विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 27 April 2026

खिळचीपूर संस्थानाची सनद..!!


 खिळचीपूर संस्थानाची सनद..!!

रतलाम आणि सैलानाप्रमाणेच माळवा प्रांतातील खिळचीपूर हे देखील एक महत्त्वाचे संस्थान होते. या संस्थानावरही शिंदे सरकारचा मोठा प्रभाव होता. १७९३ सालापासून खिळचीपूरचे संस्थान शिंदे सरकारचे मांडलिक बनले होते आणि त्यांना नियमितपणे खंडणी भरावी लागत होती.
पुढे १८१९ मध्ये खिळचीपूरचे दिवाण दुर्जन साल यांच्या मृत्यूनंतर वारसाहक्काचा वाद निर्माण झाला, तेव्हा शिंदे सरकारच्या सांगण्यावरूनच ब्रिटिशांनी यात मध्यस्थी करून हा वाद सोडवला होता. खिळचीपूर संस्थानाकडून शिंदे सरकारला बुंदी चलनात दरसाल १३,५०० रुपये टंका म्हणजेच खंडणी देणे बंधनकारक होते.
हा टंका अनेक वर्षे थेट ग्वाल्हेरच्या खजिन्यात जमा होत असे. मात्र नंतर १८४४ साली महाराज जयाजीराव शिंदे यांच्या काळात शिंदे सरकारने हा १३,५०० रुपयांचा टंका ग्वाल्हेर लष्कराच्या देखभालीसाठी ब्रिटिशांकडे वर्ग केला. १८४४ च्या सनदेनुसार जयाजीराव शिंदेंनी खिळचीपूरचे दिवाण शेर सिंग यांना हा टंका यापुढे भोपाळच्या पोलिटिकल एजंटकडे जमा करण्याचे थेट आदेश दिले होते.
यावरून हे दिसून येते की, माळवा प्रांतातील अनेक छोटी-मोठी संस्थाने मराठशाहीच्या वर्चस्वाखाली होती आणि त्यांच्या राजकीय तसेच आर्थिक घडामोडींवर शिंदे सरकारचे थेट नियंत्रण होते.
संदर्भ-
१. सी. यू. अचिसन (C. U. Aitchison), A Collection of Treaties, Engagements and Sanads, खंड ४ (Volume IV).
२. खिळचीपूर संस्थानाची माहिती आणि सनद क्रमांक XXXV, पृष्ठ क्रमांक १०५ आणि १४८.

