नाना फडणवीस यांची दोन लग्ने झाली होती. नानांचे पहिले लग्न दहाव्या वर्षी झाले; या स्त्रीचे नाव यशोदाबाई.
रावबाजीच्या म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या स्वभावाचा धसका नाना फडणवीस यांच्या जिऊबाई या पत्नीनेही घेतला होता. नाना गेल्यावर या बाजीरावाने नानांच्या अरबांचा पगार चुकता करून नानांचे वाडे, जहागीर व इनामी गावे जप्त केली.
नानांजवळील अफाट संपत्ती हाती येण्यासाठी जिऊबाईस शनिवारवाड्यात आणून ठेवले. दौलतराव शिंद्याचीही त्या संपत्तीवर दृष्टी असल्याने, त्याने बाईस दत्तक देऊन आपल्या ताब्यात देण्याबद्दल पेशव्यांस विनंती केली, पण पेशव्यांनी ती नाकारली, आणि नानांचा पक्का सूड उगवला.
यानंतर नानांच्या पक्षाच्या सर्व मंडळींस पेशव्यांनी प्रतिबंधात ठेवले. यशवंतराव होळकरांनी पुणे जाळले, तेव्हा रावबाजी पळून गेले होते. तेव्हा जिऊबाई वाड्यातच होती. नानांचा व आपल्या घराण्याचा पूर्वापार संबंध जाणून यशवंतरावाने बाईस लोहगड (हा किल्ला नानांस सरकारांतून बक्षीस मिळाला होता) किल्ल्यावर नानांचा विश्वासू नोकर धोंडोपंत नित्सुरे याच्या स्वाधीन केले. नानांचा मुख्य खजिना तेथेच असे.
पुढे दोन वर्षांनी जनरल वेलस्लीने मध्यस्थी करून बाजीरावाकडून बाईस दरसाल बारा हजारांची नेमणूक करून देऊन पेशव्यांच्या आग्रहावरून बाईस लोहगड किल्ला सोडावयास लावला. पुढे बाजीराव इंग्रजांच्या मदतीने पुन्हा पुण्यात आला. तेव्हा इंग्रजांनी जिऊबाई यांस पुण्यात येण्यास सुचवले. पण "बाजीराव याची खोड फार वाईट आहे. त्यामुळे माझी पुण्यात रहाण्याची इच्छा नाही" असे तिने सांगितले. तेव्हा इंग्रजांनी बाजीरावास तिला महिना हजार रुपये देण्यास सांगून तिला पनवेलला ठेवले व सुरक्षेसाठी स्वतःचे सैन्य ठेवले.
पुढे बाजीराव बिठूरला गेल्यावर तिला वाद, बेलबाग संस्थान व मेणवली गाव इनाम दिले. हजार रुपये पेन्शन सुरूच ठेवली. यानंतर शेवटपर्यंत ती मेणवली येथे राहिली. नंतर बाई इंग्रजांच्या आसऱ्याने पनवेलास पेशवाई नष्ट होईपर्यंत राहिली. पेशव्यांनी तिला आपल्या ताब्यांत आणण्याची फार खटपट केली, पण ती त्यांच्याकडे आली नाही.
नाना फडणीस यांनी तिसरे पानिपत युद्ध प्रत्यक्षात पाहिले होते. बहुदा यातूनच धडा घेऊन मराठेशाहीतील मुत्सद्दी नाना फडणीस यांनी त्यांच्या कारकिर्दीत अखबारनवीस आणि नजरबाज यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविली. या कारणामुळे नानांना हिंदुस्थानातीलच नाही तर परदेशातीलही बातम्या अत्यंत जलद कळत असत.
प्रत्येक ठिकाणच्या "आतल्या" बातम्या मिळविण्यासाठी नानांनी अतिशोधक आणि भेदतत्पर माणसे मिळविली होती. गायकवाड नामक एक मराठा सरदार नानांचा अत्यंत विश्वासातील पटाईत बातमीदार होता. निंबाजी माणकोजी नामक अखबारनवीस निजामाच्या दरबारातील खडान् खडा बातमी नानांना कळवीत असे.
त्यांच्या बातमीचा पल्ला फार दूरवर असून त्यांस बातमी जलद कळत असे. इंग्रज व फ्रेंच यांशी मराठी राज्याशी जसजसा संबंध अधिकाधिक जडू लागला तसतशी नानांस कलकत्ता, मद्रास, मुंबई, पांडिचेरी, माही इत्यादी ठिकाणांहून बारीकसारीक बातमी देखील कळू लागली. हिंदुस्थानबाहेर देखील फ्रेंचाच्या व इंग्रजांच्या काय काय चळवळी चालल्या आहेत इकडे नानांचे लक्ष असे. 'फ्रेंचांचा सरदार बुशी हा फ्रान्स देशाहून फौज घेऊन माॅरिशस बेटात आला..' 'युरोपात फ्रेंच, डच, पोर्तुगीज हे इंग्रजांवर उठले आहेत..' असली वर्तमाने त्यांना कळत."
No comments:
Post a Comment