विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label चिमणाजीआप्पा. Show all posts
Showing posts with label चिमणाजीआप्पा. Show all posts

Wednesday, 8 March 2023

ठाणे-साष्टी मुक्तीचा इतिहास

 




ठाणे-साष्टी मुक्तीचा इतिहास
लेखक : -पांडुरंग बलकवडे
२७ मार्च हा दिवस ठाणे शहराच्या दृष्टीने अतिशय पवित्र असतो. कारण २७९ पूर्वी म्हणजेच २७ मार्च १७३७ रोजी सव्वादोनशे वर्षांच्या पोर्तुगीजांच्या अन्यायकारी गुलामीतून ठाण्याची मुक्तता झाली होती. त्या संघर्षाचा इतिहास अतिशय प्रेरणादायी आहे. इसवी सन १५००च्या सुमारास व्यापाराचे निमित्त करून आलेल्या पोर्तुगीजांनी हळूहळू सत्ता प्राप्त करून प्रजेला गुलाम केले. संपत्ती आणि धर्मांतरासाठी अतोनात अत्याचार केले. छत्रपती शिवराय आणि त्यांच्यानंतर संभाजीराजांनी त्यांच्या दुष्कृत्यांना पायबंद घालण्याचा यशस्वी प्रयत्न केला. संभाजी राजांच्या पश्चात औरंगजेबाच्या आक्रमणाचा फायदा उठवून पोर्तुगीजांनी पुन्हा थैमान घातले होते. त्यांच्या अत्याचाराला कंटाळलेली प्रजा शाहू छत्रपती आणि पेशव्यांकडे सतत गार्हाणी घालत होती. बाजीराव पेशव्यांनी आपले धाकटे बंधू चिमाजी आप्पा यांच्यावर पोर्तुगीजांच्या ताब्यातील ठाणे-वसई भागाला मुक्त करण्याची जबाबदारी सोपविली. गुढी पाडव्याचा सण साजरा करून मराठी फौज मोहिमेवर निघाली. चिमाजी आप्पांनी मराठी सैन्याचे दोन भाग केले होते. शंकररावजी केशव फडक्यांच्या नेतृत्वाखाली एक सैन्यदल वसई जिंकावयास तर सुभेदार बलकवडे आणि सुभेदार खंडोजी माणकर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे-साष्टी जिंकावयास दुसरे सैन्य निघाले होते. पोर्तुगीजांच्या अत्याचाराला कंटाळलेला ठाणे-वसई परिसरातील सर्व समाज मराठ्यांच्या फौजेला सर्व प्रकारचे सहकार्य करावयास सिद्ध झाला होता. त्यांचे नेतृत्व मालाडचे अंताजी कावळे तसेच अणजूर गावचे गंगाजी, मुर्हारजी, बुबाजी, शिवाजी, नारायण नाईक, अंजूरकर बंधू करीत होते. पोर्तुगीजांचा ठाणे प्रांताचा सुभेदार होता लुई बहेलो. याच्याच मार्गदर्शनाखाली इंजिनीअर अँद्रो रिबेरो कुतिन्हु याने इ. स. १७३४ च्या सारास ठाणे शहराला भक्कम तटबंदीने बंदिस्त केले होते व त्यात सुसज्ज बालेकिल्ल्याची उभारणी केली होती. यामुळे मराठी सैन्यासमोर मोठे आव्हान होते. २६ मार्च १७३७ च्या रात्री खाडीच्या बाजूकडील पाणबुरूज आणि तटबंदीवर शिड्या लावून अचानक हल्ला केला. स्थानिक रहिवासी लक्ष्मण राऊत, हंसा कोळी, बुबाजी नाईक अणजुरकर यांच्या सहाय्याने खाडीच्या बाजूने किल्ल्यात प्रवेश मिळविला. होनाजी बलकवड्यांनी आपल्या सैन्यासह ठाण्याच्या जमिनीकडील बाजूने हल्ला केला. त्यांच्या बरोबर इतर अणजूरकरबंधू रामाजी महादेव, रामचंद्र हरी होते. तुकनाक, धोंडनाक, गणनाक, फकीर महंद ही स्थानिक मंडळी मोलाची मदत करीत होती. मराठ्यांच्या या अचानक झालेल्या हल्ल्याने माघार घेऊन लुई बहेलो याने सर्व फौजेसह कुटूंबकबिल्यासह पलायन केले. रणवाद्ये वाजवीत मराठ्यांनी ठाण्यात प्रवेश केला. अशा पद्धतीने आपल्या पराक्रमाची शर्थ करून सव्वा दोनशे वर्षांच्या पारतंत्र्यातून महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी ठाणे-साष्टीवर शिवरायांचा भगवा फडकला. या कामगिरीबद्दल चिमाजी आप्पा पेशव्यांनी सर्व पराक्रमी योद्ध्यांचा यथोचित सन्मान केला. कोणाला सोन्याची कडी, कोणाला सोन्याच्या मोहरा, तर विशेष कामगिरी करणार्यांना वतने जमिनी इनाम दिल्या. अशा पद्धतीने मराठ्यांनी एका पाश्चात्त्य आधुनिक पोर्तुगीज सत्तेच्या जोखडातून ठाणे-साष्टी मुक्त करून देदीप्यमान इतिहास घडविला. त्याचे स्मरणे करणे यथोचित आहे.
(लेखक इतिहास संशोधक आहेत.)

