औरंगझेबाचा राग
औरंगझेब हा मोगल बादशाह शाहजहानच्या पोटी जन्माला आलेला एक राजपूत्र. जन्माला आला २४ ऑकटोबर १६१८ रोजी गुजरातमधील दाहोद येथे. औरंगझेबाला तीन भाऊ होते. सर्वात मोठा दारा शुकोह, दुसरा शहा शूजा तिसरा औरंगझेब आणि सर्वात धाकटा मुरादबक्ष. औरंगझेब हा लहानपणापासून आपल्या भावंडांपेक्षा वेगळा होता. शाहजहान आपला बाप जिवंत असताना बापाविरुद्ध बंड करतो आणि त्या बंडाची परिणीती ही पराभवात होते आणि शाहजहानच्या बाप बादशाह जहांगीर शहा शूजा आणि औरंगझेब याना ओलीस म्हणून आपल्या कैदेत ठेवतो. या कैदेत राहिल्यामुळे औरंगझेब आणखीन संशयी आणि कारस्थानी बनतो. १६२७ साली जहांगीर वारल्यानंतर शाहजहान हा बादशाह बनतो.. शाहजहान आपल्या चारही राजपुत्राच्या शिक्षणाची योग्य व मोगल परंपरेला अनुसरून करतो. सर्व राजपुत्रांना सैनिकी, धार्मिक तसेच राज्यकारभाराचे शिक्षण दिले जाते. लहान असताना दोन गोष्टी औरंगझेब अंगी बाणतो एक अतिशय शिस्तबद्ध जीवनपद्धत. मोगल राजपुत्रांना अनेक व्यसने असत मात्र औरंगझेब कायम त्यापासून द्दुर राहिला होता. दुसरी आपल्याला बादशाह बनायचे असेल तर आपला बाप आणि भाऊ हे आपले शत्रू आहेत ही गोष्ट कायम मनात ठेवली. एकदा आग्रा शहरात दारा शुकोहने एक उत्तम इमारत बांधली आणि ती पूर्ण झाल्यावर दारा आपल्या बापाला आणि भावंडाना बघायला बोलावतो. तेव्हा औरंझेब इमारत न बघता फक्त इमारतीच्या दरवाज्या जवळ घुटमळत उभा राहतो आणि इमारतीच्या आत मध्ये बिलकुल येत नाही. शहाजहानला या चमत्कारिक वागण्याचे आश्चर्य वाटते आणि दुसऱ्या दिवशी शाहजहान औरंझेबाला विचित्र वागण्याचे कारण विचारतो. तेव्हा औरंगझेब सांगतो आपण सगळे एक इमारतीमध्ये असताना दारा शुकोह हा दगाफटका करून आपल्या सगळ्यांना मारून राज्य बळकावू शकला असता ते होऊ नये म्हणून मी दरवाज्याशी उभा होतो. या उत्तराने शाहजहान अतिशय संतापतो आणि त्याला दरबार काही महिने बंद करतो.
१६३८ साली औरंगझेबाची राजकोय कारकीर्द सुरु होते सुरुवातील तो दक्षिणेत सुभेदार म्हणून येतो नंतर तो हिंदुस्थानात अनेक ठिकाणी सुभेदार म्हणून जातो मध्यपूर्व आशियायत बल्ख (हा प्रांत उत्तर अफगाणिस्तानात आहे) प्रांतात पण लढाईत भाग घेतो आणि लढाई तसेच राज्य कारभारात तरबेज होतो. जर सामान्य माणसांना आणि सैनिकांना आपल्याजवळ करायचे असेल तर आपण धर्मवेडाचा बुरखा धारण केला पाहिजे असे त्याला वाटते आणि त्याप्रमाणे औरंगझेब तसे करतो. भरयुद्धात नमाज पढणे वैगरे गोष्टी करतो आणि त्याला प्रसिद्धी मिळते.
१६५५ साली औरंगझेब हा दक्षिणेत सुभेदार महाराष्टात होता आणि आदिलशाही सत्ता काबीज करायच्या प्रयत्नात होता. त्याच सुमारास बादशाह शहाजहान हा प्रचंड आजारी पडला आणि सगळी सूत्रे शाहजादा दारा शुकोहच्या ताब्यात गेली. बंड करून मोगलसत्ता आपल्या ताब्यात घेण्याची संधी त्याच्या कपटी मनाला योग्य वाटली त्यामुळे आदिशंबरोबरचे युद्ध बंद करून आपले सैन्य मजबूत करण्याचे काम त्याने केले. उत्तरेत कूच करण्याआधी त्यांनी शाहजादा मुरादला आपल्या गोटात सामील केले. तुलाच बादशाह करतो असे सांगितले. आणि त्या खोट्या आवाहनाला मुराद फसला. उत्तरेत कूच करण्या अगोदर औरंगझेब आपला मामा शाहिस्ताखान आणि इतर काही उमराव यांच्या मदतीने अनेक सरदार आपल्या बाजूला ओढतो.
जेव्हा औरंगझेब आणि मुराद यांचे संयुक्त सैन्य उत्तरेकडे कूच करते तेव्हा शहाजहानला बंडाची बातमी लागते आणि तो महाराणा जसवंतसिंघ (जोधपूर संस्थानाचा मोगली मनसबदार) आणि कासीमखान याना औरंझेबाला रोखण्यासाठी पाठवतो. या सैन्याची गाठ उज्जैनजवळ १५ एप्रिल १६५८ रोजी गाठ पडते आणि दरम्यान औरंगझेब कासिमखानाला फितवतो आणि जसवंतसिंगला एकटा पडतो आणि या लढाईत त्याचा धुव्वा उडतो आणि तो जोधपूरच्या दिशेने पलायन करतो. जसवंतसिंघ हा बादशाह शाहजहानच्या आज्ञेने औरंझेबाशी लढतो. .
