विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 July 2026

शिवजन्मतिथी : १९ फेब्रुवारी १६३० (शके १५५१, फाल्गुन वद्य तृतीया)

 


शिवजन्मतिथी : १९ फेब्रुवारी १६३० (शके १५५१, फाल्गुन वद्य तृतीया)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत अनेक वर्षे वाद होता. एक मत महाराजांचा जन्म शके १५४९, वैशाख शुद्ध द्वितीया (इ.स. १६२७) असा मांडत होते, तर दुसरे मत शके १५५१, फाल्गुन वद्य तृतीया (१९ फेब्रुवारी १६३०) हे योग्य असल्याचे प्रतिपादन करत होते.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दादासाहेब जेधे यांच्याकडून जेधे शकावली मिळवली होती. मात्र त्यांना मंडाले (ब्रह्मदेश) येथे कारावास भोगावा लागल्यामुळे त्या शकावलीचा अभ्यास तत्काळ प्रकाशित होऊ शकला नाही. पुढे १९१६ मध्ये पटवर्धन यांनी जेधे शकावली प्रसिद्ध केली. या शकावलीत शके १५५१, फाल्गुन वद्य तृतीया ही जन्मतिथी स्पष्टपणे नमूद असून, त्यासोबत घटक, पळ, नक्षत्र यांचाही उल्लेख आढळतो.
त्यानंतर १९२५ मध्ये प्रकाशित झालेल्या शिवचरित्र प्रदीप या ग्रंथातही विविध शकावल्यांच्या आधारे हीच जन्मतिथी ग्राह्य धरली गेली.
याशिवाय राजस्थानात शिवराम ज्योतिषी यांनी तयार केलेली शिवाजी महाराजांची समकालीन कुंडली उपलब्ध झाली. तसेच उदयपूर संस्थानातील बानेड आणि बिकानेर फोर्ट ग्रंथालयात आणखी दोन कुंडल्या सापडल्या. या तिन्ही कुंडल्यांमधील ग्रहस्थिती शके १५५१, फाल्गुन वद्य तृतीया या तिथीशी सुसंगत असल्याचे दिसून येते.
या सर्व पुराव्यांवरून १६३० सालाची जन्मतिथी अधिक बळकट होत असली, तरी इतिहासकारांमध्ये मतभेद कायम राहिले. दत्तोपंत आपटे, चिंतामणी वैद्य, करंदीकर, दिवेकर, बेंद्रे, शंकर जोशी, वि. का. राजवाडे, गो. स. सरदेसाई, जदुनाथ सरकार, गौरीशंकर ओझा, वेणीप्रसाद, गद्रे, वाकसकर इत्यादी विद्वानांनी या विषयाचा अभ्यास केला; मात्र त्यांच्यामध्येही दोन भिन्न मतप्रवाह होते.
या वादाचा निकाल लावण्यासाठी १९६६ मध्ये महाराष्ट्र शासनाने इतिहासतज्ज्ञांची समिती नेमली. या समितीत द. वा. पोतदार, न. र. फाटक, पवार, खरे, बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे आणि दीक्षित यांचा समावेश होता. समितीमध्ये एकमत झाले नाही. फाटक व पवार यांनी १६२७ या मताचे समर्थन केले, तर इतर सदस्यांनी १६३० या मताला पाठिंबा दिला. त्यामुळे ठोस निष्कर्ष निघेपर्यंत शासनाने परंपरेने साजरी होणारी शके १५४९, वैशाख शुद्ध द्वितीया ही तिथी कायम ठेवली.
दरम्यान, शिवदिग्विजय बखर मध्ये शिवजन्मतिथीविषयी तीन संस्कृत श्लोक दिलेले आहेत. हे श्लोक, उपलब्ध तिन्ही कुंडल्या आणि जेधे शकावली यांचा परस्पर मेळ शके १५५१, फाल्गुन वद्य तृतीया याच तिथीशी जुळतो.
तसेच गागाभट्टांनी रचलेल्या शिवराज्याभिषेकप्रयोग या ग्रंथात राज्याभिषेकाचा मुहूर्त निश्चित करताना शिवाजी महाराजांची जन्मकुंडली आधारभूत मानल्याचे दिसून येते. त्या कुंडलीचाही मेळ १६३० सालाशीच बसतो.
अखेर महाराष्ट्र शासनाने इतिहासकारांच्या संशोधनाचा पुनर्विचार करून २००१ मध्ये १९ फेब्रुवारी १६३० (शके १५५१, फाल्गुन वद्य तृतीया) हीच छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख अधिकृतपणे स्वीकारली. त्यानंतर १९ फेब्रुवारी हा दिवस शिवजयंती म्हणून शासकीय सुट्टीसह अधिकृतरीत्या साजरा केला जाऊ लागला.
तळटीप :
१) विजय देशमुख, शककर्ते शिवराय, पृ. १४१–१५४.

No comments:

Post a Comment

बाजीराव पेशव्यांचे पालखेडचे युद्ध.

  इतिहासात अशी काही युद्धे आहेत ज्यांनी केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगातील लष्करी अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले. त्यापैकी एक म्हणजे छत्रपत...