चिमणाजीआप्पा, (धाकटे) — भाग २

 


चिमणाजीआप्पा, (धाकटे) —
भाग

इकडे नाना फडणीस शिंद्यांच्या भयानें (ज्यावेळीं शिंदे पुण्यास आले तेव्हांच) सातार्‍याकडे निघून गेले होते. तेथून ते मेणवलीस गेल्यानंतर चिमाजीआप्पाचें दत्तविधान झालें (मे २६) व सातारकर महाराजांकडून त्यांनां पेशवाईची वस्त्रेंहि मिळालीं (२ जून); परंतु नानानीं निजाम, इंग्रज, होळकर, भोसले वगैरे मंडळींशीं राजकारण करून चिमाजीआप्पाचें उच्चाटन घडवून आणलें. त्यांनीं आपल्या मुत्सद्देगिरीनें खुद्द दौलतराव शिंद्यांसहि फोडले व त्याच्या तर्फे रावबाजीशीं सूत्र लावून त्यास गादीवर बसविण्याचें (बाजीराव रघुनाथ म्हणून) ठरविलें. या वेळीं रावबाजी जांबगावीं होते. या वर्षी दसर्‍याचा समारंभ फार थाटाचा झाला. चिमाजीआप्पाची स्वारी मोठ्या समारंभानें निघाली होती. पण हें आपलें वैभव १५-२० दिवसांतच नष्ट होणार हे श्रीमंतांच्या ध्यानांतहि आलें नाहीं. शेवटीं २६ ऑक्टोबरच्या रात्रीं या (चिमाजीस गादीवर बसविण्याच्या) सर्व कारस्थानाचा उत्पादक बाळोबातात्या पागनीस व त्याचे साथीदार यांनां दौलतरावांने कैद केलें. पहाटे होळकर व निजामाची फौज शनिवारवाड्यावर चालून आली. तत्पूर्वी रात्रींच एक चूकी झाल्यानें भाऊ व चिमाजीआप्पा निसटले. परशुरामभाऊस पकडण्याची चिठ्ठी परशुरामवैद्य यास जावयाची असतां, चुकून जासुदानें ती भाऊजवळच नेऊन दिली. तेव्हां भाऊ तात्काळ हजार पांचशें स्वार घेऊन व चिमाजीआप्पास आपल्या घोड्यावर घेऊन जुन्नरकडे पळालें. परंतु हजुरातीनें त्यांनां तेथें पकडून भाऊस मांडवगणच्या किल्ल्यांत व चिमाजीआप्पास शिवनेरीस कैदेंत ठेविलें. नंतर ठरल्याप्रमाणें नाना पुण्यास आले व रावबाजी गादीवर बसले (४ दिसेंबर). हें सर्व कारस्थान नानांचेच होतें. पुढें चिमाजी आप्पास शिवनेरीहून पुण्यास आणलें व ते शनीवारवाड्यांतच राहू लागले. तेव्हा रावबाजीनें पुण्यांतील पंडितांनां विचारून त्यांनी सांगितल्यावरून (अशास्त्रीय दत्तविधान झाल्यामुळें) चिमाजीआप्पास सक्षौर प्रायश्चित देवविलें (१७९७ नोव्हेंबर). शिंद्याच्या गृहकलहानें पुण्यास भानगडी चालू झाल्या, त्या सुमारास रावबाजीनें चिमाजीचें लग्न केले (८ जून १७९८). मुलगी आप्पाजीपंत दामले यांची नात होती; तिचें नांव सीताबाई होतें. दुसरी बायको सत्यभामाबाई नांवाची, मंगळवेढेकर मेहेंदळ्यांचीं मुलगी होती; हिचें लग्न १८१२ सालीं झालें. आप्पांचा राज्यकारभारांत फारसा प्रवेश झाल्याचें आढळून येत नाहीं. फक्त स. १७९७ च्या सुमारास गुजराथचा सुभा पेशव्यांनीं यांच्या नांवचा करून दिला होता व यांची मुतालिकी आवा शेलुकरास सांगितली होती. एवढाच उल्लेख आढळतो. पेशवाई नष्ट झाल्यानंतर यांनां इंग्रजानें पेन्शन देऊन काशीस ठेविलें व ते तेथें ९ जून १८३० रोजीं वारलें. यांची पुढील हकीकत आढळत नाहीं. [खरे-खंड, ७, ९, १०; डफ-पु.३; राजवाडे-खंड,४].

