विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 19 May 2021

स्वराज्याची प्रेरणा-राजमाता जिजाऊ !

 


स्वराज्याची प्रेरणा-राजमाता जिजाऊ !

छत्रपती शिवाजीमहाराजांसारख्या पराक्रमी सूर्याला जन्म देणारी महान माता म्हणजे राजमाता जिजाऊ! नीतीमत्ता, बुध्दीमत्ता आणि मुत्सद्दीपणा याचा सुरेख संगम म्हणजे जिजाऊसाहेब!
त्यांच्याबद्दल म्हटले जाते,
तुम्ही नसता तर नसती दिसली
अंगणात तुळस
तुम्ही नसता तर नसते दिसले
मंदिराचे कळस
तुम्ही नसता तर नसते
सुवासिनींच्या कुंकू भाळी
पतिव्रतांच्या किंकाळ्या मग
विरल्या असत्या रानी ll
अशी त्या काळची परिस्थिती होती. मंदिरे भंगली जात होती.आयाबहीणीची अब्रु सुरक्षित नव्हती. मोठमोठ्या स्वकीय सरदारांनी स्वत:चा पराक्रम सुलतान आणि बादशाहांच्या पायाशी गहाण टाकला होता. जिजाऊंनी ही परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला. तो निर्धार त्यांनी आपल्या सत्यात आणला. चारही पातशाह्यांच्या उरावर पाय देत रयतेच्या कल्याणासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा त्यांनी आपल्या पुत्राला दिली.आपण ज्यांना दैवत मानतो,त्या शिवछत्रपतींच्या मातेचे चरित्रही तितकेच अगाध आणि स्फूर्तिदायक आहे.त्यांची जीवनगाथा जाणून घेतांना जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला त्यांची वेगळी भुमिका दिसते. कधी मातेचे वात्सल्य तर प्रसंगी महिषासुरमर्दिनीचा अवतार!
जिजाऊंचा जन्म दि. 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला.त्यांचे वडील लखुजीराजे जाधव मातब्बर सरदार होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई होते. बालपणीच त्यांना शस्त्र आणि शास्त्रविद्येचेही शिक्षण मिळाले होते.
पुढे त्यांचा विवाह वेरुळच्या भोसले घराण्यातील शाहजीराजांशी झाला. महाराष्ट्राची भाग्यक्ष्मीच जणू शाहजीराजांच्या संसारात अवतरली.
जिजाऊंच्या पोटी दि. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्म झाला. बाबासाहेब पुरंदरे वर्णन करतात ,"पुत्र कोणाला झाला? मराठ्यांच्या महालक्ष्मीला पुत्र झाला,पुत्र जिजाऊसाहेबांना झाला,पुत्र शाहजीराजांना झाला,पुत्र सह्याद्रीला झाला,पुत्र भारतवर्षाला झाला. किल्ले शिवनेरीवर शिवबाचा पाळणा आंदोळू लागला,महाराष्ट्राची भाग्यभवानीच जिजाऊंसाहेबांच्या रुपाने अंगाईगीत गाऊ लागली"
शिवबाला त्यांनी रामायण,महाभारताच्या कथा सांगितल्या. राम,कृष्ण ,भीम आणि अर्जुनासारखा पराक्रम करावा,ही भूमी परकीयांच्या तावडीतून मुक्त करावी,रयतेचे कल्याण करावे असा संस्कार केला. मातृत्व ,नेतृत्व आणि कर्तृत्वाचाही त्या आदर्श होत्या.
छ.शिवाजीमहाराज पन्हाळगडावर सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकले असताना त्यांची सुटका करण्यासाठी जिजाऊ हातात तलवार घेऊन आणि घोड्यावर बसून निघालेल्या दिसतात, त्यावेळेस जिजाऊ काय म्हणाल्या याचे वर्णन कवींद्र परमानंदांनी शिवभारतात केले आहे. 'माझ्या पुत्रास सोडविण्याचा मी स्वतः प्रयत्न करीन आणि सिद्दी जौहराचे मुंडके युद्धातून घेऊन येईन' (अध्याय २६/१४) त्यांचा हा महिषासूरमर्दीनीचा आवेश आपल्याला शिवभारतासारख्या समकालीन ग्रंथात दिसून येतो.
छ.शिवरायांचे सुपुत्र छ.शंभुराजांच्या बालपणीच मातोश्री महाराणी सईबाई यांचे निधन झाल्याने त्यांचाही सांभाळ जिजाऊंनीच केला. हिंदवी स्वराज्याचे दोन छत्रपती घडवणारे विद्यापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ होत्या.
शिवराय आग्र्यात औरंगजेबाच्या कैदेत असतांना स्वराज्यात बंडाळी अथवा बेबंदशाही माजली नाही,कारण जिजाऊंनी अतिशय सक्षमपणे स्वराज्याचा कारभार पाहिला. राजा उपस्थित नसला म्हणून काय झाले? हिंदवी स्वराज्य हे केवळ राजकारण नव्हे तर पवित्र व्रत आहे. हा संस्कार अवघ्या स्वराज्यावर त्यांनी केला होता.
दि. 6 जुन 1674 रोजी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. हा दिवस म्हणजे शतकानुशतके हिंदु समाजाचे सुतक फिटण्याचा दिवस. हिंदुंचे एक सार्वभौम सिंहासन याचदिवशी निर्माण झाले होते. त्यांचा लाडका शिवबा आज सिंहासनाधिश्वर छत्रपती होणार होता. त्यांनी पाहिलेले स्वप्न "याचि देही,याचि डोळा" साकार झाले होते.काय वर्णावा तो आनंद?? इथे वर्णन करायला केवळ व्यास - वाल्मिकींचीच प्रतिभा हवी.
राज्याभिषेकाच्या अवघ्या काही दिवसानंतर राजमाता जिजाऊ यांनी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे अंतिम श्वास घेतला. त्या कृतार्थ होत्या. जिजाऊ आणि छत्रपती शिवराया हे आई-मुलांचे नाते काय होते? बाबासाहेब पुरंदरे लिहीतात " जगाच्या पाठीवर एकमेव उदाहरण ठरावे अशी ती माता होती,असा तो पुत्र होता,अशी त्याची भक्ती होती"
माँ जिजाऊंचे स्मरण आमच्या राष्ट्रासाठी सदैव प्रेरणेचा अखंड स्त्रोत आहे. त्यांचे चरित्र आम्हाला देव,देश आणि धर्माच्या रक्षणासाठी स्फूर्ति देत राहील. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
- कु.शिवानी हरिशंकर मेहता
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...