विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 8 August 2022

इचलकरंजी, सं स्था न. भाग ६

 



इचलकरंजी, सं स्था न.

भाग  ६


ना रा य ण रा व व्यं क टे श आणि अ नू बा ई..घोरपडे

सन १७५६ च्या सावनूरच्या मोहिमेंत तात्या व अनूबाई हजर होती. पुढें तात्यांच्या शरीरीं आराम नसल्यामुळें ते परत इचलकरंजीस आले. परंतु सरदार व मुत्सद्दी व फौजेसुध्दां अनुबाई श्रीमंतांच्या स्वारीबरोबर राहिल्या. यावेळीं काबीज केलेला मर्दनगड इचलकरंजीकरांचडेच ठेवावा असें मनांत आणून श्रीमंतांनीं त्यांचेंच लोक किल्ल्यांत ठेविले. नंतर श्रीमंतांनीं पटवर्धन व इचलकरंजीकरांचे कारभारी यांस धारवाड प्रांतीं छावणीस ठेवून त्या प्रांतांची मामलत पटवर्धन, इचलकरंजीकर व विठ्ठल विश्राम या तिघांस सारखी वाटून दिली. पूर्वीचा व हल्लींचा नवीन मिळालेला मुलूख मिळून हा धारवाडचा सुभा इचलकरंजीकरांच्या ताब्यांत आला. त्या वेळीं सुभ्याचें क्षेत्र फार मोठें असून त्याखालीं मिश्रीकोट, धारवाड वगैरे तेरा परगणे होते. खुद्द धारवाडचा किल्ला अनूबाईच्या ताब्यांत होता. बाकींची ठाणीं व परगण्यांतील किल्ले अनूबाईंनी आपल्या तर्फेनें त्या त्या परगण्याच्या मामलेदारांच्या ताब्यांत दिले होते. याशिवाय वल्लभगड, पारगड, भीमगड, कलानिधि, खानापूर व चंदगड हीं ठाणीं व कितूर संस्थानांपैकीं बागेवाडी हीं सर्व गेल्या तीन सालांत पेशव्यांनीं इचलकरंजीकरांच्या हवालीं केलीं होतीं. परगणा कंकणवाडी हाहि त्याजकडे पेशव्यांकडून मामलतीनें होता. एवढा हा मोठा धारवाडचा सुभा जो इचलकरंजीकरांकडे दिला होता त्याचा वसूल सरकारांत नियमितपणें यावा म्हणून येसाजीराम व रामचंद्र नारायण हे पेशव्यांच्या तर्फे सुभ्याची वहिवाट करण्यास नेमिले होते व वसुलाबद्दल पेशव्यांस व बंदोबस्ताबद्दल इचलकरंजीकरांस ते जबाबदार होते. रायबागची कमाविशीहि पेशव्यांकडून याच वेळीं तात्यांस मिळाली होती.

तात्या या लाडांत वाढलेला अनूबाईचा एकुलता एक मुलगा. त्याचे वडील व्यंकटराव यांनीं त्यास लहापणींच देशमुखीच्या कामांत घालून राज्यकारभाराचा ओनामा पढविला होता. परंतु दुर्दैवानें तात्यांस एकविसावें वर्ष लागतें तोंच वडील मृत्यू पावून सर्व कारभार अनूबाईस पहाणें प्राप्त झालें. बाईची हिंमत, धोरण व महत्वाकांक्षा जबरदस्त होती. त्यांचे भाचे नानासाहेब पेशवे भाऊसाहेब दादासाहेब यांजवर त्यांची चांगली छाप होती. तात्यांस त्यांनीं स्वतंत्रपणें कधीं वागूं दिलें नाहीं. ‘हें लहान पोर याला काय समजतें!’ अशा भावनेंनें अनूबाई त्यास जन्मभर वागवीत गेल्या. तात्या हे सरदारीचे मालक नांवाचे मात्र होते. या सर्व गोष्टींचा परिणाम तात्यांच्या मनावर प्रतिकूल रीतीचा होऊन बाईच्या ओंजळीनें पाणी पिण्याचा त्यांस कंटाळा येंऊ लागला. संस्थानांतील लबाड लोकांनीं तात्यांस भर देऊन आई व तिचे कारभारी यांविषयीं त्यांच्या मनांत वितुष्ट उत्पन्न केलें

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....