
पहिल्या महिला सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे
सहावी माळ उमाबाईसाहेब यांच्या
चरणी अर्पण 

पराक्रमाची पराकाष्टा करणारी इतिहासातील अनेक पात्रे अज्ञात असली तरी त्या इतिहासाच्या पैलूंची चमक कधी कमी होत नसते. महिला सरसेनापती उमाबाई खंडेराव दाभाडे यांनी पराक्रमाची झालर चढवली इतिहासाला शौर्याचे अनोखे कोंदणही मिळाले.
भारताचा इतिहास लढवय्या रणरागिणींनी उजळून निघालेला आहे.महाराणी ताराराणी, अहिल्याबाई होळकर,झाशीची राणी अशी नावे घेता येतील. यात एक वेगळे नाव म्हणजे सरसेनापती श्रीमंत उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे. इतिहासातील हा वेगळा पैलू अनेकदा नजरेआड झालेला दिसतो. मात्र हे एक वास्तव एक नव्या रणरागिणीची वेगळी ओळख करून देते.
उमाबाईंचा आणि नाशिकचा संबंध काय हे पाहण्यासाठी सरदार दाभाड्यांची कारर्कीद जाणून घेणे गरजेचे आहे.इतिहासाला शौर्याचा रंग देण्यात त्यावेळच्या पराक्रमी सरदारांचे महत्त्वही तेवढेच आहे. छत्रपतींच्या आदेशावर जीव ओवाळून टाकणा-या अनेक सरदारांच्या पराक्रमाने मराठेशाहीचा इतिहास उजळून निघाला आहे. यात महाराष्ट्रातील सतराव्या शतकातील एक प्रसिद्ध मराठा घराणे म्हणजे पुण्यातील तळेगावचे दाभाडे घराणे. या घराण्याचा मूळ पुरूष बजाजी व त्यांचा मुलगा येसाजी हे शिवाजी महाराजांच्या पदरी होते. छत्रपतीं संभाजी राजांनीही त्यांना रायगडाची धुरा दिली.
छत्रपती संभाजी महाराजांनंतर ते छत्रपती राजाराम महाराजांच्या सेवेत दाखल झाले. येसाजींना खंडेराव आणि शिवाजी ही दोन मुले होती. तर खंडेरावांना त्रिंबकराव व यशवंतराव ही दोन मुले होती. खंडेराव पराक्रमी निघाले. त्यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या.छत्रपती शाहू महाराजांनी खंडेरावांना सेनाखासखेल अन् नंतर १७१७ मध्ये सेनापतीपदी नेमले.
खंडेराव दाभाडेंनी उत्तर सरहद्दीवर राहून खानदेश, वऱ्हाड व गुजरात या तीनही प्रांतावर आपली पकड घट्ट केली. खंडेरावाच्या मृत्यूनंतर.छ. शाहूंमहाराजांनी त्रिंबकरावास सेनापतिपद दिले. अंतर्गत वादातून झालेल्या डभईच्या लढाईत त्रिंबकराव मारले गेले अन् येथूनच खंडेरावांची पत्नी अन् त्रिंबकरावांची आई उमाबाईंचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला
छ.शाहूंमहाराजांनी तळेगावात जाऊन उमाबाईंची समजूत काढून त्रिंबकरावाचा भाऊ यशवंतरावांना सरसेनापतिपदाची वस्त्रे दिली. यशवंतराव अल्पवयीन असल्याने सरसेनापतीपदाचा कारभार उमाबाई पाहू लागल्या अन् त्या इतिहासातील पहिल्या महिला सरसेनापती झाल्या. उमाबाई या अभोण्याच्या ठोके घराण्यातील कन्यारत्न. उमाबाई छत्रपती शाहूंचे सरसेनापती खंडेराव दाभाडेंच्या घरात लक्ष्मी म्हणून गेल्या.