श्रीमंत महादजी महाराजांचे साह्यकर्ते


 श्रीमंत महादजी महाराजांचे साह्यकर्ते

------------------------------------------------------------------------------
महादजींच्या कार्याचा व्यापच एवढा मोठा होता की,त्यास जिवास जीव देणारे शेंकडों साह्यकर्ते निर्माण करावे लागले. राणेखानभाई , त्यांचा जावई साहेबखान टोका,अंबुजी इंगळे व त्याचे कनिष्ठ बंधु विठूजी,व बाळोजी इंगळे वगैरे,खंडेराव हरि व त्यांचा मुलगा,बाळोजी व भगीरथ सिंदे, रवळोजी व देवजी गौळी,हैबतराव फाळके,लालाजी बल्लाळ कोटेकर पंडित, रायाजी पाटील सिंदे,बाळाराव गोविंद, व त्याचा आप्त बाळाजी जनार्दन जांबगावकर, रामजी पाटील जाधव,लाडोजी देशमुख शितोळे,जावई बहिरजी ताकपीर,बळवंतराव धोंडदेव, आबा चिटणीस व बंधू गोपाळराव व कृष्णोबा,
शिवाजी विठ्ठल विंचुरकर,माधवराव गंगाधर चंद्रचूड,जिवाजी बल्लाळ बक्षी व बंधु शिवबानाना आणि मुलगे,नारायण जिवाजी व यशवंत जिवाजी,तसेंच जीवबादादाचे तिघे चुलत बंधु जगनाथ राम उर्फ जगोबा बापू,व बाळाजीराम आणि राघोराम,सदाशिव मल्हार उर्फ भाऊ दिवाण आणि बंधु राघो मल्हार व बापूजी मल्हार,बाळाजी अनंत पिंगे उर्फ बाळोबा तात्या पागनीस,लक्ष्मण अनंत लाड उर्फ लखबादादा, तसेच अनुपगीर व उमरावगीर गोसावी,इत्यादि अनेक नांवें महादजींच्या मंडळींत येतात,त्यांच्या हकीकती इतिहासोपयोगी बनल्या आहेत,
या यादींतील सारस्वत वीर व मुत्सद्दी यांचा पराक्रम विशेष आहे.महादजींच्या हस्तकांची नुसती नावानिशी व संख्या भनांत आणिली तरी पेशव्यांच्या सरदारांप्रमाणेच महादजींचा व्याप केवढा मोठा होता हे दिसून येते. त्यांच्या फौजेतील युरोपियन अंमलदारांची यादीच दोनशेची असून जीवबा बक्षीच्या चरित्रांत पृ . २८२ वर सुमारे अडीचशे हिंदी सरदारांची नावांनिशी दिलेली आहे. बाळाराव गोविंद हा पुष्कळ दिवस महादजींचा कारभारी व सल्लागार असून मोठया नेकीनें काम करणारा हुशार असा गणला जात असे.त्यास प्रचारात रावजी असे म्हणत, प्रथम त्याचा वडील बंधु चिमणाजी गोविंद यास पेशव्यांनी पाटण ( राजपुताना ) येथे कमवीसदार नेमिले, त्याच्या वेळीं लालजी बल्लाळ यास कोट्यास नेमीलें
रायाजी पाटील सिंदे हा महादजींचा अत्यंत विश्वासांतला शूर योद्धा असून त्याच्याच पागेत रामजी पाटील जाधव हा आरंभीं बारगीर आणि पुढे महादजींच्या तर्फे पुण्यास वकील असे. ही दोन नांवें भिन्न व्यक्तींचीं होत,
मराठ्यांनी व मुख्यतः सिंदे घराण्याने उत्तर हिंदच्या विस्तृत क्षेत्रांत कारभार केला त्याची दृश्य स्रारकें ठिकठिकाणी नजरेस पडतात,अजमेरच्या भुईकोटाजवळ सिद्यांच्या कोणी सरदाराने एक शिवालय बांधिलेले आहे,नागोरजवळ ताउस सरोवराच्या काठी जयाप्पांची छत्री त्यांच्या दहनभूमीवर बांधलेली असून,शिवाय त्यांच्या अस्थि पुष्करास आणिल्या तेथेही त्यांची एक छत्री व त्यास लागून एक विस्तीर्ण घांट दक्षिणी पद्धतीचा आहे.
पुष्कर गावांत शिरतांनाच एक मोठा घाट लागतो,त्यावर अहल्याबाईंचे अन्नछत्र असून त्यास लागूनच सर्जेराव घाटग्याची बायजाबाईंने बांधलेली छत्री आहे..छत्रीच्या खर्चास दोन गांव इनाम आहेत. पुष्करास ब्रह्मदेवाचे मंदिर आहे, त्याचा जीर्णोद्धार गोकळ पारख म्हणून सिंद्याचा एक सावकार होता त्याच्या करवी केला,
गौघांटावर एक संगमरवरी छत्री आहे ती संतूजी वाबळे याची असून,या वाबळे घराण्याचा सिंद्यांचे पदरी उदय झाला.इस्माईल बेग गंगाराम भंडारी, खुशालीराम बोहरा, जयपुरचे कारभारी भीमसिंग हळदया वगैरे पुरुष,रणजितसिंग जाठ,गोहदकर राणे,राघवगडकर चव्हाण,काशी नरेश चेतसिंग,हिंमतबहादर गोसावी व त्याचा परिवार,प्रतापसिंग माचेडीवार , जयपुर,जोधपुर,उदेपुर,कोटा,बूंदी वगैरे ठिकठिकाणचे राजे व कारभारी यांचे उद्योग त्या त्या भाषांत उपलब्ध असतील उदेपुरचे कारस्थान मुख्यतः जालीमसिंग कटेकराच्या हातचे असून, तो व लालाजी बल्लाळ यांनी जी कारस्थाने केली,
त्यांचे उल्लेख गुलगुले पंडितांच्या दप्तरात सापडतात,मेडता पाटनच्या लढाया, अजमीरचा वेढा व रजपुतांशी झालेले महादजींचा तह,या सर्व गोष्टी सिनद्यांचे स्मरण ताजे ठेवतील,बुल्यम टोन व ब्राउटन यांच्यासारख्यांनी लिहुन ठेवलेल्या हाकिकती मराठेशाहीच्या निकृष्टावस्थेतल्या होत्या त्यांची दुसरी उज्ज्वल बाजू आपणांस मराठी कागदात मिळते,शिंदे घराण्याने व एकंदर मराठ्यांनी उत्तरेत चांगल्या गोष्टी काय केल्या,देवस्थानांची व धर्माची स्थापना कशी केली,अन्याय व अंदाधुंदी मोडून राज्याची व्यवस्था व लोकांची नीतिमत्ता कशी सुधारली,या गोष्टी बाहेर येऊन इतिहासाची पूर्तता झाली पाहिजे,अभ्यासकांस अद्यापि विपुल क्षेत्र आहे
संदर्भ-मराठी रियासत खंड ७ सरदेसाई.

