विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 21 July 2021

आनंदराव धुळप -

 



आनंदराव धुळप -

यांच्या घराण्याचें मूळचें उपनाम मोरे असून शिवरायंनि जावळी येथें ज्या मोरे घराळ्याची धूळधाण केली तें हेंच होय. जावळीच्या झटापटींत ज्या त्रिवर्गांच शेवट झाला. त्यांपैकीं हणमंतराव हा आनंदरावाचा पूर्वज होता. जावळीहून हाकालपट्टी झाल्यावर याचे पूर्वज स्वसंरक्षणार्थ विजापूर दरबारीं येऊन राहिले व तेथें त्यांनीं समशेर गाजविल्यामुळें त्यांस धुळप हा बहुमानाचा किताब मिळाला. पुढें शिवाजीच्या भीतीनें हणंतरावाचे वंशज धवडे बंदरीं जाऊन राहिले. इ.स. १७६४ मध्ये आनंदराव ह्या दर्यायुद्धांत नाणावलेल्या गृहस्थाकडे मराठ्यांच्या आरमाराचें आधिपत्य आलें. आनंदराव हा इ.स. १७९४ पर्यंत सुभे आरमाराचा प्रामुख्यानें कारभार आटपीत असे. पेशवाई नष्ट झाल्यावर त्याच्या वंशजास इंग्रजांनीं पोलिटिकल पेनशन करून दिली (भा.इ.सं.मं. आहवाल शके १८३३ पृ. ११५). पेशव्यांच्या डायरींत आनंदराव यांच्या नांवचा आरमाराकडील सरदार म्हणून पहिला हुकूम आढळतो. त्याची तारीख ३० सप्टेंबर इसवी सन १७६४ ( रविलाखर ४ खमस सितैन मया व अलफ) ही आहे. त्याच्या हाताखालीं बाळाजी हरि यास आरमाराकडील अमीन म्हणून व जगन्नाथ नारायण यास आरमाराचा कारभारी म्हणून नेमलें होतें (थो.मा. पेशव्यांची रोजनिशी, भाग १, पृ. ३४२). यांची कर्तबगारी इ.स. १७६७।६८ दिसून आली. कारण त्याच रोजनिशींत पुढें सालगुदस्तां आरमाराकडील लोकांनी हैदराशीं झालेल्या लढाईंत कामकाज चांगलें केल्यावरून आरमाराच्या शिलकेंतून ४२५० रुपये बक्षीस वाटण्याचा ६ रविलाखर, समान सितैन मया व अलफ रोजींचा आनंदराव धुळप यांस हुकूम आहे. माधरावांच्या मृत्यूनंतर व नारायणरावांच्या वधानंतर पेशवाईंत होणाऱ्या खळबळीमुळें आपले हातपाय पसरण्यास योग्य संधि आहे असें इंग्रजास वाटून त्यांनी वसईसाष्टी घेण्याची मसलत केली, तेव्हां मुंबईकडे मराठ्यांस डोळा फिरवावा लागला. इ.स. १७७४ मध्यें आनंदराव धुळप आरमार घेऊन रेवदंड्याच्या बारावर आल्याचें कळल्यावरून त्यानें व रघुजी आंगरे यांनी एकत्र मुंबईच्या शहरांत जाऊन शहर लुटून फस्त करावें व नंतर साष्टीस इंग्रज बसला आहे त्याचें पारिपत्य करावें, असा पेशव्यांचा ता. २१-१२-१७७४ (१७ सवाल) रोजीं हुकूम सुटला (भा.इ.सं.मं. अहवाल शके १८३३ पृ. ११८). आनंदरावाला आपली पुरी कर्तबगारी दाखविण्यास १८८१ नंतर संधि मिळाली. आनंदरावाचा हाताखालील सरदाराशीं बेबनाव उत्पन्न होऊन सरकारी कामास हरकत होऊं लागल्यामुळें दरखदारास परत बोलावण्यांत येऊन आरमाराचा कारभार सर्वस्वीं आनंदरावाकडे सोंपविण्यांत आला (५ रमजान इसन्ने समानीय मया व अलफ = २५ आगस्ट १७८१) असें दिसते. (पे.रो.) पृ.१९५। वरून दरबारनें आनंदरावास दिलेला जोर चांगला उपयोगी पडला. इ.स. १७८३ सालीं त्यानें इंग्रजांविरुद्ध मोठा जय मिळविला (छ ५ जमादिलावली) इंग्रजांची एक लढवई दुधोशी बोट एक बतेला व तीन शिबाड अशीं पांच गलबतें, सरंजाम, दारूगोळा व गाडद भरून कर्नाटकाकडे जात असतां रत्नागिरीनजीक आनंदराव धुळपाच्या आरमाराची व त्याची दोन प्रहर लढाई झाली. इंग्राजांचा पराभव होऊन सर्व गलबतें पाडाव केलीं. या लढाईंत इंग्रजाकडील तीस पसतीस गोरे इसम धरून सुमारें चारशेंपर्यंत लोक मराठ्यांच्या हातीं लागलें. मराठ्यांकडील आठ बरे बरे आसामी ठार व पाऊणशें माणूस जखमी झालें व इंग्राजाकडील एक कप्तान व पंचवीस आसामी ठार व कित्येक जखमी झाले. या बहाद्दरीबद्दल पेशव्यांनीं ता. २५ मे स. १७८३ (शके १७०५ चैत्र व ९;२२ जमादिलावल सुरू सलास समानीन मया व अलफ) रोजीं आनंदरावास 'बहुमान खासगीचा पोषाख व कंठी' देऊन शाबासकीचें पत्र पाठविलें तें उपलब्ध आहे ( भा.इ.सं.मं. अहवाल शके १८३३ पृ. १२०).

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...