विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label किल्ले फोंडा इतिहास. Show all posts
Showing posts with label किल्ले फोंडा इतिहास. Show all posts

Saturday, 6 February 2021

किल्ले फोंडा भाग पहिला

 





किल्ले फोंडा
भाग पहिला
छत्रपती शंभूराजे...!!
सरनोबत येसाजी कंक....!!
कृष्णाजी येसाजी कंक..…!!
पाऊसाची संथधार चालूच होती छत्रपती शंभूराजे पन्हाळ गडी येऊन आठवडा लोटला होता.मालोजीबाबा घोरपडे सरलष्कर हंबीररावमामा यांना सोब घेत राजे सहज म्हणून गडावर फेरफटका मारून आले.पणजीच्या फिरंग्यांची आणि फोंडयाची खबर रात्री नजरबाज सांगून गेल्यापासून राजे थोडे अस्वस्थ होते.फिरंग्यांची खोड मोडण्यासाठी आपण जातीनं उतरू पण फोंड्याच्या धर्माजी नागनाथ यांच्या जोडीला कोणीतरी मारत्या समशेरीचा अनुभवी गडी असावा या विचारात छत्रपती सदरेस आले.
सदरेस सर्व आसामी मानकरी जमले होते.त्या गर्दीत येसाजी कंक पण आपल्या लेकासह हजर होते.
राजे येताच सदर लपकन कंबरेत झुकली.बयटक घेत छत्रपतींनी प्रथम हंबीरमामांना नजर दिली.नजरेचा
इशारा पकडत मामांनी रायगड,राजापूर,चेऊल,रेवनदंडा
पणजी,नाशिक या सर्व ठिकाणच्या खबरा पेश केल्या.
मामा सांगत होते पण छत्रपतींच मन हे फोंडा किल्ल्यावर आणि नजर येसाजींवर स्थिरावली होती.राजे येसाजींना
बघताच मनी खुश झाले.सर्व तर्फानच्या सुभेदार किल्लेदार,अधिकाऱ्यांना जरुरी त्यासुचना केल्या सदर उठली.राजांनी येसाजींना थांबवून घेतले.
पणजीची घुसखोर चाल पारखूनच फोंडातर्फचे सुभेदार धर्माजी नागनाथ यांनाही पन्हाळी पाचारण केले.येसाजीं
बरोबर त्यांचा ऐन बांडा मुलगा कृष्णाजी पण होता.
कृष्णाजी मल्लखांबासारखा घोटीव आणि ताठ अंगकाठीचा सावळा गडी होता.बापाबरोबर राहून त्याचीही हत्यारावरीची पकड मजबूत झाली होती.अगदी शेलकीतला पट्टेकरी होता.त्याला बघताच राजे खुश झाले.येसाजींकडे नजर फेकत राजे म्हणाले." कंककाका
फिरंगी आज ना उद्या फोंडयाच्या कोटाकडे मुसंडी मारणार.तुम्ही,धर्माजी आता फोंडाफळी नेटाक ठेवावी.
येसाजी उतरले " बरी कामदारी सोपवलिसा धनी.
आम्हावर हाय न्हवं फोंडा,काळजी करू नगा त्येची.ह्या
पोराला तेवढ्यासाठनंच आणलाय संगट."उतार झाले तरी
खड्या बोलीचे येसाजी मिशीवर पालती मुट फिरवत म्हणाले.येसाजींस रसद,कुमक,फिरंग्यांच्या लढाईचे तंत्र यांची तापशीलवार माहिती राजांनी दिली.
दुसऱ्या दिवशी येसाजी,कृष्णाजी,धर्माजी यांनी पन्हाळगड सोडला.आपल्या मावळी तुकडीतील शेलका दोन-तीनशे मावळा येसाजींबरोबर फोंडयाची वाट चालू लागला.राजेही गड उतार झाले.राजे आता राजापुरच्या दिशेने ढोडत होते.राजापुरला दहा-पंधरा हजाराचा तळ पडला होता.राजे येताच छावणी ताजीतवानी झाली. कोकण प्रांताचा आढावा घेताच राजांनी फ्रेंचांना कडक शब्दात पत्र पाठवून हेजीब पाठवला.पोर्तुगीजांना धान्य आणि दारुगोळ्याची मदत करू नये अशी सक्त ताकीद होती राजांची.फ्रेंचांनी ती तात्काळ मान्य केली.(९-११-८३)
पोर्तुगीज विजरई कोंदि द आल्व्होर यानी स्वराज्याची कुरापत कडण्याचं प्रमुख कारण म्हणजे औरंगजेब.