#उत्तरेतील_मराठ्यांचा_दरारा #पाटीलबुवा

 पानिपतच्या युद्धानंतर उत्तरेत मराठ्यांची सत्ता थोडीशी कमकुवत झालेली होती, उत्तरेतील काही सत्ताधाऱ्यांनी मराठ्यांचे वर्चस्व जुगारून स्वतंत्र होण्याचा देखील प्रयत्न केलेला होता. उत्तरेत मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे आवश्यक होते आणि हे कार्य महादजी शिंदे यांनी केले हे प्रकर्षाने जाणवते. उत्तरेतील या मोहिमेत महादजी शिंदे यांच्याबरोबर अनेक मराठा सरदार होते पण विशेषतः महादजी शिंदे यांनी उत्तरेत आपले अस्तित्व आणि कर्तबगारी सिद्ध केलेले दिसून येते..

महादजी शिंदे यांनी उत्तरेत प्रवेश करताच प्रथम मराठा अंमलाखाली असलेल्या प्रदेशातून खंडणी वसूल करण्याचे काम केले. पानिपत युद्धानंतर काही राजांनी खंडणी दिलेली नव्हती ती महादजी शिंदे यांनी वसूल करून पहिल्यांदा मराठ्यांचा वचक निर्माण केला ( १७६९-१७७०)
पानिपतच्या युद्धानंतर नजीबखान हा दिल्लीत वजीर म्हणून काम करत होता पण काही कारणाने त्याने आपल्या मुलाला म्हणजे झबेताखान यास ही जबाबदारी सोपवून तो नजीबाबाद येथे राहण्यासाठी गेला होता. मराठ्यांनी उत्तरेत प्रवेश केलेला समजतास नजीबखान हा चिंतेत पडला, कारण त्याच्या मदतीस आता अब्दाली पुन्हा येऊ शकत नव्हता आणि त्यातच नजीबखानाचा ह्याचा मृत्यू झाला.( १७७० )
मराठ्यांनी आता दिल्लीवर आक्रमण करण्याचे ठरवले, त्याचवेळी महादजी शिंदे यांनी इटावा भाग जिंकला. मराठे वरचढ होत आहेत हे दिसताच झबेताखान याने दिल्लीतून पळ काढलेला होता आणि तो आता मराठ्यांच्यावर आक्रमण करण्याचा विचार करू लागला. दुसरीकडे महादजी शिंदे यांनी अहमदखान बंगश यास वटणीवर आणले, बंगश हा मराठयांना विरोध करू शकत नव्हता त्याने पानिपतनंतर जिंकलेला भाग मराठ्यांना परत केला. अशाप्रकारे दाओबमधील प्रदेश मराठयांनी पुन्हा काबीज केला आणि आपली सत्ता पुन्हा स्थापन केली.( १७७०- १७७१ )
१७७२ मध्ये मराठयांनी शुक्रताल काबीज केले, शुक्रताल येथे महादजी शिंदे यांचे बंधू दत्ताजी शिंदे यांचा मृत्यू झाला होता त्याचा बदला महादजी शिंदे यांनी घेतला, या युद्धातून झबेताखान याने पळ काढला. त्यानंतर महादजी शिंदे यांनी नजीबखान याच्या अंमलात असलेले शुक्रताल, फत्तरगढ व घोसगड हे बळकट किल्ले देखील काबीज केले. अशाप्रकारे मराठ्यांनी पुन्हा एकदा उत्तरेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