. खंडेरावांच्या निधनानंतर उमाबाईंचा मुलगा त्रिंबकरावांकडे सरसेनापतिपद सोपवले गेले १ एप्रिल १७३१ रोजी त्रिंबकरांवांच्या मृत्यूमुळे उमाबाई दुखावल्या गेल्या. त्यानंतर छ. शाहूंमहाराजांनी त्रिंबकरावांचा लहान भाऊ यशवंतरावांना सरसेनापतिपद तर धाकटा बाबुरावाकडे सेनाखासखेल ही पदे दिली. मात्र ते अल्पवयीन असल्याने सरसेनापती व सेनाखासखेल या दोन्ही पदांचा कारभार उमाबाईंच्या हाती आला. पती आणि मुलाच्या मृत्यूचे दु:ख उमाबाईंनी काळजात एकवटले आणि त्या रणभूमीवर उतरल्या.
गुजरातचा बहुतेक भाग जरी मराठ्यांच्या ताब्यात असला तरी दिल्लीच्या बादशहाने आपली दहशत कायम ठेवली होती. दाभाडेंची पकड गुजरातवरून कमी झाल्याचे पाहून मारवाडचे राजा अभयसिंग याने दिल्ली बादशहाच्या मदतीने आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्याने बडोदा हस्तगत करून डभईला वेढा घातला. पिलाजी गायकवाड उमाबाईंचा उजवा हात होता. हे ओळखून अभयसिंगने पिलाजींचा खून घडविला.
उमाबाईंचा बाणेदारपणा त्यांच्या लष्करी नेतृत्वात होता. हेच दाखवीत पिलाजींच्या हत्येनंतर उमाबाईंनी अभयसिंगवर स्वारी केली. उमाबाईंच्या भीतीने हार पत्करून अभयसिंग गुजरातमधून पळाला. मात्र अहमदाबादमधील मोगलाचे ठाणे अजूनही कायम होते. १७३२ मध्ये उमाबाईंनी गुजरातवर दुसरी स्वारी केली. यावेळी मोगलांचा जोरावरखान बाबी नावाच्या सरदाराने ‘एक विधवा माझ्याशी काय लढणार, तुझा निभाव लागणार नाही,’ अशा आशयाचे पत्र उमाबाईंना पाठवले. याचे उत्तर रणांगणात हत्तीवर बसलेल्या पांढऱ्याशुभ्र वेशातील सरसेनापती उमाबाईंनी युद्धांत अलौकिक शौर्य गाजवून दिले.
उमाबाईंचे रौद्ररूप पाहून जोरावरखान अहमदाबादच्या तटात लपला. मराठा सैन्यांनी मुगल पठाणांचे मृतदेह एकावर एक खच करून तटावर जाण्याचा मार्ग तयार केला, अशी इतिहासात नोंद मिळते. एका महिला सरसेनापतीने केलेल्या या कामगिरीवर छत्रपती शाहू महाराज खूश झाले होते. त्यांनी उमाबाईंना साताऱ्यात बोलावून दरबारात त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पायात सोन्याचे तोडे घातले.
उमाबाईंची तब्येत नंतरच्या काळात खालावली. २८ नोव्हेंबर १७५३ रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले. ‘या ऐतिहासिक घटनांमध्ये सरसेनापती हा बहुमान मिळालेल्या व रणांगणावर शौर्य गाजवून, सोन्याचे तोडे पायात घालण्याचा संन्मान मिळालेल्या उमाबाई खंडेराव दाभाडें या इतिहासात एकमेव महिला सरसेनापती होऊन गेल्या.
पेशवा बाजीरावांमुळे उमाबाईंचा मोठा मुलगा मारला गेला होता त्यामुळे साहजिकच उमाबाईंचा बाजीरावांवर राग होता परंतु नाईलाजाने त्यांना बाजीरावांशी सोबत करणे भाग होते. छत्रपती राजाराम दुसरे यांच्या काळात पेशवा होते बाळाजी बाजीराव. आणि याच काळात त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. म्हणून त्यांनी दाभाडे घराण्याशी करार करून त्यांच्या मिळकतीत हक्क दाखविला आणि दाभाड्यानां अडचणीत आणले.