औरंगजेब जेव्हा दक्षिणेत उतरला त्याघडी पासून छत्रपती शंभूराजांच्या विरुद्ध इतर सत्ताधीशां चेतावण्याचे काम
औरंगजेबाने सुरू केले.त्यातील एक मोहरा म्हणजे हा बांडगुळ पोर्तुगीज विजरई.औरंगजेबानं आपला वकील शेख महंमद याला खास विजरईच्या भेटीसाठी गोव्याला
धाडलं.वकीलाच गोव्यात जंगी स्वागत करण्यात आलं.
वकीलानं बादशाहाचा निरोप विजरईच्या कानावर घातला.
ठळक घडामोडी :-
१) प्रथम औरंगजेबाचे दि २०-६-८२ रोजी विजरईला पत्र
२)शेख मोहंमद हा वकील दि २०-१-८३ रोजी गोव्यात
आला.
३) विविध प्रकाच्या वाटाघाटी झाल्या.रसद,दारुगोळा,
अन्नधान्य इत्यादी गोष्टी.
४) पोर्तुगीज समुद्र हद्दीतून मोगली जहाजांना ये-जा
करण्यास मोकळीक.
५)मराठयांचे वकील येसाजी गंभीरराव यांनी १०-२-८३
रोजी विजरई याची भेट घेऊन हरकत घेतली.
६)विजरई चे म्हणणे की मराठयांनी पकडलेली गलबते
मचवे सोडावेत.जाळलेली गावे याची नुकसानभरपाई
द्यावीत.पण छत्रपती ही गोष्ट मान्यच करणार नाहीत हे
विजरईला चांगले ठाऊक होते.
७) म्हणून विजरई मोगलांना मदत करण्यास सुरुवात
केली.विशेष म्हणजे विजरईनं मोगली जहाजांना
स्वतःच्या लढाऊ जहाजांचे स्वरक्षण दिले.
८) कोकण प्रांतातून मराठयांना बरेच मोठ्या प्रमाणात
उत्पन्न मिळत असल्यानं विजरईचा त्यावर डोळा.
विजरईनं औरंगजेबास फेर पत्र पाठवले.पत्रात विजरई लिहितो " माझा ओढा तुमच्याकडे असल्यामुळे मी संभाजीनं केलेल्या विनंती अमान्य केली.या सहाय्याबद्दल
आपल्याला मी विनंती करतो की,मी केलेल्या मदतीबद्दल जो कोकणचा प्रदेश तुम्ही जिंकून घ्याल तो आम्हाला बहाल करावा." या पत्रतून विजरईचा हेतू अगदी स्पष्ट दिसतो.विजरईला मुघल मराठे संघर्षतून स्वतःचा फायदा करून घ्यायचा होता.मुघल मराठे युद्धात मराठे संपतील असं विजरईचा होरा होता.मुघल कोकण प्रांत काबीज करतील आणि आपण मुघलांना मदत करून कोकण मुघलांकडून आपल्या पदरात पाडून घेऊन हा हिशोब होता विजरईचा.हे सगळं ध्यानी ठेऊन विजरई
पाऊलं उचलीत होता.त्यात विजरईनं मराठयांचा वकील येसाजी गंभीररावांना अटक केली.आणि याच धोरणानुसार विजरई किल्ले फोंडयावर चाल करून निघाला होता.औरंगजेबाच्या नादी लागून विजरईला भलतीच स्वप्न पडू लागली होती.आपण मराठयांवर
चाल करून जातोय खरं.पण याचे काय परिणाम होतील
याचा त्याला विसर पडला.
व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या पाश्चात्यांत प्रथम आले ते हे पोर्तुगीज.इंग्रज,फ्रेंच,डच या व्यापाऱ्यांच्या पूर्वी त्यांनी भारतात सत्ता स्थापन केली.