#उत्तरेतील_मराठ्यांचा_दरारा
-राज जाधव

जाटांचा पराभव आणि ६५ लाखांची युद्धखंडणी

 




जाटांचा पराभव आणि ६५ लाखांची युद्धखंडणी

पानिपत युद्ध झाले मराठ्यांची एक पिढी जागीच कामी आली,समस्त हिंदुस्थानात ऐतिहासिक घडा मोडी झाली,मराठ्यांची सत्ता अस्ताला जाती की काय अशी परिस्थिती निर्माण झाली, उत्तरेतील मराठ्यांची ही स्थिती पाहून लहान मोठ्या हिंदू मुस्लिम सत्तांनी मुंडकी वर काढायला सुरुवात केली,
इकडे दक्षिणेत पुणे दरबारात सत्तेसाठी चढा ओढ सुरू होती,याच राजकारणाचा फटका महादजी शिंदे या नव्या दमाच्या सरदाराला बसला,राघोबाने शिंदेशाहीची वस्त्रे देण्यास विलंब केला,राघोबाला भविष्यात महादजी शिंदे डोईजड होतील म्हणून त्यांनी कुरघोड्या करण्यास सुरू केल्या,अखेर महादजींना शिंदेशाहीची वस्त्रे मिळाली,
१७६९ साली पानिपतचा पराभवाचा कलंक,उत्तरेरील मराठ्यांची शानशौकत व उत्तर हिंदुस्थानात सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मोहीम आखली गेली, दक्षिणेतून रामचंद्र गणेश कानडे, विसाजीकृष्ण बिनवले आपल्या फौजीनिशी आले उत्तरेत शिंदे होळकर पवार यांच्या फौजा येऊन मिळाल्या,
उत्तरेत उभ्या ठाकलेल्या या मराठ्यांच्या फौजेचा पहिला सामना भरतपुरच्या जाटाशी झाला, भरतपुरचा राजा जवाहरसिंगच्या मृत्यू नंतर त्याच्या वारसामध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला, रणजितसिंहाने लष्करी सह्ययतासाठी मराठ्यांच्याकडे धाव घेतली,संधी चालून आलेली पाहून मराठ्यांनी उचल खाऊन नवलसिंग जाटाचा निर्णयक पराभव केला,सलामीलाच उत्तर मोहिमेतील मराठ्यांनी यश प्राप्त केले यामुळे अनेकांचे धाबे दणानले,मराठ्यांच्या फौजेत वीरश्री संचारु लागली लढण्याची नवीचेतना मिळू लागले,पानिपतचा बदला घेईला मराठ्यांनी सुरू केला,बेईमानी केलेल्या प्रत्येकाचा समाचार घेण्यास मराठ्यांनी प्रारंभ केला,
लागलीच जाटांची आग्रा व मथुरा ही शहरे जिंकून घेतली पुढे मथुरा येथे महादजी शिंदे यांनी दारू गोळ्याच्या कारखान्याची निर्मिती केली,
जाटांच्या प्रदेशात मराठ्यांनी धुमाकूळ घालून नवलसिंगला घायकुतीला आणला शेवट जाट राजा नवलसिंग याने शरणागती पत्करली व सप्टेंबर १७७० मध्ये मराठ्यांशी तह केला. या तहाचे मुद्दे
१)२०लाखांची जहागीर स्वीकारून जाटांनी मराठ्यांचे मांडलिकत्व पत्करले
२)युद्धखंडणी म्हणून ६५ लाख रुपये देण्याचे मान्य केले
३)वार्षिक ११ लक्ष रुपये खंडणी देण्याचे कबूल केले,
भरतपुरच्या जाटांना मराठ्यांनी नमवताच उत्तरेत मराठ्यांची दहशत दरारा पुन्हा प्रस्थापित झाली,आज नाही तर उद्या या दख्खनी मराठ्यांना आपण नर्मदेपार पिटाळून लावू या भ्रमक समजुतीत खुशीची गाजरे खाणाऱ्या उत्तरेतील हिंदू मुस्लिम राज्यकर्त्यांची झोपच उडाली!
पानिपतची भळ भळती जखम पचवून मराठे हिंदुस्थानात पुन्हा सिद्ध झाल्याची जानवी स्वकीय सत्ता आणि परकीय बंगालच्या ब्रिटिश सत्तेलाही झाली!
#हर हर महादेव
#संदर्भ-महादजी शिंदे आणि नाना फडणवीस
#श्रीनाथ माधवराव शिंदे
#शिंदे घराण्याचा इतिहास
#दौलतराव शिंदे कार्य आणि कर्तृत्वकाळ

