | शिवासुनोरीयंमुद्रा राजारामस्य राजाते |
धर्म प्रद्योदिताशेषवर्णा दाशराथेरीव | राजारामस्य मुद्रेयं विश्ववंद्या विराजते |
मृत्यू:- ३ मार्च १७००
समाधीस्थळ:- सिंहगड, जिल्हा:- पुणे.
चलन:- होन, शिवराई.
उत्तराधिकारी:- महाराणी ताराबाई भोसले.
महत्वाचे प्रसंग:-
दूर जिंजीस जाऊन स्वराज्य राखण्याचा निर्णय आणि थरारक प्रवास :-
राजाराम महाराज छत्रपती जरी झाले तरी त्यांच्यापुढील परिस्थिती खराब होती. छत्रपती संभाजी महाराज अटकेत होते, मराठे सरदार औरंगजेबाच्या बाजूला झुकले जाऊ लागले. चाऱ्हीकडून स्वराज्यावर होणारा हल्ला, स्थानिक लोकांची फंदफितुरी, औरंगजेबाशी लढा द्यायला लागणाऱ्या पैशाची चणचण, हे सर्व प्रश्न होते. स्वराज्य तर राखायचे, मराठेशाहीला जिंवत तर ठेवायचे पण हाती बळ नाही, पैसा नाही अशी भीषण परिस्थिती. औरंगजेबाच्या सैन्याने एकाच वेळेस अनेक आघाड्या उघडल्या होत्या व ते राजारामराजांच्या मागेच लागले होते, ह्यामुळे महाराणी येसुबाईंनी राजाराम महाराजांना दूर जिंजीस जाऊन राज्य राखण्याचा सल्ला दिला. परंतू रायगड ते जिंजी हा प्रवास खूप खडतर होता.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मोगली छावणीत झालेल्या अत्यंत क्रूर वधाने हिंदवी स्वराजाचा पायाच हादरून गेला होता. मोगली फौजा स्वराज्यात सर्व बाजूंनी घुसून आक्रमण करत होत्या. स्वराज्याचे गडकोट, ठाणी एकामागून एक याप्रमाणे शत्रूच्या हाती पडत होती. प्रत्यक्ष राजधानी रायगडला औरंगजेबाचा सेनापती झुल्फीकार खान याचा वेढा पडला होता. राजाराम महाराजांनी रायगडाबाहेर पडून अनेक किल्ल्यांवर जाणे, ते जेथे जेथे गेले, तेथे तेथे मोगली फौजांनी त्यांचा पिच्छा पुरवाला. राजाराम महाराजांनी गड सोडून किल्लेदारांना व मोठ्या सरदारांना भेट देण्यास आरंभ केला, त्यांना आपल्या बाजुस वळविण्यास बोलनी लावली. बरेच सरदार मोगलांस मिळाले होते, त्यांची चाचपणी केली. जास्तीत जास्त मराठ्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले. राजाराम महाराज रायगडावरून थेट प्रतापगडास आले. प्रतापगडाहून सज्जनगड, सातारा, वसंतगड असे करत पन्हाळ्यास पोहोचले. आणि पन्हाळ्यास मोगलांचा वेढा पडला. राजाराम महाराजांपुढे शिवछत्रपतींचा पन्हाळ गडावरील प्रसंग उभा ठाकला. आता गनिमीकावा वापरुन इतिहासाची पुनरावृती करायची वेळ आली होती. परंतू आपल्या दबावामुळे मराठ्यांचा नवा राजा महाराष्ट्रातून निसटून जिंजीकडे जाण्याची शक्यता आहे’, याचा अंदाज औरंगजेबाने अगोदरच बांधला होता. ‘कोणत्याही परिस्थितीत राजास पकडायचे’, असा चंग त्याने बांधला होता आणि ‘कोणत्याही परिस्थितीत शत्रूस चकवा देऊन जिंजीस पोहोचायचे’, असा राजरामराजांचा दृढ निश्चय होता.