आणि १५१० मध्ये पादाक्रांत केलेल्या गोव्यातून या बांडगुळ पोर्तुगीजांना १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे १४ वर्षांनी हाकलून देण्यात आले.
खर म्हणजे थोरल्या छत्रपतींन कडून यांची फार पूर्वीच हकालपट्टी झाली असती.पण देव बलवत्तर म्हणून हे वाचले.
या गोव्यातील पोर्तुगीजांनची थोरल्या छत्रपती स्वामींनी
( इ.१६६८ च्या ऑक्टोबर) मध्येच जिरवली असती.
छत्रपतींनी यांच कायमच उच्चाटन करण्याची योजना आखली होती.निरनिराळ्या निमित्ताने छत्रपतींनी आपला
पाच-सहाशे मावळा गोव्यात घुसवला होता.ठरलेल्या दिवशी इशाऱत होताच या मावळ्यांनी गोव्याचे दरवाजे
ताब्यात घेऊन उघडायचे आणि राखीव तुकडीनं गोव्यावर चाल करायची.असा हा भेत आखला होता.पण भेत फसला.विजराईला गोव्यातील मावळ्यांचा वास लागला. त्यानं सर्वांना अटक करून परत छत्रपतींकडे पाठवले.
किल्ले फोंडा स्वराज्यात कदी व कसा आला :-
कोल्हापूर जिंकून थोरले छत्रपती स्वामी कुडाळप्रांती उत्तरले.कुडाळ पटाखाली घेऊन फोंडयास आले आणि किल्ल्यास वेढा दिला ( ५ एप्रिल ) विशेष म्हणजे हा सगळा उद्योग ऐन पावसाळ्यात चालू होता.त्यावेळी किल्लेदार होता महंमदखान.किल्ला होता विजापुरच्या
ताब्यात.महंमदखान सुद्धा तयारीचा गडी होता.तो मराठयांना दाद देईना.इकडं विजापुरहून बहलोलखान
निघाल्याची खबर महाराजांना मिळाली.छत्रपतींनी तात्काळ आदेश देऊन फोंडयाकडे येणाऱ्या घाट रस्त्यावर मोठाली झाडं आडवी पाडून रस्ते बंद केले.त्यामुळे बहलोलखानाला मिरज या गावी स्वस्त बसून राहावं लागल.इकडं मराठे हट्टाला पेटले.
छत्रपतींनी सुलतानढव्याचा भेत आखला.पाचशे शिड्या तयार करण्याचा हुकूम झाला.त्याच बरोबर पाचशे सोन्याची कडी प्रत्येक कडे अर्धा अर्धा शेर वजनाचें होते.
नियम असा होता.की जो कोणी शिडी चढून वर जाऊन यलगार करेल त्याला एक सोन्याचे कडे देण्यात येईल.
मावळा इरेला पेटला.बघत बघत मावळे तटाला भिडले
आणि किल्ल्यात उतरले.मावळ्यांची गर्दी दाटून आली. कापाकापीला उत आला.तासाभरातच मावळ्यांनी दोन-तीनशे मुडदा पाडला.किल्लेदार महंमदखान कैद झाला
फोंडा मावळ्यांच्या रक्तानं पावन होऊन फत्ते झाला.छत्रपती स्वामींनी जातीनं भगवा फडवला.धर्माजी नागनाथ यांची किल्ल्यावर नेमणूक केली.( दि.६ मे १६७५ ) फोंडा काबीज झाल्यामुळे अंत्रूज, अष्टागार, हेमाडबासें, बाळी,चंद्रवाडी व काकोडे म्हणजेच हल्लीचे फोंडे सांगे,केपे व काणकोण हे महाल छत्रपतींच्या कबजात आले.
फोंडयाचा रणसंग्राम :-
सूर्य डोक्यावर आला होता.राजापुरच्या छावणी नुकतेच फ्रेंचांचे लोक शंभूराजांना भेटून गेले होते.दुपारचा थाला घेऊन राजे चेऊल संदर्भात चर्चा करत होते.एक नजरबाज तिरासारखा बिचव्यात घुसला.मुजरा करून त्यानी तोंडी
खबर पेश केली.धनी फिरंग्यांचा साहेब जमाव घेऊन आगाशी पातूर आला हाय.तीन-साडेतीन हजार लढाऊ माणूस, पंचवीस घोडा अन चार तोफा हायत्या संगती.