चाफाजी शिंदे

 स्वराज्य उभे राहिले ते चाफाजी शिंदे यांच्यासारख्या अनेक अपरिचित सरदारांच्या कष्टावर. इतिहास वाचताना अनेकदा मोठी नावे समोर येतात, पण त्यांच्यासोबतच अनेक निष्ठावान सरदार पडद्यामागे राहून लढत होते.






चाफाजी शिंदे हे अशाच पैकी एक पराक्रमी नाव. त्यांच्याकडे पाच हजार पायदळ सैन्याचे नेतृत्व होते, ज्याला पदात पंचहजारी असे म्हटले जात असे.

सन १७०४ च्या सुमारास लोहगड किल्ला जिंकण्याची मोठी मोहीम हाती घेण्यात आली होती. हा काळ मराठ्यांच्या संघर्षाचा होता. लोहगडसारखा बळकट किल्ला पुन्हा स्वराज्यात आणणे सोपे नव्हते. चाफाजी शिंदे यांनी या मोहिमेसाठी स्वतः मेहनत घेऊन मोठी फौज जमवली आणि जिद्दीने ही लढाई लढली. त्यांच्या या कष्टाचे आणि एकनिष्ठेचे फळ म्हणून त्यांना स्वराज्यातून सन्मान मिळाला.
पेशवे दप्तरातील पत्र
श्री
मशरूल अनाम चाफाजी सिंदे पदात पंच हजारी यासी बहिरी मोरेश्वर प्रधान आशीर्वाद सुहूर सन खमस मया व अलफ. तुम्ही या राज्यांत कस्ट मेहणत एकनिष्टपणे केली च हाठी लोहगडचे प्रसंगी जमावणसी श्रम केला, यावद्दल तुम्हास वक्षीस घोडा वा तुपटा पेदस्त किले लोहगड पौौ किमत रुशा ७५ पचाहतरीत नदर यास खडून दिली असे. यास कोन्ही कृथला करावयास प्रयोजन नाहीं.. छ २४ रमजान. लखनसीमा.
चाफाजी शिंदे यांनी स्वराज्यासाठी जे कष्ट घेतले आणि लोहगडच्या मोहिमेत सैन्य जमवण्यासाठी जी मेहनत केली, त्याबद्दल त्यांना ७५ रुपये किमतीचा एक घोडा आणि एक दुपटा बक्षीस म्हणून दिला. ही घटना छत्रपती शाहू महाराज गादीवर येण्यापूर्वीची आहे. चाफाजी शिंदे यांच्यासारख्या अपरिचित सरदारांनी आपल्या रक्ताचे पाणी करून किल्ले जिंकले आणि स्वराज्य टिकवले, हेच या पत्रातून दिसून येते.
संदर्भ: पेशवे दप्तर, पत्र क्रमांक ८७ (१२ डिसेंबर १७०४).

जयपूरची गादी आणि मराठ्यांचे वर्चस्व..!!

 



जयपूरची गादी आणि मराठ्यांचे वर्चस्व..!!

