भाग १
इतिहासावरील वाद इतके अटीतटीचे आणि प्रक्षोभक आहेत की, त्यातून इतिहास हरवतो आणि इतिहासकार मात्र उरतात. सध्या मराठी आणि मराठा या संज्ञा एकदम प्रक्षोभक झाल्या आहेत.
सतराव्या शतकाच्या मध्यापासून (शिवकाल) महाराष्ट्रावर मराठ्यांची सत्ता प्रस्थापित होण्यास प्रारंभ झाला. आधुनिक इतिहासकारांच्या मते, ऐतिहासिक कागदपत्रांत मराठा हा शब्द जातीवाचक (म्हणजे सध्या जो मराठा समाज आहे तो) म्हणून वापरला जात नसून तो महाराष्ट्रातील मराठी भाषिकांचे लोक या अर्थाने वापरला जातो. असे असले तरी, महाराष्ट्रावर राजकीय सत्ता हे मुख्यत्वेकरून मराठा जातीनेच प्रस्थापित केली होती. म्हणून या साम्राज्याला मराठा साम्राज्य असे नाव पडले.
यादवांचे राज्य नष्ट झाल्यानंतर जवळ जवळ 300 वर्ष महाराष्ट्रात स्वातंत्र्याचा सूर्य उगवलाच नव्हता.अशा परिस्थितीत स्वराज्य निर्मिती आणि आत्म गौरवासाठी बेलभंडारा हाती घेणारी इतिहास प्रसिद्ध क्षत्रिय जमात म्हणजेच मराठा होय.
शिवपूर्व कालखंडात अनेक यवनी राजसत्तेचा अंमल हिंदुस्थानात होता. अनेक कर्तुत्ववान मराठा घराणे आपल्या पराक्रमाचा उपयोग या शाह्यांच्या सत्तेच्या संरक्षणासाठी करीत होत्या. मराठा घराण्याचा वापर करून प्रबळ होऊ पाहणाऱ्या सुलतानांमुळे अनेक मराठ्यांना उत्कर्षाची संधी मिळाली. या परिस्थितीचा योग्य वापर करत आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर अनेक मराठा घराणी उदयास आली.
मराठ्यांच्या उदयाची कारणे इतिहासकारांनी निरनिराळी दिली आहेत. परंतु राजकीय क्षेत्रावर मराठ्यांचा उदय खऱ्या अर्थाने सतराव्या शतकातच झाला.
मराठ्यांचा प्रसिद्ध इंग्रज इतिहासकार ग्रॅंट डफ यांच्या मते, हा उदय सह्याद्री पर्वतात वणवा पेटावा तसा अगदी दैवतघटित परिस्थितीमुळे झाला.
न्यायमूर्ती रानड्यांना मात्र प्रामाणिक प्रयत्न करून मराठ्यांनी आपला उदय करून घेतला असे वाटते.
राजवाडे यांच्या मते, परदेशी आणि दख्खनी मुसलमानांचे वर्चस्व रोखण्याकरिता अहमदनगरच्या निजामशहाने मराठ्यांना आपल्या दरबारात हेतुपूर्वक उत्तेजन देऊन एक मराठा पक्ष निर्माण केला आणि त्यातूनच मराठ्यांचा उदय झाला.
No comments:
Post a Comment