विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 27 January 2023

छत्रपती शिवाजी महाराजांचा दूसरा राज्याभिषेक

 


छत्रपती शिवाजी महाराजांचा दूसरा राज्याभिषेक

लेखन ::श्री नागेश सावंत

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेष्ठ शुक्ल त्रयोदशी अर्थात ६ जून १६७४ रोजी रायगडावर पूरोहित गागाभट्ट यांच्या मार्गदर्शनाने वैदीक पद्धतीने संपन्न झाला . शिवाजी महाराजांच्या काळात शाक्तपंथाचा म्हणजे तंत्रमार्गाचा प्रभाव आढळून येतो . निश्चलपुरी नावाचा एक तांत्रिक ब्राम्हण महाराजांच्या राज्याभिषेकावेळी रायगडावर उपस्थित होता. निश्चलपुरीने महाराजांना राज्याभिषेकावेळी अपघाती घडलेले अपशकुन व उणिवा निदर्शनास आणून दिल्या त्यामुळे त्याच्या सांगण्यानुसर महाराजांनी २३ सप्टेंबर १६७४ रोजी तांत्रिक पद्धतीने दूसरा राज्याभिषेक करवून घेतला. परंतु अवघ्या काही महिन्यातच महाराजांनी दूसरा राज्याभिषेक करवून घेतला त्यामागची कारणे , तत्कालीन परिस्थिति व दुसर्या राज्याभिषेखाचे विधी या विषयीची माहिती आपणास “ श्रीशिवराज्याभीशेक कल्पतरू “या पोथीत मिळते.
बंगाल एशियाटिक सोसायटी , कलकत्ता येथील संग्रहालयात या ग्रंथाची हस्तलिखित पोथी असून तिचा क्रमांक G १०१८५ आहे. या पोथीत १३ पाने असून आठ शाखा आहेत . या पोथीत २३५ पूर्ण व ३ अर्धवट श्लोक आहेत. या पोथीतील पहिली सात पाने एका ग्रंथकर्त्याने तर इतर पाने दुसर्या ग्रंथकर्त्याने तर समासातील श्लोक तीसर्या ग्रंथकर्त्याने लिहिलेले आहेत. समासात कोणकोणत्या देवतांचे पूजन आणि बलिदान करायचे याची यादी दिलेले आहे. यवन हिंदू धर्माचा नाश कसे करत होते हे समासात सविस्तर लिहिले गेले आहे. पोथी लिहिणारे ग्रंथकर्ते हे शिवकालीन असल्याने या पोथीचे लेखन हे शिवकाळात झालेले आहे.
निश्चलपुरी हा वाराणसी क्षेत्रातून दक्षिणेस आला . प्रथम तो नाशिक येथे आला. त्याने काही साक्षात्कार करून शिष्य जमा केले. जापक मांत्रिकांना राज्याभिषेकावेळी डावलण्यात आल्याने हा एक गट नाराज होता . या नाराज गटाचा पुरस्कर्ता निश्चलपुरी हा होता.
श्रीशिवराज्याभीषेक कल्पतरूच्या पहिल्या शाखेत निश्चलपुरीच्या वेगवेगळ्या तीर्थस्थळाच्या तीर्थाटनाचे वर्णन आले आहे. निश्चलपुरी महाराजांना शिवांचा अवतार संबोधतो. दुसर्या , तिसर्या आणि चौथ्या शाखेत गागाभट्टाने केलेल्या राज्याभिषेकाचे वर्णन व राज्याभिषेकातिल दोषांचे वर्णन , घडलेले अपशकुन व निश्चलपुरीचा झालेला अपमान याचे वर्णन आले आहे. पाचव्या शाखेत निश्चलपुरीने केलेले भविष्यकथन व घडलेल्या अनिष्ट घटना याचे वर्णन आले आहे. सहाव्या व सातव्या शाखेत निश्चलपुरीने केलेल्या राज्याभिषेकाचे वर्णन आले आहे. आठव्या शाखेत राजसभेचे वर्णन आले आहे. शिवाजी महाराजांच्या दोन्ही वैदिक व तांत्रिक राज्याभिषेकाचे वर्णन सदर ग्रंथात आले आहे.
