विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 11 August 2020

#सरखेल_कान्होजी_आंग्रे

 

#स्वराज्याचे_शिलेदार

#सरखेल_कान्होजी_आंग्रे

(ऑगस्ट १६६९ ते ४ जुलै१७२९)

सरखेल या शब्दाचा अर्थ आरमार प्रमुख असा होतो.
आंग्रे १८ व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते.सरखेल कान्होजींचा दरारा....

कान्होजी आंग्रे आणि शाहू राजे (पहिले) यांच्यामध्ये १६ नोव्हेंबर १७१३ रोजी तह झाला;
सातारकर छत्रपतींची कोकणची जहागीर मोगलांपासून सुरक्षित राखण्याची जबाबदारी छत्रपती पहिले राजाराम यांनी सिधोजी घोरपडे यांचेवर सोपविली होती, परंतु हे जोखमीचे काम घोरपडे पार पाडू शकले नाही आणि पुढे ही जवाबदारी कान्होजींवर आली.

मोगलांच्या जुलमापासून मुक्त केलेल्या कोकणातील जहागिरीला राजमुद्रेची संमती मिळाली, म्हणून कान्होजी आंग्रे यांचे समाधान झाले; तर आपले हितसंबंध राखण्यासाठी आपला एक कर्तबगार प्रतिनिधी आपण कोकणासाठी मिळविला, असे समाधान शाहू छत्रपतींना झाले.

१७१३ मध्ये कान्होजींना जो प्रदेश दिला गेला त्यात सिद्दीचा काही प्रदेश दिला गेला होता यामुळे कान्होजी आणि जंजिरेकर सिद्दी यांचे युद्ध झाले. सिद्दीचे परिपत्य करण्यासाठी कान्होजींना इ. स. १७१३ ते १७१५ पर्यंत खूप परिश्रम करावे लागले. अखेर ३० जानेवारी १७१५ मध्ये कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह झाला त्यात

१. मामलत तळे व गोरेगाव, गोवेळ व निजामपूर या महलांवर आंग्रे यांना एक हजार रुपये कर मिळाला. तळेपैकी ८००, गोरेगाव ६००, गोवळ १०००, तर्फ निजामपूर १७५ मिळून रुपये २५७५ पैकी १००० रूपये कान्होजींना मिळाले.

२. तर्फ नागोठणे, अष्टमी पाली, आश्रेधार पेटा व अंतोणे यांतील निम्मा वसूल कान्होजींनी घेण्याचे ठरले.

या तहाने आपली सत्ता कमी झाली हे शल्य जंजीरेकराचे मनात सलत राहिले आणि त्याने कान्होजींचा पराभव करण्यासाठी मुंबईकर इंग्रजांची मदत घेण्याचा उपक्रम केला, इंग्रजांनी मदत केली देखील परंतु कान्होजी पुढे त्या दोघांचे काही चालले नाही.
सुरतपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत त्यांचे अनिर्बंध वर्चस्व होते.
सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आयुष्यातील प्रमुख लढाया..
१७०२ – कोचीनमध्ये सहा इंग्रजांसह काही जहाजांवर ताबा.
१७०६ – जंजिऱ्याच्या सिद्दीवर हल्ला आणि विजय.
१७१० – ब्रिटिश लढाऊ जहाज गोडोल्फिनशी
दोन दिवस झुंज दिल्यानंतर केनेरी बेटांवर
(आताचे खांदेरी) कब्जा.
१७१२ – मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम
ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज पकडले. ३००००
रुपयांच्या खंडणीनंतर सुटका.
१७१३ – ब्रिटिशांकडून १० किल्ले हस्तगत.
१७१७ – ब्रिटिशांनी केनेरी बेटांवर केलेला
हल्ला असफल. ६०००० रुपयांची खंडणी वसूल केली.
१७१८ – मुंबई बंदराची नाकेबंदी. येणाऱ्या
जाणाऱ्या जहाजांकडून कर वसुली.
१७२० – ब्रिटिशांचा घेरिया (विजयदुर्ग)
किल्यावर हल्ला असफल.
१७२१ – अलिबागवर ब्रिटिश आणि पोर्तुगीज
आरमाराचा हल्ला असफल.
१७२३ – ईगल आणि हंटर या दोन ब्रिटिश
जहाजांवर हल्ला.
===========================
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*🚩मराठा🚩*

समुद्र..आरमार..जलदुर्ग यांची आवड ज्यांच्यामुळे निर्माण झाली त्या मराठा आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्रुत्युनंतरही औरंगजेबाला मराठी मुलूख काबीज करता आला नाही.यामागे अनेक शुर सरदारांचे योगदान होते.कोकण किनार्यावरील मराठी राजसत्तेचा जागता पहारा ठेवणारे कान्होची आंग्रे.
“नजर ससाण्याची, झेप गरुडाची व पकड मगरी’"
ची अशा यथार्थ शब्दांनी गौरविलेल्या या समुद्रावरील शिवाजीने (कान्होजी) आपले प्रमुख ठाणे म्हणून विजयदुर्ग व कुलाबा किल्ल्याची निवड केली.