पन्हाळ्याचा वेढा चालू असतांनाच २६.९.१६८९ या दिवशी राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी लिंगायत वाण्याचा वेश परिधान करून गुप्तपणे वेढ्याबाहेर पडले. आई भवानीने दुसऱ्यांदा पन्हाळ्यावर स्वराज्याला साथ दिली. सोबत मानसिंग मोरे, प्रल्हाद, निराजी, कृष्णाजी अनंत, निळो मोरेश्वर, खंडो बल्लाळ, बाजी कदम इत्यादी मंडळी होती. वेढ्याबाहेर पडताच घोड्यावरून प्रवास चालू झाला. सूर्योदयाच्या वेळी सर्व जण कृष्णातीरावरील नृसिंहवाडीजवळ पोहोचले. पन्हाळगडाहून सरळ दक्षिणेचा मार्ग न धरता महाराजांनी शत्रूस चकवण्यासाठी पूर्वेचा मार्ग धरला होता. आग्र्याहून निसटतांना शिवछत्रपतींनी अशी युक्ती अवलंबली होती. ते सरळ दक्षिणेस न जाता प्रथम उत्तरेस नंतर पूर्वेस आणि नंतर दक्षिणेस वळले होते. कृष्णेच्या उत्तरतिराने काही काळ प्रवास करून त्यांनी पुन्हा कृष्णा पार करून दक्षिणेचा रस्ता धरला; कारण जिंजीकडे जायचे, तर कृष्णा आणखी एकदा पार करणे गरजेचे होते. हा सर्व वरवर ‘अव्यापारेषु व्यापार’ केवळ शत्रूस हुलकावणी देण्यासाठी होता. शिमोग्यापर्यंतचा महाराजांचा प्रवास गोकाक-सौंदत्ती-नवलगुंद-अनेगरी-लक्ष्मीश्वर-हावेरी-हिरेकेरूर-शिमोगा असा झाला.
मार्गात ठिकठिकाणी महाराजांनी बहिर्जी घोरपडे, मालोजी घोरपडे, संताजी जगताप, रूपाजी भोसले इत्यादी आपले सरदार यापूर्वीच रवाना केले होते. ते प्रवासात महाराजांना मिळत गेले. इकडे महाराष्ट्रात मोगलांना उमजून चुकले होते की, मराठ्यांचा राजा आपल्या हातातून निसटला आहे. स्वतः बादशहाने निरनिराळ्या मार्गांनी त्यांच्या पाठलागावर सैन्य पाठवले होते. अशाच एका सैन्याने महाराजांना वरदा नदीजवळ गाठले. तेव्हा त्यांनी बहिर्जी आणि मालोजी या बंधूंच्या साहाय्याने शत्रूला हुलकावणी देऊन नदी पार केली; पण पुढे मोगलांच्या दुसर्या एका सैन्याने त्यांची वाट अडवली. महाराज स्वत आघाडी घेत युद्धास सामोरे गेले. तेव्हा रूपाजी भोसले आणि संताजी जगताप या शूर भालाइतांनी (भाल्यांनी युद्ध करणारे) भीम प्रकार गाजवून मोगलांना थोपवून धरले. लवकरच महाराजांनी संताजीस आघाडीस आणि रूपाजीस पिछाडीस ठेवून पुढचा मार्ग धरला. शत्रूंशी लढत लढत, त्यास अनपेक्षितपणे हुलकावणी देऊन त्यांनी तुंगभद्रेचा तीर गाठला.
ही हुलकावणी मार्गातील बिदनूरच्या चन्नमा राणीच्या सहकार्याने शक्य झाली. शिवछत्रपतींचे कार्य चन्नमास ज्ञात होते आणि म्हणूनच राजाराम महाराजांनी त्यांच्या राज्यातून सुखरूपपणे जाऊ देण्याचे आवाहन करताच त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य देऊ केले. संकटग्रस्त मराठा राजास साहाय्य करणे हा त्यांनी राजधर्म मानला आणि औरंगजेबाच्या संभाव्य क्रोधाची तमा न बाळगता त्यांनी महाराजांच्या प्रवासाची गुप्तपणे चोख व्यवस्था केली. राणीच्या या साहाय्यामुळेच मराठ्यांचा राजा आपल्या सहकार्यांनिशी तुंगभद्रेच्या तिरावरील शिमोग्यास सुखरूपपणे पोहोचला. राणीच्या या साहाय्याची वार्ता औरंगजेबास समजताच त्याने राणीस शिक्षा करण्यासाठी मोठी फौज रवाना केली; पण या फौजेचा समाचार मार्गातच संताजी घोरपड्यांनी घेऊन राणीचा बचाव केला.
राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी तुंगभद्रेच्या पात्रात असणार्या एका बेटावर मुक्काम करून होते. ऐन मध्यरात्रीच्या प्रहरी त्यांच्यावर मोगलांच्या एका मोठ्या लष्करी तुकडीने छापा टाकला. या तुकडीचे नेतृत्व करत होता विजापूरचा सुभेदार सय्यद अब्दुल्ला खान. स्वतः औरंगजेबाच्या हुकमाने ३ दिवस ३ रात्र अखंड घोडदौड करून अब्दुल्ला खानाने राजाराम महाराजांस गाठले होते. सर्व दिशांनी मोगलांचा वेढा पडताच मराठ्यांनी सावध होऊन आपल्या राजाच्या रक्षणार्थ जोराचा प्रतिकार चालू केला. मोठी धुमश्चक्री उडाली. या चकमकीत अनेक मराठे मारले गेले. कित्येक कैद झाले. खानाला कैद केलेल्यांमध्ये प्रत्यक्ष मराठ्यांचा राजा दिसला. त्याच्या आनंदास पारावार राहिला नाही. त्याने तातडीने बादशहाकडे हे वृत्त धाडले. बादशहाने राजास सुरक्षाव्यवस्थेने (बंदोबस्ताने) आणण्यासाठी विशेष सैन्य रवाना केले; पण लवकरच अब्दुल खानाच्या लक्षात आले की, आपण पकडलेला मराठ्यांचा राजा नकली आहे. सिद्दी जोहरच्या वेढ्यात शिवछत्रपतींचे असेच सोंग करून शिवा काशीद यांनी शत्रूस चकवले होते. हिंदवी स्वराज्याच्या होमकुंडात या वेळी अशाच प्रकारे आत्मबलिदान करून एका अनामिक मराठ्याने मराठ्यांच्या छत्रपतीस वाचवले होते. धन्य तो अनामिक मराठा बहाद्दूर वीर ! त्यांच्या बलिदानाने मराठ्यांचे स्वातंत्र्य-समर अधिक तेजस्वी झाले.
शिमोग्यापर्यंतचे अंतर राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी यांनी घोड्यांच्या पाठीवरून तोडले होते; पण आता मोगलांनी त्यांच्या सर्व संभाव्य मार्गांवर हेरांचे जाळे पसरल्याने घोड्यावरून प्रवास धोक्याचा ठरला. तेव्हा त्यांनी यात्रेकरू, तडीतापडी, कापडी, व्यापारी, भिक्षेकरी अशी नाना प्रकारची वेषांतरे करून आपला खडतर प्रवास चालूच ठेवला. ठिकठिकाणचे चौक्या-पहारे चुकवत त्यांनी शिमोग्याच्या आग्नेयेस १७० मैलांवर असणारे बंगळूर गाठले.
बंगळूरच्या मुक्कामी महाराजांवर आणखी एक संकट गुजरले. त्यांचे पाय एक सेवक धूत असता काही स्थानिक लोकांच्या लक्षात आले की, हा कोणी मातब्बर माणूस दिसतो. त्यांनी ही वार्ता लगेच मोगली ठाणेदारास सांगितली. त्या कालावधीत मराठी मंडळीही सावध झाली. त्यांना कोसळणार्या संकटाची चाहूल लागली. तेव्हा खंडो बल्लाळाने पुढाकार घेऊन महाराजांस विनंती केली की, त्यांनी आपल्या सहकार्यांनिशी भिन्न भिन्न मार्गांनी पुढे निघून जावे, मागे आम्ही २-४ आसामांrनिशी आल्या प्रसंगाला तोंड देऊ आणि त्यातून निसटून मार्गात ठराविक ठिकाणी येऊन मिळू. खंडो बल्लाळच्या या सल्ल्याप्रमाणे महाराज निघाले. इकडे ठाणेदाराची धाड पडली आणि त्याने खंडो बल्लाळ यांना कैद करून ठाण्यात नेले. ठाण्यात खंडो बल्लाळ आणि त्यांचे सोबती यांच्यावर अनन्वित अत्याचार केले गेले. त्यांना चाबकाने फोडून काढले. डोक्यावर दगड दिले. तोंडात राखेचे तोबरे दिले; पण ‘आम्ही यात्रेकरू’ याव्यतिरिक्त अधिक माहिती त्यांच्या तोंडून बाहेर पडली नाही. तेव्हा ‘हे खरेच यात्रेकरू आहेत. महाराजांचे असते, तर इतक्या मारापुढे बोलते झाले असते ’, असा विचार करून ठाणेदाराने त्यांना सोडून दिले. सुटका होताच ते राजाराम महाराजांना विवक्षित ठिकाणी येऊन मिळाले. खंडो बल्लाळ छत्रपती आणि हिंदवी स्वराज्य यांसाठी मोठा देहदंड सोसला. स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यनिष्ठा यांचे हे एक प्रकरण दिव्यच होते. या दिव्याच्या कसोटीस ते उतरले.
