विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label श्रीमंत राजेभोसले वावीकर. Show all posts
Showing posts with label श्रीमंत राजेभोसले वावीकर. Show all posts

Wednesday, 26 January 2022

राजे भोसलेंची वावी

 




राजे भोसलेंची वावी
पोस्तसांभार : -रमेश पडवळ, नाशिक
ऐतिहासिक नोंदी अभावी विस्कटू लागलेले इतिहासाचे धागे कधी कधी अज्ञात पैलूंचा उलगडा करून देतात. असे पैलू न कधी ऐकलेले असतात न कधी पाहिलेले. पण त्यांच्या अज्ञातपणातही एक मोठा इतिहास दडलेला असतो. गावागावात जमीनदोस्त होत असलेल्या ऐतिहासिक वास्तू हा इतिहास कुरवाळून उभ्या असतात. यादवकाळाशी ऋणानुबंध सांगत छत्रपतींच्या घराण्यांची वंशावळ उलगडणारे सिन्नरमधील वावी हे गाव वरद परशरामाच्या समृद्ध लोककलेचीही ओळख करून देते. मन प्र‌सन्न करणारा हा प्रवास आपल्याला इतिहासाच्या पानांपलीकडे घेऊन जातो.
वावीतील राजे भोसले घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याशी असलेला संबंध वावीची ऐतिहासिक गूढता वाढव‌ितो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे दक्षिणेत येण्यापासून ते पणजोबा बाबाजी भोसले यांच्यापर्यंतचा प्रवास वावी उलगडताना दिसते. अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवर स्वारी केली. यानंतर घडलेल्या अनेक घडामोडीनंतर सजनसिंह आणि त्याचा पुत्र दिलिपसिंह बहामनी राज्याची स्थापना करणाऱ्या हसन बहामनीकडे आले. याच दिलिपसिंहापासूनच‌ी १३ वी पिढी म्हणजे बाबाजी भोसले, असे संदर्भ मराठी रियासत, शिवछत्रपती समज-अपसमज व क्षत्रियकुलावतंस छत्रपती श्रीशिवाजी महाराज या पुस्तकात म‌िळते व वावीतील राजे भोसले घराण्यातील वंशजही त्यास दुजोरा देतात. बाबाजी भोसलेंकडे आठ गावाची पाटीलकी होती. त्यांना मालोजी राजे व विठोजी राजे अशी दोन मुले होती. दोघेही निजामशाहीत वेरूळ-घृष्णेश्वर भागात पराक्रमी व उत्तम प्रशासक होते. पुढे मालोजींना पुणे व सुपे जहागिरी मिळाली तर विठोजी भोसलेंना मुंगी, पैठण, हिरडी, बेरडी, जिंती, वेरूळ, वांबोरी व वावी ही गावे मिळाली. विठोजींनी आपल्या आठ मुलांना प्रत्येक गाव दिले. यात नागोजी यांना वावी हे गाव मिळाले अन् वावी राजे भोसलेंची म्हणून ओळखली जाऊ लागली. दुसरीकडे विठोजींचे भाऊ मालोजींना शहाजी व शरीफजी ही मुले झाली. यामागेही एक कथा आहे. मालोजीराजे भोसलेंनी शहाशरीफ नावाच्या नगरजवळील पिरास पुत्र व्हावा म्हणून नवस केला होता. पुत्र झाल्यावर शहाशरीफ या पिराचे नाव दोन्ही मुलांना शहाजी व शरीफजी असे ठेवले. शहाजी राजांचा सुपुत्र शिवाजी महाराज हे पुढे सुरत लुटीतून परतताना विश्रामगडावर असताना वावीत आपल्या नातलगांना भेटण्यासाठी आल्याचे वावीतील राजे भोसले घराण्याचे वंशज विठ्ठल राजे भोसले व सागर राजे भोसले सांगतात. मालोजींचा दुसरा मुलगा शरीफजी नगर येथील भातवडी (भातोडी) येथील लढाईत ऑक्टोबर १६२४ रोजी धारातीर्थी पडला. हा इतिहास पाहिल्यावर वावीमध्ये भोसले घराणे कसे आले याचा उलगडा होतो. मात्र वावीचा प्रवास येथेच थांबत नाही तर येथून सुरू होतो.