कान्होजी आंग्रेंनी सागरी सत्तेवरची मराठेशाहीची पकड इतकी बळकट केली की त्यांचा हा पराक्रम चमत्कारात गणला जावा.शत्रुंनी त्यांचा उल्लेख समुद्री चाचे असाच करायचे खरं तर आपल्या समुद्रावर आपली सत्ता आणि हे सर्व शत्रु चाचे आहेत.इंग्रज त्यांना जमिनीवरचं आणि पाण्यातलं जे मिळेल ते गिळंकृत करणारा 'लॅण्डशार्क' म्हणायचे.. इंग्रजांनी कान्होजींना लुटारु,चांचा,खलपुरूष,बंडखोर सगळं काही म्हणुन घेतलं आणि आपल्या वकिलांना त्याच्या दारी तिष्ठत राहायला पाठवताना मात्र 'त्याच्याशी सभ्यपणे बोलावे' अशा सूचनाही दिल्या. पोर्तुगिजींनी तर कान्होजीला गलिच्छ शिव्या दिल्या तरीही त्यांची बार्बारोसाशी (तुर्की साम्राज्याचा नौसेनासंघटक व सेनापती) तुलना करुन त्याच पोर्तुगिजींनी त्यांना मैल्यवान भेटीही पाठवल्या.पश्चिम किनारपट्टिवर इंग्रज,डच,पोर्तुगिज,फ्रेंच इ. परकिय सत्ता होत्या पण ह्या युरोपिय शक्तींपैकी कुणाचही एकमेकांशी पटत नसत. इतकं असुनही आठराव्या शतकाच्या सुरुवातीला ह्या परदेशी रक्तपिपासूंना कोकण किनार्यावरचा सर्वमान्य शत्रू निवडायला सांगितलं असतं तर त्यातल्या कुणीही मोगल किॅवा मराठ्यांच नाव घेतलं नसतं.ते एकमुखाने म्हणाले असते : "कान्होजी आंग्रे".

कान्होजी आंग्रे युद्ध ह्या घटनेकडे खुप विचारपुर्वक पाहात असत लढाईतील यश केवळ बेफाम धाडसावर अवलंबुन नसुन अनावश्यक धोके पूर्ण विचारानी टाळणं हे डावपेचाइतकच महत्वाचं होतं हे त्यांना उमगलं होतं.
सुरुवातीला कान्होजींनी आपल्या लढाऊ जहाजांचा वापर नौदलासारखा न करता किनार्यावरील गस्त घालणार्या जहाजांसारखा करुन ज्या जहाजांकडे मराठ्यांचे दस्तक परवाने नसतील त्यांना दंड भरायला लावणे इतकाच केला.समुद्रावरील मराठ्यांची सत्ता मुकाट्यांनी मान्य करायला लावणं हे त्या परिस्थितीतलं काहीसं महत्वाकांक्षी उद्दिष्ट कान्होजींनी बाळगलं होत.

शिवछत्रपतींच्या मृत्युनंतर धामधमीच्या काळी संभाजीराजेंची हत्या व राजाराम महाराज दुर जिंजीप्रदेशी अशा वेळी आरमाराचं संपुर्ण परिवर्तन आणि कोकणचा पद्धतशीर रितीने कबजा मिळवला तो ह्या एकाच माणसानी.जिंजीला राज्याभिषेकाच्या वेळी त्याच्या नेमणुकीची घोषणा करण्यापलीकडे छत्रपतींकडुन कान्होजींना फारसा साहाय्य नव्हतं.पण कान्होजी मात्र मराठ्यांच्या छत्रपतीखेरीज कुणालाही स्वामी मानायला तयार नव्हते.राजाराम महाराज जिंजीवरुन स्वराज्यात आल्यावर त्यांनी फार मोठा कोकणी मुलुख त्यांच्या हवाली केला.७-८ वर्षांच्या अथक परिश्रमाने निर्माण केलेल्या सागरी मुलुखावर राजाराम महाराजांनी आपल्याला आरमाराचा सरसेनापती करावे अशी अपेक्षा करणे कान्होजींची चुकीची नव्हती पण राजाराम महाराजांनी उत्तरेला कान्होजी आंग्रे व दक्षिणेला भवानजी मोहिते यांना आपापल्या विभागाचे नायब सुभेदार नेमले.