राजाराम महाराजांचा प्रवास पुढे चालूच राहिला. बंगळूरपासून पूर्वेस ६५ मैलांवर असणार्या अंबूर या ठिकाणी ते पोहोचले. अंबूर हे ठाणे मराठ्यांच्या ताब्यात होते आणि तेथे बाजी काकडे हे मराठा सरदार छावणी करून होते. त्यांना महाराज आल्याची वार्ता समजताच ते त्वरेने दर्शनास आले. आणि त्यांनी महाराजांचा यथोचित सत्कार करून त्यांचा गुप्तवास संपवला. आता महाराज उघडपणे आपल्या सैन्यासह अंबूरहून वेलोरकडे निघाले. वेलोरचा कोटही मराठ्यांच्या ताब्यात होता. २८.१०.१६८९ या दिवशी महाराज वेलोरास पोहोचले. पन्हाळगड ते वेलोर हे अंतर कापण्यास त्यांना ३३ दिवस लागले होते. वेलोर मुक्कामी कर्नाटकातील आणखी काही सरदार आपल्या सैन्यासह त्यांना येऊन मिळाले. वास्तविक अंबूरहून थेट दक्षिणेस असणार्या जिंजीकडे त्यांनी जावयास हवे होते; पण जिंजीकडे जाण्यात त्यांच्यासमोर एक अडचण उपस्थित झाली होती. जिंजीला शिवरायांचे जावई हरजीराजे महाडीक होते पण ते त्याच सुमारास वारले होते, अशातच राजाराम महाराज तिथे पोचल्यामूळे गोंधळ उडाला, घरच्याच लोकांचा विरोध झाला परंतु विरोधाला मात देऊन राजांनी जिंजी हस्तगत केली.
स्वतः शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याला अभेद्य करून ठेवले होते. पुढे महाराष्ट्रात मराठी राजाला संकटकाल प्राप्त झाला, तर येथे त्यास आश्रय घेता यावा, अशी त्यांची दूरदृष्टी होती. शिवछत्रपतींनी औरंगजेबाचा धोका जाणला होता. भाकीत केले होते. त्याचप्रमाणे घडले. औरंगजेब दक्षिणेस चालून आला. मराठी राजा संकटात पडला. तेव्हा जिंजी किल्ला साहाय्यास आला.
मराठा मंडळींनी कर्नाटकात आणि जिंजीत राजाराम महाराजांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केल्याने मद्रास किनारपट्टीवरील राजकारणाचे रंग पालटू लागले. नव्या मराठा राजाने जिंजीत आपली नवी राजधानी उभी केली. दरबार सज्ज झाला. मराठ्यांच्या राज्याचे नवे पर्व आरंभ झाले.
छत्रपती राजाराम महाराजांच्या पराक्रमाविषयी इतिहासकरांनी खूप कमी लिखाण केले आहे.
जर पुढील पोस्ट मध्ये आपल्याला छत्रपती राजाराम महारजांच्या पुढील पराक्रमी प्रवासाची माहिती हवी असेल तर कृपया कमेन्ट करून कळवावे.
संदर्भ :- शिवपुत्र छत्रपती राजाराम (डॉ. जयसिंगराव पवार)
व्याख्यान पराक्रमी मराठे (दुर्गमहर्षी प्रमोद मांडे)

छत्रपती राजारामराजे भोसले

 

छत्रपती राजारामराजे भोसले
आमचं नाव जरी राम असल तरी आम्ही भरत म्हणून राहू, कधी सिंहासन जरी आम्हाला मिळाल तरी आम्ही सिंहासनावर दादासाहेबांचे जोडे ठेऊ. शिवपुत्र छत्रपती राजारामराजे......
जन्मताना ते पालथे निपजले म्हणून सर्वजन चिंतित झाले असतां, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पातशाही पालथी घालेल असे भविष्य वर्तविले. प्रत्यक्षात जरी राजारामराजांनी पातशाही पालथी घातली नाही, तरी त्यांनी पातशहाला झुंजवत ठेवून यश मिळू दिले नाही, पातशाही खिळखिळी केली.
पूर्ण नाव:- राजारामराजे शिवाजीराजे भोसले.
वडील:- शिवाजीराजे शहाजीराजे भोसले.
आई:- सोयराबाई शिवाजीराजे भोसले.
जन्म:- २४ फेब्रुवारी १६७०
जन्मस्थान:- राजगड
बंधु:- छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले.