१७५१ साली जयाप्पा शिंदे आणि मल्हारराव होळकर आपली मोठी फौज घेऊन जयपूरवर चालून गेले. मराठ्यांची ही फौज पाहून जयपूरचा राजा ईश्वरसिंग इतका घाबरला की त्याने स्वतःच आत्महत्या केली.
ईश्वरसिंगाच्या मृत्यूनंतर आता जयपूरसारख्या मोठ्या राज्याच्या गादीवर कोण बसणार, याचा निर्णय पूर्णपणे मराठ्यांच्या हातात आला. शिंदे आणि होळकरांनी जयपूरच्या राजकारणाची सूत्रे स्वतःच्या हातात घेतली आणि आपल्या मर्जीतील माधवसिंगाला जयपूरच्या गादीवर बसवले. एवढेच नाही, तर राजा बनवल्याच्या बदल्यात त्यांनी माधवसिंगाकडून मागची सगळी थकीत बाकी आणि नवी खंडणी वसूल केली.
पेशवे दप्तरातील नोंद-
"जैपुरास मुकाम आलियावर ईश्वरसिंग लयातें पावले. माधोसिंग याची राज्यस्थापना झाली. खंडणीचा व गुदस्ताची बाकी सुधा करार जाला ते वृत शेवेसी लिहून पाठविले आहे... प्रस्तुत राजे माधोसिंग यानीं पैगाम करून पूर्ववतप्रमाणे सलूख राखिला."
ज्या सवाई माधवसिंगाने पुढे मराठ्यांशी गद्दारी केली, त्याला त्याच जयपूरचा राजा बनवणारे खुद्द जयाप्पा शिंदे आणि मल्हारराव होळकर होते. राजपुतान्यात कोणाला राजा करायचे, ही ताकद मराठ्यांच्या तलवारीत होती!
संदर्भ-
१. पेशवे दप्तर भाग २१, पत्र क्रमांक ४०, पृष्ठ क्रमांक ३८ (१२ फेब्रुवारी १७५१)

इंग्रज अधिकारी महादजींबद्दल लिहितात

 


इंग्रज अधिकारी महादजींबद्दल लिहितात

​महादजींच्या सहवासात दीर्घकाळ राहिलेला इंग्रज वकील अँडरसन, गव्हर्नर जनरल (ग.ज.) हेस्टिंग्जला लिहितो
​"शांत व न्याय्य वृत्ती कायम ठेवून महादजींनी जी कामगिरी केली (साल्बाईचा तह), त्याबद्दल माझ्या मनात मोठा आदरभाव आहे. तो होता म्हणूनच बारभाईंच्या शंका दूर झाल्या. अशा थोर पुरुषांचा स्नेह आपण कधीही तोडू नये. युद्धात बाजू अंगावर आली तर त्यांचा हुरूप व शांती कधी भंग पावत नाही, तसेच विजय मिळाला असता ते हर्षाने फुगून जात नाहीत."
​हा अँडरसन काही काळ शिंद्यांच्या दरबारात इंग्रज वकील होता,
​आता प्रत्यक्ष ग.ज. वॉरन हेस्टिंग्ज काय लिहितो ते पाहूया —
​"महादजी कपटी व पाताळयंत्री आहेत, ते इंग्रज व अर्काटच्या नबाबाचा अत्यंत द्वेष करतात (हा नबाब इंग्रजांचा मित्र होता) असे पुष्कळ लोक मला सांगतात. पण मला ते बिलकूल खरे वाटत नाही. माझा त्यांचा इतक्या वर्षांचा संबंध आहे, त्यात लबाडीचे एकही उदाहरण नाही. गोहदच्या राण्याचे उदाहरण वारंवार दिले जाते; पण त्या राणाने आमच्याशी इतकी लबाडी केली आहे की, महादजी जे करत आहेत ते योग्यच वाटते."
​(राणाला योग्य धडा शिकवून श्रीमंतांनी त्याला ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैदेत ठेवले, तेव्हा त्याच्या पत्नीने गोहदच्या किल्ल्यात स्फोट घडवून आत्महत्या केली होती. प्रत्यक्ष ती त्यात मृत्युमुखी पडली होती).
​हेस्टिंग्ज पुढे म्हणतो, "उगाच अविश्वास दाखवून शिंद्यांना आपण दुखवू नये, नाहीतर आपल्या सत्तेस धोका निर्माण होईल."
​या गव्हर्नर जनरलवर असा आरोप होता की, मुगल बादशहाला महादजींनी इंग्रजांच्या ताब्यातून सोडवून आपल्या नियंत्रणात ठेवले. तसेच इंग्रज-मराठा पहिल्या युद्धाबद्दल हेस्टिंग्जला ब्रिटिश पार्लमेंटसमोर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. त्यावेळी त्याने महादजींचे ठाम समर्थन केले होते.
संदर्भ-अलिजाह बहाद्दूर महादजी शिंदे
​ डॉ.पी एन शिंदे

"कोपर्डेतील ऐतिहासिक वाडे- पानिपतकर शिंद्यांचा पराक्रम"

 








"कोपर्डेतील ऐतिहासिक वाडे- पानिपतकर शिंद्यांचा पराक्रम"

