विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 10 April 2024

छत्रपतींच्या सिंहासनाची रचना (भाग चवथा

 


छत्रपतींच्या सिंहासनाची रचना

(भाग चवथा = तक्त सुवर्णाचें, बत्तीस मणांचे)
समाज जिवनात एक विश्वासाच स्थान निर्माण केलेल्या एका संस्थेने महाराजांच्या “सुवर्ण सिंहासनाचा” संकल्प सोडल्या पासून सिंहासनाच्या वजनाबद्दलच्या वेगवेगळ्या संकल्पना समोर येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शिवप्रेमीच्या मनात काहिसा वजनाबद्दलचा गोंधळच होत आहे. तरीही मी पहातोय इतर काहिहि जरी झालं, तरी शिवाजी महाराजांबद्दल ची निष्ठा व प्रेम तिळभर सुध्दा कमी होत नाही. मी इंटरनेट वरील बातम्यांमध्ये व युट्यूब वरील एका जेष्ठ रणनितीकार, इतिहासकार, व्याख्याते आणि बेस्ट सेलर पुस्तकांचे लेखक यांच्या व्हिडीओ मध्ये तरी सिंहासन 1280 किलो ग्रॅम वजनाचे होते नमूद केलेले आहे. त्यांनी जो प्रमाण वापरले आहे ते खाली प्रमाणे आहे.
1 मण = 40 शेर (किलो ग्रॅम)
वरील सुत्रांनुसार 1 शेर म्हणजेच 1 किलो ग्रॅम म्हणून गृहित धरुन 32 मणाचे किलो ग्रॅम मध्ये रुपांतर केल्यास 32 मणाचे शेर 1280 म्हणजेच 1280 किलो भेटतात. हेच सूत्र आपण आणखिण विस्तृत केल्यास खालील प्रमाणे रुपांतर मिळते
1 मण = 40 शेर
1 शेर = 2 अछर
1 अछर = 2 पावशेर
1 पावशेर = 4 छतक
1 छतक = 5 तोळे
आणि या सुत्रांच्या प्रमाणे आपण शहाजहानच्या मयुरासनाच्या सोन्याचे रुपांतर मणात केले तर आपणास धक्कादायक आकडा मिळून जातो. मागच्या लेखात आपण पाहिलेले आहेच मयूरासनासाठी 100000 तोळे सोने वापरण्यात आले. तरी एक लक्ष सोन्यचे 20 हजार छतक, 5000 पावशेर, 2500 अछर व 1250 शेर होतात. 1250 शेराचे मणामध्ये रुपांतर केले तर शहाजहानच्या मयूरासनाचे वजन होते 31.25 मण म्हणजेच 32 मणापेक्षा किंचीत कमी सोने. वरील सर्व रुपांतराच विचार करुन आपण या धक्कादायक निर्ष्कशापर्यंत कि छत्रपती शिवाजी महाराजाचे सिंहासन हे मयूरासन पेक्षा थोडेसे जास्त वजनाचे होते? महाराजांनी जाणीव पूर्वक स्वराज्याचे सिंहासन मयूरासनाच्या सोन्याच्या वजना इतके बनविले होते ? तर या प्रश्नाची उत्तरे माझ्याकडे ‘नाही’ म्हणूनच आहेत. ते कसे ते पुढील प्रमाणे..
उपरोक्त सुत्रांचा वापर हे गणितीय भाषेतील (माझ्या ज्ञानाप्रमाणे) ध चा मा करणे या प्रकारातील आहे. उपरोक्त वजन/मापन पध्दती ही कनिष्ट धातु आणि इतर वस्तुंची विक्री करण्यासाठी वापरली जाणारी ब्रिटिश कालीन पध्दती आहे. भारतीय इतिहासात वस्तू, कालखंड, क्षेत्र आणि राजवट यांचे नुसार वेगवेगळ्या मापन पध्दती दिसून येतात. साधारणतः लोखंड, जस्त, पितळा, शिसे, कथील आणि इतर मौल्यवान नसलेले धातू तसेच कापसाचे वजन करण्यासाठी दोन अर्धा छटाक = एक छटाक (58.32 ग्रॅम), दोन छटाक = एक अदपाव, दोन अदपाव = एक पाव (233.28 ग्रॅम), दोन पाव = एक अच्छेर, दोन अच्छेर = एक शेर (933.10 ग्रॅम), तेरा शेर = एक मण (11.20 कि.