गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर :
"वेंगुर्ल्याच्या डच अधिकाऱ्याने वरवर तरी शिवाजी महाराजांपासून सुरक्षित ठेवण्याचे कारण दाखवून मसालेही गोव्याला आणिले आहेत. शिवाजी महाराजांच्या धामधुमीमुळे आमच्या गलबतावरील काहीच माल खपला नाही. शिवाजी महाराजांनी हुबळी व इतर बरीच सधन शहरे वसूल करुन बरेच प्रमुख व्यापाऱ्यांना कैद केल्याची खात्रीलायक बातमी आली. त्यामुळे कारवारच्या बाजूने बाजार तसेच मंदीचे असणार. तो पुढे कोठे जाणार हे नक्की समजले नसले तथापि आमचे कारवारचे दोस्त शिवाजीराजें संनिध येताच माल हलविण्याची तयारी करित आहेत. १७ दिवसांपूर्वी दिसलेल्या धूमकेतूचे परिणाम काय होतात याबद्दल कित्येकांची मने चूर होऊन गेली आहेत. आम्ही कारवारला असताना आमचे गलबत राजापुरास नेऊन लाविल्यास तेथे काही विक्री नक्की होईल असे रावजी पंडिताचे पत्र आले...
“हुबळीला देखील शिवाजी महाराजांचे भय आहे अशी पत्रे आली आहेत. हुबळी किंवा कारवार यापैकी कोठेच सुरक्षितपणा नसून आम्ही बंकापूरला सरसुभेदार शेरखान याचा कौल घेऊन जाऊन रहाणार आहोत, कारण (१) शेरखान वचनाला जागतो अशी त्याची कीर्ति आहे. (२) तो पैसा देण्यात चोख आहे अशीही त्याची ख्याती आहे. (३) आणि बंकापूर मोठे मजबूत स्थान असून तेथील अधिकारी बहलोलखान हाही सर्व राज्यात महाप्रबळ सरदार आहे...”
————————————

No comments:
Post a Comment