बहीण:-
१. सखुबाई - महादजी नाईक निंबाळकर (फलटण-सातारा) (जन्मदाती आई:- सईबाई)
२. राणूबाई - - अचलोजी जाधव (भुईंज-सातारा) (जन्मदाती आई:- सईबाई)
३. अंबिकाबाई- हरजीराजे महाडिक (तारळे-सातारा) (जन्मदाती आई:- सईबाई)
४. दीपाबाई - - विसाजी उर्फ विश्वासराव (जन्मदाती आई:- सोयराबाई)
५. कमळाबाई - जानोजी पालकर पुत्र, (शिरूर-पुणे) (जन्मदाती आई:- सकवारबाई)
६. राजकुवर - -गणोजी शिर्के (दाभोळ) (जन्मदाती आई:- सगुणाबाई)
पत्नी:-
१. जानकीबाई (गुजर)
२. ताराबाई (मोहिते)
३. राजसबाई (घाटगे)
४. अंबिकाबाई
५. सगुणाबाई
राजारामराजे पुत्र :-
१. शिवाजीराजे दुसरे (ताराबाई यांचे पुत्र)
२. संभाजीराजे दुसरे (राजसबाई यांचे पुत्र)
मंचाकरोहन:- १२ फेब्रुवारी १६८९
राजधानी:- किल्ले रायगड व जिंजी
राजमुद्रा:- छत्रपती राजाराम महाराज यांच्या दोन राजमुद्रा होत्या.
प्रतिपात चन्द्र्लेखेव वर्धीष्णू विश्ववंदिता | शिवासुनोरीयंमुद्रा राजारामस्य राजाते |
धर्म प्रद्योदिताशेषवर्णा दाशराथेरीव | राजारामस्य मुद्रेयं विश्ववंद्या विराजते |
मृत्यू:- ३ मार्च १७००
समाधीस्थळ:- सिंहगड, जिल्हा:- पुणे.
चलन:- होन, शिवराई.
उत्तराधिकारी:- महाराणी ताराबाई भोसले.
महत्वाचे प्रसंग:-
दूर जिंजीस जाऊन स्वराज्य राखण्याचा निर्णय आणि थरारक प्रवास :-
राजाराम महाराज छत्रपती जरी झाले तरी त्यांच्यापुढील परिस्थिती खराब होती. छत्रपती संभाजी महाराज अटकेत होते, मराठे सरदार औरंगजेबाच्या बाजूला झुकले जाऊ लागले. चाऱ्हीकडून स्वराज्यावर होणारा हल्ला, स्थानिक लोकांची फंदफितुरी, औरंगजेबाशी लढा द्यायला लागणाऱ्या पैशाची चणचण, हे सर्व प्रश्न होते. स्वराज्य तर राखायचे, मराठेशाहीला जिंवत तर ठेवायचे पण हाती बळ नाही, पैसा नाही अशी भीषण परिस्थिती. औरंगजेबाच्या सैन्याने एकाच वेळेस अनेक आघाड्या उघडल्या होत्या व ते राजारामराजांच्या मागेच लागले होते, ह्यामुळे महाराणी येसुबाईंनी राजाराम महाराजांना दूर जिंजीस जाऊन राज्य राखण्याचा सल्ला दिला. परंतू रायगड ते जिंजी हा प्रवास खूप खडतर होता.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मोगली छावणीत झालेल्या अत्यंत क्रूर वधाने हिंदवी स्वराजाचा पायाच हादरून गेला होता. मोगली फौजा स्वराज्यात सर्व बाजूंनी घुसून आक्रमण करत होत्या. स्वराज्याचे गडकोट, ठाणी एकामागून एक याप्रमाणे शत्रूच्या हाती पडत होती. प्रत्यक्ष राजधानी रायगडला औरंगजेबाचा सेनापती झुल्फीकार खान याचा वेढा पडला होता. राजाराम महाराजांनी रायगडाबाहेर पडून अनेक किल्ल्यांवर जाणे, ते जेथे जेथे गेले, तेथे तेथे मोगली फौजांनी त्यांचा पिच्छा पुरवाला. राजाराम महाराजांनी गड सोडून किल्लेदारांना व मोठ्या सरदारांना भेट देण्यास आरंभ केला, त्यांना आपल्या बाजुस वळविण्यास बोलनी लावली. बरेच सरदार मोगलांस मिळाले होते, त्यांची चाचपणी केली. जास्तीत जास्त मराठ्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले. राजाराम महाराज रायगडावरून थेट प्रतापगडास आले. प्रतापगडाहून सज्जनगड, सातारा, वसंतगड असे करत पन्हाळ्यास पोहोचले. आणि पन्हाळ्यास मोगलांचा वेढा पडला. राजाराम महाराजांपुढे शिवछत्रपतींचा पन्हाळ गडावरील प्रसंग उभा ठाकला. आता गनिमीकावा वापरुन इतिहासाची पुनरावृती करायची वेळ आली होती. परंतू आपल्या दबावामुळे मराठ्यांचा नवा राजा महाराष्ट्रातून निसटून जिंजीकडे जाण्याची शक्यता आहे’, याचा अंदाज औरंगजेबाने अगोदरच बांधला होता. ‘कोणत्याही परिस्थितीत राजास पकडायचे’, असा चंग त्याने बांधला होता आणि ‘कोणत्याही परिस्थितीत शत्रूस चकवा देऊन जिंजीस पोहोचायचे’, असा राजरामराजांचा दृढ निश्चय होता.