मराठा सार्वभौमत्व न जुमानता स्वखुषीने कारभार करायला आणि वेगळी वाट धरायला जर कारणच हवं असेल तर ते इथे होतं. पण शिवाजी महाराजांच्या घराण्याच्या सार्वभौमाविरुद्ध असणार्या विचाराचा त्यांच्या मनाला स्पर्शही झाला नव्हता.आपली बढती व बर्खास्ती त्यांनी राजांवर सोपवली.४० वर्षापुर्वी जेव्हा आरमार स्थापन केलं त्यावेळी अारमाराची कर्तव्य कोणती,जबाबदार्या कोणती ह्याची शिवरायांनी स्पष्ट शब्दात मांडणी केली होती.किनारपट्टीचं संरक्षण,देशाच्या समुद्रावरुन चालणार्या व्यापाराच्या धोक्यापासुन बचाव आणि सर्व जहाजांकडून जकातीची वसुली.आता कान्होजीच्या काळात आरमाराला दाढा,पंजे आणि पिळदार स्नायू लाभले होते.आता ते कामगिरीला सज्ज झालं होतं.सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी आरमाराला कान्होजीसारखा थंड डोक्याचा आणि कर्तबगार सरखेल लाभला होता.कान्होजींनी समुद्रपर्यटनाला निघालेल्या सर्व जहाजांना परवाने द्यायला सुरुवात केली होती त्यांना "दस्तक" म्हणत.

पोर्तुगिझांच्या "कार्ताझ" इतकीच ह्या दस्तकींची किंमत होती.आणि सवलती तशाच होत्या.
कान्होजींच मुख्य ध्येय आणि उद्योग ,अधिक मोठी आणि अधिक मजबुत जहाजं बांधणे हेच होतं.हिंदुस्थानातल्या जहाजांच्या रचनेत पुरातन काळापासून चालत आलेल्या पध्दतीत काही फरकच पडला नव्हता.सगळी जहाजं एका ठरावीक नमुन्याचीच बांधली जायची.फक्त त्यातली काही मोठी होती.आणि काही लहान होती एवढाच काय तो फरक.जहाज बांधणीच्या एकूण कल्पनेतच आमुलाग्र फरक घडवून आणायची गरज होती.
कान्होजी व पोर्तुगिजांशी असणारा मुख्य दुवा"मॅन्युएल मोराईस डि कार्व्हालो" नावाचा इसम होता.ह्या माणसाला कान्होजी आंग्रेंनी जहाज बांधणीच्या आणि रचनेच्या कामात आपला सल्लागार नेमला.वस्तुत: त्यांनी बऱ्याच परदेशी तंत्रज्ञांना,बंदुकबाजांना,बंदुकीच्या नळ्या करणाऱ्यांना,बंदुकीची दारु करणाऱ्यांना,अश्वपरिक्षा असणाऱ्यांना अशा अनेकांना आपल्या पदरी नोकरीस ठेवले होते.पण सर्वात जास्त परदेशी लोक होते ते जहाद बांधणीचे लोक."मॅन्युएल मोराईस डि कार्व्हालो" या सोबत आणखी एका पोर्तुगीज नावाचा वारंवार उल्लेख आढळतो ते म्हणजे"मॅन्युएल डि कॅस्ट्रो" याचा. हा निशाणबाजीत अतिंशय तरबेज होता.

