विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 21 July 2021

सावंतवाडी संस्थान.

 







सावंतवाडी संस्थान.—

मुंबई, बेळगांव एजन्सींतील एक संस्थान. सांप्रतकाळीं आपण ज्याला सावंतवाडी संस्थान असें म्हणतों, तो प्रदेश प्राचीन काळी हल्लीं असलेल्या नांवानें प्रसिद्ध नव्हता. कोंकण सुभ्याच्या पोटीं कुडाळ व भीमगड ह्या नांवाचें दोन परगणे होते, त्यांत सावंतवाडी प्रदेशाचा समावेश होत असे. इ. स. १६९७ मध्यें सावंत भोंसले यांनीं कुडाळदेशस्थ प्रभूस जिंकून ते वरील दोन्ही परगण्यांवर स्वतंत्रपणें सत्ता चालवूं लागले, व आपल्यास 'सरदेसाई परगणे कुडाळ व महालानिहाय' असें म्हणवूं लागले. पुढें या सावंताकडील मुलुखांपैकीं थोडथोडा मुलूख शेजारच्या राजांनीं हस्तगत केला. कुडाळ परगण्यापैकीं तीन तर्फा, एक बंदर व दोन तर्फांपैकीं कांहीं गांव इंग्लिशांनीं घेतले. एक कर्यात कोल्हापूर संस्थानाकडे गेली. भीमगड परगण्यापैकीं तीन महाल पोर्तुगीज सरकारच्या ताब्यांत गेले. शेवटीं नऊ तर्फा, एक कर्यात व दोन महाल सावंत भोंसले यांच्या सत्तेखालीं राहिले. हा मुलूख व चंदिगडें तर्फेपैकीं मिळालेले आंबोली, चौकूळ व गेळें हीं तीन गांवें मिळून सध्याचें सावंतवाडी संस्थान झालेलें आहे.
इ ति हा स.— या संस्थानच्या राजघराण्याच्या पूर्वजांची माहिती साधारणत: स. १५०० च्या सुमारापासून मिळते. या घराण्याच्या मूळ पुरुषाचें नांव मांग सावंत असें होतें, व तो उदेपूर येथील प्रसिद्ध शिसोदिया घराण्यापैकीं असून त्याचें उपनांव भोंसले असें होतें. मांग सावंत यानें या प्रांती आल्यावर कांहीं प्रांत मिळविला व होडावडें येथें आपलें राहण्याचें ठिकाण केलें. यावेळीं या प्रांतीं विजयानगरच्या हिंदु राजांचा अंमल होता. विजयानगरचा पाडाव झाल्यावर हा प्रांत आदिलाशाहीकडे गेला. आदिलशाहींतून कुडाळ परगण्याच्या देशमुखीचें काम एका कुडाळदेशस्थ प्रभु घराण्याकडे देण्यांत आलें होतें. या प्रभु देशमुखांकडे दळवी या आडनांवाचें सेनापति होते. हे दळवी मूळचे जोधपूर येहथें राहणारे असून प्रभूंची सत्ता या प्रांतांत सुरू झाली तेव्हां प्रभूंनीं त्यांस आपले सेनापति केले. या प्रांतावर मराठ्यांची सत्ता स्थापन करावी या उद्देशानें तत्कालीन सेनापति देवदळवी व मांग सावंत हे कांहीं दिवस एक होऊन देशमुखांचा पाडाव करूं लागले, परंतु या कामीं त्यांस यश न येतां ते दोघेहि इ. स. १५८० त मृत्युमुखी पडले. मांग सावंत यास सात बायका होत्या; त्यापैकीं सहा त्याच्याबरोबर सती गेल्या, आणि एक गरोदर होती, ती ओखणें येथें जाऊन राहिली. तिला पुढें मुलगा झाला, त्याचें नांव फोंड सावंत.
खेम सावंत पहिला.— फोंड सावंताचा हा मुलगा. हाच सावंतवाडीचा राज्यसंस्थापक म्हणतां येईल. यानें १६२७ सालीं विजापूरकरांकडून देशमुखी मिळवून तिचा १४ वर्षे उपभोग घेतला. याच्या मागून याचा वडील मुलगा सोमसावंतामागून धाकटा मुलगा फोंडसावंत गादीवर आला. स. १६५१ त फोंड सावंत मरण पावल्यावर त्याचा धाकटा भाऊ लखम सावंत या प्रांताचा सत्ताधीश झाला. या लखम सावंतानें शिवाजीला कोंकणांतून हांकून देण्याचा विजापुरकरांच्या वतीनें प्रयत्न चालविला. पण शिवाजीच्या हातून पराभव पावून हा तहास कबूल झाला (१६५९). या तहान्वयें सावंतानें शिवाजीचें मांडलिकत्व पत्करिल्यासारखें झालें. हा नामोष्कीचा तह न आवडून लखमानें स. १६६४ त शिवाजीशीं लढाई करून जय मिळविला. हा शूर सावंत १६७५ सालीं मरण पावला.