चिमणाजीआप्पा, (धाकटे) — भाग १


चिमणाजीआप्पा, (धाकटे) —
भाग १
हे राघोबादादाचे व आनंदीबाईचे धाकटे औरस पुत्र. यांचा जन्म ता. ३० मार्च १७८४ रोजीं कोपरगांवीं झाला. राघोबादादा वारले तेव्हां चिमणाजीआप्पा यांच्या वेळीं आनंदीबाई चार महिन्यांची गरोदर होती. धाकटे बाजीराव व चिमाजीआप्पा दादासाहेबाच्या पश्चात् बरेच दिवस आनंदवल्लीस राहिले होतें. आप्पांची मुंज ८ मार्च १७८९ रोजीं झाली. खर्ड्याच्या स्वारीच्या वेळेस रावबाजी कांहीं खूळ उत्पन्न करतील म्हणून या दोघा भावांनां आनंदवल्लीहून काढून शिवनेरीस नजरकैदेंत ठेविलें होतें. सवाईमाधवराव वारल्यानंतर मुत्सद्यांच्या व मराठामंडळाच्या आग्रहावरून एखादा गोत्रज यशोदाबाईच्या मांडीवर दत्तक बसवावा असें नानांनीं ठरविलें, परंतु पुण्यांतील लोकांनां तें पसंत पडलें नाहीं. त्यांचें म्हणणें रावबाजी व धाकटा चिमणाजी जिवंत असतां परक्याला दत्तक कां घ्यावें? इकडे रावबाजीनींहि दौलतराव शिंद्यांस सव्वाकोट रु. देण्याचें अमीष दाखवून आपल्यास गादीवर बसविण्यासाठीं त्याची अनुमति मिळविली. तेव्हां नानांनीं पटवर्धन, रास्ते, वगैरे सरदारांच्या सल्ल्यानें चिमणाजीस दत्तक घेण्याचें ठरवून परशुरामभाऊस चिमराजीस आणण्यासाठीं जुन्नरास पाठविलें. चिमणाजी हा यशोदाबाईचा चुलत सासरा होता व धर्मशास्त्राप्रमाणें सुनेस सासरा दत्तक घेतां येत नसे. यात तोड अशी काढिली की, चिमणाजीनें फक्त सरकारकागदोपत्रीं चिमराजी माधवराव म्हणावें व खासगी व धार्मिक व्यवहारांत चिमणाजी रघुनाथ म्हणावें. पुण्याच्या लोकांच्याहि मनांत चिमणाजीसच दत्तक घ्यावें असें होतें. परंतु रावबाजीनें दौलतरावाच्या हिमायतीवर नानांचा हा बेतच मुळांत खोडून टाकला. आपणच बाजीराव रघुनाथ म्हणून पेशवे व्हावयाचें; आपण किंवा चिमाजी दत्तक जावयाचें नाहीं. असें त्यानीं ठरविलें व त्यास परशुरामभाऊहि अनुकूल झाले व नानांनींहि काळवेळ जाणून त्यास रुकार दिला. त्याप्रमाणें भाऊ या मंडळींस घेऊन पुण्यास आले (मार्च १७९६). यावेळीं चिमणाजीआप्पा घोडी भरधांव सोडून भाले फेकण्यांत तरबेज झाला होता. हा रंगानें फार गोरा, चपल व क्रोधिष्ट असे. रावबाजीनें पुण्यास आल्यावर दौलतराव शिंद्यास सव्वाकोट रु. देण्याचें लांबणीवर टाकलें व पुढें पुढें तर ते निव्वळ दौलतरावाच्या सल्ल्यानेंहि चालेनात. तेव्हां शिंद्यानें व परशुरामभाऊनें मसलत करून पेशवाईंचीं वस्त्रें घेण्याच्या निमित्तानें रावबाजींनां पुण्याच्या बाहेर काढून थेऊर येथें त्यांनां प्रथम कच्या प्रतिबंधांत ठेविलें (८ एप्रिल). पुढें देण्याघेण्याचे खटके मोडण्यासाठीं रावबाजी हे शिंद्याच्या गोटांत ता. ९ मे रोजीं रात्रीं गेले असतां शिंद्यानें त्यांनां कायमची नजरकैद केली व त्याच रात्रीं भाऊनें चिमाजीस बळजबरीनें (तो येत नसतांहि त्यास जबरदस्तीनें) पालखीत घालून पुण्याचा रस्ता पकडला; त्यानंतर मुहूर्त पाहून १२ मे रोजी शनिवारवाड्यांत प्रवेश केला (तोपर्यंत रास्त्यांच्या वाड्यांत राहिले होते)