आतापर्यंत बेसावध असलेला दारा शुकोह जागा होतो आणि तातडीने सैन्यभरती करतो आणि औरंझेबाला रोखण्यासाठी चंबळ नदीच्या काठी धोलपूरला आपली पन्नास हजार फौज पाठवतो आणि खंदक खणून सर्व उतार सुरक्षित करतो. औरंगझेबाच्या हेरांकरवी दाराच्या चंबळेच्या काठी मोर्चे बांधणीची
संपूर्ण माहिती मिळते. तसेच औरंगझेबाच्या धोलपूरच्या पूर्वेस चाळीस मैलावर एका दुर्लक्षित उताराची माहिती मिळते आणि औरंगझेबाचे सैन्य त्या नदीउतारावरून चंबळ नदी ओलांडते आणि दाराची मोर्चेबांधणी निरुपयोगी ठरते. हे ऐकून दारा मनाने खचतो आणि न लढत तो आग्र्याकडे माघार घेतो. औरंगझेब दाराचा पाठलाग करतो आणि आग्र्याजवळ दाराचे सैन्य आणि औरंगझेबाकजे सैन्य आग्र्याजवळ सामूगढ येथे गाठ पडते आणि भीषण युद्ध होते आणि त्यात औरंगझेबाच्या सरशी होते. दारा पळ काढतो आणि औरंगझेब आग्र्याला पोहोचतो आणि मुरादला शिकारीवर पाठवतो. शहाजहानला कैद करतो आणि सगळी सल्तनत आपल्या ताब्यात घेतो. मुराद शिकारीहून परतल्यावर त्याला दंग्याने कैद करतो. दाराच्या मागे सैन्य घेऊन जातो दारा प्रथम लाहोर आणि नंतर मुल्तानकडे जातो. तेव्हा शुजा शाह जो बंगालमध्ये सुभेदार असतो तो आपले सैन्य घेऊन आग्र्याकडे कूच करतो. औरंगझेब शुजा बरोबर लढण्यासाठी सैन्य जमवतो आणि बादशहा म्हणून जसवंतसिंगला पण ससैन्य आपल्या बाजूने लढण्याची आज्ञा करतो.
येथे जसवंतसिंघ औरंगझेबाशी दगा करतो काही सरदार आणि स्वतः फितूर होतो आणि ऐन लढाईच्यावेळी पळ काढतो आणि औरंझेबाच्या सैन्यात मोठा गोधळ उडवतो. जसवंत मैदानातून पळतो आणि शुजाला लगेच आक्रमण करण्यासाठी निरोप पाठवतो. पण शुजाला जसवंतवर विश्वास बसत नाही आणि तो २४ तास उशिरा हल्ला करतो. पण ते २४ तास औरंझेबाला परिस्थिती सावरण्यासाठी वरदान ठरतात आणि युद्धात शुजाचा धुव्वा उडतो आणि तो परत बंगालकडे पळतो आणि औरंझेब त्याच्यामागे सैन्य पाठवतो आणि शूजाला रानोमाळ भटकायची पाळी येते आणि त्यातच त्याचा अंत होतो. दारा पण मुलतानहून पुढे पर्शियाला जात असताना पकडला जातो आणि त्याला दिल्लीला आणून त्याचा शिरच्छेद केला जातो.
या वारसयुद्धाच्या कहाणीत औरंझेबाच्या दृष्टीने फितूर महाराणा जसवंतवर मोठा राग असतो आणि तो योग्य आहे. पण औरंगझेब आपल्या रागाचे परिवर्तन सूडात लगेच करत नाही आणि त्याने तसे केले असते तर इतर रजपूत राजे बिथरले असते. त्यामुळे जसवंतला माफी दिल्याचे नाटक करतो.
साधारण मोगली सैन्यात सगळे मनसबदार ५०% युद्धभूमीवर असतात २०% दिल्लीत/आग्रा येथे दरबारात हजर असतात आणि उरलेला वेळ आपल्या जहागिरीत असतात. पण औरंगझेबाच्या राग जसवंतवर असल्याने त्याला बराच काळ युद्धभूमीवर राहवे लागले. एकदा तर पाच वर्ष तो जोधपूरला जाऊ शकला नाही.
औरंगझेबाच्या सूड उगवाची संधी १६७८ साली मिळाली जेव्हा जसवंत वारला आणि त्याचा मुलगा ५ वर्षाचा बालक होता. तेव्हा औरंगझेबाने जाहीर केले हा मुलगा जसवंतला रखेलीपासून झाला आहे त्यामुळे तो वारसदार होउ शकत नाही. जोधपूरचे संस्थान त्याने खालसा केले आणि अश्या पद्धतीने त्याने जसवंतवर मरणोत्तर सूड उगवला. एखादा बादशाह इतका दीर्धद्वेषी असू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.
शैलेश दामले
औरंगझेब - शक्यता आणि शोकांतिका लेखक - रवींद्र गोडबोले
जिंदादिल दारा शुकोहचे चरित्र लेखक - काका विधाते
No comments:
Post a Comment