|| शिवबाचे शूरवीर ||
छत्रपतींच्या महावीरांच्या शौर्यगाथा
" शूरवीर तानाजी "
तानाजी मालुसरे , हे शिवरायांचे अगदी बालपणीचे सवंगडी . हिंदवी स्वराज्याची , रायरेश्वराच्या
पवित्र मंदिरात शपथ घेताना , छत्रपती शिवरायांबरोबर
तानाजी होते . प्रतिकूल परिस्थितीत राजांना साथ देणारा
खरा मावळा म्हणजे , ' तानाजी ' . तानाजी उमरठे गावचे
होते , तसेच तानाजी अंगापिंडाने भरदार होते , कोरीव मिशा होत्या , आणि ते बेडर व धाडसी होते , आणि
विशेष म्हणजे त्यांचा स्वतःच्या ताकदीवर विश्वास होता .
■ तानाजींचा संगमेश्वरातील पराक्रम : -
शिवरायांनी कोकण स्वारीत , संगमेश्वर
जिंकले , पुढे तानाजी आणि पिलाजी [ पिलाजी नाईक
हे पुरंदरचे किल्लेदार , नीलकंठराव सरनाईक ह्यांचे
चिरंजीव ] , संगमेश्वर येथे बंदोबस्तासाठी आणि रस्ते
दुरुस्तीकरीता ( रस्ते खूप खराब होते ) , दोघांनी संगमेश्वराची उत्तम घडी
बसविली , पण अचानक सुर्व्यांनी घात केला , काळोख्या रात्री मराठ्यांवर
हल्ला केला , सुर्व्यांना पाहून पिलाजी पळ काढण्याच्या बेतात होते ; परंतु
भगव्याच्या सौरक्षणासाठी व राजनिष्ठेकरिता
तानाजींनी पळ काढण्याऐवजी लढण्याचा निर्णय घेतला
तानाजींनी , ढाल - तलवार घेऊन सुर्व्यांचा जोरदार प्रतिकार करायला सुरुवात केला , तानाजींना पाहून
मावळ्यांचा उत्साह वाढला आणि मराठे निकराने लढू
लागले , त्यामुळे सुर्व्यांना पळता भुई थोडी झाली .
हा तानाजींचा संगमेश्वरातील , यादगार विजय होता .
■ शिवराय आणि तानाजी : -
शिवरायांनी दरवेळी तानाजींचा पराक्रम जवळून पाहिला होता , प्रतापगडच्या
युध्दावेळी तानाजींनी मोठा पराक्रम गाजविला होता , पुढे अबू तालिब ,
शाईस्तेखानावर छाप्याच्यावेळीही ते राजां -
- बरोबर होते . शिवराय आणि तानाजींमध्ये मैत्रीचे अगदी घट्ट नातं होतं . राजांनी तानाजीस पायदळाचे
१ हजारी अधिकारी केले होते .
■ कोंढाण्याचा रणसंग्राम : -
नोव्हेंबर १६६९ अखेर , शिवरायांनी , औरंगजेबाविरुद्धचा तह मोडला , राहुजी
नाना यांनी वऱ्हाडात स्वारी केली , प्रचंड लूट केली .
पुढे हिंदवी स्वराज्याच्या फौजा बागलाण व खानदेश भागात थैमान घालू लागले , मराठ्यांचा आत्मविश्वास
पाहून मोगली सैन्य कच खात होते . शिवरायांनी
मुलतानगड , मुल्हेर , चोलागड ह्या किल्ल्यांना वेढा घातला . हिंदवी स्वराज्याची वाढलेली ताकद पाहून
आलमगीर औरंगजेबसुद्धा हबकला . अशातच एके
दिवशी राजे , राजधानी राजगडावर असताना आऊ -
- साहेब राजांस म्हणाल्या , " शिवबा कोंढाणा घेणे ,
कोंढण्यासारखा बेलाख दुर्ग शत्रूंच्या ताब्यात असणे ,
हे दौलतीकरिता चांगले नाही " , त्यावर राजे म्हटले ,
" माँसाहेब दुर्ग काही काळामध्ये स्वराज्यात येईल " ,
असं राजांचं बोलणं ऐकल्यावर , जिजाऊंच्या चेहऱ्यावर
एक स्मित उमटलं ; कारणचं होतं कोंढाणा हा जिजाऊं -
- चा आवडता दुर्ग , तसेच विशेष म्हणजे " सतराव्या शतकात दुर्ग कोंढण्याला बारा मावळाचे , प्रवेशद्वार
म्हणून ओळखले होते " .