चिमणाजीआप्पा — भाग ३

 


चिमणाजीआप्पा —
भाग ३

बाजीरावाचें व आप्पाचें शेवटी शेवटीं बिनसलें असावें. ''श्रीमंत (मस्तानीमुळें) विषयलंपट झाले, यामुळें आप्पाशीं अंतर पडून नर्मदातीरीं गेले.'' आप्पानीं १७४० च्या जानेवारींत फिरंग्याचें रेवदंडा नांवाचें (गोवें व दमण या मधील) राहिलेलें एकच ठाणें काबीज केलें. येथून परत आल्यावर आप्पांची प्रकृति वाख्यानें ढासळली. आप्पांची पहिली बायको रखमाबाई, ही त्रिंबकरावमामा पेठेची बहीण होती. हिचाच पुत्र सदाशिवराव भाऊ. भाऊचा जन्म झाल्यानंतर २८ दिवसांनींच ही वारली (३१-८-१७३०) त्यानंतर आप्पानीं अन्नपूर्णाबाई नांवाची दुसरी स्त्री केली (डिसें. १७३१). हिला बयाबाई नांवाची एक मुलगी झाली (नोव्हें. १७४०). आप्पांची प्रकृति एकदां बिघडली ती न सुधारतां अखेर पुणें येथें त्यांचें देहावसान झालें (डिसें. १७४०) त्यावेळीं अन्नपूर्णाबाई ही सती गेली. या और्ध्वदेहिकास ११७५ रु. खर्च झाला. बयाबाई ही गंगाधर नाईक यास दिली (१४ एप्रिल १७४५); ती पुढें १७५९ त वारली. आप्पा हे थोरल्या बाजीरावापेक्षां कांहीं बाबतींत श्रेष्ठ होतें. त्यानीं बाजीरावास त्याच्या दोषांवर पांघरूण घालून शेवटपर्यंत पाठपुरावा केला. बाजीरावास पेशवाई मिळाली तेव्हांच आप्पांस त्यांची मुतालिकी मिळाली होती. आप्पा विचारी, धोरणी, मनमिळाऊ, शूर व नीतिमान होते. वसईच्या किल्ल्यांत सांपडलेल्या फिरंगी सरदाराच्या सुस्वरूप मुलीस त्यांनी सन्मानानें परत पाठविलें ही गोष्ट प्रख्यातच आहे. शाहू व इतर सरदार मंडळी बाजीरावाकडील काम आप्पांच्या मध्यस्तींनें उरकून घेत. बाजीरावाचीं मुलें बहुधा आप्पाजवळच असत. त्यांनां शिक्षणहि आप्पांनींच दिलें होतें. कौटुंबिक व्यवस्थाहि तेच पहात असत. बाजीरावानें उत्पन्न केलेल्या अनेक प्रकरणांचा निकाल आप्पाच लावीत. नानासाहेबांच्या अंगी जो अष्टपैलु मुत्सद्दीपणा आला होता त्यांचे श्रेय आप्पांसच होतें. आप्पानां गुजराथी लोक चिमणराजा म्हणत असत. डफ म्हणतो कीं पोर्तुगीजांवर मिळविलेल्या अनेक विजयांमुळें आप्पांची कीर्ति महाराष्ट्रांत अजरामर झाली. पाश्चात्य राष्ट्रांशीं लढण्याचे वारंवार प्रसंग आल्यानें त्यांचें असें ठाम मत झालें होतें की तोफखाना व कवायती पायदळाशिवाय पाश्चात्यांबरोबर टिकाऊ जय मिळणें नाहीं. [डप. पु.१, २; मराठी रिसायत, मध्यविभाग; नानासाहेब रोजनिशी; पत्रें यादी वगैरें; ब्रह्मेंद्र स्वामीचरित्र: राजवाडे खं. २, ३; शाहू म. ची बखर; पंतप्रधान शकावली, पृ.७].