सिन्नरपासून शिर्डीरोडवर वीस किलोमीटरवर वावी हे गाव लागते. उजव्या हाताच्या दिल्ली दरवाजातून गावात प्रवेश केल्यावर पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे वावी म्हणजे काय? असा. सिन्नर परिसर हा यादवांची राजधानी. यादवकालीन शिलालेखातून वावी हा शब्द बारवेसाठी (विहीरीसाठी) उपयोगात आणलेला दिसतो. असाच उल्लेख चक्रधर स्वामींच्या साहित्यात सापडतो. त्यांनी वावी पोखरणी (विहिर खणणे) असे म्हटल्याने वावी म्हणजे बारव. याला वावीतील वैजेश्वराच्या मंदिरासमोर असलेल्या यादवकालीन बारव दुजोरा देते. या बारवेतून लग्नासाठी भांडी बाहेर येतात, अशी अख्यायिका ग्रामस्थ सांगतात. पाण्याने काठोकाठ भरलेली ही बारव त्यात साचलेल्या कचऱ्यामुळे आज उपेक्षित आयुष्य जगताना दिसते. वाल्ह्याकोळ्याची वावी अन् वैजेश्वर महादेव मंदिरामुळे गावाला वावी म्हटले जात असावे, असेही ग्रामस्थ सांगतात. या विहिरीसमोरच तटबंदीतील महादेवाचे वैजेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्याचे दगडी प्रवेशद्वार सुंदर नक्षीकामाने सजलेले आहे. मंदिरातील शिलालेखाची हेळसांड झाल्याने हा इतिहास अज्ञात आहे. याच मंदिरासमोरील बारवे शेजारी उभा असलेला प्राचीन मंदिराचा दगडी स्तंभ वावीत आणखी काही आखीवरेखीव मंदिरे असावीत याची साक्ष देतो. वैजेश्वर मंदिराचे पुजारी दत्तात्रेय शिंदे-गुरव यांच्या घरी महादेवाचा पंचमुखी मुखवटा आहे. हा वारसा पेशवाईपासून त्यांनी जपला आहे. हा सोहळा अनुभवून थोडे पुढे गेल्यावर राजे भोसले घराण्याच्या तीन मोठाल्या वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यातील एकच वाड्याचे अवशेष थोडेफार शिल्लक आहेत. वाड्याचा उंच बुरूज कणा ताट करून वावीतील भोसले घराण्याचे महत्त्व आजही सांगताना उभा असल्याचा दिसतो. वावीतील राजे भोसले घराण्याने साताऱ्याची छत्रपतींची गादी चालविण्यासाठी वावीतून शाहू राजे दुसरे (आबासाहेब, मूळ नाव विठोजी त्र्यंबक भोसले, वावी) दत्तक म्हणून गेले. हा विठोजींच्या घराण्याचा गौरवशाली इतिहास मात्र अंधारात राहिला. हा वाडा पाहताना वावीतील राजे भोसले घराण्याचे ऐश्वर्य डोळ्यापुढे उभे राहते. वाड्याच्या आजूबाजूला पडलेले अनेक दगडी अवशेष, वाड्यातील भुयार अन् भिंतींवरील देवळींचे लहानमोठे नमुने पाहताना हा वाडा पुन्हा उभा राहिला तर अनेक अज्ञात पैलू पुढील शेकडो वर्ष भोसले घराण्याचा इतिहास सांगत राहतील, असे वाटायला लागते. शहाजी राजांकडून वावीतील घराण्याला मिळालेली तलवार विष्णूच्या दशावताराने सजली आहे. तर दुसऱ्या तलवारीची मूठ सोन्याची आहे. मात्र हे वैभव आता वावीत नाही. राजे भोसले घराण्याचा इतिहास संग्रही करण्याचीही गरज आहे.