कोंढाणा कसा घायचा ,
ह्याची मसलत आऊसाहेबांच्या कक्षात चालू होती ,
तेव्हढ्यातच वर्दी आली की , सुभेदार तानाजी मालुसरे
त्यांच्या खाजगी कामाकरिता येत आहेत . तानाजींनी कक्षात प्रवेश केला , प्रथम राजांना मुजरा केला व
माँसाहेबांचे पवित्र चरण स्पर्श करून , त्यांच्याकडून
आशीर्वाद घेतला . पुढे तानाजी राजांस म्हटले ,
" राजे रायबाचं लगीन काढलंया " , त्याचीच पत्रिका
घेऊन आलोय , असं बोलून तानाजींनी पत्रिका राजांच्या
समोर ठेवली ; परंतु राजे काही बोलनात ! तानाजी म्हटलं , " राजे
लग्नकार्यास आपण यावे ही सदिच्छा आहे आमची ! " , त्यावर राजे बोलते झाले की
, ताना शुभकार्यास येता येणार नाही र गड्या , मग तानाजी का राजे काय झालं ?
राजे म्हणाले , " कोंढण्याचं लगीन ठरविलं आहे [ अर्थात कोंढण्याची मोहीम ]
. महाराजांचे
शब्द ऐकून , तानाजींनी क्षणाचा ही विलंब न करता राजांकडे मोहीम [ कोंढण्याची ] मागितली . राजे त्यावर
म्हणाले अरे ताना घरात लग्नकार्य आहे , आणि ही मोहीम साधिसोपी नाही , जीवावर सुद्धा बेतू शकतो ,
तानाजी राजांच्या चरणाकडे बघून म्हटले , " तुम्ही तिकडं मोहिमेवर आणि आम्ही इकडं वरबाप म्हणोन
मंडपात मिरवू काय , राजे आधी लगीन कोंढण्याचं मग माझ्या रायबाचं " ,
आपणांस आई तुळजाभवानीची आन " , तानाजींचा हट्ट पाहून , राजांनी मोहीम
तानाजींवर सोपविली ; धन्याच्या प्रति स्वामिनिष्ठा पाहून मांसाहेबांचे
अश्रू वाहू लागले , राजांनी तानाजींना आलिंगन दिलं .
पुढे मसलतखाण्यात राजांनी तानाजींना व नाईकांना बोलावले , पहिला प्रश्न राजांनी तानाजीला विचारला , " तानाजी किती फौज पाहिजे ?
प्रचंड आत्मविश्वासाने तानाजी म्हटलं की , आपलं
निवडक ५०० मावळे घेऊन गड ताब्यात घेऊ "
[ सुभेदारांचं उत्तर एकूण राजे आणि नाईक चकित
झाले ] , तानाजी नेहमी म्हणत , मोठमोठ्या फौजा घेऊन किल्ल्याला वेढा घालून
जिंकण्यापेक्षा , एका झडपेत [ गनिमी काव्याने ] किल्ला जिंकणे हेच खरे
यश . राजांनी नाईकांना विचारले गडावर किती गनीम आहे , नाईक म्हणतात एकूण १५०० सैन्य आहे , त्यात
१ हजार राजपूत सैन्य आहे , व ४०० ते ५०० पठाण आहेत , तसेच गडाचा किल्लेदार उदयभान [उदयभानू]
हा कडक शिस्तीचा राजपूत आहे . अशी एकंदर कोंढाणा दुर्गाची परिस्थिती होती .
