वेळापुरात इतिहासाचा अमूल्य ठेवा!
छत्रपती शाहू महाराजांचे अप्रकाशित शिल्प सापडल्याने पुन्हा एकदा इतिहास जिवंत झाला! 
लेखक :रामकुमार शेगडे
An unseen sculpture of Chhatrapati Shahu Maharaj brings history back to life! 
मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाला उजाळा देणारा एक अनमोल शोध सोलापूरला लागला आहे. रविवार, १ नोव्हेंबर २०२५ रोजी वेळापूर (ता. माळशिरस) येथील खंडोबा मंदिराच्या आवारात इतिहास अभ्यासक अमर साळुंखे यांना छत्रपती शाहू महाराजांच्या तात्कालीन दगडी शिल्पाचा शोध लागला. ‘मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा व जिंजी’ या ग्रंथाचे लेखक असलेल्या साळुंखे यांनी हा शोध त्यांच्या अभ्यास दौऱ्यादरम्यान लावला. हे शिल्प आजवर खंडोबाचे शिल्प म्हणून ओळखले जात होते, मात्र आता ते शाहू महाराजांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या शिल्पात छत्रपती शाहू महाराज आपल्या तोलदार घोड्यावर स्वार आहेत. घोडा आकर्षक अलंकारांनी सजवलेला असून महाराजांच्या कानात बाळी, गळ्यात नाजूक माळ, डाव्या हातात लगाम आणि उजव्या हातात धोक्याच्या दोरीचे टोक आहे. कपाळी गंध, ओठांवर भरदार मिशा, तर घोड्याच्या समोर आबदागीर हातात अब्दागिरी घेऊन उभा आहे. घोड्याच्या मागे हुक्कापात्र हातात घेतलेला सेवक दिसतो. ही सारी मांडणी शाहू महाराजांच्या ऐश्वर्यशाली दरबारी जीवनाची जिवंत झलक देणारी आहे.
इतिहास अभ्यासक अमर साळुंखे यांनी सांगितले की, हे शिल्प छत्रपती शाहू महाराजांच्या तारुण्यातील काळाचे प्रतिबिंब आहे आणि इतिहासासाठी हा एक अमूल्य ठेवा आहे. या शिल्पामुळे शाहू महाराजांच्या वैभवशाली कालखंडाविषयी नवी माहिती मिळू शकते. इतिहास अभ्यासक रवी मोरे, अजय जाधवराव आणि सुरेश जाधव यांनीही या शिल्पाचा शाहू महाराजांशी असलेला संबंध दुजोऱ्याने मान्य केला आहे.
छत्रपती शाहू महाराजांचा काळ हा मराठा साम्राज्याच्या सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. मोगलांच्या कैदेतून सुटल्यावर त्यांनी सातारा राजधानी म्हणून वसवली आणि मराठा साम्राज्याला स्थैर्य दिले. त्यांनी महाराष्ट्रातील लहान-मोठ्या घराण्यांना पराक्रमासाठी संधी दिली आणि स्वराज्याचा पाया अधिक भक्कम केला. शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची घोडदळं अटकेपार भगवा फडकवणारी ठरली. त्यांच्या काळात मराठ्यांची ताकद इतकी प्रबळ होती की इंग्रज म्हणत असत — “शाहू महाराजांच्या पाठिशी असताना हिंदुस्थानावर युद्ध करणे म्हणजे आशिया खंडावर हात घालण्यासारखे आहे.”
इतिहासकारांच्या मते, छत्रपती शाहूंनी दिल्लीच्या तक्त्यावरून मोगल बादशहाला खाली खेचले आणि मराठ्यांच्या सामर्थ्याचा आवाज संपूर्ण हिंदुस्थानभर घुमवला. त्यामुळे शाहू महाराजांचा काळ हा मराठा साम्राज्याच्या दृष्टीने सर्वाधिक स्थैर्य आणि गौरवाचा काळ ठरला.
इतका ऐतिहासिक ठेवा आजवर दुर्लक्षित राहिल्याने इतिहासप्रेमींनी आणि अभ्यासकांनी या शिल्पाचे जतन व संवर्धन करण्याची मागणी केली आहे. “शाहू महाराजांचा खरा इतिहास आणि त्यांचे पराक्रम जनतेपर्यंत पोहोचावेत, यासाठी मी प्रयत्नशील आहे,” असे अमर साळुंखे यांनी या प्रसंगी सांगितले.
वेळापूर येथे सापडलेले हे दगडी शिल्प म्हणजे शाहू महाराजांच्या वैभवशाली राजवटीचा जिवंत पुरावा आहे. खंडोबा मंदिराच्या आवारात आजही ते जतन करण्यात आले आहे. इतिहासाच्या दृष्टीने हा शोध केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण हिंदुस्थानासाठी अभिमानास्पद ठरला आहे.




No comments:
Post a Comment