विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 8 April 2024

छत्रपती शिवाजी महाराज- ९

 


छत्रपती शिवाजी महाराज- ९
--------------------------
औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखानाची बोटे तोडली -
जुलै 1659 मध्ये औरंगजेबाचा राज्याभिषेक पार पडला आणि त्याने सहजादा मोजम च्या जागी शाहिस्तेखानाची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली. शिवाजी महाराजांचे पारिपत्य करणे हे त्याचे मुख्य काम होते.
शिवाजी महाराजांनी रुस्तम हे जमान आणि फजल खान यांचा पराभव करून पन्हाळा सर केला. आदिलशहाने सिद्धी जोहरला सलाबत खान हा किताब दिला आणि शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी फौज देऊन पाठवले. त्यामुळे शिवाजी महाराजांना पन्हाळा गडावर जाणे भाग पडले (दोन मार्च 1660). आपल्या पंधरा हजार सैनिकांच्या दलासह सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला.
पन्हाळ्याचा वेढा जवळपास पाच महिने चालू होता. महाराजांनी सिद्धी जोहरला फितूर करून घेऊन त्यांची मध्यरात्री भेटी घेतली आणि एकमेकांना सहाय्य करण्याचे ठरले.
विजापूरच्या सैन्यात फाजल खान हा अफजलखानाचा मुलगा आणि मित्र सिद्धी हलाल ही होता. परंतु पंधरा हजार फौजेसह पन्हाळा जिंकणे शक्य नव्हते त्यामुळे विजापूरच्या सैन्याने शेजार च्या पावनगडावर हल्ला सुरू केला. पावनगड पडला असता तर पन्हाळा लढवणे आणखी कठीण गेले असते. म्हणून महाराजांनी थोडी फौज पन्हाळ्यावर ठेवून निवडक फौजेच्या साह्याने पावनगड च्या बाजूच्या विजापूरच्या सैन्यावर अचानक हल्ला चढवला. मग सैन्याचा वेढा तोडून ते विशाळगडाच्या दिशेने निघाले.
फाजल खान व सिद्धी हलाल महाराजांचा पाठलाग करू लागले. गजापूरच्या खिंडीत आल्यानंतर हिरडस मावळचे बाजीप्रभू देशपांडे यांनी आपण ती खिंड लढवू तुम्ही विशाळगडाला निघा असे शिवाजी महाराजांना सांगितले. त्यानुसार बाजीप्रभूंनी पाच तास खिंड लढवली आणि ते गंभीर जखमी होऊनही लढत राहिले. शिवाजी महाराज सुखरूप पन्हाळा च्या वेढ्यातून नि सटून विशाळगडला पोहोचले व तोफेचे बार काढले. तोफेचे आवाजाने बाजीप्रभू सुखावले आणि आपले प्राण सोडले.
सिद्धी जोहर फितूर झाल्याचे पाहून नबाब स्वतः मोहिमेवर निघाला आणि दोन्ही बंडखोरांना शिक्षा करण्यासाठी येऊन त्याने मिरजेत तळ ठोकला. मग शिवरायांनी पन्हाळा सिद्धी जोहरच्या ताब्यात दिला आणि त्याने तो आदिलशहाच्या लोकांकडे सुपूर्द केला (२२ सप्टेंबर १६६०).
शाहिस्तेखान अहमदनगर वरून 25 फेब्रुवारी रोजी प्रचंड सैन्यासह निघाला. सुप्यावरून पाच एप्रिल रोजी तो बारामतीत आला. तेथील दोन किल्ले घेऊन मिरच्या काठावरून 18 एप्रिल रोजी तो शिरवळला पोहोचला. तिथून राजगडाभोवतीची गावे त्याने काबीज केली. एक मे 1660 रोजी शाहिस्तेखान सासवड मध्ये आला.