● उदयभान आणि तानाजी : -
उदयभान आणि तानाजी
, शरीरयष्टीने मजबूत होते , दोघेही वीर होते . दोघांबद्दल काही दंतकथा
प्रसिद्ध आहे त्या अशा की , उदयभान एका वेळेस दीड बकरा खात असे , तर तानाजी
एका
वेळेस ६४ भाकऱ्या खात असत , तात्पर्य एकचं दोघेही
बलवान होते , फरक एवढाच की , " तानाजी धर्माचं कार्य करत होते , याउलट उदयभान अधर्माच काम करायचा ".
तानाजींचा एक विशेष गुण म्हणजे ते , शीलवान होते .
● स्वराज्याच्या नरवीराची झडप : -
तानाजींनी निवडक ५०० मावळे , आणि
मोत्याजी मामा , सूर्याजी मालूसरे ( तानाजींचे बंधू ) , व
शेलार मामा [ वय ८० वर्षे ] , यांना बरोबर घेतले ; विशेष म्हणजे तानाजींनी मोहिमेच्या अगोदर वेषांतर करून
कोंढण्याची बारीक माहिती काढली होती , त्यानुसार मोहिमेची रणनीती ठरविली होती .
तानाजींनी मोहिमेचा दिवस ठरविला ,
' शके १५९१ , सौम्य नाम संवत्सराची माघ वद्य नवमी
म्हणजे शुक्रवार , दि. ४ फेब्रुवारी १६७० ला [ जेधे -शकावली नुसार ] , व रात्री हल्ला करायचं ठरविलं .
तानाजींनी सैन्याचे दोन भाग केले , ते खालीलप्रमाणे : -【१ 】३०० मावळे :: तानाजी आणि मोत्याजी मामा
व
【२ 】 २०० मावळे :: सूर्याजी आणि शेलार मामा
तानाजी ३०० मावळे घेऊन द्रोण -
- गिरीचा कडा चडून [ इकडे शत्रूची गस्त नव्हती कारण कडा चढवयास खूप अवघड
होता ] , समोर जे कोणी येईल त्यांना कापून कल्याण दरवाजाजवळ जाऊन ,
उरलेल्या सैन्याला घेऊन जोरदार हल्ला होईल अशी रणनीती होती .
● लढाईला सुरुवात : -
अखेर लढाईचा दिवस उजाडला, तानाजींनी व्यवस्थितरित्या मोहिमेची रणनीती सांगितली
, प्रत्येकाला काय करायचे आहे हे स्पष्ट सांगितलं , चुकी
व्हायला जागाच सुभेदारांनी ठेवली नव्हती , इतकं नियो -
- जन उत्तम होतं . ठरल्याप्रमाणे रात्रीच्या सुमारास
तानाजी आणि मावळे [ ३०० मावळे ] , द्रोणागिरीच्या
कड्याजवळ आले , मराठ्यांच्या फौजेत दुर्गम डोंगर वा
कडे चढण्याकरिता , एक विशेष पथक असे , तेच पथक
सर्वप्रथम कडा चढून वरती गेलं आणि मावळ्यांना वर
येण्यासाठी दोर बांधले , हळूवारपणे सुभेदार आणि ३००
मावळा वर आले . तानाजींनी सर्वांना इशारा केला आणि
कोंढण्यावर , " हर हर महादेव " चा जयघोष करत मावळे शत्रूवर तुटून पडले ,
तानाजी सपासप कापत होते , मावळे त्वेछाने लढत होते , इतक्यात गडाचा सरनौबत
तानाजींच्या रोषाने धावत आला , तानाजींनी एका घावातच त्याचे शीर धडावेगळे
केले , मराठे प्रबळ आत्मविश्वासाने लढत होते , आणि पुढे तानाजींनी कल्याण
दरवाजा उघडून सूर्याजी , शेलारमामा आणि
मावळ्यांना आत घेतले . मराठ्यांनी गडावर हमला
केलाय , हि खबर किल्लेदार उदयभान याला मिळाली ,
तोही तातडीने निघाला . कोंढण्यावर मोगलांचे सैन्यबळ
हे १५०० हून अधिक होते , तर मराठे ५०० होते ; परंतु
१ प्रहरानंतर शत्रूपक्षातील ५०० सैनिक मारले गेले , तर
३० ते ४० मावळे धारातीर्थी पडले . लढाईच्या सुरुवाती -
- पासून विजयश्री मराठ्यांच्या बाजूने होता . तानाजी ,
सूर्याजी , मोत्याजी आणि शेलार मामा पराक्रमाची शर्थ करत होते . इकडे
उदयभान सुद्धा भान बाळगून लढत होता , पुढे उदयभान आणि तानाजींचा सामना झाला
.