ग्रॅ.) आणि वीस मण = एक खंडी (224. कि. ग्रॅम) हे परिणामाचे कोष्टक वापरले जाई. परंतू मौल्यवान नसलेले धातू मोजण्याचे कोष्टक मौल्यवान वस्तू मोजन्यासाठी सयुक्तिक कसे असेल. मौल्यवान खडे, हिरे, माणके, पाचु आणि मोती यांचे वजन कराण्यासाठी मण, शेर हि परिमाणे क्वचितच वापरली जातात. यांचे वजन करण्यासाठी 24 रती = एक टाक असे कोष्टक वापरले जाई, एक रतीआ चार गव्हाच्या दाण्यांएवढे किंवा 16 तांदळच्या दाण्यांएवढे असे. साधारणतः पाच टाकांचा एक तोळा असे. सोने व चांदी हे मौल्यवान धातू असल्याने त्यांच्या वजनासाठी आठ गुंजा = एक मासा, बारा मासे = एक तोळा (11.66 ग्रॅम), चोवीस तोळे = एक शेर आणि चाळीस शेर = एक मण हे कोष्टक वापरले जाते.
वर जे मी सूत्र$ सांगीतले आहे, ते माझ्या अभ्यासात आलेले आणि मला विश्वासहार्य वाटले असे सूत्र आहे. त्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन 32 मण म्हणजेच 358.20 किलो ग्रॅम वजनाचे आणि मयूरासन 100000 तोळे म्हणजेच 104.17 मण व 1166 किलो ग्रॅम वजनाचे होते या निष्कर्षापर्यंत आपण येवून पोहचतो. असो! ह्या क्षणाला किती मण होते याचा निश्चित आकडा बाजुला ठेवला व तरी इतके सोने महाराजांनी सिंहासनासाठी वापरले असेल का ? या प्रश्नाकडे वळूया . या अगोदर शिव साहित्यातील एक महत्वाच्या संवादाकडे मी आपले लक्ष्ये वेधू इच्छीतो. शिवाजी महाराजांच्यावर जिवनावरली प्रसिध्द कांदबरी श्रीमानयोगी मधील हा प्रसंग आहे. हि कांदबरी असल्याने तीस तितकेसे ऐतिहासिक नाही, परंतू आपणास आजच्या विश्लेषनासाठी थोडीसी मदतच होईल असे मला वाटते. तो संवाद खालील प्रमाणे आहे-
गडाचे अठरा कारखाने राज्याभिषेकाच्या तयारीला लागले. आपल्याकडून काही उणीव राहू नये, ही धडपड पत्येकात दिसत होती. सुवर्णसिंहासनाचे काम पुरे होत आले होते. खुद्द जिजाबाईंनाही आपल्या वयाचा विचार करायला उसंत नव्हती. सर्व राण्यांचे दागदागिने, कपडे पाहण्यात त्या गुंतल्या होत्या. कुशल सुवर्णाकार सोनारसोप्यात दागिने घडवीत होते.
राजांच्या शेजारी अनाजी, मोरोपंत, बाळाजी उभे होते. जामदारखान्यात राज्याभिषेकासाठी लागणा-या सर्व खर्चाचा तपशील राजे ऐकत होते. लक्षावधी होनांच्या खर्चाचा अंदाज पाहून राजे म्हणाले,
‘मोरोपंत, एवढ्या खर्चात एक राज्य उभं करणं सहज शक्य आहे.’
‘जी! मासाहेबांनी सर्व तपशिलांना मान्यता दिली आहे.’ मोरोपंत म्हणाले.
‘मग आमच्या नजरेची गरज काय?’
‘मासाहेब म्हणाल्या-राजांच्या राज्याभिषेकात काही कमतरता पडू देऊ नका.’
‘पण हे सारं जमेल का?’
मोरोपंतांची छाती किंचित तणावली. चेह-यावर अभिमान प्रकटला. ते म्हणाले,
‘असले दहा राज्याभिषेक करण्याचं सामर्थ्य राजांच्या जामदारखान्यात आहे.’
राजांनी प्रेमभराने मोरोपंतांच्या खांद्यावर हात ठेवला.