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर निश्चलपुरी कोकणातील तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत कुडाळेश्वर येथे आला असता त्याची भेट गोविंद नावाच्या एका ब्राम्ह्नाशी झाली. त्या ब्राम्ह्नास राज्याभिषेकाविषयी उत्सुकता असल्याने त्याने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कसा पार पडला या विषयी निश्चलपुरीकडे विचारणा केली.
निश्चलपुरी म्हणतो शिवाजी महाराजांच्या आमंत्रणावरून गागाभट्ट रायगडास आला. गागाभट्ट यांच्या रायगड आगमनापासुन रायगडावर अशुभ घटना घटू लागल्या . सरनौबत प्रतापराव गुजर नेसरीला युद्धात मारले गेले . शिवाजी महाराजांची पत्नी कशिबाई ह्याचे निधन झाले. महाराजांना गायत्र्यूपदेश झाला त्याच्या आधीच्या दिवशी आकाक्षातून उल्कावृष्टी झाली परंतू निश्चलपुरीने हनुमंत मंत्राच्या साह्याने तिचे निवारण करून अशुभ टाळले. निश्चलपुरीच्या म्हणण्यानुसार गायत्र्यूपदेश अशुभ मुहूर्तावर झाला.
शिवाजी महाराजांनी केळंजा घेतला , संपगावच्या पेठेची लूट , हंबीररावाणी मिळवलेला विजय. या शुभ घटनांचे श्रेय निश्चलपुरीने शिवाजी महाराजांच्या पुण्याईला दिले आहे . मात्र अनिष्ट घटनांबद्दलचा दोष निश्चलपुरीने गागाभट्ट यांना दिला आहे.
शिवाजी महाराजांच्या वैदीक राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांचा विवाह हा पूर्वीच्याच स्त्रियांशी विधिपूर्वक झाला. शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली व दानधर्म झाला . परंतु गागाभट्टाने जाणीवपूर्वक निश्चलपुरीचा अपमान केला निश्चलपुरी नमस्कार योग्य नसल्याचे शिवाजी महाराजांस संगितले. दानधर्मा मध्ये गागाभट्टाने निश्चलपुरीच्या ब्राम्हणाना डावलले व स्वत:च्या मर्जीतील ब्राम्हणांची वर्णी लावली. शिवाजी महराजांच्या सुवर्णतुलेनंतर अपघात घडला त्यात गागाभट्टाच्या नाकाला लाकूड लागले . शिवाजी महाराजांचे कुलोपाध्ये बाळंभट्ट यांच्या मस्तकावर स्तंभावरील लाकडी कमळ पडून अपघात झाला. अशा अशुभ घटना घटत असताना महाराजांचा अभिषेक झाला . रायगडावरील शिरकाई देवी , कोकणचे अधीष्ठित देव परशुराम , हनुमान व वेताळ या स्थानिक देवतांचे पूजन करण्यात आले नाही. सिंहासनास बळी देण्यात आला नाही. गडाच्या संरक्षक देवतांचे पूजन करण्यात आले नाही. भूतपिछाश यांना बळी देण्यात आला नाही. गागाभट्टाच्या या चुकांमुळे अपशकुन झाले. संभाजी महाराजांच्या मस्तकावरून दोन मोती ओघळले. शिवाजी महाराजांची कट्यार म्यानबद्ध न्हवती परंतु वेळीच लक्षात आल्याने अपघात टळला. महाराज रथारूढ होताना रथाचा कणा ( आस ) वाकला . नंतर महाराज हत्तीवर स्वार झाले. धंनुष्याची प्रतंच्या ओढताना बोटातील आंगठी गळून पडली. निश्चलपुरीने राज्याभिशेकानंतर शिवाजी महाराजांची भेट घेऊन या सर्व गोष्टी शिवाजी महाराजांस सांगितल्या तसेच काही दिवसात तेराव्या, बाविसाव्या, पंचावनव्या व पासठाव्या दिवशी अशुभ घटना घडतील अशी भविष्यवाणी केली.
निश्चलपुरीच्या भविष्यवाणीनुसार बाराव्या दिवशी राजमाता जिजाऊ यांचे महानिर्वाण झाले. प्रतापगडावरील पागा जळून हत्ती व अश्व मारले गेले.