पन्हाळ्याचा वेढा चालू असतांनाच २६.९.१६८९ या दिवशी राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी लिंगायत वाण्याचा वेश परिधान करून गुप्तपणे वेढ्याबाहेर पडले. आई भवानीने दुसऱ्यांदा पन्हाळ्यावर स्वराज्याला साथ दिली. सोबत मानसिंग मोरे, प्रल्हाद, निराजी, कृष्णाजी अनंत, निळो मोरेश्वर, खंडो बल्लाळ, बाजी कदम इत्यादी मंडळी होती. वेढ्याबाहेर पडताच घोड्यावरून प्रवास चालू झाला. सूर्योदयाच्या वेळी सर्व जण कृष्णातीरावरील नृसिंहवाडीजवळ पोहोचले. पन्हाळगडाहून सरळ दक्षिणेचा मार्ग न धरता महाराजांनी शत्रूस चकवण्यासाठी पूर्वेचा मार्ग धरला होता. आग्र्याहून निसटतांना शिवछत्रपतींनी अशी युक्ती अवलंबली होती. ते सरळ दक्षिणेस न जाता प्रथम उत्तरेस नंतर पूर्वेस आणि नंतर दक्षिणेस वळले होते. कृष्णेच्या उत्तरतिराने काही काळ प्रवास करून त्यांनी पुन्हा कृष्णा पार करून दक्षिणेचा रस्ता धरला; कारण जिंजीकडे जायचे, तर कृष्णा आणखी एकदा पार करणे गरजेचे होते. हा सर्व वरवर ‘अव्यापारेषु व्यापार’ केवळ शत्रूस हुलकावणी देण्यासाठी होता. शिमोग्यापर्यंतचा महाराजांचा प्रवास गोकाक-सौंदत्ती-नवलगुंद-अनेगरी-लक्ष्मीश्वर-हावेरी-हिरेकेरूर-शिमोगा असा झाला.
मार्गात ठिकठिकाणी महाराजांनी बहिर्जी घोरपडे, मालोजी घोरपडे, संताजी जगताप, रूपाजी भोसले इत्यादी आपले सरदार यापूर्वीच रवाना केले होते. ते प्रवासात महाराजांना मिळत गेले. इकडे महाराष्ट्रात मोगलांना उमजून चुकले होते की, मराठ्यांचा राजा आपल्या हातातून निसटला आहे. स्वतः बादशहाने निरनिराळ्या मार्गांनी त्यांच्या पाठलागावर सैन्य पाठवले होते. अशाच एका सैन्याने महाराजांना वरदा नदीजवळ गाठले. तेव्हा त्यांनी बहिर्जी आणि मालोजी या बंधूंच्या साहाय्याने शत्रूला हुलकावणी देऊन नदी पार केली; पण पुढे मोगलांच्या दुसर्या एका सैन्याने त्यांची वाट अडवली. महाराज स्वत आघाडी घेत युद्धास सामोरे गेले. तेव्हा रूपाजी भोसले आणि संताजी जगताप या शूर भालाइतांनी (भाल्यांनी युद्ध करणारे) भीम प्रकार गाजवून मोगलांना थोपवून धरले. लवकरच महाराजांनी संताजीस आघाडीस आणि रूपाजीस पिछाडीस ठेवून पुढचा मार्ग धरला. शत्रूंशी लढत लढत, त्यास अनपेक्षितपणे हुलकावणी देऊन त्यांनी तुंगभद्रेचा तीर गाठला.
