विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 26 February 2021

शहाजी राजे यांचे निधन !

 


शहाजी राजे यांचे निधन !
शके १५८४ च्या माघ शु.५ रोजी शिवरायाचे वडील 'स्वराज्यसंकल्पक' शहाजी राजे यांचे निधन झाले.
बेदनूरच्या स्वारीत असतांना तुंगभद्रेच्या तीरी बसवापट्टणजवळ होडिकेरी येथे त्यांचा मुक्काम होता.-" या ठिकाणी अनेक श्वापदे उठली. राजास शिकार करावयाची इच्छा होऊन घोड्यावर स्वार होऊन हरणाचे पाठीस लागले. ईश्वरेच्छा त्यायोगें घोड्याचा पाव भंडोळीत अडकून, घोडा व राजे एकवच्छेदें पडले, ते गतप्राण झाले. मागाहून लोकमाणसे आली. त्यांनी एकोजी राजांस तेथे आणविल. एकोजी राजे यांनी उत्तर क्रिया सांग केली. शिवाजी राजे सुरतेच्या स्वारीहून परत आल्यावर वृत्त कळून जिजाबाई सुद्धां शोकसमुद्री बुडून बहुत विलाप केला."
शहाजी राजे मोठे धाडसी, कल्पक, व विपन्नावस्थेत न डगमगणारे होते. कर्नाटकात मराठ्यांचा प्रवेश प्रथम शहाजी राजांनीे करविला. ब्राह्मण, क्षत्रिय, कारागीर यांची महाराष्ट्रीय संस्कृति दक्षिणेत अद्यापि दिसून येते. सन १६३६ सालापर्यंत निजामशाहीचा कारभार पाहिल्यानंतर त्यांची दृष्टि कर्नाटकाकडे वळली. मोंगल नर्मदे अलीकडे येऊ नयेत म्हणून शहाजी राजांनी कमालीचे प्रयत्न केले. शहाजहानच्या दोन लाख फौजेस सुद्धा त्यांनी दाद दिली नाही. तत्कालीन व्यक्तीत राष्ट्रीय स्वत्व दिमाखाने दाखवणारा हेच एकटे हिंदु सत्ताधीश दक्षिणेत होते. आपण हिंदु असून मुसलमानी सत्तेची वृद्धि करण्यास आपला पराक्रम कारणीभूत होतो याची जाणीव शहाजी राजास कष्टी करीत होती. पूर्वपरंपरेची, प्राचीन संस्कृतीची व संस्कृत विद्येची आवड शहाजी राजांच्या ठिकाणी होती. ते विद्या कलांचे भोक्ते होते. कवींना, शिल्पज्ञांना बंगलोर, तंजावरास जो आश्रय मिळाला तो महाराष्ट्रांत मिळाला नाही. शहाजी राजांनी निर्माण केलेली प्राचीन संस्कृतीची ही आवड आजहि त्या प्रांतांतून दिसून येते. विजयनगरचा शेवटचा राजा श्रीरंगराय याबद्दल शहाजी राजांस पराकाष्ठेचा आदर होता; त्याचा बचाव करण्याची त्यांनी शिकस्त केली.
-२३ जानेवारी १६६४

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...