विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 8 August 2020

माय लेकरू हृदयभेट :-

 माय लेकरू हृदयभेट :-Chhatrapati shivaji maharaj & masaheb jijabai | Shivaji maharaj hd ...

औरंगजेबासारख्या साक्षात मृत्यूच्या कराळ दाढेत अडकले शिवराय परत यावेत म्हणून आऊसाहेबांनी काय काय म्हणून केलं नसेल. स्वतःच्या पोटचा गोळा दूर आहे, प्राणापेक्षा प्रिय नातूही दुरावलाय. अन्न-पाणी तरी गोड लागत असेल काय
त्या माऊलीला?
आणि अश्यात एक दिवस वर्दी येते, काही बैरागी आले आहेत. भेटायची इच्छा नसताना आऊसाहेब त्यांना भेटल्या असतील. मायबाप विठू-माऊलीच्या पताक्याच्या भगव्या रंगात रंगलेल्या, तुकारामांच्या अभंगांत तल्लीन झालेल्या, खांद्यावर शहाजी राजांनी स्वराज्यासाठी दिलेला भगवा घेतलेल्या सगळ्या बैराग्यांना वरवरचं भेटून परतीला निघालेल्या आऊसाहेबांना त्यातल्याच एका बैराग्यानं आर्त हाक मारली असेल, "माँसाहेब, आम्हाला न भेटताच परत जाताय."
अचानक शिवबाचा आवाज ऐकून काय वाटलं असेल आऊसाहेबांना?

कानात पंचप्राण गोळा झाले असतील आऊसाहेबांच्या. क्षणार्धात मागे वळून बैराग्यांच्या गर्दीतून शिवबांना शोधलं असेल. डोळ्यातल्या झर-झर झरणाऱ्या आसवांनी शिवबाला जलाभिषेक घातला असेल त्यांनी. चेहऱ्यावरून- केसांवरून- पाठीवरून मायेचा हात फिरवला असेल. जंगलात हरवलेलं पाडस परत भेटल्यावर हरिणी जशी सैरभैर होते तशी काहीशी अवस्था झाली असेल आऊसाहेबांची. "शिवबा" म्हणून हंबरडा फोडून शिवबा राजांना कडकडून हृदयाशी धरलं असेल त्यांनी. जशी यशोदा कृष्णाला धरायची, सीतामाई लव-कुशाला धरायची. केवढा भारलेला असेल तो क्षण, तमाम मराठी जणांनी स्वतःच्या हृदयात कोरून ठेवावा असाच हा क्षण

आऊसाहेबांच्या डोळ्यात आसवांचा फुटलेला बांध, शिवबाला त्यांनी मारलेली कडकडून मिठी. आऊसाहेबांच्या एक कापरा हात महाराजांच्या हृदयावर तर एक खंबीर हात शिवरायांच्या पाठीवर. राजांच्याही डोळ्याच्या कडांमध्ये उमळुन आलेल्या गोदा-कृष्णा. सगळं कसं एकदम जिवंत.

या चित्रात मागे दोन व्यक्ती थांबलेल्या दिसताहेत. कोण आहेत ती दोन पात्रं ?
आऊसाहेबांच्या मागे थांबलेल्या आहेत त्या पुतळाराणी सरकार आणि शिवबांच्या मागे थांबलेला रांगडा वीर, पण आऊसाहेब- शिवबाराजे भेटीचा अनुपम देखावा पाहून सदगतीत झालेला वीर म्हणजे महाराजांना आग्र्याहून स्वराज्यात सुखरूप आणणारा गुप्तहेर खात्याच्या प्रमुख बहिर्जी नाईक. डोळ्यातून ओघळणारे आनंदाश्रू लपवण्यासाठी पुतळाराणीसरकारांचा नकळत पदराला गेलेला हात, दोन्ही हाताच्या मुठी जोडून स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या माता-पुत्रांना भरल्या डोळ्यांनी नमन करणारे बहिर्जी नाईक. मागे दिसणारी राजगडाची डौलदार राजसदर, मशालींच्या जर्द लालपिवळ्या प्रकाशातला हा भावविभोर प्रसंग आज महाराष्ट्र अनुभवू शकतोय.

🚩|| जय जिजाऊ||🚩
🚩||जय शिवराय।।

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...