विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 20 July 2021

अलिबागमधील आंग्र्यांची छत्रीबाग

 


अलिबागमधील आंग्र्यांची छत्रीबाग

पोस्त्साम्भर ::प्रवीण कदम
मराठा आरमाराचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी घातला आणि त्याचा कळस सरखेल कान्होजीराजे यांनी घडविला. अठरा टोपीकरांच्या मनात धडकी भरविणाऱ्या सरखेल मराठा आरमाराचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी घातला आणि त्याचा कळस सरखेल कान्होजीराजे यांनी घडविला. अठरा टोपीकरांच्या मनात धडकी भरविणाऱ्या सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांना 'समुद्रावरचा शिवाजी' म्हणून ओळखले गेले. कान्होजींचे वडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेमध्ये होते. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याची धुरा छत्रपती राजाराम आणि राणी ताराबाई यांनी वाहिली. त्या काळात कोकण किनारपट्टीवर सर्व फिरंगी आणि जंजिऱ्याच्या सिद्दीला शह देऊन स्वराज्याच्या आरमाराची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर नेली ती आंग्रे कुळातील मातब्बर योद्ध्यांनी. कान्होजी आंग्रे यांनी इ. स. १७२९ पर्यंत परकीय सत्तांना सळो की पळो करून सोडले. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र सेखोजी, मानाजी, तुळाजी आणि संभाजी यांनीसुद्धा स्वराज्याच्या सागरी सीमा सतत झुंजविल्या. स्वराज्याच्या आरमारी इतिहासात आंग्रे घराण्याचे मोठे योगदान आहे.
या आंग्रे घराण्यातील दिवंगत व्यक्तींची स्मृती-स्मारके रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरात आहेत. अलिबागच्या एस. टी. स्थानकापासून चालत ४०० मीटर अंतरावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात (काशी विश्वेश्वर मंदिरासमोर) हे ऐतिहासिक स्मारकांचे संकुल आहे. मध्ययुगीन काळात व्यक्तींच्या मृत्युपश्चात त्यांच्या स्मरणार्थ स्मारके उभारली जायची. या स्मारकांना सामान्यपणे समाधी किंवा छत्री असे संबोधले जायचे. त्यामुळे आंग्रे घराण्याची ही स्मारके आंग्र्यांची छत्रीबाग म्हणून प्रसिद्ध झाली. येथे अंदाजे एक एकर क्षेत्रफळामध्ये आंग्रे घराण्यातील स्त्री-पुरुषांची लहान-मोठी २२ स्मारके आहेत.
यातील सर्वांत जुने आणि मोठे स्मारक सरखेल कान्होजींचे आहे. हे स्मारक जमिनीवर तीन टप्प्यांमध्ये रचलेले आहे. संपूर्ण बांधकाम काळ्या पाषाणातील असून सुबक सौंदर्यपूर्ण स्थापत्याने अलंकृत आहे. जमिनीलगतचे एक मीटर उंचीचे जोते आधुनिक आहे तर त्यावरील दोन टप्पे मात्र प्राचीन आहेत. दुसऱ्या टप्प्यावरून तिसऱ्या टप्प्यावर जाण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. सर्वांत वरील टप्प्यात अष्टकोनी भिंतींच्या आत मध्यभागी प्रतिकात्मकरित्या दोन पादुकांची निर्मिती केलेली आहे. अष्टकोनी भिंतीच्या कोपऱ्यांवर सुंदर कलाकुसर असलेले खांब कोरलेले आहेत. काळ्या दगडातील बांधकाम असूनही स्मारकाच्या वास्तूवरील शिल्पकाम सुबक आणि दर्जा अप्रतिम आहे. कान्होजीराजे आंग्रे यांच्या स्मारकाव्यतिरिक्त येथे कान्होजींच्या पत्नी मथुराबाई आंग्रे, पुत्र सेखोजी आंग्रे (१७ ऑगस्ट १७३३), मानाजी आंग्रे (४ ऑगस्ट १८९६), गजराबाई मानाजीराव आंग्रे (९ मार्च १८९७), आनंदीबाई मानाजीराव आंग्रे यांची स्मारके आहेत. काही स्मारकांवर शिलालेख दिसून येतात. त्यामुळे ते स्मारक कोणाचे आहे आणि त्यांचा मृत्यू कधी झाला याची माहिती आपल्याला कळते.
ही सर्व स्मारके वेगवेगळ्या काळात निर्माण केलेली आहेत. त्यामुळे त्यांची शैली वैविध्यतेने नटलेली आहे. तत्कालीन स्थापत्याचे स्थित्यंतर यातून दिसून येते. प्रत्येक काळातील बांधकाम शैली आणि साहित्य वेगवेगळे आहे. छत्र्यांवरील नक्षीसुद्धा भिन्न आहे. राजकीय धामधुमीच्या काळात उभारलेली स्मारके आणि राजकीयरित्या तसेच आर्थिक स्थैर्य असलेल्या काळातील स्मारके यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास अनेक बारकावे दिसून येतात. राजकीय स्थैर्य असलेल्या काळातील स्मारकांचे आखीव-रेखीवपण, शिल्पकलेतील सौंदर्य अधिक देखणे व सौंदर्यपूर्ण आढळते. काही स्मारकांवर राजस्थानी शैलीचा प्रभाव दिसून येतो. छत्रीबागेत स्मारकांसोबतच एक तुळशी वृंदावन आणि शंकराचे देवस्थान आहे. शंकराचे देवस्थान वर्तुळाकार साकारलेले असून त्यात नाजूक पिंडी आणि नंदीची मूर्ती आहे. आजही कान्होजींचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे आपल्या पूर्वजांच्या श्राद्धतिथीला त्या त्या समाधीची पूजा करून नैवेद्य अर्पण करतात. अशा वेळी होणाऱ्या धार्मिक विधींसाठी येथे एका विहिरीची सोयही उपलब्ध आहे. छत्रीबागेला राज्य पुरातत्त्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. या स्मारकाच्या जतन-संवर्धनाचे काम पूर्ण करून सन २००८ मध्ये कान्होजीराजे यांच्या पूर्णाकृती शिल्पासह हे स्मारक जनतेसाठी खुले करण्यात आले.
जायचे कसे?
मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापासून मांडवा जेट्टीपर्यंत अलिबागला जाण्यासाठी लाँच उपलब्ध आहेत. मांडव्याच्या पुढे अलिबागपर्यंत लाँच कंपन्यांच्या बस असतात. भाऊच्या धक्क्यावरूनही रेवस जेट्टीपर्यंत लाँच आहेत. त्यामधून दुचाकी/चारचाकी वाहनेही नेता येतात. रस्त्याने येणाऱ्यांसाठी मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी अशा बहुतांश ठिकाणाहून एस. टी. बसेस उपलब्ध आहेत.

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...