ही हुलकावणी मार्गातील बिदनूरच्या चन्नमा राणीच्या सहकार्याने शक्य झाली. शिवछत्रपतींचे कार्य चन्नमास ज्ञात होते आणि म्हणूनच राजाराम महाराजांनी त्यांच्या राज्यातून सुखरूपपणे जाऊ देण्याचे आवाहन करताच त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य देऊ केले. संकटग्रस्त मराठा राजास साहाय्य करणे हा त्यांनी राजधर्म मानला आणि औरंगजेबाच्या संभाव्य क्रोधाची तमा न बाळगता त्यांनी महाराजांच्या प्रवासाची गुप्तपणे चोख व्यवस्था केली. राणीच्या या साहाय्यामुळेच मराठ्यांचा राजा आपल्या सहकार्यांनिशी तुंगभद्रेच्या तिरावरील शिमोग्यास सुखरूपपणे पोहोचला. राणीच्या या साहाय्याची वार्ता औरंगजेबास समजताच त्याने राणीस शिक्षा करण्यासाठी मोठी फौज रवाना केली; पण या फौजेचा समाचार मार्गातच संताजी घोरपड्यांनी घेऊन राणीचा बचाव केला.
राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी तुंगभद्रेच्या पात्रात असणार्या एका बेटावर मुक्काम करून होते. ऐन मध्यरात्रीच्या प्रहरी त्यांच्यावर मोगलांच्या एका मोठ्या लष्करी तुकडीने छापा टाकला. या तुकडीचे नेतृत्व करत होता विजापूरचा सुभेदार सय्यद अब्दुल्ला खान. स्वतः औरंगजेबाच्या हुकमाने ३ दिवस ३ रात्र अखंड घोडदौड करून अब्दुल्ला खानाने राजाराम महाराजांस गाठले होते. सर्व दिशांनी मोगलांचा वेढा पडताच मराठ्यांनी सावध होऊन आपल्या राजाच्या रक्षणार्थ जोराचा प्रतिकार चालू केला. मोठी धुमश्चक्री उडाली. या चकमकीत अनेक मराठे मारले गेले. कित्येक कैद झाले. खानाला कैद केलेल्यांमध्ये प्रत्यक्ष मराठ्यांचा राजा दिसला. त्याच्या आनंदास पारावार राहिला नाही. त्याने तातडीने बादशहाकडे हे वृत्त धाडले. बादशहाने राजास सुरक्षाव्यवस्थेने (बंदोबस्ताने) आणण्यासाठी विशेष सैन्य रवाना केले; पण लवकरच अब्दुल खानाच्या लक्षात आले की, आपण पकडलेला मराठ्यांचा राजा नकली आहे. सिद्दी जोहरच्या वेढ्यात शिवछत्रपतींचे असेच सोंग करून शिवा काशीद यांनी शत्रूस चकवले होते. हिंदवी स्वराज्याच्या होमकुंडात या वेळी अशाच प्रकारे आत्मबलिदान करून एका अनामिक मराठ्याने मराठ्यांच्या छत्रपतीस वाचवले होते. धन्य तो अनामिक मराठा बहाद्दूर वीर ! त्यांच्या बलिदानाने मराठ्यांचे स्वातंत्र्य-समर अधिक तेजस्वी झाले.
शिमोग्यापर्यंतचे अंतर राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी यांनी घोड्यांच्या पाठीवरून तोडले होते; पण आता मोगलांनी त्यांच्या सर्व संभाव्य मार्गांवर हेरांचे जाळे पसरल्याने घोड्यावरून प्रवास धोक्याचा ठरला. तेव्हा त्यांनी यात्रेकरू, तडीतापडी, कापडी, व्यापारी, भिक्षेकरी अशी नाना प्रकारची वेषांतरे करून आपला खडतर प्रवास चालूच ठेवला. ठिकठिकाणचे चौक्या-पहारे चुकवत त्यांनी शिमोग्याच्या आग्नेयेस १७० मैलांवर असणारे बंगळूर गाठले.
