विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 4 August 2020

औरंगजेब एक अजब रसायन भाग २

औरंगजेब एक अजब रसायन भाग २
एखाद्या राज्याचा अपकर्ष हा त्याच्या शासन व्यवस्थेच्या कमकुवतपणा मुळे होत असतो. औरंगजेबाचा अपकर्ष होण्यामागे काही अंशी त्याच्या राज्य व्यवस्थेअंतर्गत काम करणारे मनसबदार व त्यांची व्यवस्था हेही कारणीभूत ठरले.
मोगल काळात जहागिरीची पद्धत ही वंशपरंपरेच्या परंपरेचा तत्वावर आधारलेली नव्हती. बादशहा हा राज्यातील सर्व जमिनीचा मालक समजला जाई. राज्याचे बैत ऊलमाल नावाचे स्वतंत्र खाते होते. या खात्याकडे या व्यक्ती वारस न ठेवता भूत होत त्यांची आणि त्याचप्रमाणे अमीर उमराव आणि राज्याचे इतर अधिकारी मरण पावत त्यांची मालमत्ता सोपवली जाई. या पद्धतीचे मुख्य कारण असे होते की, प्रत्येक अधिकाऱ्याकडे सरकारी देणे थकलेले असे. मोगल राज्यात प्रत्येक अधिकारी हा मनसबदार असे. त्याचा पगार त्याच्या जहागिरीच्या उत्पन्नातून त्याला मिळे. हा पगार त्यांनी ठेवलेल्या स्वरांच्या संख्येशी मिळता आहे किंवा नाही याची नोंद त्या स्वरांची मोजदाद केल्याशिवाय होत नसे. हे काम व्यवस्थित असे शांततेच्या काळात होइ. औरंगजेबाची ची कारकीर्द सतत युद्धात गेल्यामुळे कोणत्याही अधिकार्याचे हिशेब पूर्ण होत नसत. अशा परिस्थितीत प्रत्येक अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर तात्पुरती का होईना त्याची मालमत्ता सरकार कडून जप्त केली जाई. असे करण्यामध्ये बादशहाचा उद्देश मृत व्यक्ती सरकारचे जे देणे आहे ते वसूल व्हावे असा असे. औरंगजेबाचे याबाबत हुकूम अगदी स्पष्ट होते. परंतु एखाद्या म्रुत अधिकाऱ्याचा वारस देण्याबद्दल जामीन राही त्यावेळी मालमत्ता जप्त करण्यात येत नसे.
या पद्धतीचे मूळ काही असले तरी या पद्धतीचे परिणाम खूप विघातक होते. आपल्या पाठीमागे आपल्या कुटुंबीय मंडळी करता आपण काहीही ठेवू शकत नाही या जाणिवेने सरदार मंडळी आपल्या हयातीत पैशाची उधळमाधळ करीत, आणि आपली संपत्ती नाच रंग दारू आणि स्त्रिया यावर खर्च करीत. सहाजिकच मोगल साम्राज्यातील एक महत्त्वाचा वर्ग समाजाच्या दृष्टीने कुचकामी ठरला. या पद्धतीचा आणखी एक वाईट परिणाम झाला आणि तो म्हणजे खाजगी भांडवलाची साठवण होईनाशी झाली आणि समाजाच्या आर्थिक विकासाला त्यामुळे खो बसला. राजकीय दृष्टिकोनातून देखील या पद्धतीचे अनेक दुष्परिणाम झाले. बादशहाच्या सत्तेला पायबंद घालणारा आणि सार्वजनिक स्वातंत्र्याचे रक्षण करणारा असा सरदार वर्ग अतिशय कमकुवत बनला. लढाईच्या काळात अथवा वारसा हक्काचे युद्ध चालू असताना जिथे जय असेल तिकडे जाऊन मिळण्याची सरदार वर्गाची वृत्ती बनली. परिणामी सरदार वर्गाप्रमाणेच सरकार ही अस्थिर व दुबळे बनले.
अमीर उमरावावर मोगल बादशहाची वरील पद्धतीमुळे अतिशय हुकुमत चाले. त्याशिवाय बादशहाच्या हातात उमरावावर सत्ता चालवण्यासाठी आणखी एक शस्त्र होते. औरंगजेबाच्या उमरावामध्ये पुष्कळसे उमराव पर्शिया पूर्व आशिया आणि तुर्कस्थान यामधून आलेले होते. हिंदुस्थानातील मुसलमानांपेक्षा ते श्रेष्ठ आहेत असे औरंगजेब मानीत असे. आपल्या देशातील बादशहाच्या संतापाला बळी पडल्यामुळे जेव्हा अशी सरदार मंडळी हिंदुस्तानात येत तेव्हा मोगल दरबारात त्यांना अतिशय मान दिला जाई. त्यांनी येथील बादशहा जवळ प्रामाणिक राहावे म्हणून त्यांना फार मोठी किंमत द्यावी लागे. आपली बायका-मुले हिंदुस्तानात आणण्याची त्यांच्यावर सक्ती केली जाई. त्याकरिता त्यांना मोठ्या जागेवर कायम करण्यात येत नसे किंवा स्वतंत्र अधिकार दिले जात नसत. त्याबरोबर जेव्हा-जेव्हा ते सुभ्यावर कामगिरी करता जात तेव्हा त्यांना दरबारात आपला मुलगा प्रतिनिधी म्हणून ठेवावा लागे.

No comments:

Post a Comment

शिवरायांचे ज्ञात अज्ञात कष्टकरी मावळे ‘बकाजी फर्जंद’...🚩

  बकाजी फर्जंद यांस पाटीलकी बहाल २५ सप्टेंबर १६७५ शिवरायांचे ज्ञात अज्ञात कष्टकरी मावळे ‘बकाजी फर्जंद’... महाराजांची प्रामाणिकपणे सेवा करून ...