विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 17 May 2021

वाईचा इतिहास



 वाईचा इतिहास

महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, वाई तालुक्याचे मुख्यालय व एक ऐतिहासिक शहर.
वाई या नावाच्या व्युत्पत्तीविषयी तज्ज्ञांत मतैक्य नाही; तथापि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते, ‘वायदेश’ या शब्दातील ‘वाय’ (कोष्टी) यावरून शहरास वाई हे नाव पडले असावे. स्कंदपुराणांतर्गत कृष्णामाहात्म्यात वाईचा ‘वैराजक्षेत्र’ असा उल्लेख आढळतो. ‘विराटनगर’ या नावानेही हे परिचित आहे.
वाईचा फार प्राचीन इतिहास ज्ञात नाही; परंतु येथील किवरा ओढ्याच्या (कीचक विहिरीच्या) परिसरात सापडलेली क्षुद्राश्म हत्यारे प्राचीन वस्तीच्या खुणा दर्शवितात. पुरातत्त्वीय सर्वेक्षणांत सापडलेल्या सातवाहनकालीन अवशेषांवरून वाई हे इ. स. पू. २०० ते इ. स. २०३ या काळात सातवाहन राजांच्या अंमलाखाली असावे. वाईच्या ईशान्येस सहा किमी.वरील लोहारे गावाजवळ हीनयान बौद्धांच्या आठ गुहा आहेत. त्यानंतरच्या बाराव्या शतकापर्यंतचा इतिहास अस्पष्ट आहे. वाईच्या परिसरातील पांडवगड, वैराटगड, कमळगड, चंदन-वंदन इत्यादी डोंगरी किल्ले शिलाहारांनी इ. स. ९०० ते इ. स. १३०० या काळात बांधले आहेत. त्यावरून या प्रदेशावर शिलाहारांचे आधिपत्य असावे, असे इतिहास तज्ज्ञांचे मत आहे. १३९६ ते १४०८ या बारा वर्षांत दुष्काळामुळे वाईची वस्ती उठून गाव ओस पडले होते. तेव्हा बीदरचा बहमनी सुलतान पहिला अहमदशाह वली (कार. १४२२ – १४३६) याने मलिक-उत्-तुज्जार खलफ हसन यास महाराष्ट्रात पाठविले. त्याने १४२९ मध्ये वाई परिसरातील किल्ले घेऊन येथे वस्ती करण्याचे काम दादा नरसो व एक तुर्की खोजा यांच्यावर सोपविले. बहमनींचे लष्करी ठाणे वाई येथे होते. महमूद गावानच्या १४६९ मधील कोकणातील स्वारीत वायदेशातील काही शिपाई होते, नंतर वाई विजापूरच्या आदिलशाहीकडे गेले. आदिलशाहीचा सरदार अफझलखान १६४९ – १६५९ यांदरम्यान येथे सुभेदार होता. त्याच्या वाड्याच्या काही भागांचे (तटबंदी, बुरूज इत्यादी) अवशिष्ट असून सतराव्या शतकातील दोन मशिदी अद्यापही येथे सुस्थितीत आढळतात. प्रतापगडाच्या युद्धात अफझलखानाचा वध झाल्यानंतर (१६५९) वाई हे काही काळ मराठ्यांच्या अंमलाखाली होते; तथापि मराठ्यांना वाईवर सलग ताबा ठेवता आला नाही. अफझलखानानंतर येथे सय्यद इलियास शर्झाखान याची सुभेदार म्हणून नियुक्ती झाली. छ. शिवाजी महाराजांनी १६७४ मध्ये हा प्रदेश पूर्णतः जिंकून येसाजी मल्हार यास येथे सुभेदार नेमले. संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत हा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात होता. या काळात शर्झाखानबरोबरच्या युद्धात (१६८७) सेनापती हंबीरराव मोहिते वाईजवळच केंजळ परिसरात मारले गेले. नंतर १६८९ मध्ये वाई मोगलांच्या ताब्यात गेले. संताजी घोरपडे, रामचंद्रपंत अमात्य आणि शंकराजी नारायण यांनी मोगलांबरोबर लढा देऊन पुन्हा वाई काबीज करून तेथे मराठ्यांचे ठाणे केले. छ. शाहूंच्या वेळी (कार. १७०७ – १७४९) वाईवर सुरुवातीस मोगल व मराठे असा दुतर्फी अंमल होता.
साताऱ्यातील एक सावकार भिकाजी रास्ते (नाईक) यांनी बाळाजी बाजीरावास (नानासाहेब पेशवे) आपली मुलगी गोपिकाबाई दिली आणि रास्ते घराण्याचे पेशवे दरबारी वजन वाढले. परिणामतः पेशव्यांनी रास्त्यांना १५ लाखांचा सरंजाम दिला. त्यामुळे रास्ते हे उत्तर पेशवाईत (१७६१ – १८१८) वाईत स्थायिक झाले आणि जवळजवळ अनभिषिक्त राजे बनले. त्यांनी वाईचा सर्वांगीण विकास केला. रास्ते व त्यांचे आश्रित यांनी कृष्णाकाठावर अनेक फरसबंद घाट बांधले; उमामहेश्वर (पंचायतन), महागणपती, काशीविश्वेश्वर, गोविंद-रामेश्वर, विष्णू, लक्ष्मी, भद्रेश्वर, केदारेश्वर इत्यादी सुरेख मंदिरे उभारली; वाडे बांधले आणि किवरा ओढ्यावर छोटी धरणे बांधून बागायतीस उत्तेजन दिले व पिण्याच्या पाण्याची योजना केली.
वाईत लहान-मोठी अशी शंभराहून अधिक मंदिरे आहेत. त्यांतील कृष्णा पुलाजवळची महादेव, दत्तात्रेय, दक्षिणकाठचे सिद्धश्वेर इत्यादी काही मंदिरे एकोणिसाव्या शतकातील असून हरिहरेश्वर, अंबाबाई (महाकाली), रामदासांनी स्थापन केलेले रोकडोबा (मारुती), वाकेश्वर, गणपती (साबणे) ही पूर्व-पेशवाईतील मंदिरे आहेत. त्यांच्या चुनेगच्चीतील शिखरांचे बांधकाम मात्र पेशवाईत झाले असावे. या जुन्या मंदिरांतून काही पाषाणशिल्पे आढळतात. तद्वतच मंदिरांतील प्रतिष्ठापित मूर्तीतील काही मूर्ती, विशेषतः महालक्ष्मी, विष्णू, विठ्ठल-रखुमाई, महागणपती, महाकाली, त्रिमुखी दत्तात्रेय, गोशाळेतील संगमरवरी कृष्णमूर्ती, काशीविश्वेश्वर मंदिरातील घंटायुक्त झूल घातलेला एकसंध अलंकृत पाषाण नंदी व गर्भगृहाची कलाकुसरयुक्त द्वारशाखा ही लक्षणीय आणि चित्तवेधक आहेत. महालक्ष्मी, विष्णू, काशीविश्वेश्वर, महागणपती, उमामहेश्वर इत्यादी मंदिरे एका विशिष्ट मराठा वास्तुशैलीत (नव-यादव) बांधलेली आहेत. या मंदिरांचे विधान चतुरस्त्र असून त्यांत गर्भगृह, सभामंडप, क्वचित अंतरालय आढळते. शिखरांवरील कोनाड्यांत चुनेगच्चीत मूर्तिकाम आहे.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...