__________________________________________
सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यात कोपर्डे नावाचं एक जुने आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव आहे. लोणंद-खंडाळा रस्त्यालगत वसलेल्या या गावात शिरताच भूतकाळाची आठवण करून देणारे अनेक अवशेष दिसून येतात. गावात आजही दगडी दरवाजे, तटबंदी, नगारखाने, आणि वाड्यांच्या खुणा टिकून आहेत.मराठा शैलीतील हे वाडे आणि रक्षणासाठी बांधलेली तटबंदी आजही गावाचं वैशिष्ट्य जपून आहेत..!!
ग्वाल्हेरमध्ये आजही “पानिपत्ते की गोठ” “पानिपतकर शिंदे यांची गोठ” म्हणून ओळख असलेलं त्यांच्या वसाहतीच ठिकाण आहे, पानिपताच्या तिसऱ्या रणसंग्रामात कोपर्डे गावातील शिंदे घराण्याने भाग घेतला होता. या युद्धात त्यांच्या घराण्यातील अनेक पुरुष धारातीर्थी पडले. एका अर्थाने एक संपूर्ण पिढीच या युद्धात गारद झाली. त्यामुळे गावाला 'पानिपतकर शिंदे' असं नाव पडले..!!
या घराण्याने केवळ पानिपतच्या युद्धातच नव्हे, तर संपूर्ण मराठेशाहीच्या काळात आपल्या शौर्याचं उदाहरण दिलं.शौर्य,स्वामीनिष्ठ,त्याग बलिदान यासाठी हे घराणं ओळखलं जातं..!!
गावात प्रवेश करताच स्वागताला एक भक्कम दगडी प्रवेशद्वार दिसतं. त्याच्या मागे गावाचं जुना किल्ल्यासारखा रक्षण केलेला परिसर दिसतो. नगारखाने, उंच भिंती, आणि तटबंदी यामुळे गावाचं पूर्वीचं सामर्थ्य आजही लक्षात येतं. गावात काही वाडे अजूनही चांगल्या स्थितीत आहेत.काळे पाषाण दगडी रचना, खोल अंगणं आणि मजबूत पाया असलेले हे वाडे कोपर्ड्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात..!!
गावात मंदिराच्या शेजारी समाधीस्थळं आहेत, जी पानिपत मोहिमेतील बलिदानाची आठवण करून देतात. तसंच गावात जुन्या वीरगळी आहेत. ही सगळी ठिकाणं गावाच्या समृद्ध परंपरेचं आणि बलिदानाचे प्रतीक आहेत..!!
कोपर्डे हे गाव फक्त एक वस्ती नाही, तर एका संपूर्ण इतिहासाची साक्ष आहे. येथे आले की, प्रत्येक वाडा, प्रत्येक दगड, आणि प्रत्येक वास्तू काहीतरी सांगत असते. पानिपताच्या रणभूमीत लढलेलं हे गाव आजही आपल्या पराक्रमाची आणि बलिदानाची गाथा शांतपणे सांगत उभं आहे..!!

#उमाबाई_दाभाडे (Umabai Dabhade) # #मराठा_साम्राज्यातील_पहिली_आणि_एकमेव_महिला_सरसेनापती (Commander-in-Chief)