हे ऐकताच राजांनी सुस्कारा सोडला आणि विजारल त्याचा फोड्या कडे जाण्याचा मार्गाचा काय सुगावा..? नजबाज उतरला जी..आगाशी,दुर्भाट,कवळे ते फोंडा असा मार्ग निवडलाय अशी कुणकुण हाय.नजरबाज
पुढे सांगू लागला.धनी फोंडया तर्फचा देसाई दुलबा नायक बी फीतलाय फिरंग्यांसनि.आपला सत्तर-ऐंशी लोकांचा जमाव घेऊन तो फिरंग्यांच्या टोळीत सामील झालाय.ठीक आहे म्हणत राजे विचारमग्न झाले.
दिवसमावळतीला तळावरून तीनशे घोडा बाहेर पडला.
दुर्भाट बंदराच्या दिशेनं ते पथक निघालं होतं.
फोंडा आता सरनोबत येसाजी कंकांच्या तिखट तलवारीच्या धारे खाली सुरक्षित होता.राजांना चिंता होती ती विजरईची कुठल्या पद्धतीनं जिरवायची.दुर्भाटपासून
जवळच त्या तीनशे मावळ्यांनी विजरईला सरळ सरळ अंगावर घेतला.विजरई चक्कीत झाली.त्याच्या मनी आपण तीन-साडेतीन हजार असून फक्त तीनशे मावळा आपल्यावर चाल करून येतो म्हणजे काय.मराठ्यांच्या हत्याराच पाणी आताशी कुट विजरईला जोकायला मिळणार होतं.तासाभराच्या खणाखणीत नंतर मावळ्यांनी माघार घेतली.आणि पसार झाले.( १-११-८३)
इकडं फोंडयाला येसाजींही विजरईच्या स्वागताची जयत
तयारी केली होती.किल्ल्या रसद,दारुगोळा मुबलक होता.
हर एक बुरुजावरील तोफ ठासून तयार ठेवली होती.
गडात असकऱ्याचा सहाशे गडी तयारीत होता.शिवाय येसाजींनी दोनशे मावळा किल्ल्याच्या बाहेर रानावनात दबा धरून ठेवला होता.दि १-११-८३ रोजी जंग सुरु झाली.विजरई येताच येसाजीं तोफा चालू केल्या त्यामुळे
विजरई तोफेच्या टप्या बाहेर राहावं लागलं.ही गोळागोळी
तीन दिवस चालूच होती.मराठयांचा मारा सुमार झाल्याचे बघून विजरईनं ताबडतोब त्यांच्या तोफा सुरु करण्याचा हुकूम दिला.त्यामुळे किल्लाच्या बाहेरील तटाला भगदाड पडलं.
दुसऱ्या बाजूने दॉम रॉद्रिगा द कॉस्ता यानं किल्ल्यावर हल्ला चढविला.भगदाड पडलेल्या ठिकाणी किल्ल्यातील
शिवबंदी दिसत नव्हती.विजरईनं भगदाड पार करून किल्ल्यात प्रवेश करून हल्ला करण्याचा निर्णय घेतला.
पोर्तुगीज सैन्य हल्ला करण्यात भगदाड पाशी आले.पण येसाजींनी मुदामून कसलीच हालचाल केली नाही.त्यामुळे
पोर्तुगीज सैन्य भलतच खुश झाले.पण येसाजी शिवबंदी गोळा करून भिंतीच्या कडेला दबा धरून बसले होते.पोर्तुगीज मोठ्या झोकात हल्ला करण्यासाठी निघाले. भगदाड पारकरून ते दरवाजा उघडण्यासाठी गेले.पण दरवाजा काय उघडला नाही.बरोबर ती वेळ हेरून येसाजींनी पोर्तुगीज सैन्यावर जबरदस्त हल्ला चढवला.तो हल्ला इतका तीव्र होता की पहिल्या झटक्यात दोन-अडीशे पोर्तुगीज सैन्य पडले.मराठ्यांचा मारा बघून उरलेसुरले उड्या टाकत पळून गेले.
