पालखेडचा संग्राम (Battle of Palkhed)
लेखक :शशिकांत पित्रेभाग २
बाजीरावांची रणनीती : बाजीरावांची मदार सर्वथा घोडदळावर होती. निजामाच्या पाऊण ते एक लाख सैन्याविरुद्ध बाजीरावांच्या सेनेची संख्या फक्त पंचवीस ते तीस हजारांच्या घरात होती; परंतु शत्रूच्या संख्या वा शस्त्रबलाची पर्वा बाजीराव करत नसत. बुद्धिचातुर्यपूर्ण डावपेचांवर त्यांचा भर असे. शत्रूला वेढा घालणे, त्याची रसद तोडणे आणि त्याचा पाणीपुरवठा अडवणे यांसारख्या मार्गांचा परिणामकारक उपयोग करून शत्रूला गुडघे टेकविण्यास ते भाग पाडत. शक्यतो युद्ध न करता आणि आपल्या सेनेची वाताहत न होऊ देता प्रतिपक्षी सेनापतीचे मनोधैर्य खच्ची करून त्याच्यावर मनोवैज्ञानिक विजय मिळविण्याची अफलातून कला बाजीरावांना साध्य होती.
या वेळी आपल्या गती क्षमतेचा फायदा घेऊन मुघल सैन्याला लांब पल्ल्याचा पाठलाग करावयास भाग पाडायचे, ते थकून जेरीस आल्यावर त्यांना आपल्या निवडीच्या जागेच्या साठमारीत पकडायचे, रसद तोडून उपासमार करायची आणि शरण आणायचे, ही त्यांची योजना होती.
मराठा सैन्यापाशी तोफखाना नाममात्र होता; उलट, निजामाकडील तोफांचा संभार प्रबळ होता. हा असमतोल भरून काढण्याचा एकच उपाय होता, तो म्हणजे निजामाचा तोफखाना रणांगणाजवळ पोहोचण्याअगोदरच अडसर घालायचा. म्हणजेच शत्रूच्या सैन्याची त्याच्या तोफखान्यापासून ताटातूट करण्याची नीती! ही किमया बाजीरावांनी अद्भुत रीत्या साधली. पालखेडची लढाई हा या सर्जनशील रणनीतीचा बेजोड आविष्कार होता.
घोडदळाचा भर गतिमानतेवर असतो. ही वावटळ कोणत्या बाजूने आणि केव्हा धाड घालेल, याची बाजीरावांच्या शत्रूला सदैव धास्ती वाटे. कोणताही लवाजमा आणि अवजड सामान नसल्याने आपल्या योजना शत्रूच्या हालचालींनुसार किंवा लढाईच्या धावत्या परिस्थितीनुसार बदलण्याची लवचीकता त्यांना उपलब्ध होती. त्याचबरोबर शत्रूचा पराभव संरक्षणात्मक पवित्र्याने नव्हे, तर आक्रमक चालीनेच होऊ शकतो, यावर बाजीरावांचा दृढ विश्वास होता. अशा प्रकारे गतिमानता (Mobility), लवचीकता (Flexibility) आणि आक्रमकता (Offensive Spirit) हे त्रिसूत्र बाजीरावांच्या सामरिक नीतीचा आणि कारवाईचा आत्मा होता.
बाजीरावांनी आखलेल्या युद्धयोजनेचे दोन पैलू होते. निजामाच्या सैन्याला आपला पाठलाग करावयास लावून स्वराज्याबाहेर दूरच्या मुलखात न्यायचे, त्याचे सैन्य दमल्यावर आपल्या निवडीच्या जागी त्याला घेरायचे आणि लढाईत त्याला पराजित करायचे. या कारवाईची धुरा बाजीरावांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. दुसरीकडे, आधीपासूनच आपल्या अनुपस्थितीत नाशिकपासून दक्षिणेकडील स्वराज्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी बंधू चिमाजीआप्पांवर त्यांनी सोपविली होती. त्यासाठी शाहू महाराज आणि दरबार तात्पुरता पुरंदर किल्ल्यावर हलविण्यात आला होता. त्यांच्या संरक्षणासाठी पुणे परिसरात शिंद्यांच्या तुकडीला तैनात करण्यात आले होते. जुन्नर, पेडगाव, पाटस, खेड वगैरे मुलखांचे संरक्षण त्यांनी चिमाजीआप्पांवर सोडले होते. काही झाले तरी शत्रू पुरंदरवर कधीही हल्ला करू शकणार नाही, याची तजवीज करण्याचा दोन्ही बंधूंनी निर्धार केला होता.
No comments:
Post a Comment