विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 14 June 2021

अपरिचित मराठा वीर 🚩 🌞सरदार कर्णाजीराव शिंदे-कुडाळक

 




अपरिचित मराठा वीर

🚩
🌞सरदार कर्णाजीराव शिंदे-कुडाळकर🌞
-------------------------------------------
हाती लखलखणाऱ्या तलवारीच पात..
ऐटबाज मर्द रांगडी चाल...
मांड टाकतो पाठीवर घोड्याच्या रुबाबात..
कर्नाटक मोहीम गाजवे शिंद्यांचा हा शूरवीर..
छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या कार्यकाळात मध्ये स्वराज्याचे बलाढ्य मराठा साम्राज्यात रूपांतर झाले.मराठयांचे हे साम्राज्य उभे करायला बऱ्याच मातब्बर व्यक्ती कामी आल्या,अगदी छत्रपती शिवरायांच्या पासून ते छत्रपती शाहूमहाराज यांच्या पर्यंतच्या कार्यकाळात कित्येक शूरवीर मराठा सरदार यांनी आपल्या प्राणांची आहुती या यज्ञकुंडात देऊन राष्ट्रसेवा केली. कित्येक वीर आपल्या पराक्रमामुळे इतिहासात प्रसिद्ध झाले तर काहींच्या नशिबी इतिहासातील एक पान ही नाही आले.मोहिमेत अतुलनीय,अविश्वसनीय पराक्रम करून ही काहींचे मुद्दामून म्हणा किंवा अन्य कारणांमुळे महत्व अगदीच नगण्य करण्यात आले.इतिहासात अशी कितीतरी उदाहरणे आहेत पण सत्य इतिहास कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी तो उजेडात येतोच. मराठ्यांनी इतिहास लिहला तो आपल्या तलवारीच्या जोरावर असो पण हा अंधारातील इतिहास उजेडात आणण्याचे कर्तव्य प्रत्येकाचे आहे.अश्याच एका अपरिचित वीर सरदार कर्णाजीराव शिंदे यांनी कर्नाटक मोहिमेत आपल्या अफाट शौर्याचे प्रदर्शन केले.
सरदार कर्णाजीराव शिंदेची विस्तृत माहिती कुठेही मिळत नाही परंतु हे कर्णाजीराव जावळीतील कुडाळ गावचे, शाहू महाराज यांच्या कार्यकाळात पश्चिम महाराष्ट्र्रातील शिंदे घराण्यातील बऱ्याच मातब्बर पुरुषांनी मोठ्या निष्ठेने शाहू महाराजांची सेवा केली. कण्हेरखेडकर शिंदे,कुडाळकर शिंदे,ताथवडाकर शिंदे, पिंगोरीकर शिंदे,मळणगावकर शिंदे,सालपे-तांबवे-कोपर्डे गावचे पानिपतकर शिंदे अशी कित्येक घराणी नावारूपास आली.त्यापैकी हे कर्णाजीराव कुडाळ शाखेतले.या लेखाच्या माध्यमातून सरदार कर्णाजीराव शिंदे यांच्या बद्दल अजून माहिती मिळविण्याचा प्रयत्न पुढे नक्कीच होईल.पूर्वी एखादी मोहीम निघाल्यावर त्या मोहिमेचे जो कोणी नेतृत्व करत असेल त्याच्या नावानेच मोहिमेला ओळख मिळत त्यामुळे सोबत असणाऱ्या मातब्बर शूरवीरांचे महत्त्व नगण्य होत असत.यालाच बळी पडलेले हे सरदार कर्णाजीराव शिंदे त्यापैकी एक आहेत.कर्नाटक मोहिमेत ते रघुजी भोसले यांच्या समवेत होते.
