विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 14 June 2021

होनाजी बलकवडे :


 होनाजी बलकवडे :
मराठेशाहीतील सुभेदार होनाजी बलकवडे यांच्या पराक्रमाची स्मृती त्यांच्या वाड्याचे अवशेष जागृत ठेवत आहेत. त्यांचा वाडा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौडच्या दोन किलोमीटर अलिकडे दारवली या गावी आहे.
वाड्याचे अवशेष गावाच्या मध्यभागी, तीस-चाळीस फूट उंचीवर, सुमारे सहा एकर जागेत दिसून येतात. वाड्याचे पश्चिमेकडील भव्य प्रवेशद्वार त्याच्या वैभवाचा दिमाख दाखवते. प्रवेशद्वाराची उंची बावीस फूट असून त्याचे काळ्या पाषाणातील बांधकाम आहे. ते दोन-अडीचशे वर्षांनंतरही सुस्थितीत आहे. प्रवेशद्वाराच्या कमानीवरील कमळाचे सुंदर शिल्प आणि दरवाज्यावरील गणेशपट्टी स्पष्ट दिसते. दरवाजा ग्राममुख आहे. वाड्यामधून मुळा नदीच्या काठावर वसलेले दारवली गाव दृष्टीस पडते. दरवाजाच्या दोहो बाजूंस दगडी तटबंदीचे अवशेष आहेत. वाड्याच्या भोवतालची घोटीव पाषाणातील तटबंदी आश्चर्यचकित करते. दोहो अंगांस घडीव जोत्यांच्या देवड्या आहेत. दरवाजांचा अडसर मोठा होता. त्याची कल्पना त्याच्या खुणांवरून येते.
दरवाजाच्या आत दोन्ही अंगांस पहारेकऱ्यांच्या ओवऱ्या आहेत. पुढे वाड्याचे मुख्य प्रांगण. लगेच पडिक अवस्थेतील भव्य चौसोपी वाड्याचे चित्र नजरेसमोर उभे राहते. वाड्याचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेस असल्याचे त्याच्या रचनेवरून जाणवते. त्याचे तोंड पुण्याच्या दिशेने असल्याने त्यास ‘पुणे दरवाजा’ असे म्हणत असत.
वाडा पंधराखणी, चौसोपी, तिघई, दुपाखी म्हणजे एकशेऐंशी खणांचा व दोन्ही बाजूंस ओवरीयुक्त असा भव्य होता. वाड्याची लांबी व रुंदी दीडशे बाय दीडशे फुटांची असून त्याच्या भिंती काही प्रमाणात दिसतात. भक्कम चौथऱ्यावर वाडा दिमाखाने उभा असावा. वाड्याच्या चौकात कारंजे असल्याच्या खुणा दिसून येतात. तो प्रदेश प्रचंड पावसाचा असल्याने चौकातील पाणी बाहेर काढण्यासाठी बंदिस्त गटारे बांधली होती. वाड्याला दक्षिणेकडेही दरवाजा होता. पश्चिम दिशेस, वाड्याच्या जवळ पाणीपुरवठ्यासाठी घोटीव दगडात बांधलेली विहीर आहे. मुख्य चौथऱ्याजवळ वाड्याचे निर्माते सुभेदार होनाजी बलकवडे यांची समाधी आहे. होनाजीने निर्माण केलेली काळभैरवनाथमंदिर व विठ्ठलमंदिर सुस्थितीत आहेत. मंदिरासमोर अनेक वीरगळ बलकवडे घराण्यातील वीरांच्या पराक्रमाचे साक्षीदार म्हणून उभे आहेत.
सुभेदार होनाजी बलकवडे, सुभेदार येसाजी, किल्लेदार पिलाजी हे तिघे बंधू त्या वाड्यात वास्तव्य करून होते. संभाजीराजांच्या कारकिर्दीत उदयास आलेले नागोजी बलकवडे यांनी औरंगजेबाशी संघर्ष करून लोहगड, सिंहगड, कोरीगड, सुधागड हे किल्ले परत जिंकून घेतले; जंजिरेकर सिद्दी आणि जुन्नरकर बेग यांचा पराभव केला. त्या पराक्रमाबद्दल छत्रपती राजाराममहाराजांनी त्यांना दारवली, मुलखेड व सावरगाव ही गावे इनाम म्हणून दिली. त्यांची तिन्ही मुले सुभेदार येसाजी, होनाजी व पिलाजी यांनीही पराक्रम गाजवला. त्यांनी चिमाजीअप्पांच्या गुजरात मोहिमेत त्यांनी सुरत परगण्यातील घनदेवी हा प्रांत जिंकला. त्यांनी बाजीराव पेशव्यांच्या जंजिरा मोहिमेत पराक्रम करून अवचितगड, सूरगड, चण्हेर-बिरवाडी, तळा, घोसाळा व मानगड हे किल्ले जिंकले. त्या तीन बंधूंनी चिमाजीअप्पांच्या वसईच्या मोहिमेत पोर्तुगीजांविरूद्ध लढा दिला. वेसावा, तांदुळवाडी, कालदुर्ग, ठाणे कोट, मनोर, घोटावडा, गोरक्षगड, सिद्धगड, डहाणू ही ठाणी जिंकून पोर्तुजांची कोकणातील सत्ता खिळखिळी करून टाकली व वसईच्या किल्ल्याच्या विजयात मोलाची भर घातली....!!

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...