 #शाहूपर्व


#उमाबाई_दाभाडे
(Umabai Dabhade) #छत्रपती_थोरले_शाहू_महाराज यांच्या वेळी ही #मराठा_साम्राज्यातील_पहिली_आणि_एकमेव_महिला_सरसेनापती (Commander-in-Chief) होती. त्या मराठा इतिहासातील एक अत्यंत शूर, कर्तबगार आणि जिद्दी स्त्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी पुरुषप्रधान लष्करी आणि राजकीय क्षेत्रात मोठे पराक्रम दाखवले आणि दाभाडे घराण्याचे नेतृत्व सांभाळले.
मुख्य माहिती:
#जन्म: खानदेशातील अभोणा (Abhona, नाशिक जिल्हा) येथे. त्या देवराव ठोके (अभोनकर देशमुख) यांच्या कन्या होत्या. लहानपणीच घोड्यावर बसणे, तलवारबाजी आणि इतर योद्धा कौशल्ये शिकल्या होत्या.
विवाह: खंडेराव दाभाडे (सरसेनापती) यांच्याशी. खंडेराव हे शिवाजी महाराजांचे अंगरक्षक येसाजी दाभाडे यांचे पुत्र होते.
#मृत्यू: २८ नोव्हेंबर १७५३ (वृद्धापकाळाने). त्यांची समाधी तळेगाव दाभाडे (पुणे जिल्हा) येथील श्री बनेश्वर मंदिराजवळ आहे.
लष्करी आणि राजकीय कारकीर्द:
खंडेराव दाभाडे यांचा मृत्यू २७ सप्टेंबर १७२९ रोजी झाल्यानंतर, त्यांचा थोरला मुलगा त्रिंबकराव दाभाडे सरसेनापती झाला. पण १७३१ मध्ये बाजीराव पेशवा यांच्याविरुद्ध बिल्हापूरची लढाई (Battle of Bilhapur) झाली, ज्यात त्रिंबकराव मारले गेले.
त्रिंबकराव यांच्यानंतर दुसरा मुलगा यशवंतराव दाभाडे लहान असल्याने, उमाबाई यांनी दाभाडे घराण्याचे मुख्य नेतृत्व सांभाळले. सुमारे १७३२ मध्ये त्यांना सरसेनापती पद मिळाले. त्या मराठा सैन्याच्या इतिहासातील पहिल्या महिला सरसेनापती ठरल्या.02f5d3
त्यांनी गुजरात प्रांतातील मोहिमा यशस्वीपणे हाताळल्या. दाभाडे घराण्याला गुजरातमधील चौथ आणि सरदेशमुखी वसुलीचे हक्क होते. बाजीराव पेशव्यांशी मतभेद झाल्याने (गुजरातच्या महसुलावरून) उमाबाईंनी पेशव्यांच्या विरोधात बंड केले.
बाजीराव प्रथम यांच्यानंतर बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांच्या काळातही मतभेद कायम राहिले.
उमाबाईंनी दामाजी गायकवाड यांच्यासोबत युती करून १७५० च्या आसपास पेशव्यांविरुद्ध मोठे बंड केले. त्यात महाराणी ताराबाई यांचाही सहभाग होता.
पेशव्यांनी या बंडाला चिरडले. उमाबाईंना मोठा दंड (इंडेम्निटी) भरण्यास सांगितले गेले, पण त्या पूर्णपणे शरण गेल्या नाहीत. तरीही दाभाडे घराण्याचा प्रभाव कमी झाला.
उमाबाईंनी सुरुवातीला पेशव्यांशी समझोता दाखवला, पण आपल्या मुलाच्या मृत्यूचा राग मनात ठेवला आणि पूर्ण सहकार्य केले नाही.
कुटुंब:
#पती: खंडेराव दाभाडे (सरसेनापती).
मुलगे:
त्रिंबकराव दाभाडे (सरसेनापती, १७३१ मध्ये मारले गेले).
यशवंतराव दाभाडे (नंतर सरसेनापती पद मिळाले, पण लहानपणी उमाबाईंच्या देखरेखीत).
#दाभाडे_घराणे_शिवाजी_महाराजांपासून_निष्ठावंत_होते, पण पेशवाईच्या उदयानंतर त्यांच्यात सत्तासंघर्ष झाला.
उमाबाई दाभाडे यांना "भद्रकाली" सारखे उपनाम मिळाले कारण त्या रणांगणात भयंकर आणि शूर होत्या. त्यांनी पुरुषांच्या बरोबरीने लष्करी निर्णय घेतले, जहागिरी सांभाळल्या आणि घराण्याचे रक्षण केले. मराठा इतिहासात त्यांचे योगदान "लढवय्या स्त्रिया" म्हणून महत्त्वाचे आहे, जसे की अहिल्यादेवी होळकर किंवा अन्य योद्ध्या स्त्रियांप्रमाणे.
आजही त्यांचा चरित्रपट "भद्रकाली" सारखे प्रयत्न झाले आहेत, ज्यात त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यात आला आहे.

खिळचीपूर संस्थानाची सनद..!!

  खिळचीपूर संस्थानाची सनद..!! रतलाम आणि सैलानाप्रमाणेच माळवा प्रांतातील खिळचीपूर हे देखील एक महत्त्वाचे संस्थान होते. या संस्थानावरही शिंदे ...