चिमणाजीआप्पा — भाग २

 


चिमणाजीआप्पा —
भाग २
फिरंग्यांच्या धार्मिक जुलुमानें कंटाळलेली अंताजी रघुनाथ व अणजूरकर नाईक वगैरे प्रांतस्थ प्रमुख मंडळी मराठ्यांस अनुकूल झाली होती. फिरंग्यांचें आरमार व सैन्य सुसज्जित असतांहि मराठ्यांनीं चिकाटीनें व शौयानें वसईसह त्यांचा वरील सर्व प्रदेश काबीज केला. पुढें (१७३८) फिरंग्यांनीं त्या प्रांतीं असलेल्या शंकराजी केशव, रामचंद्र हरि वगैरे सरदारांवर जय्यत तयारीनिशी मोहिम केली. परंतु या सुमारास मराठे भोपाळच्या मोहिमेंत गुंतल्यानें वसईभागांत त्यांनां फारशी हालचाल करतां आली नाहीं. त्यानंतर १७३८ च्या नोव्हेंबरांत आप्पा वसईच्या स्वारीवर निघाले. सहा महिने या स्वारीचा हंगाम चालू होता. दमण ते दीवपर्यंतचा सर्व किनारा त्यांनीं हस्तगत केला. या भागांत सर्वत्र चकमकी सुरू होत्या व आप्पा या सर्व किनार्यावर एकसारखे लढत होते. त्यांनीं प्रथम माहीम सर केले (डिसेंबर). येथें शंभर गलबतें भरून इंग्रज व हबशी यांची मदत फिरंग्यास झाली असतांहि मराठ्यांनीं माहीम काबीज केलें. नंतर केळवें, शिरगांव, डहाणू, अशेरी वगैरे ठाणीं घेतलीं. (जानेवारी १८३९). या सर्वांत तारापूरचें ठाणें मजबूत असल्यानें तेथें शिताफीचा रणसंग्राम झाला. पण अखेर तारापुरचा किल्ला मराठ्यांनीं घेतला. मात्र येथें बाजी भिवराव हा नामांकित सरदार ठार झाला (जाने.). नंतर आप्पानीं वसईवर हल्ला केला. हा वेढा तीन महिने चालू होता. मराठ्यांनी अत्यंत चिकाटीनें युद्ध चालवून हा किल्ला अखेर १३ मे रोजीं फिरंग्यांपासून काबीज केला (वसई पहा). दुसरीकडे वांदरा, वेसावे, धारावी वगैरे ठाणीं आप्पांच्या सरदारांनीं काबीज केलींच होतीं (फेब्रु). वसईच्या मोहिमेचीं खास अप्पानीं ब्रम्हेंद्रस्वामीस लिहिलेलीं पत्रें वाचण्यालायक आहेत. (राजवाडे खं. ३ ले. २७; काव्येतिहास सं. पत्रें यादी ले. ४३९). सारांश या मोहिमेंत फिरंग्यांचा सुमारें पाऊणशें मैल लांबीचा (३४० गावें असलेला) प्रदेश आप्पानीं काबीज केला. त्याशिवाय ८ शहरें, २० किल्ले, २५ लाख किंमतीचा दारूगोळा व जहाजें, तोफा इतकें सामान आप्पानीं हस्तगत केलें. यावेळीं आप्पानें अगर पेशव्यानें वसईस मराठी आरमाराचा एक सुभा स्थापून इंग्रजास पायबंद घालावयास पाहिजे होता, परंतु हें त्या दोघांच्याहि लक्ष्यांत आलें नाहीं. पुढें पेशव्यांचें निजामाशीं युद्ध झालें त्यांत आप्पाहि सामील होतें (१७४०). त्यावेळी मुंगीपैठणचा तह होऊन आप्पा परतले. इतक्यांत आंग्र्यांच्या घरांत कलह माजला व मानाजीनें मदतीस बोलाविल्यावरून आप्पा कोंकणांत गेले व त्यांनीं तेथें संभाजी आंग्र्यांचा पराभव करून त्याला सुवर्णदुर्गास परतविलें (१७४०). इतक्यांत थोरले बाजीराव वारल्यानें आप्पा बरोबर नानासाहेबांस घेऊन, पुण्यास व तेथून सातार्यास गेले व त्यांनीं नानासाहेबास पेशवाईचीं वस्त्रें मिळवून दिलीं. (आगष्ट १७४०).