हर घडीची खबर शंभूराजांना देण्यात येत होती.राजे फोंडयावर विशेष लक्ष ठेऊन होते.राजांनी चार घोडदळाच्या तुकड्या आणि दोनशे पायदळी प्यादी फोंडया साठी कुमक म्हणून पाठवली.नवीन आलेल्या
शिवबंदीनं आल्या आल्याच पोर्तुगीज सैन्य झोडपून काढले.आतून आणि बाहेरून हल्ला झाल्या मुळे वेढा विस्कळीत झाला.मात्र या हल्ल्यात मराठयांकडील तीन सरदार पडले.तरीही मराठे माघे हटायला तयार नव्हते.
विजरईच्या स्वप्नांचा येसाजींनी दिवसाढवळ्या चुराडा केला होता.ज्या हारामखोरांनी विजरईला दोन-तीन दिवसात किल्ला हस्तगत करून देतो म्हणून सागीतलं होतं तेच आता माघार घ्या म्हणून विजरईच्या माघे लागले होते.कारण लवकरच छत्रपती शंभूराजे स्वतः जातीनं या यलगारा उतरणार होते अशी बातमी पोर्तुगीज गोटात पसरली होती.वेढ्याचा चवथा दिवस उजाडला होता.पण कसलीती प्रगती दिसत नव्हती.उलट पोर्तुगीज सैन्यसक्ती घटली होती.विजरई निराश होऊन आपल्या तंबूत बसला होता.( ४-११-८३)
लेखन समाप्त.
दुसरा भाग सेवेशी नंतर.
( इंद्रजीत खोरे )
प्रस्तुत लेखन सेवा ही छत्रपती शंभूराजे,येसाजी कंक
कृष्णाजी कंक आणि जे मावळे फोंडयासाठी लढले त्या सर्वांनच्या चरणी अर्पण...!!
।। जय जिजाऊ।।
।। जय शिवराय ।।
।। जय रौद्र शंभू ।।
टीप :- येसाजी कंक याचा फोटो इंस्टा वरती सापडला. ज्याकुणी फोटो बनवला त्यासी धन्यवाद.

किल्ले फोंडा...!! भाग दुसरा








 

किल्ले फोंडा...!!
भाग दुसरा
छत्रपती शंभूराजे...!!
सरनोबत येसाजी कंक
कृष्णाजीं येसाजी कंक
" श्री शंभो : शिवजातस्य मुद्रा द्यौरिव जायते ।
यदंक सेविनो लेखा वर्तते कस्य नोपरी ।। "
पोर्तुगीजांनी वेढ्याचे काम सात-आठ दिवस चालू ठेवूनही काही प्रगती झाली नसल्याने विजरईच्या ध्यानी आले.
विजरईला भरीला घालणारे लोक आता माघारीची भाषा बोलू लागले.दोन-तीन वेळा मराठयांची हत्यारं अंगचटिला चाटून गेल्यामुळे विजरई हादरून गेला होता.
दोन वेळा तो मरणाच्या दारातून सही सलामत सुटला होता.त्यामुळे तो निराश होऊन आपला तंबूत जाऊन बसला.त्याला समाधान फक्त एकाच गोष्टीचं होतं की आपण जिवंत आहोत.पोर्तुगीजांचा प्रत्येक हल्ला मोठ्या निकारानं येसाजीं परतावून लावला होता.अखेरचा हल्ला करावा म्हणून विजरई नेटाने उठला.त्यानं पुन्हा तोफा सुरू करण्याचा हुकूम केला.पण कसलेले गोलंदाज मराठयांच्या हल्ल्यात कामी आले होते.त्यामुळे नवीन गोलंदाज लावले.त्यांना ते काम नीट जमेना.कदी गोळा किल्ल्याच्या थेट आता पडे नाहीतर बाहेर.आता तर येसाजींनी रात्रीची छापेमारी चालू केली.यामुळे पोर्तुगीज पुरते वयतागले.पोर्तुगीजांना हा गनिमी कावा नवीन असल्याने ते गांगरले.
