विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 27 April 2026

दीडवानाचा रणसंग्राम आणि जणकोजी शिंदेंचा गनिमी कावा..!!


 दीडवानाचा रणसंग्राम आणि जणकोजी शिंदेंचा गनिमी कावा..!!

मारवाड मोहिमेत मराठ्यांनी तलवारीसोबतच गनिमी काव्याचा अत्यंत अचूक वापर केला. जयपूरचा सेनापती अनिरुद्धसिंग मोठी फौज घेऊन मराठ्यांवर चालून आला. पण जनकोजी शिंदे आणि मराठा फौजेने त्यांचा धुव्वा उडवला आणि राजपुतांची दाणादाण उडाली.
​मराठ्यांच्या हल्ल्यात शेकडो राजपूत मारले गेले. त्यांच्या तोफा, घोडे आणि उंट मराठ्यांनी लुटले. जीव वाचवण्यासाठी राजपुतांची फौज दीडवानाच्या दिशेने पळू लागली. इथेच जनकोजी शिंद्यांनी शत्रूची कोंडी केली. शत्रू पळत असलेल्या वाटेवरच्या सगळ्या विहिरी मराठ्यांनी माती टाकून बुजवून टाकल्या आणि पाण्याचे साठे अडवून धरले.
​पाण्याविना शत्रूची कशी अवस्था झाली, हे खुद्द जनकोजींनी पेशव्यांना पाठवलेल्या पत्रात सांगितले आहे
​पेशवे दप्तरातील नोंद-
"आम्हाकडील लोकांनी मार्गातील विहिरी बुजवून जागोजागची तली रोखून उभे राहिले. लोकांनी बहुतच निकड करून कछव्याचे राजपूत तीनसे चारशे मारले... प्रातकालपासून दोन प्रहर रात्रपर्यंत तीन कोस चालला. मार्गामध्ये पाण्यावाचून त्याचे लष्करचे राजपूत व माणसे व घोडी उंटे बैले वगैरे बहुत मृत्यू पावले. तेणेकरून बहुतच सिकिंदा जाला. कछव्याच्या लोकांची दीडवाण्याहून पुढें यावयाची हिंमत न जाली."
​पाण्याविना शत्रूचे सैन्य आणि जनावरे तडफडून मेली. मोठ्या फौजेचा गर्व असलेल्या राजपुतांना पुढे एक पाऊलही टाकता आले नाही. शत्रूची रसद आणि पाणी तोडून त्याला संपवण्याची जनकोजींची ही युद्धनीती राजपुतांना नामोहरम करणारी ठरली.
​संदर्भ-
१. पेशवे दप्तर भाग २१, पत्र क्रमांक ७७, पृष्ठ क्रमांक ८४-८५.

No comments:

Post a Comment

खिळचीपूर संस्थानाची सनद..!!

  खिळचीपूर संस्थानाची सनद..!! रतलाम आणि सैलानाप्रमाणेच माळवा प्रांतातील खिळचीपूर हे देखील एक महत्त्वाचे संस्थान होते. या संस्थानावरही शिंदे ...