राव भाऊ सिंग यांच्या नेतृत्वाखाली 3000 मराठा घोडदळांन 30 एप्रिल रोजी मुलांच्या पिछाडीवर हल्ला केला तो त्यांनी परतवून लावला. आता शाहिस्तेखानाने पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये लुटालुट सुरू केली. मराठ्यांच्या फौजेने त्यांच्यावर हल्ले केले तेही त्यांनी परतवून लावले. त्यानंतर नऊ मे रोजी ही फौज पुण्यात आली. पावसाळ्यात फौजेला दाना वैरण मिळणे कठीण झाले असते म्हणून शाहिस्तेखानाने आपला मुक्काम चाकणला हलवण्याचे ठरवलं आणि 19 जूनला पुणे सोडले. तो 21 तारखेला चाकण जवळ पोहोचला. फिरंगोजी नरसाळा यांनी 56 दिवस चाकणचा किल्ला लढवला.
ऑगस्ट 1660 च्या अखेरीस शाहिस्तेखान पुण्यात परत आला. मग त्याने 20 नोव्हेंबर रोजी परांडा कडे भले मोठे सैन्य पाठवले आणि गालिब या किल्लेदारास लाच देऊन किल्ला ताब्यात घेतला.
आता शाहिस्तेखानाने कल्याणवर आपले लक्ष केंद्रित केले. त्यासाठी त्याने कर तलब खान या ऊझबेक सरदाराची निवड केली. त्याच्यासोबत उदाजीरामाची शूर विधवा माहूरची रायबागिनी होती. पुण्यावरून लोहगड मार्गे भोरच्या दक्षिणे तून कर्तलब खान उंबरखिंडीला पोहोचला. त्या ठिकाणी मराठा सैन्याने चोहोबाजूने जोरदार हल्ला करून मोगली फौजेची दाणा दान उडवली. एकही मराठा सैनिक कामी न येता ही लढाई जिंकण्यात ते यशस्वी झाले. आपल्याकडील सर्व संपत्ती आणि साहित्य देऊन कर्तलबखनाने 3 फेब्रुवारी सोळाशे 61 रोजी माघार घेतली.
आता शिवाजी महाराजांनी दक्षिण कोकण वर आपले लक्ष केंद्रित केले आणि दांडा राजपुरी पासून खारेपाटण पर्यंतची संपूर्ण किनारपट्टी त्यांच्या ताब्यात आली. त्यांनी राजापूरची दुसऱ्यांदा लूट केली आणि तीन मार्चला ते ताब्यात घेतले. त्यांनी चिरदुर्गला तटबंदी बांधून मजबूत केले व मंडणगड असे नाव दिले. तिथे पालगड हा दुसरा किल्ला बांधला. पल्ली वन घेतल्यानंतर शृंगारपूर घेतले (29 एप्रिल). शेजारचा प्रतीत गड (प्रचित गड) दुरुस्त केला. महाराजांनी श्रंगारपूरच्या शिर्के यांना आपल्या सेवेत ठेवून घेतले व त्या कुटुंबाशी सोयरीक जुळवली.
मुघलांनी मे 1661 मध्ये कल्याण काबीज केले. तर शिवाजी महाराज वर्धनगड या गडावर विश्रांतीसाठी गेले. पेंड जवळील देयरी गडाला बुलाखी या सरदाराने वेडा घातला होता. कावजी कोंढाळकर यांच्या सैन्याने 400 लोक कापून काढून त्यांना हकले 21 ऑगस्ट 1661.
मराठ्यांनी 1662 च्या सुरुवातीला मिऱ्या डोंगरावर नामदार खानावर हल्ला केला. तथापि या मोहिमेत महाराजांना फार मोठे नुकसान झाले. नंतरचे सव्वा वर्ष मुघल आपल्या प्रांताची आणि मराठे ही आपल्या प्रांताची व्यवस्था राखण्यात व्यस्त होते. सरनोबत नेताजी पालकर मुलांच्या मुलाखात लुटा लूट करीत असताना 7000 च्या मुघल फौजेंने त्यांचा पाठलाग केला. यात नेताजी कसेबसे निष्टून गेले तरीही ते जखमी झाले होते आणि तीनशे घोडे गमवावे लागले होते (३० मार्च ते आठ एप्रिल 1663).