या आठनऊ दिवसांच्या लढाईत सरनोबत येसाजी व त्यांचे पुत्र कृष्णाजीनं शर्तीची तरवार केली.थोरल्या छत्रपती स्वामीं पासून येसाजी सरनोबत होते.लढाईचा मोठा अनुभव होता गाठीशी.उमर झाली होती.पण अजूनही गनिमांनच्या मुडक्यांची रास लावण्याची ताकद होती मनगटात.त्यामुळे तर शंभूराजांनी फोंडयासाठी त्यांची निवड केली होती.पडलेल्या भगदाडात परत
अखेरचा निर्णायक हल्ल्यासाठी विरजरईनं सैन्य तयार केलं.भलताच चेकाळून उठला विजरई.पण झालं भलतच
छत्रपती शंभूराजे सैन्यासह फोंडयाच्या कुमकेसाठी दाखल झाले.त्यामुळे विजरईचे धाबेदणाणले.मोठी पळापळ उठली.विजरईच्या नजरे समोर छत्रपतींनी आपल्या खास एक हजार घोडळाच्या संरक्षणाखाली आपले सहाशे पाऊल लोक किल्ल्यात घातले.त्यांना अडविण्याची हिमत नं विजरईत होती नं त्याच्या सैन्यात
मात्र विजरई हादरला होता.अशा परिस्थिती आपण जर छत्रपतींच्या हाती लागलो तर मराठे आपल्याला नागडे करून मारतील.( ९-११-८३ )
राजे आलेले कळताच खूप दिवसांनी गडाची नौबत धूडधूडली.येसाजीं किल्ल्याचे दार सताड उघडे ठेवले. आपल्यासाठी कुमकेस खासा राजा आलेला बघून येसाजींचा जीव आभाळा येवडा झाला.लढाईच्या गर्दीत
येसाजीं जखमी झाले होते.अंग चोरून लढणार तो सरनोबत मुळीच नव्हता.सर्वांच्या आधी आपली समशेर पेलून गनिमावरी तुटून पडणार तो वीर होता.जखमा जरा खोल असल्यातरीही ते किल्ल्याचा आतील घेरा सांभाळून होते.तशाही परिस्थिती येसाजींन शंभूराजांच स्वागत केलं.राजे आल्यामुळे मावळ्यांमध्ये नवसंजीवनी आली.मावळ्यांनी माऱ्याचा वेग दुप्पट केला.या मुळे विजरईनं ताबडतोब विचारविनिमय करून माघारी घेण्याचे ठरवले.त्याला हे माहीत होतं की हीच वेळ आहे
माघारीची नाहीतर मराठे आपल्या आपले थडगे हितच
फोंडयाच्या परिसरात बांधायला लावतील.
विजरईनं जसा माघारीचा हुकूम दिला तसे पोर्तुगीजसैन्य
आनंदाच्या भरात पळत सुटले.छत्रपतींनी तात्काळ कृष्णाजीच्या दीमतीस पाचशे स्वार-शिपाई देऊन त्यांचा फडशा पाडण्याचा हुकूम केला.मराठे जसे किल्ल्यातून बाहेर पडले तशी घनघोर लढाईला प्रारंभ झाला. पोर्तुगीजांची पळापळ उठली.मराठयांच्या बंदुका आग ओकू लागल्या.पोर्तुगीज सैनिक ही गोळागोळी करू लागले.मराठयांनी पाठीला लावलेल्या ढाली काडून
आपल्या बचावासाठी समोर धरल्या आणि पोर्तुगीजांना
नदीपर्यंत रेटत आणले.कृष्णाजीची तलवार मात्र तळपत होती.एक-दोन गोळ्या लागूनही त्यांची घोड्यावरची मांड अजूनही पक्की होती.त्यांची घारी नजर विजरईच्या शोदात होती.आपला भाला त्या विजरईच्या छाताडाच्या आरपार केल्याशिवाय कृष्णाजीं स्वस्त बसणार नव्हते.
नदीच्या काठी विजरई नदी पार करण्याच्या नादात होता.
कृष्णाजींनी आपला घोडा थेट विजरईच्या अंगावर घातला.बाजूला असलेल्या चार-पाच पोर्तुगीज सैनिकांनी थेट कृष्णाजीवर निशाणा धरून गोळ्या झाडल्या.गोळ्या वरमी लागल्यानं कृष्णाजींची शुद्ध हरपू लागली.त्यावेळी मराठ्यांची पाच-पणास घोडी कृष्णाजीच्या मदतीला आली.