याच्यानंतर याचा पुतण्या खेम सावंत (दुसरा) गादीवर आला. यानें मोठ्या पराक्रमानें पोर्तुगीजांनां नामोहरम करून आपल्या राज्याचा विस्तार केला व कुडाळच्या प्रभूंनां जिंकून स्वतंत्र झाला. याचवेळी आदिलशाहीचा अंत झाल्यानें सावंतानें मोंगलांचें सार्वभौमत्व नांवाचेंच कबूल केलें. या खेम सावंतानें चराठें हें राजधानाचें ठिकाण करून तेथें मोठी वस्ती करविली. याच गांवाला पुढें सुंदरवाडी म्हणूं लागले. शाहु छत्रपति झाल्यावर खेम सावंत त्याच्याशीं राजनिष्ठ राहिला. शाहूनेंहि त्याची सरदेशमुखी कबूल केली व कुडाळ आणि पंचमहाल त्यास इनाम दिले. हा सावंत स. १७०९ त निर्वतला. याच्यामागून फोंड सावंत गादीवर बसला. त्याला कोल्हापुरकर, आंग्रे व पोर्तुगीज यांशीं झगडावें लागत असल्यानें त्यानें इंग्रजांशीं दोस्तीचा तह केला (१७३०). फोंडानंतर त्याचा नातू रामचंद्र सावंत राजा झाला. त्याचा सर्व कारभार त्याचा महापराक्रमी व कर्तबगार चुलता जयराम हा पहात असे. पण चुलत्या-पुतण्यांत कलह लागून पोर्तुगीज लोकांचें पुन्हां फावलें. त्यांनीं सावंतावर स्वारी करून खंडणी लादली. या अपजयाचा वचपा रामचंद्राचा पुत्र खेम सावंत गादीवर आल्यानंतर (१७५५) त्यानें काढिला व पोर्तुगीजांपासून गेलेला मुलुख परत मिळविला (१७९१). जिवबादादा बक्षी यानें या सावंताला हाताशीं धरून संस्थानला ऊर्जितावस्था आणिली. पण संस्थानच्या वाईट अंतःकारभारामुळें संस्थान कर्जबाजारी व परावलंबी बनलें. हा खेम सावंत १८०३ मध्यें निपुत्रिक वारल्यानंतर गादीविषयीं भांडणें लागली. शेवटीं रामचंद्र उर्फ भाऊसाहेब सावंत हा खेम सावंताची पत्नी लक्ष्मीबाई हिच्या मांडीवर बसून राज्याधिकारी झाला. लवकरच या दत्तक मायलेकरांत वितुष्ट आलें व सन १८०८ त भाऊसाहेबाचा खून झाला व लक्ष्मीबाई वारली. तेव्हा खेम सावंता(तिसरा)ची दुसरी पत्नी दुर्गाबाई हिला दुसरा एक मुलगा दत्तक दिला. हा फोंड सावंत १८१२ सालीं वारला, तेव्हां अज्ञान मुलगा (चवथा) खेम सावंत गादीवर आला.
हा सावंत सज्ञान झाल्यावर देखील राज्यकारभार नीट चालवीना, संस्थानांत बंडाळ्या होऊं लागल्या व एकंदर फार अनास्था माजली. तेव्हां इंग्रज सरकारनें से. १८३८ त राजघराण्यांत लायख पुरुष होईपर्यंत राज्यकारभार पोलिटिकल सुपरिंटेंडेंटमार्फत स्वतः पहाण्याचें ठरविलें. १८४४ त प्रसिद्ध फोंड सावंताचें बंड उद्भवलें त्यांत प्रत्यक्ष युवराज फोंड सावंत उर्फ आबासाहेब सामील होता. लवकरच हें बंड मोडलें व संस्थानांत बर्याच सुधारणा घडून आल्या. स. १८६७ त खेम सावंत निवर्तून त्याचा मुलगा फोंड सावंत नांवाचा गादीवर आला. हा दीड वर्षांतच वारल्यानंतर त्याचा मुलगा रघुनाथ सावंत उर्फ बाबासाहेब गादीवर बसला. यास बडोद्याच्या जमनाबाईसाहेबांची कन्या ताराराजे ही दिली होती. १८९९त बाबासाहेब मृत्यु पावला व त्याचा चुलत भाऊ श्रीराम गादीवर आला. याच्या राज्याभिषेकाच्या वेळीं असा ठराव झाला होता कीं, पोलि. सुपरिटेंडेंटनें पोलि. एजंट या हुद्द्यानें संस्थानिक राजेबहाद्दरच्या नांवानें सर्व कारभार पहावा. स. १९०९ पासून हा सावंत पागा, देवस्थान व दरबार यांचीं कामें पूर्ण मुखत्यारीनें पाही. हा १९१३ मध्यें वारला. त्यावेळीं युवराज बापूसाहेब (प्रस्तुतचे राजे) अल्पवयस्क होते. यांचे शिक्षण इंग्लंडांत झालें असून गेल्या महायुद्धांत यांनीं मेसापोटेमियांत चांगली मर्दुमकी गाजविल्यामुळें यांनां 'हिज हायनेस' व कॅप्टन या पदव्या मिळाल्या. १९२४ सालच्या आक्टोबर महिन्यांत (ता. २९) बापूसाहेबांच्या हातीं (८६ वर्षे आपल्याकडे घेतलेलीं) सर्व सूत्रे इंग्रजसरकारनें दिलीं.
गां व.— सावंतवाडी संस्थानची राजधानी. ही वेंगुर्ल्यापासून १७ मैल आहे. सावंतवाडीस सुंदरवाडी म्हणतात. याची लोकसंख्या १९०१ सालीं १०२१३ होती. १६७० सालीं कोणी फोंड सावंतानें हें शहर वसविलें असें म्हणतात. गावांजवळच मोतीतलाव आहे. त्यानें ३१ एकर जमीन व्यापिली आहे. तलावजवळ पडक्या स्थितींत एक किल्ला आढळतो. १९०४ सालीं येथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली. स. १८९५ त पाण्याचा चांगला पुरवठा करून नळांनीं शहरभर पाणी खेळविलें आहे.

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...