दिल्लीचे ही तख्त राखितो "महाराष्ट्र"माझा
छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठ्यांनी पहिले बाजीराव आणि सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोहिमा काढून अगदी दिल्ली पर्यंत धडक मारली होती. त्यावेळेस दिल्लीचे तख्त हे मुघल बादशाही कडे होते.
त्यानंतर मराठ्यांनी नानासाहेब पेशवे यांच्या काळात त्यांचे सुपुत्र विश्वास राव पेशवे आणि चिमाजी आप्पांचे वीर सुपुत्र श्री सदाशिवराव पेशवे अर्थात भाऊ पेशवे यांनी सन १७६० ला दिल्ली ला धडक मारून दिल्ली वर मराठयांचा भगवा ध्वज फडकविला. तो दिवस होता ३ ऑगस्ट १७६०!!
मात्र या दिल्ली मोहिम साठी बराच खर्च झाला. तसेच कर्जही झाले होते.ती देणी चुकविण्यासाठी मग भाऊंनी दिल्लीच्या लाल किल्ल्यातील "दिवाण-इ-खास" च्या तख्तावर असलेला चांदीचा पत्रा काढला. तो दिवस होता ६ ऑगस्ट १७६०. ती चांदी वितळवून मग त्याची नाणी पाडली गेली. ही नाणी त्यावेळचा मुघल सम्राट शाह जहान तिसरा याच्या नावाने पाडली गेली. मग त्या नाण्यांचा वापर करून भाऊंनी जे काही कर्ज होते त्याची बऱ्यापैकी परत फेड केली .म्हणजेच अंदाजे सात लाखाच्या आसपासचा सैन्याचा खर्च ऑक्टोबर महिन्यांपर्यन्त भाऊंनी भागवला.यानंतर मराठा सैन्य भाऊंच्या नेतृत्वाखाली कुंजपुरा च्या दिशेने निघाले. विशेष म्हणजे या वखताला अहमद शाह अब्दाली याने हिंदुस्थान मध्ये प्रवेश केला होता. फक्त त्याने यमुना नदी ओलांडली नव्हती!!
मग भाऊंनी पाडलेली मराठेशाहीची ही चांदीची नाणी नेमकी कोणती आणि कशी होती याची आपल्याला पानिपत मोहिमेचा अभ्यास करताना नेहमीच उत्सुकता असते.कारण ती कर्ज चुकविण्यासाठी दिली गेली आणि दुसरे म्हणजे दिल्लीच्या अनभिषिक्त मुघल साम्राज्याचा दरबारातील चांदी काढून बनविलेली होती. त्यामुळेच ही नाणी सध्या प्रचंड दुर्मिळ आहेत. आम्ही दोन वर्षे आधी पानिपत ची मोहीम करून आलो.तेंव्हा पासून या नाण्याविषयी डोक्यात सतत एक विचार घोंगावत होता. कधी एकदा हे नाणे संग्रहात येतेय असे झाले होते. मात्र तो सुवर्णक्षण लवकरच आला आणि हे मराठेशाहीचे दुर्मिळ नाणे माझ्या नाणी संग्रहात दाखल झाहले. प्रत्यक्ष विश्वासराव आणि भाऊसाहेब पेशवा यांनी पाडलेले हे मराठेशाहीचे दुर्मिळ नाणे संग्रहातून आपल्या समोर दर्शविताना अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले होतेच. पण प्रचंड अभिमान ही आहे. कारण ही अशी नाणी आपल्या मराठेशाहीच्या उत्तुंग इतिहासाची साक्षीदार आणि आपला जाज्वल्य अभिमान ही आहेत. आज माझे महतभाग्य की हे नाणे प्रत्यक्षात हातात घेऊन ते आपल्याला ही दर्शन घडविता येत आहे.
सध्या यातील काही नाणी दिल्ली येथील संग्रहालय आणि काही ठराविक संग्रहकांकडे आहेत.पण ती अशी सहजासहजी पाहण्यास उपलब्ध होत नाहीत.
त्यानंतर पानिपत युद्धाच्या तब्बल १०-११ वर्ष्यानी म्हणजेच १७७२ ला सवाई माधवराव पेशवे यांच्या काळात मराठयांनी वीर महादजी शिंदे आणि तुकोजी होळकर या सरदारांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा दिल्लीवर मराठेशाहीचा भगवा ध्वज फडकविला. त्याही वेळेस मराठ्यांनी दिल्ली अर्थातच "शाहजहानाबाद" इथे पुन्हा मराठेशाहीची नाणी पाडली. म्हणजे जवळजवळ मराठयांनी पुन्हा पानिपत चा सूड घेण्याच्या उद्देशाने उत्तरेकडे मोहीम आखली होती.ती सफल झालीच.
ही दिल्ली येथे पाडलेली नाणी म्हणजे आपले मराठेशाहीचे सार्वभौमत्व असल्याचे प्रतिक आहेत. अशी दुर्मिळ पण इतिहासाला सांगड घालणारी नाणी संग्रहात दाखल झाली की आमच्या सारख्या इतिहासाच्या विद्यार्थ्यांना प्रचंड उत्साह आणि अभिमान दाटून येतो.
मागे मी पानिपत युद्धा संदर्भात नाण्यावर एक पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये अहमदशहा अब्दाली,कसबा पानिपत आणि दिल्ली येथे पाडलेल्या नाण्याविषयी माहिती आपण खालील लिंक वर वाचू शकता.
तसेच पानिपत च्या अभ्यासासाठी आवश्यक संदर्भ ग्रंथांची एक पुस्तक लेखमाला ही लिहिली होती.
तीही जमल्यास जरूर वाचणे.
आपणही अभ्यास करत राहावे आणि आपला दैदिप्यमान इतिहास जगापुढे संदर्भ सहित आणत राहावे हाच या पोस्ट मागील एकमेव उद्देश.
बहुत काय लिहिणे? आपला स्नेह असाच कायम राहोत!!
जय भवानी! जय शिवराय!!
@ किरण शेलार.
No comments:
Post a Comment