शाहिस्तेखानाचा पुण्यातील मुक्काम लाल महालात होता. शिवरायांचे बालपण याच ठिकाणी गेलेले असल्यामुळे त्यांना लाल महालांची खडान खडा माहिती होती. बहिर्जी नाईकांनी सुद्धा लाल महालात आपले हेर पेरून पूर्ण विठ्ठल बातमी मिळवलेली होती. बहिर्जी नाईक आणि शिवराय दोघांनी मिळून शाहिस्तेखानावरच रात्रीच्या वेळी हल्ला करण्याची योजना आखली. रविवार दिनांक 5 एप्रिल 1663 रोजी 400 निवडक सैनिकांसह शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाच्या छावणीत आपण मोगली सैन्याचे दक्षिणेकडील लोक आहोत असे भासवून तसेच अन्य मार्गाने दिवसा ढवळ्या प्रवेश केला. रात्र होईपर्यंत आडोशाच्या जागी विश्रांती घेतली आणि मध्यरात्री ठरल्याप्रमाणे आपली योजना राबवून ते लाल महालात घुसले.
रमजान चे दिवस असल्यामुळे सैनिक भरपूर जेवण करून गाढ झोपलेले होते. रोजे असल्यामुळे ते पहाटे लवकर उठणार होते. जेवण करण्याच्या कामासाठी जागे झालेल्या लोकांना कापून काढून ते स्वयंपाक घर आणि सेवकांची खोली या दरम्यान आले. इथून हराम मध्ये प्रवेश करण्यासाठी पूर्वी एक दरवाजा होता तो आता बंद केला होता. तेथील विटा काढून ते हराम मध्ये घुसले. त्यांच्यासोबत 200 निवडक सैनिक होते. शिवाजी महाराज शाहिस्तेखानाच्या शयन कक्षात गेले. तोपर्यंत काही लोकांना जाग आली होती तर काही आवाज गोंधळ व संशयाने उठले होते. या सर्वांची कत्तल करण्यात आली. तोपर्यंत हराम मधील गुलाम स्त्रियांनी आणि खानाच्या बायकांनी तेथील दिवे विझवले व अंधार केला. अशातच महाराजांनी खानावर तलवार चालवली. त्यात त्याची बोटे तुटली. अबुल भात खान हा शाहिस्तेखानाचा मुलगा वडिलांच्या सुटकेसाठी आला होता त्याला कापून काढले. एका सेनापतीलाही कापून काढले. कापाकापी करत शिवराय आणि सोबतचे सैनिक लाल महालातून निघून गेले. या हल्ल्यात मराठ्यांचे फक्त सहा लोक कामी आले परंतु शाहिस्तेखानाच्या मुलाला आणि एका सेनापतीला व 40 सहाय्यकांना ठार केलं होतं. तसेच अंधारामध्ये काही स्त्रिया ही ठार झाल्या होत्या. इतर दोन मुलगे आठ महिला आणि स्वतः शाहिस्तेखान जखमी झाला होता.
या हल्ल्याच्या वेळी महाराजा जसवंत सिंग लोहगडाजवळच छावणीत असून जाताना अगर येताना त्यांनी कसलीही हालचाल केलेली नव्हती. औरंगजेबाला हे वृत्त मिळाले त्या तेव्हा तो काश्मीरला निघाला होता. तिथूनच त्याने शाहिस्तेखानाची नेमणूक बंगाल प्रांतावर केल्याचे फर्मान दिले. त्याच्याजागी शहजादा मुअजम दख्खनचा सुभेदार झाला.
दिलीप गायकवाड.
०७-०४-२०२४.

No comments:

Post a Comment

अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय

  अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...