मुत्सद्दी पुढे म्हणाले, "महाराष्ट्राच्या अंतर्भागातून जमेल तसा मोगलांना विरोध करावा. त्यांना प्रतिकार करत असतानाच कर्नाटकात सुरक्षित जिंजीच्या किल्ल्यात महाराजांनी जावे."
महाराजांनी महाराष्ट्रातील लढाईची सर्व जबाबदारी अमात्य रामचंद्र पंत, शंकराजी नारायण, सरसेनापती संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्यावर सोपवली. आजच्या दरबारातच राजाराम महाराजांनी शंकराजी नारायण यांना सचिव केले. जिंजीच्या प्रवासात बहिर्जी, मालोजी घोरपडे, मानसिंग मोरे, प्रल्हाद निराजी, दाभाडे, कृष्णाजी अनंत, खंडो बल्लाळ, कान्होजी आंग्रे, बाजी कदम ही तुकडी नक्की करण्यात आली.
संध्याकाळच्या वेळी धनाजी जाधव संताजींकडे आले. दोघांनीही कडकडीत आलिंगन दिले आणि दोघे बैठकीवर बसले. बराच वेळ दोघेही मनसुबे रचत होते. शंका निरसन होत होत्या. जेवणाची वेळ झाली तसे द्वारकाबाईने जेवणाची वर्दी दिली. पंगत बसली. धनाजीने कमरेच्या शेल्यात बांधलेले बत्तासे द्वारका बाईकडे दिले.
"कशाचे बत्तासे भावजी?"
"मुलगा झाल्याचे."
"नाव काय ठेवले?"
"नाव.. नाव ठेवले माझ्या जीवश्च कंठस्थ मित्र सेनापती संताजीच्या मैत्रीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून "संताजी"!
हास्यविनोदात जेवणं उरकली. मग पलंगावर बसून स्वराज्याचे हे दोन शिलेदारा बऱ्याच उशिरा रात्रीपर्यंत पुढचे मनसुबे ठरवण्यात गर्क झाले. सकाळीच राजाराम महाराज जिंजीकडे निघणार, त्या आधी सर्वांना दरबारात जायचे होते म्हणून मग सारे झोपी गेले.
सकाळी सूर्योदयाबरोबरच छत्रपती राजाराम निवडक मुत्सद्दी व सेनेसह जिंजीकडे जाण्यास निघाले. धनाजी जाधव, विठोजी चव्हाण हे आपल्या तुकडीसह संताजींचा निरोप घेऊन रवाना झाले. पन्हाळ्यावर फक्त नारो व संताजीराव होते. म्हाळोजींनी नारोला आश्रय देऊन लहानाचा मोठा केला. तो आश्रित होता हे सांगूनही कोणाला खरं वाटणार नाही इतका घोरपडे घराण्याशी एकरूप होऊन गेला होता. संताजींचा पुत्र राणोजी व नारो जवळपास एकाच वयाचे. त्यांचे नारोवर पहिल्यापासूनच पुत्रवत प्रेम होते. नारो स्वतः फार बुद्धिमान असल्याने वेळप्रसंगी संताजी त्याचा सल्ला घेत असत. तो संताजींना पित्याप्रमाणे मान देत असे.
दोघेही निवांतपणे बैठकीवर मसलत करत बसले. संताजी म्हणाले, "नारो, संभाजी महाराजांना संगमेश्वरी जाळ्यात अडकवणारा शेख निजाम कोल्हापूर प्रांताच्या रोखाने यायला निघाला आहे."
"बाबा, तुम्ही त्याच्यावर चालून जाल त्यावेळी मीही तुमच्याबरोबर असेल."
"होय मला तुझ्या सल्ल्याची गरज असते. पण त्याआधी कुटुंब कबिला कापशीला हलवणे अगत्याचे आहे. तू सुद्धा बहिरेवाडीला निघण्याच्या तयारीला लागावेस."
"बाबा मला एवढ्या मोठ्या प्रशस्त वाड्याची काय गरज? यापुढे मी तुमच्या बरोबर नेहमी स्वारीवर राहीन."
"मग आईला एवढ्या मोठ्या वाड्याची आवश्यकता काय? का? थोड्याच दिवसात कुळकर्ण्याची सून नाही का येणार?"
नारो लाजून गप्प बसला. "एकदाचा शेख निजामला पिटाळून लावले की, तुझा विवाह करायचे ठरवले आहे."
"तर मग घोरपड्यांची सून म्हटले तर नाही का चालणार?"
"संस्कृतीचा विपर्यास होईल."
"नाही होणारे. मी माझी ब्राह्मण संस्कृती जरूर जपेन. पण ज्यांनी माझे लालन पालन करून डोंगराएवढा आधार देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं, त्या घोरपड्यांचेच नाव यापुढे माझ्या नावासमोर लावणार आहे."
"आणि तुझं कुळ? नाव बदललं म्हणून कुळ थोडेच बदलणार आहे?"
ठरल्याप्रमाणे नारो आईला घेऊन बहिरेवाडीला राहायला गेला आणि घोरपडेंचे कुटुंब कापशीला आले. कापशी ते बहिरवाडीचे अंतर केवळ दोन कोसांचे. परकीय सत्ताचक्रापासून अलिप्त असलेल्या कापशीत सेनापती संताजी घोरपडे वास्तव्याला आलेले समजताच खेडोपाडीच्या जनतेला अत्यानंद झाला. त्यांच्या वास्तव्यावरुन कापशीला "सेनापती कापशी" नाव रूढ झाले.
बहिरवाडीला सर्व स्थिरस्थावर करून नारो कापशीला आला. तो प्रथमच एवढा भव्य, सुसज्य योजनाबद्ध वाड्याची रचना बघून चकित झाला. प्रवेश दाराच्या दक्षिण बाजूस असलेल्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जाऊन प्रथम दर्शन घेतले. मग सदरेवर आला. तिथे शंकराजींना पाहून त्यांना मुजरा करून विचारले, "आपण कधी आलात?"
"हुकूमतपन्हाचा खलिता घेऊन सकाळीच आलो."
"खलिता?"
"होय नारो! शेख निजाम पन्ह्याळाला वेढा घालून बसला आहे. त्याच्या फौजेने कोल्हापुरात उच्छाद मांडलाय. लोक हैराण होऊन जीव मुठीत धरून आहेत."
नारोला संताजीच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटले. त्यांनी तिथून लवकर कुटुंबक कबिला हलवला ते ठीकच झाले.
शंकराजी म्हणाले, "धनाजीराव प्रतापगड वाईकडे मोहिमेत गुंतले, म्हणून हुकूमतपन्हानी शेख निजामाचा समाचार घेण्यासाठी संताजीसाठी खलिता धाडला आहे."
सेनापती सदरेवर येताच सर्वांनी उठून मुजरे केले. सर्वांना बसायला सांगून, सेनापतींनी मोहीमेबद्दल महत्त्वाच्या सूचना केल्या. संताजींना कापशीला येऊन आठच दिवस झाले, पण एव
ढ्या कमी वेळात त्यांनी हजारो शिपायांची भरती केली होती.
संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख
नमोस्तुते!
क्रमशः
No comments:
Post a Comment