‘जगदंबेची कृपा! मोरोपंत, आम्हांला सदैव तुमच्याबद्दल कौतुक वाटतं. तुमच्यासारखी अष्टावधानी माणसं हाती असता आम्ही कसली काळजी करणार ?
वरील प्रसंग जरी काल्पनीक असला तरी सिंहासन स्थापन करण्याच्या वेळाची धावपळ, नियोजन, जिजाऊ चा आनंद या सर्व गोष्टींचा अंदाज येवून जातो. मला या प्रसंगावरुन आपणास एका गोष्टीकडे लक्ष्य वेधायचे आहे, ती गोष्ट म्हणजे स्वराज्याचा जमादारखाना होय. ज्या जमादारखान्यान महाराजांच्या सिंहासनाचा भार अलगद उचलला तो जमादारखाना, त्याची श्रीमंती कशी होती ती आपणापुढे ठेवतो. जमादारखान्याची हि पडताळणी संभाजी महाराजांनी स्वतः केलेली आहे. शिवाजी महाराजांचे निधन झाले आणि संभाजी महाराजांनी स्वतःस राज्याभिषेक करुन घेवून सिंहासनारुढ झाले. आगस्ट, 1680 ला संभाजी महाराजांनी आपल्या कारकुनास रायगडावरील जमादारखान्याची पडताळणी करुन संपत्तीच्या याद्या आपणासमोर सादर करावयास सांगितल्या. संभाजी महाराजांनी जातीने याद्या स्वतः तपासून घेतल्या. त्या यादीच्या संपुर्ण तपशिल येथे देणे शक्य नाही. तरी आपल्या विषयाच्या अनुषंगाने महत्वाचा भाग खालील प्रमाणे-
=> सोनें 9 खंडी, #होन 5 लक्ष, चांदी 5॥ खंडी,
=> तांबे 3 खंडी, शिसे 450 खंडी, लोखंड 20 खंडी, ब्रांझ 272 खंडी,
=> तेल 70 हजार खंडी, सदैव (मीठ) 270 खंडी, गंधक 200 खंडी,
=> या व्यतिरिक्त निरनिराळ्य अधिका-यांजवळ ## 3 लक्ष होन खरेदीस दिले होते आणि वेगवेगळ्या किल्यांवर ### 30 लक्ष होनाची संपत्ती होती ती वेगळी (#+## + ### = 38 लक्ष होन म्हणजे एका होनाचे वजन 3.15 ग्रॅम अंदाजे धरल्यास 11970 किलो ग्रॅम सोने होते आणि आपल्या वरील सुत्रानुसार 11970 किलो ग्रॅमचे मण होतात 1070)
वरील सोने 9 खंडी चे मणात रुपांतर केले तर (सुत्र 1 खंडी = 20 मण) 180 मण मिळतात. याच्या अर्थ होन मधील सोने 1070 मण व निव्वळ सोने 180 मण म्हणजेच 1250 मण सोने इ.स.1680 ला स्वराज्यात होते. हे सोने राज्याभिषेकावरिल खर्च वजा जाता उरलेले सोने आहे. असो.
गेली काही दिवस मी आपणास “छत्रपतींच्या सिंहासनाची रचना” या अनुषंगाने काही माहिती आपल्या समोर ठेवत आहे. माझ्याकडे उपलब्ध असलेली माहिती पुष्कळ आहे. परंतू ती अशी पोस्ट स्वरुपात दररोज देणे मलाही शक्य होणार नाही म्हणून आज हिथेच मी थोडी विश्रांती घेतो. इतिहासात #हिंदुपदपादशाहीचे_सिंहासन याबद्दल भरपूर माहिती उपलब्ध आहे. त्या माहितीबद्दल माझ्याकडे सद्या एकच वाक्य आहे #वाचालतर_थक्कव्हाल! त्यामुळे ती सर्व माहिती आपणासमोर एका वेगळ्या स्वरुपात आणण्याचा मी प्रयत्न करत आहे. मला आशा आहे की ती लवकरच मी आपणासमोर घेवून येईन. आपल्याला माझे लेखन आणि माहिती कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करुन नक्की कळावा ..
लेखन आणि संकलन – मुकेश मारुती वडीयार

No comments:

Post a Comment

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...