मराठाकालीन शेतकरी !
काल समुहावर शिवाजी महाराजांच्या काळात 'शेती' कशाप्रकारे केली जात असे, असा एक प्रश्न विचारला होता.
सभासदाची बखर आणि काही पत्रे यामधून अगदी त्रोटकपणे शिवाजी महाराजांनी कृषीव्यवस्थेत काय बदलकेले होते, हे दिसते. त्याचा थोडक्यात आढावा घेऊन, एका इंग्रजी माणसाने उत्तर मराठेशाहीच्या काळातील शेतकऱ्याचं जे वर्णन केलं आहे, ते आज लिहीत आहे. यावरून मध्ययुगातील शेतीच्या तंत्राविषयी माहिती मिळेल.
महसूल आकारण्याच्या दृष्टीकोनातून जमिनीचे विभाजन व मोजमाप पुढीलप्रमाणे केलेले आढळते( शिवकालीन महाराष्ट्र - अ. रा. कुलकर्णी, डायमंड पब्लिकेशन्स, २०१२; पृ. क्र. ३०; श्री राजा शिवछत्रपती भाग १ – ग. भा. मेहेंदळे; डायमंड पब्लिकेशन्स, २००८; पृ. क्र. ३३०.)
•पांढरी – वसाहतीची जागा.
•काळी – नांगरटीची जागा – अ. लागवडीखालील जमीन , ब. पडीक जमीन.
•जिराईत व बागायत जमीन (या जमिनींचे पुन्हा इनाम आणि खालिसा जमीन असे प्रकार पडत.) बागायत जमिनीस ज्या कोणत्या पद्धतीने पाणी दिले जात असे, त्या पद्धतीनुसार बागायतीचे पाटस्थळ आणि मोटस्थळ असे दोन प्रकार असत.
•शेरीचे शेत - सरकार किंवा जहागिरदाराच्या खाजगी मालकीचे शेत असे, तिला शेरीचे शेत असे म्हणत. शेरीची जमीन कसणारा तो ‘शेरीकर’. अशा जमिनीच्या महसुलावर मणास दोन शेर प्रमाणे कमाविसदाराचा हक्क असे. याशिवाय काही कुरणे, बागा, आंबराई अशा काही विशेष जमिनीही शासकीय मालमत्तेचा भाग असत.
•‘पासोडी’ ही गाव पाटलाला बहाल केलेली सारामाफ जमीन असे.
•महार व्यक्तीला इनाम म्हणून दिलेल्या जमिनीस ‘हाडकी’ किंवा ‘पाडेवारी’ म्हटले जात असे.
शिवकालातील जमिनीची मोजदाद
(अनंत सभासद विरचित शिवछत्रपतींचे चरित्र, संपादक – र. वि. हेरवाडकर, व्हिनस प्रकाशन, २०१४; पृ. क्र. ३६.)
•काठी – पाच हात, पाच मुठी (एकूण ८२ किंवा ८४ तसू – साधारण करंगळी आणि तर्जनी यातील अंतर म्हणजे एक तसू).
•बिघा – वीस काठ्या औरस चौरस त्याचा एक बिघा.
•चावर – एकशेवीस बिघे.
•पांड – कोकणात काठीला पांड म्हणत. (२३ औरस चौरस पांड म्हणजे एक बिघा.)
याशिवाय टका, रुके, सजगणी इ. मापेही वापरली जात. ही मोजमापे पुढे पेशव्यांच्या कारकिर्दीत वेळोवेळी बदलली आहेत.
