विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 30 August 2023

अटकेचा किल्ला (पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमा)

 


अटकेचा किल्ला (पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमा)
२० एप्रिल १७५८ मधे तुकोजी होळकर व साबाजी शिँदे यांनी जिँकला आणि अटकेपार मराठी भगवा फडकला.
इ.स.१७५२ मधे महाराष्ट्राच्या दृष्टीने एक अत्यंत अभिमानास्पद अशी घटना घडली. राघोबादादा पेशव्यांनी आताच्या पाकिस्तानात असलेल्या अटकेपर्यँत धडक मारुन मराठी साम्राज्याचा भगवा झेंडा तिथे रोवला. ही घटना तिथे मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक आहे. या पराक्रमावरच अटकेपार झेंडे रोवणे नावाची म्हणही अस्तित्वात आली.
१७५२ मधे अफगाणिस्तानच्या अहमदशाहा अब्दा
लीने तत्कालीन हिँदुस्तानातील लाहोर आणि मुलतान या मोगलांच्या प्रांतावर स्वारी करुन ते काबीज केले. ही बातमी पुण्यात आल्यावर मराठ्यांना करारानुसार बादशहाच्या रक्षणासाठी जाणे आवश्यक होते. त्याप्रमाणे रघुनाथराव पेशव्यांच्या पुढाकाराखाली उत्तरेची मोहीम काढण्यात आली. रघुनाथराव दिल्लीला गेले तेव्हा खुद्द बादशहानेच मराठ्यांविरुद्ध कारस्थान चालविलेले पाहुन रघुनाथरावांनी त्यास कैद केले आणि बहादुरशाहाचा एक नातु अजीजउद्दीन यास तख्तावर बसवुन व रोहीलखंडात बंदोबस्त ठेवुन ते दक्षिणेत परतले.
मराठ्यांची ही हीँम्मत पाहुन दिल्लीतले सगळे राजपुत, अफगाण, मुसमान दरबारी संतापले. पण राघोबादादा दिल्लीत असेपर्यंत ते काही करु शकले नाहीत. मराठ्यांची पाठ फिरल्यानंतर या दरबारी धेडांनी गुप्तपणे निरोप धाडुन अब्दालीला पुन्हा एकदा हिँदुस्थानात स्वारी करण्याचे निमंत्रण दिले. त्या वेळेपर्यंत अब्दालीने जिँकलेले लाहोर व मुलतान परत दिल्लीच्या बादशहाच्या हातात गेलेले होते. अब्दालीने १७५६ मधे पुन्हा स्वारी करुन ते जिँकले. दिल्लीत येऊन नवीन बादशहाला कैद केले आणि त्याच्याकडुन खंडणी वसुल केली. रघुनाथरावाने सोडविलेली मथुरा, वृंदावन हि हिँदुंची पवित्र क्षेत्रे लुटली. आधीच्या बादशहाला पुन्हा गादीवर बसवुन तो परत गेला.
हे कळताच मराठे संतापले. आता बादशहा आणि अब्दाली दोघांचे कंबरडे मोडायचे या हेतुनेच जंगी तयारी करुन रघुनाथराव पुण्याहुन निघाले. आधीच्या स्वारीचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. यावेळी दिल्ली शहरात आणि तिथल्या कारभारात गूतुन न राहता त्यांनी पंजाबात वायव्येच्या दिशेने मुसंडी मारली. पंजाबाच्या एकेक नद्या पार करीत सरहिंद येथे अब्दालीच्या समदखान या सरदाराचा ८ मार्च १७५८ ला पराभव केला. त्याहीपुढचा भीमपराक्रम म्हणजे लाहोर, मुलतान हे प्रांत काबीज करुन थेट सिंधु नदी गाठली. तिच्या तीरावरील अटक या गावी दि.१० ऑगस्ट १७५८ रोजी आपली छावणी टाकली. त्या आधीच म्हणजे २० एप्रिल १७५८ रोजी अटकेचा किल्ला तुकोजी होळकर व साबाजी शिँदे यांनी जिंकला हे मराठ्यांचे आणि कुठल्याही हिँदु आणि दक्षिण राजवटीचे उत्तर हिंदुस्थान सरहद्दी बाहेरील पहीले यश मानले जाते.
तिकडे ईराणच्या शहानेही अब्दालीचा पराभव केला आणि राघोबादादाकडे पत्रे पाठवुन मराठ्यांशी मैत्री राखण्याबद्दलची मनीषा व्यक्त केली. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठी साम्राज्याच्या शौर्याचा हा कळसबिंदु मानता येईल. इराणच्या राजाने महाराष्ट्रातल्या मराठींशी दोस्तान्याचा पैगाम पाठविणे याचा अर्थ मराठ्यांच्या पराक्रमाला, शौर्याला मिळालेली पावती आहे. मराठ्यांचा दरारा किती होता हेही या घटनेवरुन दिसुन येते. भिमथडीच्या तट्टांनी प्रथमच सिंधु नदीचे पाणी प्यायले. बखरकारांनी मराठ्यांचा हा भीमपराक्रम मोठ्य सुरसतेने वर्णन केला आहे. मानाजी पायगुडे लाहोरवर चालुन गेले परंतु तयदरशहा व जहानखान यांनी पळ काढल्याने अनायसे लाहोर मराठ्यांच्या ताब्यात आले यावरुन मराठी पराक्रमाची कल्पना येते.
पुढे त्यांनी अफगाणांचा पाठलाग करीत चिनाब गाठली. रावी, बियास एकेक नद्या ओलांडल्या. दक्षिणी फौज दिल्ली पलीकडे आली नव्हती ती चिनाब सिँधुपर्यंत पोचली. इराणच्या पातशहाची पत्रे रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर दोघांनाही आली की,
"कंदाहरी येऊन यांचे पारिपत्य करा आणि अटकेची हद्द करावी".
रघुनाथरावाने ही वार्ता पुण्यास कळविताना म्हटले की," काबुल कंदाहर अटकेपारचे सुभे हिँदुस्तानचे अकबरापासुन आलगिरापावेतो होते ते आम्ही विलायतेत का द्यावे. आम्ही कंदाहारपावेतो अंमल बसवून तुर्त त्यास गोडीचा जाब पाठवणार आहोत".
मराठी फौजा मूलतान अटकेपर्यंतचा पंचनंदचा मुलूख करून मुलूख करुन माघारी निघाल्या. पेँढारी व लष्कर कुबेर झाले. रघुनाथराव मल्हारराव यांनी मोठे यश संपादले.
(संदर्भः महाराष्ट्राच्या कालमुद्राः लेखक म. वि. सोवनी)

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...