पालखेडचा संग्राम (Battle of Palkhed)
लेखक :शशिकांत पित्रे
युद्धपूर्व हालचाली : सुरुवातीचे डावपेच : जुलै-ऑगस्ट १७२७ मध्ये ऐवजखानाने सिन्नरवर हल्ला केल्यानंतर हालचालींना आरंभ झाला. जून ते सप्टेंबर १७२७ मध्ये निजामाच्या सैन्याचा तळ धरुर भीरमध्ये होता. ऑक्टोबरमध्ये निजामाने भीरपासून साताऱ्याच्या दिशेने आगेकूच केली. बाजीरावांनी लागलीच गाजावाजाने औरंगाबादच्या दिशेने प्रयाण केले. नंतर पारनेर आणि अहमदनगर उजवीकडे सोडून ते पुणतांब्याला पोहोचले. त्यांनी गोदावरी नदी ओलांडली आणि पूर्वेकडून वळून निजामाच्या हद्दीतील जालन्यावर हल्ला चढविला. त्यानंतर बऱ्हाणपूरवर चाल करण्याची त्यांनी खोटी बतावणी केली. बऱ्हाणपूर त्या काळचे महत्त्वाचे व्यापार आणि दळणवळणाचे केंद्र होते; परंतु बऱ्हाणपूरला न जाता बाजीराव डिसेंबर १७२७ मध्ये वाशिममध्ये दाखल झाले आणि ‘चौथ’ गोळा केला. बऱ्हाणपूरच्या दिशेने बाजीराव जात आहेत, हे ऐकून निजामाचे धाबे दणाणले आणि त्याने आपले सैन्य बऱ्हाणपूरकडे वळविले. बाजीरावांना हेच अपेक्षित होते. त्यांनी वाशिम सोडले आणि मंगळूर-माहूर मार्गे वायव्येच्या दिशेने चोपडाला पोहोचून तापी नदी ओलांडली. १८ डिसेंबर १७२७ रोजी ते काकरमुडाला पोहोचले. नंतर बावापीर गंदोडला नर्मदा पार करून त्यांनी भडोचकडे आपला मोर्चा वळवला. हे कळल्यावर निजामाने दिशा बदलून भडोचच्या दिशेने आगेकूच केली. संथ चालीने मार्गक्रमण करणाऱ्या त्याच्या सैन्याने काही अंतरच कापले होते, तेव्हा बाजीराव गुजरातमधील छोटा उदयपूरजवळ पोहोचल्याची बातमी त्याला कळाली. एव्हाना १७२८चा जानेवारी उजाडला होता. गेले तीन महिने कूर्म गतीने चालणारे निजामाचे अगडबंब सैन्य पार थकून गेले होते. बाजीरावांचा पाठलाग करण्याची आपली चूक निजामाला कळून चुकली होती. आता बाजीरावांना परतण्यास भाग पाडण्याचा निजामासमोर एकच उपाय होता, तो म्हणजे पुण्यावर हल्ला करण्याचा.
निजामाने ‘पिछेमुड’ करून पुण्याचा रस्ता धरला. शिवाय निजामाला गुजरातचे वावडे होते; कारण तिथला मोगलांचा सुभेदार सरबुलंदखान हा निजामाचा कट्टर प्रतिस्पर्धी. निजाम त्याच्या मुलखात जाणे टाळेल, हे चाणाक्ष बाजीराव जाणून होते. निजामाचे सैन्य जुन्नर, उदापूर, नारायणगड, औसेरी, खेड जिंकून पुण्याला पोहोचले. ८ जानेवारी १७२८ रोजी निजामाच्या पुढाकाराने संभाजी महाराजांच्या लग्नाचा समारंभ पुण्याला झाला. निजामाची अपेक्षा होती की, बाजीराव घाबरून पुण्यास परततील; परंतु बाजीरावांचा चिमाजीआप्पांवर पूर्ण भरवसा होता. निजामाला पुन:श्च चालता करण्यासाठी बाजीरावांनी आपला मोर्चा निजामाची पूर्व राजधानी औरंगाबादकडे वळविला. ते तातडीने खानदेशात पोचले आणि १४ फेब्रुवारी १७२८ रोजी मराठा सैन्य धुळ्याजवळील बेलवाडला धडकले.
बाजीरावांच्या औरंगाबादवर हल्ला करण्याच्या मनसुब्यामुळे निजाम हबकला आणि त्याने पुणे सोडून उत्तरेकडे प्रयाण केले. १२ फेब्रुवारीला तो अहमदनगरला पोहोचला. बाजीरावांना हेच पाहिजे होते. निजाम गोदावरी ओलांडण्याच्या दिशेने येत आहे, हे पाहून पालखेडमध्ये सापळा लावण्याचे बाजीरावांनी ठरविले. गेल्या चार महिन्यांच्या बाजीरावांच्या अथक परिश्रमापश्चात दिशाहीन भटकंतीनंतर दमले-भागलेले निजामाचे सैन्य मराठ्यांनी लावलेल्या जाळ्याकडे वाटचाल करीत होते. पालखेडची रणदुंदुभी गर्जू लागली.
No comments:
Post a Comment