मोगल साम्राज्याच्या पडत्या काळात प्रांतिक अंमलदार स्वातंत्र्य धारण करू लागले.अर्काट येथे नवाब दोस्तअली कारभार करत होता त्याचा जावई चंदासाहेब हुशार व खटपटी होता.तो फ्रेंच्यांच्या मदतीने प्रबळ होऊ लागला त्याने त्रिचनापल्ली जिंकून आपले वास्तव्य फार मजबूत केले होते.तंजावरचे राज्य जिंकून ते आपल्या घशात टाकण्याचा तो उपक्रम करू लागला.तंजावरचे मराठा राज्य व्यंकोजीराजे भोसले यांच्या वेळेपासून स्वतंत्र होते.छत्रपती शाहुमहाराज यांचा तंजावरच्या घराण्याशी मोठा स्नेहभाव होता.1740 साली प्रतापसिंहराजे भोसले तंजावरच्या गादीवर बसले.त्यांना वाटू लागले चंदासाहेब कडून तंजावरच्या राज्यास अपाय होऊ शकतो म्हणून त्यांनी छत्रपती शाहूमहाराज यांची मदत मागितली.
तंजावरच्या गादीबद्दल शाहूमहाराजांना अत्यंत आदर होता.तंजावरच्या घराण्याबद्दल त्यांना नेहमी कळकळ वाटत असे,मराठा साम्राज्याचा शत्रूंचा पाडाव करण्यासाठी त्यांनी जो निग्रह दाखविला त्याहून कितीतरी उत्कंठा कर्नाटकमधले तंजावरचे राज्य संकटमुक्त रहावे असे त्यांना वाटत असत.आणि येथूनच कर्नाटक मोहीम निघाली या मोहिमेचे नेतृत्व रघुजी भोसले यांच्याकडे देण्यात आले.सोबत सरदार मुरारराव घोरपडे व सरदार कर्णाजीराव शिंदे असे मातब्बर वीर होते.1740 च्या एप्रिल महिन्यात मराठ्यांची जंगी फौज अर्काट प्रांतात डेरे दाखल झाली.
कडाप्पा व अर्काट या जिल्ह्यांच्या दरम्यान दमलचेरीचा घाट आहे.तेथे मराठ्यांना अडवून धरण्यासाठी नवाब दोस्तअली आपल्या फौजेनिशी चालून गेला.प्रथम मराठ्यांनी सामोपचाराने बोलणी सुरू केली पण नवाबाने आपला कपटीपणा दाखवुन उडवाउडवीची उत्तरे दिली.मराठ्यांना नवाबाचा कपटपणा लक्षात येताच दहा हजार फौज सोबत घेऊन त्यांनी आड मार्गाने नवाबाच्या फौजेस वेढा दिला.दोघांमध्ये मोठी खडाजंगी होऊन युद्धास सुरवात झाली.कर्णाजीराव शिंदे व मुरारराव घोरपडे हे आघाडीवर होते त्यांनी आपल्या तलवारीचे पाणी नवाबाच्या फौजेस पाजण्यास अशी सुरुवात केली की शत्रूला पळता भुई थोडी वाटू लागली.या युद्धात खुद्द नवाब दोस्तअली,त्याचा धाकटा मुलगा हसनअली व कित्येक नामांकित सरदार रघुजी भोसले, कर्णाजीराव शिंदे,मुरारराव घोरपडे व मराठा वीरांनी यमसदनी पाठवले.नवाबाच्या फौजेची मोठी हानी झाली व दमलचेरीच्या लढाईत मराठयांचा मोठा विजय झाला.
मराठयांच्या या विजयामुळे कर्नाटकात निरनिराळे मनोरथ मांडणाऱ्या कित्येक जनांचे डोळे खाडकन उघडले.मराठे आता सर्व हिंदुस्थान आपल्या ताब्यात घेतोय असे सर्वांना वाटू लागले म्हणुन जो तो आप-आपला बचाव करून घेण्यासाठी वाट मिळेल तिकडे पळू लागला.नवाबाचा मुलगा सफदरअली बापाच्या मदतीला येत असताना त्याला दमलचेरी येथे झालेल्या पराभवाची बातमी कळाली व तो आपल्या बचावासाठी वेल्लोर च्या किल्यात लपून बसला.मराठ्यांचा तडाखा एवढा जबरदस्त होता की नवाबाचा कपटी जावई चंदासाहेब याने मराठ्यांच्या पासून चार हात लांबच राहणे पसंत आहे म्हणून त्रिचनापल्लीला पळून गेला.