रणांगणावर उदयभान तानाजींकडे त्याच्या करड्या नजरेने पाहत होता , तानाजींनी हे पाहून मिशांवर ताव
देऊन उदयभानावर जोरदार हल्ला केला , दोघांच्या तलवारी विजेप्रमाणे लखलखत होत्या , दोघेही वीर .
दोघांमध्ये जोरात लढाई चालू होती , इतक्यात तानाजींची
ढाल तुटली , तानाजींनी लगोलग कट्यार काढली व
कट्यारीचा ढालीसारखा उपयोग करून उदयभानाचे वार
आडवू लागले [ मराठी सेनानी त्यांचे काही विशेष डाव होते त्यातील हाच एक
डाव , युद्धकाळात प्रसंगी ढाल नसता , कट्यारीचा वापर ढालीसारखा करत असत ,
अशा विशेष काही डावांमुळेच मराठ्यांची युद्धनीती
श्रेष्ठ ठरत असत . ] तानाजी - उदयभान यांमध्ये युद्ध
चालूच होते , दोघांच्या देहावर वार होते [ पण असं
म्हणतात , योध्याच्या देहावरील वार , जखमा म्हणजे
योध्याचे भूषण ] , जवळपास १ घटिका दोघांमध्ये युद्ध चालू होते , पुढे तानाजींची उदयभानावर सरशी झाले ,
उदयभान पुरता ओळखून चुकलेला तानाजीवर मात करणे शक्य नाही , त्याने तानाजींपुढे मान झुकविली ,
उदयभान राजपूत असल्यामुळे तानाजी त्यास म्हणाले ,
" उदयभान तू राजपूत आहेस त्यामुळे तुला मी सोडतो ,
जा शस्त्र खाली ठेव आणि निघून जा " , इतक्यात मागून
तानाजींवर पाठमागून एका हशमाने वार केला , समशेर पार सुभेदारांच्या पोटात घुसविली , त्या हशमाचं नाव
होतं बाबुखान ( लगोलग बाबुखान याने पळ काढला )
, संधीचा फायदा घेऊन उदयभानाने समोरून तानाजींवर
वार केला , तानाजींनीही प्रसंगावधान दाखवून उदय -
- भानाच्या गळ्यावर वार केला , परंतु ह्याझटापटीत
सुभेदार पडले , तानाजींना वीरमरण आलं . हा सर्व प्रकार लढता लढता शेलार मामा पाहत होते , [ समोर
भाच्यास वीरमरण आलंय , पण लढाई सॊडून ते जाऊ
शकत नव्हते ] , दोन्ही सेनापती पडले एकूण , दोन्ही पक्षाचे सैन्य चलबिचल
झाले ; पण सूर्याजी धैर्याने पुढे आले , मावळ्यांना लढण्यास प्रेरित केले ,
आणि हशमांची कत्तल करून कोंढाणा जिंकला , फत्ते केला .
दुर्ग ताब्यात येताच , सुर्याजीने पागेचे खण [ गवताची
गंज्या ] पेटवून , दुर्ग जिंकल्याचे राजांस सूचित केले .