आता दिवस मावळा होता.हत्यारांची खणाखणी थांबली
होती.कृष्णाजींना मावळ्यांनी उचलून किल्ल्यात आणलं. कृष्णाजींचा रक्ताळलेला देह बघून शंभूराजांचे डोळे भरून आले.त्या विराच्या देहावर आता कुठे जखमांना जागा उरली नव्हती.आधीच येसाजीही जखमी होते.त्यात कृष्णाजींही जबर जखमी झाले.कृष्णाजींपाशी बसून राजांनी त्यांना धीर दिला.येसाजींच्या व कृष्णाजींनं
सांडलेल्या इमानी रक्ता मुळे फोंडा आणि परिसर पावन झाला होता.छत्रपतींनी जवळ असलेल्या मावळ्यांना येसाजी व कृष्णाजींना तात्काळ पालखी घालून भुतोंडे या त्यांच्या गावी पोहोविण्याची आज्ञा केली.रात्र झाली होती.मावळे मिळालेली लुट किल्ल्यात घेत होते.तीनशे पोती भात.आणि दोनशे खेचरावर राहील एवढे समान माघे ठेऊन पोर्तुगीजांनी पळ काढला होता.
( १०- ११- ८३ )
कंक पिता-पुत्राची आठवण आपल्या हृदयात ठेऊन शंभूराजे स्वतःच किल्ला लढविण्यास सिद्ध झाले.दिवस फुटीला मराठयांनी पोर्तुगीजांनवर हत्याराची धार धरली.
पोर्तुगीज नदी पार करून आपल्या हद्दीत जाण्याच्या तयारीत होते.वाटेवर मराठ्यांच्या ताब्यात असलेली एक टेकडी होती.मराठ्यांनी शे-दोनशे हशम टेकडी माघे लपवून ठेवले आणि पाचपणास मावळ्यांनी टेकडीला
वळसा घालून पोर्तुगीजांवर चाल केली.घटकाभरात त्यांनी माघार घेतली अनं टेकडीकडे पळत सुटले.पोर्तुगीज ही पळणाऱ्या मराठयांच्या माघे लागले.त्यात भर म्हणजे विजरईनं उरलासुरली कुमकही दॉम रॉद्रिगो द कॉस्ताच्या ताब्यात देऊन घोडदळ ही त्यांच्या माघे लावले.मराठे टपूनच होते.पोर्तुगीज माथ्या जवळ येताच मराठयांनी
हर हर महादेवच्या जयघोषात पोर्तुगीजांवर चाल केली.
मराठ्यांच्या बंदुका कडाडूलागल्या.त्याच बरोबर घोडदळ ही पुढे सरसावले.धापा टाकत टेकडी चढून आलेल्या पोर्तुगीजांवर पुन्हा खाली पळण्याची वेळ आली. मराठ्यांच्या तलवारी बेजरब चालू लागल्या.पोर्तुगीजांच्या गोळीबारा पासून बचावासाठी मराठयांनी आपल्या ढाली समोर धरल्या.नुसत्या घोड्यांच्या टापा खाली बरेच पोर्तुगीज कामी आले.मराठयांचा प्रताप बघून विजरईला
घाम फुटला.मराठयांनी लढाई झपाट्याने टेकडीच्या पायत्याला आणली.कारण त्यांना विजरईला घेरायचे होते.एका शिलेदारांन घोड्यावरून आपला भाला इतक्या जोरात विजरईला टिपण्यासाठी फेकला पण विजरई वाचला.त्याचा कोट फाटून पोटाची बगल धरून भाला पार झाला.विजरईचं नशीब थोर.की त्यावेळी पन्नास-साठ
मुसलमानी बंदुकी दस्ता पोर्तुगीजांच्या मदतीला धावला.
नाही तर फिरंगी बियाला सुद्धा शिलक राहत नव्हते.
या बंदुकधारी मुस्लिमांना माघे रेठण्याच्या नादात पोर्तुगीजांनी नदीत उड्या टाकल्या आणि पळ काढला.
बंदुकधाऱ्यांचा फडशा पाडून मराठे नदी तीरी आले पण तोपर्यंत विजरई निसटला होता.या चकमकीत
मानू-यल-द-सिल्व्हा आणि दोनशे वीस पोर्तुगीज सैनिकांचे मराठयांनी मुडदे पाडले.