मराठ्यांनी इकडे नवाबाची राजधानी अर्काट आपल्या ताब्यात घेतली परंतु सफदरअलीने आधीच येथील पैसा अडका,जडजवाहीर, खजाना फ्रेंच्याकडे पौंडेचेरीला पाठवून दिल्यामुळे येथील संपत्ती मराठ्यांच्या हाती काही लागली नाही.त्याचदरम्यान पहिल्या बाजीराव पेशव्याचे अकाली निधन झाल्यामुले रघुजी भोसले हे मोहिमेची सूत्रे मुरारराव घोरपडे व कर्णाजीराव शिंदे यांच्याकडे देऊन साताऱ्यास आले.त्यामुळे मोहिमेचे घोंगडे काही काळ भिजत राहिले.परंतु शाहूमहाराज यांनी आज्ञा केल्यावर रघुजी भोसले पुन्हा कर्नाटक स्वारीवर रुजू झाले.मराठ्यांच्या पुढे आपला काही निभाव लागू शकत नाही हे कळल्यावर सफदरअलीने तहाची बोलणी सुरू केली.या तहात कपटी,महत्वकांक्षी व नवाब बनू पाहणाऱ्या चंदासाहेबला मराठ्यांनी त्रिचनापल्ली येथून कैद करावे व सफदरअलीच्या शत्रूंचे निर्मूलन करावे त्याबदल्यात 1 कोटी रुपये मराठ्यांना देण्याचे सफदरअलीने कबूल करून तह केला.या तहामुळे तंजावरच्या राज्यास मदत करण्याची सोय मराठ्यांची झाली.
गुप्ततहाची कुणकुण चंदासाहेबला लागली व तो फ्रेंच्यांचा अधिकारी डूमास याला सोबत घेऊन फौज बांधू लागला.इकडे मराठ्यांनी थोडीही उसंत न घेता तिकडच्या राजांचे व पाळेगारांचे साहाय्य मिळवले तसेच सोबत तंजावरचे महाराज प्रतापसिंह यांचे सैन्य हाताशी घेऊन पूर्ण तयारी केली.सर्व संयुक्त सैन्याने डिसेंबर महिन्यात त्रिचनापल्लीला वेढा दिला.मराठा सैन्य व चंदासाहेबच्या सैन्यात मोठी खडाजंगी होऊ लागली.एका तुकडीचे नेतृत्व हे कर्णाजीराव शिंदे यांचे कडे होते.कर्णाजीराव मोठ्या शर्थीने लढत होते. आकाशात वीज चमकावी तसे कर्णाजीरावांच्या हातातले तलवारीचे पाते लखलखत होते.
मराठ्यांचे हे वादळ थांबवता-थांबवता किल्ल्यातील साधनसामग्री संपत आली होती म्हणुन त्याने आपला भाऊ बडासाहेब यास बोलावणे धाडले परंतु याची कुणकुण मराठ्यांना लागताच त्यांनी त्याला वाटेतच गाठून ठार मारून टाकले.कर्णाजीरावांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या तुकडीने अफाट पराक्रम करून चंदासाहेबास पार जेरीस आणल.26 मार्च 1741 ला त्रिचनापल्लीचा किल्ला कर्णाजीराव शिंदेनी काबीज केला.चंदासाहेबाचा वडील मुलगा व तो रघुजी भोसलेंच्या हाती लागला सुटकेसाठी आठ लाख रुपये देऊ लागला परंतु रघुजी भोसलेंनी ते कबूल न करता त्याला कैद केली व साताऱ्याला रवाना केले.
मराठ्यांच्या केलेल्या या पराक्रमाची चर्चा देशभर होऊ लागली.शाहूमहाराज यांना या मोहिमेत जय मिळाल्यामुळे मोठा संतोष झाला.त्यांनी बरीच इनाम बक्षिसे फौजेस बहाल केली.रघुजी भोसले बरोबर मुरारराव घोरपडे व कर्णाजीराव शिंदे यांनी ही मोठा पराक्रम केला.त्याचबरोबर तंजावरचे राज्य चंदासाहेबाला दूर केल्यामुळे स्वस्थ झाले त्यामुळे प्रतापसिंह महाराजांनी मराठा सरदारांना अनेक बक्षिसे देऊन त्यांचा गौरव केला.
कर्नाटक मोहिमेत शर्थीने लढणारे सरदार कर्णाजीराव शिंदे यांचा इतिहास या लेखातून आपल्यापर्यंत मांडताना विशेष आनंद होत आहे.सरदार कर्णाजीराव शिंदे यांना विनम्र अभिवादन.🙏🙏
-----------------------------------------------
-प्रसाद शिंदे सरकार-पानिपतकर
Prasad Shinde

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...