मध्ययुगीन शेतकरी शेती कशाप्रकारे करत असे ? -
थॉमस ड्यूअर ब्रॉटन (Thomas Duer Broughton) हा इंग्रज कमांडर काहीकाळ शिंद्यांच्या राजपुतान्यातील छावणीत वास्तव्यास होता. त्याकाळात त्याने लिहिलेली पत्रे उपलब्ध आहेत. आपल्या एका पत्रातून ब्रॉटनने हिंदुस्थानातील शेतकरी शेती कसे करत, याचे वर्णन केले आहे; ते बरेचसे रंजक आणि माहितीपूर्ण आहे. ब्रॉटन म्हणतो, ‘...शेतातील खरीप पिके – ज्यामध्ये बाजरी, ज्वारी, काही लहान आकाराचे धान्य, कापूस यांचा समावेश होतो, (असे पिक) काढून अजून तीन आठवडेही झालेले नाहीत, त्याआधी तेच शेत पार आमच्या तंबूंच्या दोरांपर्यंत नांगरून त्यात गहू, जव, चणा अशा मोठ्या रबी पिकांची पेरणी झाली आहे. ते धान्य पेरण्याचे जे अवजार (drill plough) वापरतात, ते त्यांच्या इतर हत्यारांप्रमाणे (किंवा) इतर शेतकामांप्रमाणेच अतिशय साधेसोपे आहे. जो रोपण्याचा भाग आहे, तो साधारण दोन फूट लांब असा बांबूचा असून, नरसाळ्याप्रमाणे त्याचे एक टोक दुभागून रुंद केलेले आहे, ज्यावर चामडे गुंडाळलेले असते. (हा भाग) नांगराच्या मुख्य काठीला बांधला जातो. चालक (नांगरणारा शेतकरी) मुठीत धान्य घेऊन आपला डावा हात या रुंद भागात घालून, त्याच हाताने नांगर सांभाळतो आणि त्याचवेळी उजव्या हाताने वेसण आणि एक लांब काठी पकडून बैल हाकतो. एक नांगर चालवायला एक माणूस आणि एक बैलजोडी पुरते. (काम करणारा) माणूस स्वत: दिवसभर काम करतो, पण बैलांना दुपारी मोकळं सोडतो. त्याने अवलंबलेल्या सोप्या पद्धतीने व्यवस्थित नांगरणी होते आणि धान्य (सर्वत्र) सारख्या प्रमाणात पेरले जाते. शेतातली नांगरणी आणि पेरणी झाली, की त्यावरून एका मोठ्या, वजनी ओंडक्यापासून बनवलेल्या एका बोजड अशा दंताळ्यावर, ज्याला ‘मई’(muee) असं म्हणतात, त्यावर दोन माणसे बसतात आणि साधारणतः चार बैल ते खेचतात, ज्यामुळे मोठी ढेकळंही फुटतात आणि धान्यावर मातीचा थर चढतो. शेतकऱ्याचे हे काम आटोपले, की तो पुन्हा शेतात जाऊन सिंचनाच्या उद्देशाने इंग्लंडमध्ये जसे करतात, त्याचप्रमाणे ‘पंज्याने’ (rake) मोठी ढेकळं एका बाजूला करतो. हे शेवटचं काम पिक जेव्हा एखाद् महिन्याचे झालेले असते तेव्हा केले जाते. इतर अवजारांप्रमाणेच बोजड, साध्यासोप्या आणि उपयुक्त घडणीच्या साखळ-पंपांनी विहिरी किंवा नदीकिनारी खोदलेल्या तलावांतून पाणी काढले जाते. धान्य पिकलं, की विळ्याने कापून, गावात आणून, एकावर एक भारे ठेवून रास केली जाते. मळणीसाठी काही भाग स्वच्छ करून, त्यावर तोंड बांधलेल्या बैलाकरवी धान्य रगडले जाते. त्यानंतर वाऱ्यावर धान्य उंचावरून खाली टाकण्याची सोपी पद्धत वापरून पाखडले जाते.या भागातील शेतकरी भारतातील इतर शेतकऱ्यांपेक्षा बरेच कमी गबाळे आहेत; पण त्यांच्या परिश्रमांचे फळ म्हणून त्यांना काही शेतातून मोठे उत्पन्न मिळत नाही; यासाठी कदाचित येथील जमिनींतील क्षारांचे जास्तीचे प्रमाण कारणीभूत असावे, जे इथे सर्वत्र आढळते.[Letters written in a Mahratta camp, during the year 1809 by Thomas Duer Broughton – Edited by M. E. Grant Duff, Asian Educational Services 1995; Letter no. XXVI, Pages 215-216. सदर मजकुराचा मराठीत स्वैर अनुवाद केला आहे.
डॉ. सागर पाध्ये.
No comments:
Post a Comment