बंगळूरच्या मुक्कामी महाराजांवर आणखी एक संकट गुजरले. त्यांचे पाय एक सेवक धूत असता काही स्थानिक लोकांच्या लक्षात आले की, हा कोणी मातब्बर माणूस दिसतो. त्यांनी ही वार्ता लगेच मोगली ठाणेदारास सांगितली. त्या कालावधीत मराठी मंडळीही सावध झाली. त्यांना कोसळणार्या संकटाची चाहूल लागली. तेव्हा खंडो बल्लाळाने पुढाकार घेऊन महाराजांस विनंती केली की, त्यांनी आपल्या सहकार्यांनिशी भिन्न भिन्न मार्गांनी पुढे निघून जावे, मागे आम्ही २-४ आसामांrनिशी आल्या प्रसंगाला तोंड देऊ आणि त्यातून निसटून मार्गात ठराविक ठिकाणी येऊन मिळू. खंडो बल्लाळच्या या सल्ल्याप्रमाणे महाराज निघाले. इकडे ठाणेदाराची धाड पडली आणि त्याने खंडो बल्लाळ यांना कैद करून ठाण्यात नेले. ठाण्यात खंडो बल्लाळ आणि त्यांचे सोबती यांच्यावर अनन्वित अत्याचार केले गेले. त्यांना चाबकाने फोडून काढले. डोक्यावर दगड दिले. तोंडात राखेचे तोबरे दिले; पण ‘आम्ही यात्रेकरू’ याव्यतिरिक्त अधिक माहिती त्यांच्या तोंडून बाहेर पडली नाही. तेव्हा ‘हे खरेच यात्रेकरू आहेत. महाराजांचे असते, तर इतक्या मारापुढे बोलते झाले असते ’, असा विचार करून ठाणेदाराने त्यांना सोडून दिले. सुटका होताच ते राजाराम महाराजांना विवक्षित ठिकाणी येऊन मिळाले. खंडो बल्लाळ छत्रपती आणि हिंदवी स्वराज्य यांसाठी मोठा देहदंड सोसला. स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यनिष्ठा यांचे हे एक प्रकरण दिव्यच होते. या दिव्याच्या कसोटीस ते उतरले.
राजाराम महाराजांचा प्रवास पुढे चालूच राहिला. बंगळूरपासून पूर्वेस ६५ मैलांवर असणार्या अंबूर या ठिकाणी ते पोहोचले. अंबूर हे ठाणे मराठ्यांच्या ताब्यात होते आणि तेथे बाजी काकडे हे मराठा सरदार छावणी करून होते. त्यांना महाराज आल्याची वार्ता समजताच ते त्वरेने दर्शनास आले. आणि त्यांनी महाराजांचा यथोचित सत्कार करून त्यांचा गुप्तवास संपवला. आता महाराज उघडपणे आपल्या सैन्यासह अंबूरहून वेलोरकडे निघाले. वेलोरचा कोटही मराठ्यांच्या ताब्यात होता. २८.१०.१६८९ या दिवशी महाराज वेलोरास पोहोचले. पन्हाळगड ते वेलोर हे अंतर कापण्यास त्यांना ३३ दिवस लागले होते. वेलोर मुक्कामी कर्नाटकातील आणखी काही सरदार आपल्या सैन्यासह त्यांना येऊन मिळाले. वास्तविक अंबूरहून थेट दक्षिणेस असणार्या जिंजीकडे त्यांनी जावयास हवे होते; पण जिंजीकडे जाण्यात त्यांच्यासमोर एक अडचण उपस्थित झाली होती. जिंजीला शिवरायांचे जावई हरजीराजे महाडीक होते पण ते त्याच सुमारास वारले होते, अशातच राजाराम महाराज तिथे पोचल्यामूळे गोंधळ उडाला, घरच्याच लोकांचा विरोध झाला परंतु विरोधाला मात देऊन राजांनी जिंजी हस्तगत केली.
स्वतः शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याला अभेद्य करून ठेवले होते. पुढे महाराष्ट्रात मराठी राजाला संकटकाल प्राप्त झाला, तर येथे त्यास आश्रय घेता यावा, अशी त्यांची दूरदृष्टी होती. शिवछत्रपतींनी औरंगजेबाचा धोका जाणला होता. भाकीत केले होते. त्याचप्रमाणे घडले. औरंगजेब दक्षिणेस चालून आला. मराठी राजा संकटात पडला. तेव्हा जिंजी किल्ला साहाय्यास आला.
मराठा मंडळींनी कर्नाटकात आणि जिंजीत राजाराम महाराजांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केल्याने मद्रास किनारपट्टीवरील राजकारणाचे रंग पालटू लागले. नव्या मराठा राजाने जिंजीत आपली नवी राजधानी उभी केली. दरबार सज्ज झाला. मराठ्यांच्या राज्याचे नवे पर्व आरंभ झाले.
छत्रपती राजाराम महाराजांच्या पराक्रमाविषयी इतिहासकरांनी खूप कमी लिखाण केले आहे.
जर पुढील पोस्ट मध्ये आपल्याला छत्रपती राजाराम महारजांच्या पुढील पराक्रमी प्रवासाची माहिती हवी असेल तर कृपया कमेन्ट करून कळवावे.
संदर्भ :- शिवपुत्र छत्रपती राजाराम (डॉ. जयसिंगराव पवार)
व्याख्यान पराक्रमी मराठे (दुर्गमहर्षी प्रमोद मांडे)

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...