इंग्रज,फ्रेंच,डच,पोर्तुगिझ हे मराठ्यांच्या जहाजांचा उल्लेख "आंग्र्यांची गलबतं" असा किंवा "आग्र्यांचा आरमार" असासुद्धा करायला लागले.सेनापतीच्या नावाने फौजा ओळखल्या जाण्याचे दाखले इतिहासात क्वचितच आढळतात.युद्धात लढणार्या खलाशी किंवा सैनिकांपैकी फार थोड्याजणांना आपल्या नौसेनापतीचं नाव ठाऊक असतात.मराठ्यांच्या आरमाराचा उल्लेख "आंग्र्यांचा आरमार असा करणे" हेच आंग्र्यांचा पराक्रमाची साक्ष आहे.पण ह्यांमधुन एक विचित्र गोष्ट घडली छत्रपतींच्या मनात आंग्रेविषयी संशय निर्माण करण्यासाठी इंग्रज,पोर्तुगिज,डच,फ्रेंच ह्या लोकांनी त्यांच्या अजोड पराक्रमचा विपर्यास करुन कान्होजीबद्दल अफवा पसरवण्यास सुरुवात केली की, कान्होजी आंग्रे स्वतंत्र राजा असल्याचे जाहीरपणे सांगतो छत्रपतींच्या अनुमतीशिवाय आपला अंमल गाजवु पाहतो.याउलट कान्होजींनी कंपनीच्या सल्लागारांना वारंवार बजावलं होतं की आपण "मराठा साम्राज्याचे सरखेल आहोत.समुद्राचे सार्वभौमत्व मराठ्यांच्या छत्रपतीकडे आहे."

कान्होजींनी मानसून ,बाॅम्बे,गोडोल्फिन,अॅन हे कंपनीच्या अत्यंत महत्वाच्या जहाजांवर यशस्वी हल्ला चढवला.
चर्चगेट,बझार गेट हे जे आज मुंबईच्या ठिकाणांची नावे आहेती त्या कान्होजी आंग्रेंपासुन बचाव करण्यासाठी मुंबई शहराभोवती बांधलेल्या भिंतीच्या दरवाजाचे नाव आहेत.
कान्होजींच्य् विरुध्द लढाईस इंग्रजांनी सहा महिन्यांच्या आत ब्रिटानिया,फेम,रिव्हेंज,व्हिक्टरी,फ्राम,बून अशी अधिक बलवान असं आधुनिक पद्धतीच आरमार उभा केलं.नवीन नियुक्त झालेला गव्हर्नर "बुन" ह्याने विजयदुर्गावर हल्ला करण्यासाठी आपलं हे आरमार बाहेर काढलं व ‪१८ जून‬ १७१८ ला मोठी नामुष्की पदरी पाडुन हे आरमार मुंबईला परतले.हा हल्ला सर्वात मोठा समजला जातो.कोकणच्या इतिहासात झाला नाही असा तोफांचा भडिमार विजयदुर्गावर झाला.आजही विजयदुर्गाच्या भोवताली खडकावर आदळलेल्या तोफांचे खुणा आहेत.

पण आंग्र्यांचे बळ इतके वाढले होते की हा हल्ला त्यांनी यशस्वीरित्या परतवला व शत्रुसैन्याचा जबर नुकसान केलं ही लढाई अहंकारी गव्हर्नर बुनला मोठी चपराक होती ह्या हल्ल्यातुन त्याने धडा न घेतल्याने पुढे त्याच्या पदरी आणखी नामुष्की आली.फेमस होण्याच्या बाबतीत तत्कालीन मुघल बादशाह, छत्रपती शाहू आणि बाजीराव यांनाही आंग्रेंनी मागे टाकले होते . मलबार ते नॉर्थ कॅरोलिना पर्यंत प्रसिद्ध पावलेले एकमेव कान्होजी आंग्रे. छत्रपतींनी कान्होजींचे इतके विराट स्वागत केले होते कि जेजुरी ते सातारा पूर्ण रस्ता भंडारा उधळल्या मुळे सोनेरी झालेला.
जमिनीवर कुणाचीही सत्ता असो, खंदक आणि भिंतीच्या कडेकोट बंदोबस्ताआड असणार्या व्यापारी वसाहतीवर कोणाचीही मालकी असो पण अठराव्या शतकाच्या सुरुवातीला कोकणच्या पाण्यावर सत्ता कोणाची होती यावर दुमच नव्हतं.
"सत्ता होती ती मराठा आरमार प्रमुख सरखेल कोन्होजी आंग्रे यांचीच!"

अलिबाग शहरात कान्होजी आंग्रेंची समाधी आहे. मुंबई नवल डाॅकयार्ड मध्ये त्यांचा पुतळा आहे.एकेकाळी जिथे एक ब्रिटीश किल्ला होता तिथे आता भारतीय वेस्टर्न नव्हल कमांडचा तळ आहे.ह्या तळाला कान्होजी आंग्रेंच्या गौरवाप्रित्यर्थ आय.एन.एस.आंग्रे ( INS ANGRE) असे नामकरण करण्यात आले.
💐

फोटो साभार anup1479

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...