राजांनी इशर्तीची खूण पाहून , मनोमन तानाजींचे कौतुक
केले , मांसाहेबांना कोंढाणा स्वराज्यात आल्याची खबर दिली , आणि राजे वाट पाहू लागले ते सूर्योदय होण्याची ,
कधी सूर्य उगवतोय आणि तानाजीला जाऊन भेटतोय
अशी घाई राजांना झाली होती .....
● राजांचे कोंढण्यावर आगमन : -
राजे दुर्गावर आले , परंतु नौबती वाजल्या नाही की , तानाजी समोर आला नाही ,
राजांना थोडी मनोमन चाहूल लागली की काहींना काही दुःखद झालंय , राजे
मध्यावर आले , सर्वजण खाली मान घालून होते , राजे ताना , ताना ओरडत होते पण
, ओ देणारा कोणीही नव्हता , अखेर राजे तानाजींच्या पवित्र देहापाशी आले ,
आणि ते हबकले सूर्याजीने सर्व इत्यंभूत माहिती राजांना सांगितली , त्यावर
राजे म्हटले , " गड आला परंतु आमचा सिंह गेला " .
असा हा कोंढण्याचा रणसंग्राम होता , तानाजींच्या पराक्रमामुळे कोंढण्यासारखा बेलाख दुर्ग वा बारा
मावळाचा प्रवेशद्वार हिंदवी स्वराज्यात आला , व
खऱ्या अर्थाने एका विशिष्ठ वेळाने " स्वराज्यविस्तारास
सुरुवात झाली " .
◆ सिंहगड : -
तानाजींच्या मृत्यचे कळता , अत्यंत दुःखी
मनाने , राजे उद्गारले , " गड आला परंतु आमचा सिंह गेला " , हे निर्विवाद सत्य आहे , परंतु तानाजींची याद
म्हणोन , कोंढाणा वा कन्यकडा ह्या दुर्गाचे राजांनी ,
" सिंहगड " , असे नामकरण केले , हे पूर्णतः अनैतिहासिक आहे ; कारण कोंढण्याचे सिंहगड
हे पूर्वीपासून प्रचलित होते , तानाजीने सिंहगड घेण्यापूर्वी ( वा पुरंदरच्या तहात हा दुर्ग देण्यापूर्वी ) ,
७ वर्षे आधी , दस्तुरखुद्द शिवरायांचे दि. ३ एप्रिल १६६३
, च्या पत्रात " सिंहगड " असा स्पष्ट उल्लेख आहे .
■ स्वराज्यकर्म : -
राजांनी तानाजीचे अंत्यसंस्कार योग्य
रीतीने केले , पुढे स्वतः जातीने हजर राहून रायबाचे लग्न
लावून दिले , धन - धान्य दिलं , तसेच सुर्याजीरावांस
दुर्ग कोंढण्याची किल्लेदारी दिली आणि लढाईत पराक्रम
गाजविलेल्याना मावळ्यांस मानाची कडी दिली , व विशेष म्हणजे कोंढण्यावर
तानाजींची समाधी सुध्दा बांधली . पुढे दि. २४ फेब्रुवारीला स्वराज्यास
दुसरे राजकुमार मिळाले , शिवरायांना सोयराबाईंनकडून पुत्र प्राप्त झाले ,
त्यांचे नामकरण " राजारामराजे " म्हणोन
केले होते .
■ विशेष टीप : - कोंढण्यावर स्वराज्याचे सर्वात मोठे
दारूचे कोठार होते .
■=■=■=■=●●●●=■=■=■=■
इतर माहितीपूर्ण , ऐतिहासिक लेख अभ्यासणाकरीता खालील लिंकला अवश्य भेट द्या :-
https://www.facebook.com/जगविजेता-संभाजी-2212452729012520/
" अखंड भारताचा विजय आहे "
|| जय हिंद ||
राहुल रमेशजी पाटील ,(शंभूमहितीगार)
टीप-: फोटो हा संकल्पित आहे
फोटो साभार anup1479
No comments:
Post a Comment