विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 28 July 2020

राजकुमारी पणाला लावते ..!!



राजकुमारी पणाला लावते ..!!

postsaambhar :Prashant Babanrao Lavate-Patil

अहिल्यादेवींनी सरदार होळकर यांच्यावर सुभेदाराची जबाबदारी सोपवून राज्यकारभार स्वतःच्या हाती घेतला. इंदोर हे होळकरांचे मुख्य ठाणे होते सर्व कारभार इंदोर मधून चालत असे. होळकरांची राजधानीच इंदोर. पण याच ठिकाणी देवींनी आपले सासरे, सासू, पती आणि मुलगा हे जग सोडून गेले होते त्यामुळे तिथे त्यांना त्यांच्या आठवणी सतत सतावत होत्या. यामुळे त्यांनी आपले ठिकाण इंदोर वरून महेश्वरला हलवण्याचे ठरवले. महेश्वरचा मल्हारबांनी १७४५ साली चांगला विकास केला होता. देवींनी येथे आल्यावर महिलांना रोजगार मिळावा म्हणून वस्त्र उद्योग सुरू केला. आजही महेश्वर साड्या प्रसिद्ध आहेत.

पेशव्यांचा डाव फसला होता. देवींना दरबारातील चतुर कारकून शिवाजी गोपाळ आणि राजाराम रणसोड हे गंगाधरपंतावर नेहमी लक्ष ठेवून सर्व कारस्थाने कळवीत होते. सुभेदार तुकोजी होळकर यांच्यासोबत शिवाजी गोपाळ यांना पुण्याला पाठवले. पण पेशव्यांनी गोपाळ यांना ठेवून घेतले व सुभेदार तुकोजी होळकर यांना दिवानजी म्हणून नारो गणेश शौचे यांना पाठवले. पेशव्यांची ही कपटी खेळी देवींच्या लक्षात आली होती त्यामुळे त्यांचा संताप वाढला होता. इकडे पेशव्यांनी चारी बाजुंनी कारस्थाने सुरू केली होती आणि त्याचवेळी राज्यात चोर, डाकू आणि लुटाऱ्यांनी राज्यात धुमाकूळ घातला होता. रयत यामुळे भीतीच्या वातावरणात होती आणि याचा बंदोबस्त करणे देवींनी ठरवले.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

एक दिवस देवींनी सर्व सरदार आणि प्रमुख व्यक्तींना दरबारात बोलवले आणि त्यांच्यासमोर हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर जी देवींनी घोषणा केली ती महत्वाची होती. त्यांनी घोषणा केली,

"जो वीर माझ्या राज्यातील चोर, डाकू, लुटेरे यांचा बंदोबस्त करून राज्यात शांतता निर्माण करेल त्याचे लग्न मी माझी एकुलती एक कन्या मुक्ताबाईंशी लग्न लावून देईन."

ही घोषणा ऐकून संपूर्ण दरबार थक्क झाला.

यातून एक वीर तरुण पुढे आला आणि ही जबाबदारी स्वीकारली. लागणारे सैन्य व धन देण्यात यावे आणि चोर लुटारूंनी काळजी सोडावी, त्यांचा बंदोबस्त होईल, असा विश्वास त्यांनी देवींनी दिला. हा तरुण म्हणजे "यशवंतराव फणसे". दिलेल्या वचनाप्रमाणे यशवंतरावांनी सर्व चोर, डाकू आणि लुटारूंचा बंदोबस्त करून देवींना भेटण्यासाठी दरबारात आले. देवी अत्यंत खुष होत्या कारण रयतेच्या सुरक्षिततेबद्दलचा एक मोठा प्रश्न आता सुटला होता. देवींनी दिलेल्या वचनाप्रमाणे १७६६ साली राजकुमारी मुक्ताबाई यांचे लग्न यशवंरावांशी लावून दिले आणि यशवंतरावांना काही गावांची जहागिरी दिली.

१७६७ साली यशवंतरावांना मुलगा झाला ज्याचे नाव 'नथोबा' ठेवण्यात आले. पण स्वकीयांना गमावण्याचे दुःख जणू देवींचा पाठलाग सोडतच नव्हते. अल्पजीवी नथोबांचा मृत्यू १७९० साली झाला आणि पुढे वर्षभरात यशवंतराव व मुक्ताबाईंचा मृत्यू झाला.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संदर्भ: "लोकमाता-राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर".
लेखक: गोविंदराम शुरनर.

#अहिल्यापर्व
#जागर_इतिहासाचा

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...