चिमणाजीआप्पा — भाग १

 


चिमणाजीआप्पा —
भाग १
हा बाळाची विश्वनाथ पेशवे यांचा दुसरा पुत्र. याच्या जन्माचे १६९० (राजवाडे), १६९७ (अ. कोशकार) व १७०८ (सरदेसाई) असे निरनिराळे सन आढळतात. दमाजी थोराताच्या कैदेंत बापाबरोबर चिमणाजी कांहीं दिवस होता (१७१३). पेशवाई मिळाल्यानंतर थोरल्या बाजीरावानें मोगलांच्या विरुद्ध जें चढाईचें धोरण स्वीकारलें, त्यांत माळवा प्रांतीं मुलुखगिरी करण्याच्या कामावर पेशव्यांनीं चिमणाजी आप्पास नेमिलें. तेव्हांपासून आप्पा स्वार्यांमोहिमांवर जातीनिशी जाऊं लागले. सारंगपूर येथें राजा गिरधर, माळव्याचा सुभेदार याच्यावर स्वारी करून आप्पानीं त्यास ठार मारिलें (१७२४). तसेंच आप्पांनीं त्याच्या नंतरच्या माळव्याचा सुभा दयाबहादुर याच्यावरहि १७३०/३१ त दोन स्वार्या करून त्याला तिरलच्या लढाईंत ठार केलें व माळवा हस्तगत केला (आक्टो. १७३१). परंतु शाहूच्या आज्त्रेनें आप्पा माळव्यांतून निघून शिद्दीवर कोंकणांत गेले. सरबुलंदखानापासून त्यांनीं १७३० त गुजराथेंत चौथाईचा अंमल बसविला. त्रिंबकरावदाभाडे यांच्या पारिपत्याच्या प्रकर्णी बाजीराव व आप्पा यांचें ऐकमत्य होतें (१७३१), पुढें (१७३३) शिद्दीवरील स्वारींत प्रतिनिधीच्या मदतीस आप्पा यास जाण्याबद्दल शाहूनें आज्त्रा केली; परंतु शिद्दीच्या तर्फे निजामानें कारस्थान चालविल्यामुळें, निजामावर दाब ठेवण्यासाठीं आप्पा शिद्दीवर गेल्यानें व सेखोजी आंग्रे मरण पावल्यानें आप्पा हे शिद्दीच्या विरुद्ध आक्टोबरांत कोंकणांत चढाई करून गेले (१७३३). मराठ्यांचें निजामाशीं युद्ध चालूं असतां तापी नदीच्या आसपास निजामाला पायबंद म्हणून आप्पा फौजबंद होऊन राहिले होते (१७३८). यापुढें वसईच्या मोठ्या मोहिमेंत आप्पा प्रमुख होते. ही मोहीम दोन वर्षे चालू होती. प्रथम ठाणें व साष्टी काबीज केली (१७३७ जून). यावेळीं आप्पानीं बेलापूर, मांडवी, टकमक, कामणदुर्ग, मनोर वगैरे पुष्कळ ठाणीं फिरंग्यांपासून घेतलीं.

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...