गागाभट्टाणी केलेल्या या वैदिक राज्याभिषेकात निश्चलपुरी व त्याच्या शिष्यांच्या पदरी कोणतेही दान तसेच सन्मानजन वागणूक मिळाली नाही. त्यामुळे निश्चलपुरी नाराज होता. निश्चलपुरीने महाराजांच्या या दु:खद परिस्थितिचा लाभ घेतला व महाराजांच्या सांगण्यावरून पुन्हा तांत्रिक विधीने महाराजांना राज्याभिषेक करण्याचे मान्य केले. त्यानुसार निश्चलपुरीने शुभमुहूर्तावर जपकर्त्या ब्राम्हणानद्वारे जप करण्यास सुरवात केली. व पंधरा दिवसात शत्रू हस्तगत होईल असे भाकीत केले त्याप्रमाणे तुकोराम नावाचा प्रभानवल्लीचा सुभेदार हा महाराजांशी बेअदबी करत होता तो सापडला. त्यामुळे शिवाजी महाराजांचा त्याच्यावर विश्वास बसला. निश्चलपुरीकडून शिवाजी महाराजांनी अभिषेक करवून घ्यावा मंत्रोपदेश घेऊ नये असा सल्ला मंत्र्यांनी शिवाजी महाराजांना दिला परंतु महाराजांनी तो सल्ला नाकारला. निश्चलपुरीने अक्षरमंत्राचा उपदेश केला त्यास त्याने विद्या असे म्हटले आहे.
आनंदनाम संवत्सर, आश्विन शुद्ध पंचमीला बुधवार २३ सप्टेंबर १६७४ रोजी निश्चलपुरीने कलशस्थापना केली. मेरूयंत्र धारण करून निश्चलपुरीने राज्यारोहण समारंभ केला. सिंहासनाजवळील भूमी मंत्राने शुद्ध करण्यात आली. दरवाज्याजवळील देवतांना बळी देण्यात आल्यानंतर सहस्त्रभोजन झाले. सिंहासनाच्या आठ सिंहाना बळी देण्यात आले. तसेच सिंहासनावर यंत्रस्थापना करून सिंहासनाला बळी देण्यात आला. एका रत्नखचित आसनावर रौप्य आसन ठेऊन त्यावर महाराजांना बसवून अभीषेक विधीस सुरवात करण्यात आली. कलशामध्ये पाच पानांचे तुरे ठेऊन त्यास लाल रेशीम वस्त्राने गुंडाळले . धूप व दिवे लावण्यात आले. सामवेद गायन सुरु असताना महाराज्यांवर अभिषेकाच्या धारा चालू होत्या. अभिषेकानंतर महाराजांनी नवी वस्त्रे परिधान केली. रायगडास अन्नाचा नैवद्य दिला गेला. सुहासिणींनी महाराजांना ओवाळले त्यानंतर महाराजांनी भोजन केले. वैदिक व तांत्रिकाणी मंत्रांचा जाप करत आशीर्वाद दिले. त्यांनातर निश्चलपुरीने महाराजांना सिंहासनारोहण करण्यास संगितले व त्यांच्यावर रत्नजडीत छत्र धरण्यात आले. अश्याप्रकारे शिवछत्रपतींचा दूसरा राज्याभिषेक विधीयुक्त संपन्न झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक २३ सप्टेंबर १६७४ रोजी तांत्रिक पद्धतीने झाल्यानंतर राज्याभिषेकाच्या दुसऱ्याच दिवशी रोजी प्रतापगडावरील देवीच्या मंदिरावर वीज पडून ते दुभंगले . हनुमंत मंत्राच्या साह्याने आकाक्षातून होणारी उल्कावृष्टी निवारणारा निश्चलपुरी ह्यावेळी मात्र कोणताच तांत्रिक चमत्कार दाखवून हा अपशकून टाळू शकला नाही.
श्री. नागेश सावंत
संदर्भ :- मराठ्यांच्या इतिहासाची साधने :- डॉ. सदाशिव शिवदे
ऐतिहासिक संकीर्ण निबंध खंड ६
शककर्ते शिवराय :- विजयराव देशमुख , छत्रपती शिवाजी महाराज :- वा.सि.बेंद्रे
छायाचित्र साभार गुगल

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....