विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 5 June 2023

किल्ले दौलतमंगळ

 


किल्ले दौलतमंगळ
छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज हे काही काळ आदिलशाहीत तर काही काळ निजामशाहीमध्ये होते. मात्र असे राहणे शहाजी महाराजांना आता मान्य नव्हते. त्यातच त्यांचे सासरे लखुजीराव जाधव व त्यांच्या तीन पुत्रांचा दौलताबादच्या किल्ल्यात निजामशहाने खून केला. त्यामुळे अर्थातच शहाजीराजे संतापले व त्यांनी निजामशाही सोडण्याचे ठरवले. शहाजी महाराजांनी एक धाडसी बेत आखला. शहाजी महाराजांनी या परकीय शाह्यांविरोधात बंड पुकारले. पुण्याची जहागिरी शहाजी महाराजांच्या वडीलांपासून त्यांच्याकडेच होती. तिथे राजांचे वाडेही होते. त्यामुळेच राजे परांड्यावरून पुण्यात आले व पुणे आणि आसपासचा प्रदेश त्यांनी भरभर ताब्यात घेण्यास सूरुवात केली. तब्बल तीनशे वर्षांनी पुण्याची भूमी स्वतंत्र झाली. आदिलशहाला हे समजताच त्याने रायाराव नावाचा मराठी सरदार महाराजांवर पाठवला. आदिलशाहीच्या फौजा पुण्यात घुसल्या. त्यावेळी जिजाबाई गरोदर होत्या. या धामधुमीत त्रास नको म्हणून शहाजी महाराजांनी त्यांना सुरक्षित अशा किल्ले शिवनेरीवर ठेवले.
इकडे आदिलशाहीच्या फौजांनी पुण्यात धुमाकूळ घातला. कत्तली करीत त्यांनी आगी लावण्यास सुरुवात केली. शहाजी राजांचे वाडे पेटले. जीव वाचवण्यासाठी लोक वाट मिळेल तिकडे पळत होते. पुण्याच्या तटबंदी व वेशी सुरुंगांनी उडवल्या गेल्या आणि दहशत बसावी म्हणून पुण्यातून गाढवाचा नांगर फिरवला गेला.
त्यावेळी विजापुरी सरदार मुरार जगदेव याने पुणे प्रांताचा मुलकी आणि लष्करी कारभार बघण्यासाठी पुण्याचे ठाणे सिंहगड रांगेतील भुलेश्वराच्या डोंगरावर नेले. तेथे प्राचीन हेमाडपंथी मंदिराच्या भोवताली तटबंदी उभारून किल्ला बांधला व त्याचे नाव ठेवले दौलतमंगळ. भुलेश्वर मंदिराच्या दक्षिणेस श्रीमंगळाई देवीचे मंदिर आहे त्यावरून या किल्ल्याला दौलतमंगळ असे नाव पडले असावे. अहमदनरच्या बाजूने पुरंदरवर हल्ला करणाऱ्या शत्रूस पायबंद बसावा म्हणूनच मुरार जगदेवाने हा किल्ला बांधला असावा.
मुरार जगदेव हे आदिलशाही दरबाराचे मोठे सरदार होते. त्यांना ' महाराजाधिराज ' अशी पदवी होती. त्यांचे आणि शहाजी महाराजांचे संबंध अतिशय जवळचे होते. पुणे प्रांतावर मुरार जगदेवाचा अंमल १६२९ ते १६३४ पर्यंत होता. याच दरम्यान १६३३ मध्ये आलेल्या सूर्य ग्रहणाच्या वेळी भीमा - इंद्रायणीच्या काठी नागरगाव येथे मूरार जगदेवाची तुला झाली. या वेळी स्वतःहा शहाजी महाराज उपस्थित होते. या ठिकाणी तुळा झाली म्हणून गावाचे नाव तुळापुर पडले.
पुढे आदिलशाहीसाठी झटणाऱ्या मुरार जगदेवाला आदिलशहाने कैद केले आणि ऑक्टोबर १६३५ मध्ये त्याची जीभ छाटून शहरातून धिंड काढली व नंतर तुकडे तुकडे करून ठार मारले. शहाजी महाराजांना मदत करणाऱ्या आणि दौलतमंगळ किल्ल्याची निर्मिती करणाऱ्या मुरार जगदेवाचा दारुण अंत झाला.
मुरार जगदेवाच्या मृत्यू नंतर सुद्धा पुणे प्रांताचा कारभार काही वर्षे दौलतमंगळ वरूनच सुरू होता. मात्र नंतर शिवछत्रपतींनी पुण्यावरून सोन्याचा नांगर फिरवला आणि पुणे पुन्हा उभे राहू लागले. तेव्हा पुन्हा संपूर्ण कारभार पुण्यातून बघण्यास सुरुवात झाली आणि या किल्ल्याला फारसे महत्त्व राहिले नाही. नंतरच्या काळात काही हल्ल्यांमध्ये किल्ला संपूर्ण नेस्तनाबूत झाला.
दौलतमंगळ हा किल्ला म्हणून जास्त प्रसिद्ध नाही. तो प्रसिद्ध आहे हेमाडपंथी धाटाच्या मंदिरामुळे. महाराष्ट्रातील मंदिरात इतके उत्तम, सौष्ठवपूर्ण आणि प्रमाणबध्द मूर्तिकला असलेले मंदिर क्वचितच बघायला मिळते.
आज दौलतमंगळ किल्ला म्हणून फक्त एक बुरुज अस्तित्वात आहे बाकी किल्ला म्हणून एकही खूण शिल्लक नाही.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
महाराष्ट्रातील किल्ले - डॉ. द. ग. देशपांडे
भटकंती व इतिहास विषयक लेखांसाठी आमचे व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...