वावीत भटकंती करताना अनेक मंदिरे पहायला मिळतात. गावात दोन मारूती मंदिरे आहेत. गावात पिराचे ठाण अन् साती आसराही पहायला मिळते. वावीचे वारकरी संत रामगीरी महाराजांची समाधीही येथे आहे. गावाला चार दरवाजे होते. दिल्ली दरवाजा सोडला तर इतर वेशी आता नाहीत. मात्र दिल्ली दरवाजा व पुणे दरवाजा सोडला तर इतर वेशीच्या आठवणीही आता शिल्लक नाहीत. आखाडात बोहाड्यात सोंगे मिरविण्याची परंपरा वावीकरांनी जपली आहे. वावीचा प्रवास वरदी परशरामांची वावी या ओळखीशिवाय पूर्ण होत नाही. परशराम आपल्या वेगळ्याशैलीत सांगतात की,
विठू परशराम येशूचे तोंड अति गोड रसिकरंग भरून/
रामकृष्ण रामाचे छंद ऐकती चतुर जिवी धरून/
वावी नांव गांव धनवटात आडा जबरू
कोणी विरळा एकादा राहील सांभाळून अबरू/
इषकाचे पायी सजण मारिला गबरू/
वरदी परशराम यांचा जन्म (जन्म १७५४- मृत्यू १८४४)मध्ये सिन्नर-शिर्डी मार्गावरील वावी या गावात झाला. देवपूरच्या भागवतबाबांनी त्यांना अभंग करण्याऐवजी आताच्या समाजाचे लावण्यांमाध्यमातून प्रबोधन करण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच त्यांच्या अनेक लावण्या पौराणिक कथांवर व आध्यात्मिक विषयांवर असून, त्यावर संतकाव्याची छाया आहे. तत्कालीन समाजस्थितीचे उत्कृष्ट चित्रण त्याच्या कवनांत आढळून येते. पेशवाईच्या काळात तमाशा ही लोककला बहरली. वरदी परशराम यांनी आपल्या लावणीनं महाराष्ट्रात आपला ठसा उमटवला. पेशवे तसेच इंदोरचे होळकर व बडोद्याचे गायकवाड घराण्याने त्यांच्या कलेचा गौरवही केला. परशराम यांची `आध्यात्मिक लावणी' हे त्यांचं वेगळेपण अनेकांना भावल्याने त्यांना वरदी परशराम म्हटले जाऊ लागले. आपले गाव असलेल्या वावीबद्दलचा अभिमान वरदी परशरामाच्या शाहिरीतून ओथंबून वाहताना दिसतो. म्हणून ते म्हणतात...
वावी गाव तेथे परशराम येसू वर्णी हरीच्या गुणा/
रमारंगे श्रीरंगे अभंगे तारि-तारि मज..//
लोककलेतील एक अनोखी संस्कृतीनिर्माण करणारा हा कवी व कुटुंबिय अज्ञात आहेत. त्यांची परंपरा निष्ठेने पुढे घेऊन जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज आहे. मात्र वावीत परशरामाचे मंदिराशिवाय काहीच नाही. असे म्हणतात की, मरणापूर्वी वरदी परशरामाने आपल्या मृत्यूची वार्ता आईला कळविली होती व मृत्यूपूर्वी चार दिवस आधी त्यांनी वावीतून कोपरगाव येथील गोदाकाठचे मंजूर या गावी प्रस्थान केले. त्यांनी सांगितलेल्या दिवशीच कवने करताना त्यांनी प्राण सोडले. ‘वरदी’ नावाला शोभावी अशी त्यांच्या मृत्यूबद्दलची अख्यायिका आजही गावात सांगितली जाते.
वैजेश्वराचे सान्निध्य, बारवेचा गारवा, बोहाड्यांची परंपरा, मंदिरांचा साज, राजे भोसले घराण्याचे ऐश्वर्य अन् परशरामाची अध्यात्मिक काव्यभक्तीने वावी मंत्रमुग्ध झालेली दिसते. दुष्काळी परिसर असला तरी हा ऐतिहासिक गारवा वावीची सफर आनंददायी करतो.

छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे दत्तक पुत्र श्रीमंत छत्रपती त्रिंबकजी उर्फ शाहू (शहाजी) उर्फ जंगली महाराज

 छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे दत्तक पुत्र श्रीमंत छत्रपती त्रिंबकजी उर्फ शाहू (शहाजी) उर्फ जंगली महाराज 

पोस्तसांभार :: ©



श्रीमंत राजेभोसले वावीकर

सन १८४० ला खान्देश च्या पुढे जंगलात काशीच्या वाटेवर सांगवी मुक्कामी जन्म झाला स्वराज्याच्या छत्रपतींचा... छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे दत्तक पुत्र श्रीमंत छत्रपती त्रिंबकजी उर्फ शाहू (शहाजी) उर्फ जंगली महाराज यांचा. श्रीमंत छत्रपती शाहू (शहाजी) उर्फ जंगली महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा...!
श्रीमंत छत्रपती शाहू (शहाजी) उर्फ जंगली महाराज :
हे जंगली महाराज अध्यात्मिक क्षेत्रातील नावाजलेले जंगली महाराज नाहीत. तर श्रीमंत जंगली महाराज म्हणजे स्वराज्याचे छत्रपती शाहू महाराज धाकटे यांचे लहान बंधू, स्वराज्यासाठी, छत्रपतींसाठी पराक्रमाची पराकाष्ठा करणारे स्वराज्याचे सेनापती श्रीमंत चतुरसिंग राजे भोसले वावीकर यांचे नातू . श्रीमंत चतुरसिंग राजे भोसले यांचा वारसा समर्थपणे चालवणारे स्वराज्याचे सेनापती श्रीमंत बळवंतराव राजे भोसले यांचे चिरंजीव.
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी ७ डिसेंबर १८३९ ला काशीला प्रयाण केले. तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या दोन महाराणी, कन्या गोजराबाई साहेब, श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती, त्यांची पत्नी गुणवंताबाई साहेब , सेनापतीचे काका - श्रीमंत छत्रपती शाहू महाराज धाकटे यांचे लहान बंधू श्रीमंत परशराम राजे भोसले वावीकर, महाराजांना मानणारे सर्व आप्तेष्ठ होते. या प्रवासात खान्देशात सांगवी मुक्कामी १२ जानेवारी १८४० रोजी श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती यांची पत्नी गुणवंताबाई साहेब प्रसूत होऊन त्यांनी एका मुलाला जन्म दिला. त्याचे नाव त्रिंबकजी असे ठेवण्यात आले. जंगलात जन्म झाल्याने त्यांना जंगली महाराज हे नाव पडले. त्यांच्या जन्माचा कुठला उत्सव तर सोडा साधा आराम सुद्धा न करू देता इंग्रज अधिकाऱ्याने भोयांना पालखी उचलण्याचा इशारा केला. पालख्या काशीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.
श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती यांना ताप येऊ लागला होता. इंग्रज अधिकाऱ्याने त्यांच्यावर कुठलाही औषधोपचार करू दिला नाही. ज्वर वाढत गेला. मुलगा झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांनी २७ जानेवारी १८४० ला स्वराज्याचे सेनापती आपल्या तान्ह्या मुलाला परकं करून, गुणवंताबाई साहेब यांना विधवा करून इहलोकी गेले. मध्य प्रदेशातील महू जवळील तिकुराई येथे स्वराज्याच्या सेनापतींचे श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती उर्फ बाळासाहेब सेनापती यांचे निधन झाले. प्रबोधनकार ठाकरे आपल्या रंगो बापूजी आणि प्रतापसिंह महाराज या पुस्तकात बाळासाहेब सेनापती यांचे निधन आमांशाने म्हणजे अतिसाराने झाले आहे असं मांडले आहे.
२५ मार्च १८४० ला श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे सर्व लवाजम्यासह काशी नगरीत आगमन झाले. ऑक्टोबर १८४५ मध्ये श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी जंगली महाराज उर्फ त्रिंबकजी राजे यांना मेजर कारपेण्टरच्या समक्ष विधीपुर्वक दत्तक घेतले.१० आॕक्टोबर १८४५ च्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी मृत्युपत्रात लिहले की,” माझ्या दोन्ही राण्यांना पुत्र झाला नाही. सबब आमच्या हिंदुधर्माप्रमाणे मी माझे आप्त कै. बळवंतराव राजे भोसले यांचा पुत्र त्रिंबकजी राजेभोसले यास विधीपुर्वक दत्तक घेऊन त्याचे नाव शाहाजी असे ठेवले आहे. सदरहु त्रिंबकजी याच्या मातोश्री गुणवंताबाई हिची या दत्तक विधानाला संमती असुन तीला दुसरा मुलगा दत्तक घेण्याची आम्ही परवानगी दिलेली आहे. माझ्या मागे माझ्या राज्याचा खाजगी आणि सरकारी खजिना नि मालमत्तेचा, माझ्या पदव्यांचा आणि मी उपभोगलेल्या सर्व अधिकारांचा आणि सत्तेचा त्रिंबकजी हा कायदेशिर वारस समजण्यात यावा. विलायतेतल्या मोकादम्याचा निकाल माझ्या हयातीत लागला तर ठिकच. न लागल्यास तो आमचे दत्तकपुत्र शाहाजीराजे यांच्या नावाने पुढे चालवावा आणि ब्रिटीश सरकारने त्यांना न्याय द्यावा.” (मराठी रियासतीमध्ये दत्तकविधानाची तारीख २५ जानेवारी १८४७ आहे. )
