दोन दिवसा पुर्वी जंजिरे विजयदुर्गाची तटबंदी ढासळल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत .या संदर्भात आजच खासदार संभाजीराजांनी थेट दिल्ली येथे जाऊन सबंधीत मंत्र्यांची भेट घेऊन हि तटबंदी जतन ,संवर्धना चे आदेश मिळवले आहेत.
सन१६५६ मधे जावळी मारुन शिवरायांनी स्वराज्याचा विस्तार समुद्रा पर्यंत केला होता. याच वेळी त्यांनी अदिलशहीचा हा घेरीया नावाचा जलदुर्ग जिंकून घेतला या दुर्गाची संपूर्ण पुर्णबांधणी केली आणि नाव ठेवले विजयदुर्ग. हा दुर्ग पूढे जाऊन मराठा आरमाराचा केंद्र बिंदू झाला. समुद्रावरील मराठा आरमाराचे मुख्य आश्रयस्थान झाला.सरखेल कान्होजी आंग्रानी तर या दुर्गांच्या अधाराने परकिय दर्यावर्दी सत्ताना सिंधूसागराचे पाणीच पाजले. इंग्रजांना या मराठ्यांच्या जलदुर्गाचा भारी दरारा आणि धाक वाटत होता. या टोपड्यानी हा दुर्ग जिंकून घेण्यासाठी अनेक स्वार्या केल्या पण शूर आंग्रांनी आणि विजयदुर्गाःच्या बुलंद तटबंदिने इंग्रजांच्या आक्रमणाला दाद दिली नाही. पण सन १७५६/५७ मधे पेशवा नानासाहेबांने इंग्रजांशी हातमिळवणी करुन हा दुर्ग सरखेल तुळाजीआंग्रां कडून जिकून घेतला. खरेतर पेशवा नाना भटा च्या सहकार्य ने इंग्रजांनीच हा दुर्ग जिंकला. याच वेळी आंग्रांच्या नेतृत्वाखाली आसणारे मराठ्यांचे आरमार याच दुर्गाच्या साक्षीने जाळले गेले. याच वेळी विजयदुर्गाचा काही भागही जळाला ! हि नाना पेशव्यांने तुळाजी आंग्रांच्या द्वेषा तुन केलेली मोठी चूक पूढे हिंदूस्थानाच्या पारतंत्रांची पहाट ठरली .
आज वाचन करत आसताना याच बद्दल चे ऐक पत्र मिळाले .नाना ऊर्फ बाळाजी बाजीराव प्रधानाला विजयदुर्गाच्या पाडावाची किती अतुरता होती हे या पत्रा वरुन दिसून येते. दिनांक १४ फेब्रुवारी १७५६ चे पत्र शनिवारवाड्याच्या कचेरीतुन सुटले आहे ...
इंग्रजाचे साहयाने झालेला विजयदुर्गाचा पाडाव व तुळाजीचे पारिपत्य हा नानाच्या पेशवाईतील एक विषादजनक बनाव आहे.हा बनाव कसा सिद्धझाला याचे हे पत्र उदाहरण आहे.हे पत्र पेशवे दप्तर भाग २४ मधे छापलेले आहे.विजयदुर्गाच्या पाडावाची अशी अनेक पत्रे उपलब्ध आहेत पण तुर्तास येवढेच वाचूया...
श्री.
राजश्री जावजी गौली(गोळे असावे?) गोसावी यांसी अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नाा बालाजी बाजीराऊ प्रधान असीर्वाद . सुहूर सन सीत खमसैन मया व अलफ( हि मुसलमानी कालगणनेची पद्धत आहे. शिवरायांनी सूरु केलेली मराठी कालगणना पुढे बंद पडली आणि मराठी राज्यकर्ते अशी मूस्लीम कालगणना पद्धत वापरु लागले )मुंबईकर इंग्रज यावयाचा गुंता होता त्यास सर्व सरंजाम आरमारसामानसुधा येऊन पोहोचला . राजश्री रामाजी माहादेवहि आले . तुम्ही आहाच . अतःपर गुंता राहिला नाही . तरी तुम्ही सर्व सरदार येकचित होऊन मातबर येलगार ' करून मुख्य स्थलं(विजयदुर्ग) हस्तगत करणे . आंगारकाचे(आंग्रे) भेटीचा मजकूर कोण्ही बोलावयास येईल तरी सहसा न आइकणे . येविसी राजश्री रामाजी माहादेव यास सविस्तर आर्थ लिहिला आहे . आंगारकाचे भेटीचे प्रयोजन नाही . निकडीने येलगार करून कार्यसिध्धि करणे . * असा समय पुढे कधी येणार नाही हे पुढे चितात आणून सर्व येक विचारे होऊन कार्य करणे . जाणिजे छ १३ जमादिलोवल . बहुत काय लिहिणे ?
आशीच निकड करुन अख्खी पेशवाई विजयदुर्गा विरुद्द उभी राहिली ! दुर्ग इंग्रजांनी जिंकला पण लगेच नाना पेशव्याला दिला नाही . खुप विनंत्या करुन करुन मग .विजयदुर्ग पेशव्याला मिळाला पण मराठा आरमार तर सगळे जळाले होते .त्याच बरोबर सरखेल आंग्रे घराण्याची ताकदही संपली. हिंदुस्थान चा समुद्र किनारा इंग्रजाना मोकळा झाला. राष्ट्रीय नेतृत्व कसे नसावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाना पेशवा .
असो! मराठा आरमाराचे बलस्थान आसणारा शिवरायांचा विजयदुर्ग जपला जावा ही आपल्यासर्व दुर्ग अभ्यासकांची इच्छा पूर्ण होईल .या आशेसह!
जय शिवराय!
इंद्रजित सावंत,
६/८/२०२०,
कोल्हापूर.
No comments:
Post a Comment