१२-११-८३ रोजी ८ वाजण्याच्या सुमारास पोर्तुगीज सैन्य दुर्भाट सोडून खालमाणेंन गोव्यात परतले.विजरई कोंदि
द आल्व्होरनं छत्रपती शंभूराजांचा इतका धसका घेतला की जुन्या गोव्यातील बों जेजूस या चर्चशेजारील मठात जाऊन राहिला.पण छत्रपती या बांडगुळ पोर्तुगीजांना कुटं सुखासुखी सोडणार होते.अजून मराठयांची हत्यारी चाल गोवा परिसरात होण्यास बाकी होती.सगळं शांत झाल्यावर शंभूराजांनी फोंडयाची पाहणी केली.पडलेलं भगदाड पाहता छत्रपतींच्या सहज मनात आलं की
" आपल्या आबासाहेबांनी किती अंगमेहनत करून
हा गड फत्ते केला.उणेपूरे तीन महिने खर्ची घालून गड हस्तगत केला.बहुदा पुन्हा जर फिरंग्यांनी चाल केली तर गड हातचा गमावून बसू.." या विचाराने छत्रपतींनी गड पाडून जवळच्या असलेल्या एका टेकडीवर नवीन गड बांधण्याचा आदेश दिला आणि त्याचे नाव " मर्दनगड "
असे ठेवले.
इकडे जखमा न सुकल्यामुळे कृष्णाजी सूर्य मंडळ भेदून गेले.स्वराज्यावर शोककळा पसरली.छत्रपती कष्टी झाले.मोतीकंनट्यातील अजून एक मोती पडला.वय झालेल्या बापा अगोदरच लेक गेला.येसाजींवर तर डोगर कोसळला.छत्रपतींनी येसाजींची जातीनं भेट घेऊन सांत्वन केले.कृष्णाजींच्या मुलगा जो कृष्णाजी ( दुसरा) नावाने सुबा चालवावा व चाहुजी कंक यासी कारभारी नेमावे असे ठरले. छत्रपतींनी मर्दुमकी गाजवल्याबद्दल येसाजींना एक हजार होन.आणि स्वामीकार्यावर खर्ची पडल्यामुळे कृष्णाजींना एक हजार होन असे दोघास बक्षीस म्हणून दिले.कृष्णाजीस सुभा देऊन लोकांचा जमाव करण्यासाठी,नेहमी चाकरीत राहावे म्हणून चाहुजी
कंक यासी कारभार चालविण्यास सांगिले.कृष्णाजींच्या सुभ्याची आसामी चालवावी व त्याचा अज्ञानं पालनकर्ता
म्हणून चाहुजीस वार्षिक सहाशे होणं देण्याचे ठरले. त्यातील चारशे होन खासा जातीस व दोनशे होन चाकरी साठी होते.
सुरवातीला पोर्तुगीजांच्या भारीभरकम तोफा आणि तोफगोळ्यामुळे फोंडा तग धरू शकणार नाही अशी किल्ल्यातील अधिकाऱ्यांची समजूत होती.पण मोठी हमरीतुमरीची लढाई होऊन देखिल किल्ला पोर्तुगीजांना
जेर करता आला नाही.स्वामींची फत्ते व्हावी यासाठी किल्ल्यावरील हवालदार,सरनोबत,सबनीस,नाईकवाडी हे फोंडयाच्या पीरास नवस बोलले होते.स्वामींची फत्ते झाल्यावर दि २-१-८४ रोजी छत्रपतींचे लाडके छंदोगामात्य कवी कुलेशांनी यांनी धर्माजी नागनाथ
यांना खास पत्र पाठवून पिरास दर वर्षी पन्नास होन उदफुल व दिवाबत्ती साठी म्हणून पाठवले....!!
आहे तितुके जतन करावे । पुढे आणीक मेळवावे ।
मऱ्हाष्ट्रराज्य चि करावे । जिकडे तिकडे ।।
लेखन समाप्त.
इंद्रजीत खोरे
प्रस्तुत लेखन सेवा छत्रपती शंभूराजे यांच्या चरणी अर्पण.

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...