त्रिंबकजी राजे यांचेच नाव शहाजी उर्फ शाहू महाराज झाले. या दत्तकविधानानंतर लगेचच गुणवंताबाई साहेब यांनी संताजी राजेभोसले शेडगावकर यांचे कनिष्ठ चिरंजीव तात्याबा यांस दत्तक घेऊन त्याचे नाव दुर्गासिंह ठेवले. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी त्यांना दुर्गासिंह सेनापती असे संबोधले. त्यासोबतच श्रीमंत परशराम राजे भोसले वावीकर यांनी जानराव राजेभोसले शेडगावकर यांचे कनिष्ठ चिरंजीव जिजाबा यांस दत्तक घेतले.
दत्तकविधानानंतर काही दिवसांनी १४ ऑक्टोबर १८४७ ला स्वराज्याचे धनी छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे दुःखद निधन झाले. महाराजांच्या निधनानंतर त्यांची कन्या गोजराबाईसाहेब यशवंतराव गुजर १३ जानेवारी १८५० ला साताऱ्यात आल्या. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांनी ३० ऑगस्ट १८५३ ला त्यांचे दुःखद निधन झाले.
इसवी सन १८५४ मध्ये श्रीमंत जंगली महाराज, त्यांच्या मातोश्री राजसबाईसाहेब, जनकमता गुणवंताबाई, दुर्गासिंह सेनापती यांचे कृष्णा नदीच्या तीरावर मौजे आरले येथे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी मातोश्री सगुणाबाईसाहेब आणि व्यंकोजी राजे हे स्वतः आरले येथे जाऊन त्यांना सातारा शहरात घेऊन आले. आणि जुन्या वाड्यात राहू लागले.
इसवी सन १८५७ च्या सुरुवातीलाच इंग्रजांविरुद्ध जनमानसात असंतोष वाढू लागला होता. छत्रपती प्रतापसिंह महाराजांना पदच्युत करून त्यांची काशीला रवानगी केल्याने सातारकर मंडळी जास्त चिडलेली होती. त्यात छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे चिरंजीव छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज साताऱ्यात आल्याने सातारकर मंडळीत उत्साह संचारला होता. छत्रपती प्रतापसिंह महाराजांची बाजू इंग्लंड मध्ये मांडणारे रंगो बापूजी हेही साताऱ्यात दाखल झाले होते. त्यांच्या वाटाघाटी सुरु झाल्या होत्या. इंग्रज अधिकाऱ्यास ठार मारणार असल्याची बातमी साताऱ्यात पसरली. एके दिवशी छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज आणि दुर्गासिंह सेनापती यांचे घोडे रात्रभर जीन घालून वाड्यापुढे सज्ज असल्याचे आढळले. साताऱ्यात इंग्रजांविरुद्ध उठाठेवी वाढू लागल्या होत्या. जुलै महिन्यात इंग्रजांनी धरपकड चालू केली. ८ सप्टेंबर १८५७ ला रंगो मापूजी यांच्या मुलाला पकडून फाशी देण्यात आली. त्यापूर्वीच ६ ऑगस्ट १८५७ ला छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज, त्यांचे चुलते काकासाहेब, मातोश्री राजसबाईसाहेब, जनकमता गुणवंताबाई, दुर्गासिंह सेनापती यांना अटक करून मुंबई येथे बूचर बेटावर अलग अलग ठेवण्यात आले. डिसेंबर १८५७ ला Mr. Rose हे बूचर बेटावर जाऊन त्यांनी महाराजांना कारस्थानाचा कबुली देण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. अर्थात तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज अथवा इतर कुणीही कबुली दिली नाही.
मार्च १८५८ ला त्यांना कराचीला पाठवण्यात आले. त्यांना एकमेकांना भेटूही दिले जात नव्हते. त्यानंतर इतरांना काही काळानंतर सोडण्यात आले. छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज आणि त्यांच्या पत्नी आनंदीबाईसाहेब याना जुलै १८८५ मध्ये सोडण्यात आले. परत आल्यांनतर छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज आपल्या पत्नी समवेत पुण्यातील भवानी पेठेत घर क्र ५४३ येथे राहू लागले. तिथेच त्यांनी १ जून १८९२ ला आपला देह ठेवला. महाराजांनी त्यांच्या हयातीत ब्राम्हो समाजाची दीक्षा घेतली असल्याने त्यांचा अंत्यविधी त्याच पंथानुसार करण्यात आला.
आजही छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज उर्फ जंगली महाराज यांची समाधी पुण्यातील भवानी पेठेत आहे. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे लहान बंधू यांचे देखील नाव श्रीमंत छत्रपती शाहजी महाराज असल्याने गफलत करू नये. दोघांचा कार्यकाळ वेगळा आहे.
आजच्या १८२ व्या जयंतीनिमित्त छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज उर्फ जंगली महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा ...!
फोटो १. छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज उर्फ जंगली महाराज यांच्या भवानी पेठेतील समाधीचा.
२. दत्तकविधानानंतर छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज उर्फ जंगली महाराज आणि त्यांच्यासोबत श्रीमंत दुर्गासिंह सेनापती
© श्रीमंत राजेभोसले वावीकर

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...