विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 29 July 2021

गंगाजलनिर्मळ अहिल्याबाई होळकरांचे योगदान

 

महेश्वर (महिष्मती) हे होळकरांचे राजधानीचे शहर उभारण्यात

गंगाजलनिर्मळ अहिल्याबाई होळकरांचे योगदान अपूर्व असेच होते. त्या संदर्भातील काही महत्वाची माहिती खाली दिलेली आहे.
मोंगलांच्या काळात महेश्वरचा किल्ला मातीचा होता. संवत १७९० मध्ये म्हणजे इसवी सन १७३३मध्ये तेथे होळकरांचा अम्मल सुरु झाल्यावर त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. श्रीमंत अहिल्याबाई देवींची स्वारी इसवी सन १७६७ मध्ये येथे मुक्कामास आली. त्य्नाच्या काळात जी काही नवीन देवळे, घाट बांधले व ज्यांची दुरुस्ती केली गेली त्याची माहिती पुढे दिली आहे : शीमंत अहिल्याबाई देवींनी प्रथम सरकारवाडा बांधून घेतला व नर्मदेवरचा घाट सरकारवाड्याखाली बांधवला.नंतर कशी विश्वेश्वराचे मोठे देऊळ शिखरबंध बांधवून स्थापना केली. त्यानंतर किल्ल्यावर श्रीराम मंदिर बांधवून त्याची पूजा भिंकभटास सांगितली. त्यानंतर श्रीकृष्ण मंदिर बांधले. अहिल्यादेवी प्रत्येक देऊळ बांधीत आणि सोबतच त्यांच्या पूजाअर्चेची पण व्यवस्था करीत गेल्या.
प्राचीन किल्ला मातीचा होता, त्याची डागडुजी करून चुन्याचे थर बसविले व दक्षिण पश्चिमची बाजू दगडांची पक्की केली. मोंगली अंमलात कामे दरवाजा दगडाचा होता, तो पडल्याने तेथे दुरुस्ती करून बुरुज वगैरे बांधला.
त्याच सुमारास कसबे महेश्व्ररातील बांधकाम हाती घेतले. पूर्वी किल्ल्याखाली जुना बाजार व मारूवाडा (विणकर लोकांची वस्ती) तसेच किल्ल्यावर सुद्धा थोडी होती. नंतर अहिल्याबाईंनी शहराची आबादी (वस्ती) करून घेतली. आदितवार बाजार, मंगळवारपूरा वसविला तर अहिल्याबाईंचे जावई राजश्री यशवंतराव फणसे यांनी फणसपुरा बसविला. कृष्णाजीपंत दिवाण यांनी मल्हारगंज तसेच कृष्णपुरा वसविला. खासगीवाले दिवाण गोविंदपंत गानू यांनी गोविंदपुरा वसविला . १७७८ मध्ये अहिल्याबाईंनी शहरचे उत्तरेस श्रीभवानीदेवीचे मंदिर बांधले. तसेच रेवातीरीं परशुराम मंदिर बांधून त्याखाली पेशवे घाट बांधला.
श्रीकेशवराय यांचे मंदिर बाईसाहेबांच्या सासू गौतमीबाईनी (पेशव्यांचे सेनापती मल्हारराव होळकरांच्या पत्नी) यांनी बांधले. श्रीचतुर्भुज नारायणाचे मंदिर श्रीमंत सुभेदार मल्हारराव यांनी अहिल्यादेवी यांच्या येण्यापूर्वीच बांधले होते. कार्तिविर्यचे मंदिराचा जीर्णोद्धार बाईंनी करविला.
श्री काळाग्निरुद्ध (श्री काळेश्वर) यांचे मंदिर नर्मदातीरी होते त्याची डागडुजी बाईंनी करून धर्मशाळा बांधून घेतली. श्री मातंगेश्वर तसेच श्री भर्तृहरीची प्राचीन गुंफा यांची अहिल्याबाईंनी व्यवस्था केली.
अहिल्याघाटाचे काम भारमल दादा होळकर यांनी अहिल्याबाईंच्या देहान्तानंतर इसवीसन १८०१ मध्ये सुरु केले. १८३८ साली श्री हरिराव महाराजांच्या कारकिर्दीत ते काम छत्रीसह पूर्ण झाले.
संदर्भ: होळकरशाहीच्या इतिहासाची साधने, भाग पहिला संकलन:प्रमोद करजगी

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...