पालखेडचा संग्राम (Battle of Palkhed)
लेखक :शशिकांत पित्रे
मराठा सैन्य : मराठा सैन्य स्वराज्याच्या प्रेरणेने पेटलेल्या शिलेदारांचे होते. पंचवीस ते तीस हजार संख्येच्या बाजीरावांच्या सैन्यात बहुसंख्य घोडदळ होते. वाटेत मिळेल ते खाऊन ते आपला गुजारा करत. त्यामुळे शिधा आणि राहुट्यांचे ओझे त्यांच्याजवळ नसे. घोडेस्वाराच्या वैयक्तिक गरजा घोड्याच्या पाठीवरच असत. त्यायोगे गतिमानता आणि चपळता त्यांच्या अंगी बाणली जात असे. परंतु मराठा सैन्याची प्रमुख उणीव म्हणजे तोफखाना. तोफखान्याच्या उणिवेमुळे त्यांच्या गतिक्षमतेत जरी भर पडत असली, तरी मोगलांच्या जंगी तोफांपुढे मराठा सैन्याला कच खावी लागण्याची शक्यता होती.
नेतृत्व : बाजीरावांचे नेतृत्व कणखर, चतुर आणि सैन्याचे मनोबल उंचाविणारे होते. आपल्या सैनिकांत मिळूनमिसळून राहण्याने सैनिकांमध्ये निष्ठा आणि भरोसा निर्माण होत असे. सैन्याच्या तुकड्यांचे सेनापती सामान्य शिलेदारांमधून त्यांच्या गुणांची पारख करून निवडलेले होते. सैन्यात विलक्षण एकसूत्रता होती.
निजामाचे सैन्य : निजामाच्या सैन्याची संख्या लाखाच्या घरात होती. संख्याबलात आणि शस्त्रबलात श्रेष्ठ असूनही इच्छाबलात मात्र मराठ्यांच्या तुलनेत ते कमी होते. पैशाच्या मुबलकतेमुळे सुखलोलुपता अंगी भिनली होती. तसेच धनधान्य आणि इतर गरजा जनावरांवर लादून नेण्याच्या प्रथेमुळे त्यांच्या सवयी ऐषारामी होत्या आणि गतिमानता कमजोर होती. लढाऊ दलाच्या मानाने त्यांच्या साहाय्यदलाचा आकार अवजड असायचा (‘Teeth to Tail Ratio’). मोगलांचा तोफखाना मात्र बलाढ्य होता आणि योग्य लक्ष्य लाभल्यास केवळ तोफांकरवीच शत्रूचा विध्वंस साधून विजय प्राप्त करण्याची त्यांच्यात क्षमता होती. परंतु बोजडपणामुळे आणि अवाढव्यपणामुळे मोगल सैन्यात एकसूत्रता, गतिमानता आणि लवचीकता यांचा पूर्ण अभाव होता.
नेतृत्व : निजाम-उल-मुल्क हा मोगल सेनापती एक कर्तबगार तुराणी होता. हा कावेबाज, कुटिल, शूर आणि कसलेला सेनानी होता. परंतु लढाईच्या मैदानावर आघाडीच्या सैन्यापासून निजाम खूप मागे असे आणि डावपेच त्याच्या सेनादलांतील नेते वापरीत असत. त्यामुळे लढाईच्या आघाडीवर निर्णयामधे विलंब होत असे. बहुसंख्य सैन्य मराठा सरदारांचे असल्यामुळे सैनिक निजामाशी निष्ठावान नव्हते.
No comments:
Post a Comment