सोलापूरचा इतिहास
सोलापूर जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही; तथापि पंढरपूर येथील विठोबाचे मंदिर प्राचीन काळापासून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. भगवानलाल यांच्या मते, ‘पंढरपूरच्या विठोबाची मूळची मूर्ती प्राचीन असावी’. तज्ज्ञांच्या मते, आजची मूर्ती आद्य मूर्ती नसावी. या धार्मिक स्थळामुळे सोलापूर व पंढरपूर ही ठिकाणे प्राचीन काळापासून लोकांना माहीत असावीत. प्राचीन काळापासून अरबी समुद्रकिनाऱ्यावरील चौलकडे जाणारा व्यापारी मार्ग सोलापूर जिल्ह्यातून जात होता. ब्रिटिश काळात व्यापारी मार्गांनी हा भाग मुंबईशी जोडला होता. हा जिल्हा महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांना जोडणारा दुवा आहे.
सातवाहन (आंध्रभृत्य) राजांच्या काळात दक्षिणेकडील भागाप्रमाणेच सोलापूर जिल्हाही त्यांच्या राज्याचा एक भाग असला पाहिजे. या घराण्यानंतर बादामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य व देवगिरीचे यादव यांच्याही राज्यांत हा जिल्हा काही काळ मोडत असावा. यादव राजांच्या कारकिर्दीतील हेमाडपंती इमारती, देवालये व शिलालेख हे चपळगाव, जेऊर, बावी, मोहोळ, माळशिरस, नातेपुते, वेळापूर, पंढरपूर, पुळूज, कुंडलगाव, कासेगाव, मार्डी, कपडगाव, वाफे इत्यादी ठिकाणी आढळतात. पुढे दक्षिणेत मुस्लिम राज्याचे प्राबल्य झाले. बहमनी राज्याची राजधानी सोलापूरच्या पूर्वेस सुमारे १०० किमी.वरील गुलबर्गा येथे होती. सोलापूर जिल्हा हा गुलबर्गा तरफ (भाग) चा एक भाग होता. मुहम्मद शाह बहमनीच्या कारकीर्दीच्या सुमारास (इ. स. १३५८ – १३७५) सोलापूर व इतर काही ठिकाणचे किल्ले बांधले असावेत. इ. स. १३९६-१४०७ या बारा वर्षांच्या काळात या प्रदेशात जो भयंकर दुष्काळ पडला होता, त्यास दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणतात. इ. स. १४६० मध्ये दक्षिणेत पुन्हा दुष्काळ पडला होता, तो पंतांचा दुष्काळ म्हणून प्रसिद्ध आहे. या वेळी मंगळवेढ्यास पुष्कळ धान्याची कोठारे होती. ती दामाजीपंत या अधिकाऱ्याच्या ताब्यात होती. दामाजीपंताने हुकूमाशिवाय आपल्या ताब्यातील सरकारी धान्यकोठारातील धान्य देऊन दुष्काळी परिस्थितीत हजारो गोरगरिबांना पोसले.
विजापूरचा सुभेदार यूसुफ आदिलखान (१४८९ – १५१०) याने जिंकलेल्या प्रदेशात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला व पंढरपूरचा काही भाग समाविष्ट होता. त्याच्या मृत्यूनंतर
खर्ड्याच्या लढाईचे तळ
(१५१०) कमालखानने राजपुत्र ईस्माईल आदिलशहा व त्याची आई यांस कैदेत टाकून सोलापूर किल्ल्यास तीन महिनेपर्यंत वेढा दिला होता. अहमदनगरहून वेळेवर मदत न आल्यामुळे झैन खानाने इ. स. १५११ मध्ये सोलापूरचा किल्ला व इतर काही भाग कमालखानाच्या ताब्यात दिला. सोलापूरच्या कब्जासाठी विजापूर व अहमदनगर या राज्यांमध्ये सारखे तंटे चालू होते. बुऱ्हाणशहाचा मुलगा हुसेन निजामशहा याने आपली मुलगी चांदबिबी हिचे लग्न विजापूरच्या अली आदिलशहाशी करून दिले. त्या वेळी सोलापूरचा किल्ला आंदण म्हणून देण्यात आला. औरंगजेबाने १६८६ मध्ये विजापूरवर स्वारी केली, त्या वेळी त्याच्या सैन्याचा तळ सोलापूर शहरात होता. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सोलापूर प्रांत त्याचा मुलगा कामबक्ष याच्याकडे आला असावा. इ. स. १७१६ च्या सुमारास पंढरपूर प्रांत आणि नीरा व माण नद्यांच्या मधला प्रदेश शाहूराजांच्या ताब्यात देण्यात आला. १७२३ च्या सुमारास सोलापूर शहर व किल्ला, जिल्ह्याचा काही मुलूख निजामाकडे गेला.
आष्टीची लढाई झालेले ठिकाण
परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या ताब्यात पंढरपूर व त्याच्या आसपासचा प्रांत होता (१७९२). जेव्हा खर्ड्याच्या लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला (१७९५), तेव्हा जो तह झाला, त्यानुसार सोलापूर जिल्हा मराठ्यांस दिला गेला. १८१५ मध्ये पंढरपूरजवळ गंगाधरपंतास ठार मारण्यात आले. आष्टीच्या लढाईनंतर तीन महिनेपर्यंत सोलापूर हे रणक्षेत्र होते. पेशव्यांनी सोलापूरच्या किल्ल्यात आपला तळ दिलेला होता. ९ मे १८१८ रोजी ब्रिटिश सैन्य सोलापूरनजीक येऊन दाखल झाले होते. त्यांनी सोलापूरच्या किल्ल्यास वेढा देऊन १० मे रोजी शहरात प्रवेश केला. १५ मे रोजी ब्रिटिशांनी मराठा सैन्याकडून हा किल्ला ताब्यात घेतला. अशा रीतीने सोलापूर जिल्ह्याचा ताबा १८१८ पासून ब्रिटिशांच्या हाती गेला. सांप्रत सोलापूर जिल्हा पूर्वी अहमदनगर, पुणे व सातारा या जिल्ह्यांचा भाग होता. १८३८ मध्ये सोलापूर हा अहमदनगर जिल्ह्याचा उपजिल्हा बनला. तो १८६४ मध्ये बरखास्त करण्यात आला. त्यानंतर १८६९ मध्ये सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा व सातारा जिल्ह्यातील पंढरपूर व सांगोला हे उपविभाग जोडून सोलापूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. पुढे १८७५ मध्ये त्याला माळशिरस जोडण्यात आला. १९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेनंतर सोलापूर जिल्हा मुंबई प्रांतात समाविष्ट करण्यात आला आणि १९६० पासून हा महाराष्ट्रातील एक स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. १९८१ च्या जनगणनेनंतर बार्शी तालुक्यातील ८ गावे उस्मानाबाद जिल्ह्यात व सांगोला तालुक्यातील एक गाव सांगली जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले. जिल्ह्यात सोलापूर, माढा (कुर्डूवाडी), माळशिरस व पंढरपूर असे चार महसूल उपविभाग असून ९ नगर परिषदा व एक महानगरपालिका आहे.
No comments:
Post a Comment