या कराराला विरोध करून देखील उमाबाईंचा प्रयत्न असफल झाला.या लढ्यात उमाबाईंना साथ मिळाली ती म्हणजे छत्रपती ताराराणींची. ताराराणींना देखील पेशव्यांबद्दल राग होता म्हणूनच त्यांनी उमाबाईंशी संधान बांधले आणि परस्परांना मदत करण्याचे आश्वासन दिले. उमाबाईंनी इतके वाद असूनही लढाई करण्याचे विचार बाजूला ठेवले होते व चर्चेवर भर देण्याकडे त्यांचा कल होता. त्यांचे समजूतदारीचे अनेक प्रयत्न फोल गेले परंतु तरीही उमाबाईंनी एक शेवटचा प्रयत्न म्हणून आपल्यातर्फे महादेव निरगुडे यांना सलोख्याची बोलणी करण्यासाठी पेशवे दफ्तरी धाडले परंतु पेशव्यांनी हि देखील विनंती धुडकावून लावली.
याउपरही उमाबाईंही स्वतःआळंदी येथे पेशव्यांची भेट घेतली व हा करार आमच्यावर जबरदस्तीने लादला गेला असून आम्हाला तो मान्य नाही त्यामुळे, हा करार रद्द करण्यात यावा असा दावा केला परंतु, हा दावा झुगारून लावत पेशवा दाभाडे घराण्याच्या गुजरात मधील मिळकतीमधील अर्ध्या हिस्याच्या मागणीवर अडून राहिले. आता मात्र सलोख्याचे प्रयत्न करून भागण्यासारखे नव्हते, काहीतरी ठोस कृती करणे गरजेची होती.
पेशव्यांविरुद्ध उमाबाई सलोख्याचे सर्व प्रयत्न व विनंत्या धुडकारून लावल्याने आता उमाबाईंनी लढाईचा मार्ग स्वीकारला. आधीच ठरलेल्या करारानुसार ताराराणीसाहेब देखील त्यांच्या सोबत होत्या. पेशवा बाळाजी बाजीराव मुघल मोहिमेवर गेले असता अतिशय चलाखीने सुमारे १७५० साली ताराराणींनी छत्रपती राजाराम (दुसरे) यांना कैद केले.
ताराराणींच्या मदतीला पुढे उमाबाईंनी आपले मराठा व गुजरात असे दुहेरी सैन्य दमाजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पाठविले. सुरुवातीला यश पदरी येत होते परंतु, पुढे परिस्थिती उलटी झाली आणि दमाजी जाळ्यात अडकले आणि कृष्णा नदीच्या नजीक दरीत फसले गेले.दमाजी गायकवाडांना ताब्यात घेतले गेले आणि पेशव्यांशी करार करण्यास त्यांना दबाव टाकण्यात आला व करारानुसार गुजरातेतील अर्धा वाटा व या केलेल्या हल्ल्याची नुकसानभरपाई म्हणून मोठी रक्कमदेखील मागितली.
दमाजींनी या मागणीला विरोध केला. पेशव्यांनी दमाजींना त्यांच्या परिवारासकट कैद केले, पाठोपाठ उमाबाई व त्यांच्या परिवारातील काही सदस्यांना देखील कैद केले गेले.
२८ नोव्हेंबर १७५३ रोजी पुणे येथे उमाबाईंचा मृत्यू झाला. आजही तळेगाव येथे त्यांची समाधी आहे. पेशव्यांशी लढण्यात त्यांना यश आले नाही पण एक स्त्री म्हणून तेव्हाच्या काळात परिवारासोबत इतक्या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडणे खरंच कठीण काम होते.
या सगळ्या विरोधांना, संकटाना मात देत आपल्या पतीच्या पश्च्यात उमाबाईंनी जवळजवळ २० वर्षे आपली सत्ता सांभाळली. स्त्री शक्तीला कमी लेखणार्यांना उमाबाई दाभाडे हे नेहमीच एक उत्तम उदाहरण राहतील.


लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे
# जागर - मराठेशाहीचा - जागर स्त्रीशक्तीचा
# राष्ट्रीय - क्षत्रिय - जनसंसद
!!जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे!!
No comments:
Post a Comment