विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 March 2026

संताजी घोरपडे : भाग - ३८

 संताजी घोरपडे : भाग - ३८

संताजी घोरपडे मोहिमेवर कांजीवरमकडेच होते. कांजीवरमच्या जवळ कैवारकुटी येथे दोन्ही सेना एकमेकांना भिडल्या. धनाजीच्या सेनेत नागोजी मानेचा मुलगा व मेहुणा अमृतराव निंबाळकर होते. यावेळी राजाराम महाराजांनी आपली राखीव फौज बरोबर घेतली होती. संताजी धनाजी एकमेकांना भिडले. संताजींनी अमृतराव निंबाळकरला कैद केले व हत्तीच्या पायी दिले. मग राजाराम महाराज व धनाजी संताजी घोरपडेवर तुटून पडले.

संताजीचे डोके सटकले. धनाजींचे सैन्य चळचळा कापू लागले. राजाराम महाराज कैद झाले. धनाजीचा धीर सुटला. आपण याच्या हाती सापडलो तर हा गय करणार नाही हे ओळखून धनाजीने रणांगणातून फळ काढला. मराठे विरुद्ध मराठे अशी अभूतपूर्व लढाई केवळ महाराजांच्या गैरसमजामुळे झाली की, प्रबळ द्वेष भावनेने धनाजीने घडवून आणली? महाराजांना संताजींच्या कैदेत एक दिवस काढावा लागला. धनाजी व महाराजांचा सपशेल पराभव झाला. तरी देखील संताजी महाराजांसमोर हात जोडून म्हणाले, "मी तुमचा सेवक आहे. तुम्ही धनाजीला माझ्याबरोबरीचा दर्जा देऊ इच्छित होतात. म्हटले होते ना, सेनापतीचा कस रणांगणातच लागतो. जो रणांगण जिंकतो तो सरसेनापती. आपल्या आज्ञेप्रमाणे मी वागेन."

संताजींनी राजाराम महाराजांना कैद केल्यावर, झुल्फिकारखाने त्यांना आपल्या ताब्यात द्यावे, म्हणून बादशहाच्या वतीने भले मोठे बक्षीस देवू केले. खुद्द बादशहाने १२००० उमराव करण्याचे आश्वासन दिले. पण संताजी लोभाला बळी पडले नाही. स्वराज्यावर, मराठ्यावर हे संताजींचे मोठे उपकार आहे. त्यावेळी महाराज मोगलांच्या ताब्यात गेले असते तर, मराठे शाहीचा अंत निश्चित होता. संताजी म्हणजे सूर्याजी पिसाळ नव्हते. ते होते मराठ्यांच्या स्वातंत्र्याचा सहस्त्र रश्मी सूर्य!

निदान महाराजांनी आता तरी समजूतदारपणा दाखवून संताजींची समजूत घालून आपल्याकडे वळवायला हवे होते. पण मराठेशाहीच्या दुर्दैवाने तेवढी जाण महाराजांजवळ नव्हती, हे केवढे मोठे दुर्भाग्य? संताजी शिघ्रकोपी होते, तेवढेच उदात्त विचारसरणीचेही होते. त्यांनी महाराजांना कैद्यावस्थेत जिंजीला पाठवायचे ठरवले. निदान ताराऊ तरी काही मार्ग काढतील. त्या एकट्याच महाराजांना सल्ला देऊ शकत होत्या.

जिंजीच्या राजमहालात महाराजांनी जळफळत प्रवेश केला. आम्हाला कैद करण्याचा अधिकार सेनापतीला कोणी दिला? आमच्या बरोबर महाराणी तारा आणि बाळ शिवाजींना पकडून औरंगजेबाच्या स्वाधीन करून स्वतः दख्खनची सुभेदारी मिळवण्याचा त्या गद्दार, विश्वासघातकी, नमकहराम संताजीचा मनसुबा दिसतो.

महाराणी म्हणाल्या, "पण स्वारीचा असा गैरसमज का व्हावा? आम्हाला सर्व वार्ता मिळाल्या आहेत. आपण फक्त धनाजींच्या आग्रहापायी संताजीवर चालून गेलात. एकदा लढाईत उतरल्यावर कुणा एकाची हार होणार आणि दुसऱ्याची जीत होणारच. त्याचा दोष कुणाला का द्यावा?"

"पण राणीसाहेब, आम्हाला, खुद्द छत्रपतींना कैद केलं आहे."

"आपणच तशी पाळी त्यांच्यावर आणली. स्वामी विचार करा. आपल्याला कैद केल्यावर संताजी औरंगजेबच्या छावणीवर आपल्याला नेऊ शकत होते आणि बाकी कबिला न्यायला चार शिपाई सुद्धा पुरे होते. संताजीने स्वार्थापायी किंवा सुडबुध्दीने तसा विचार केला असता तर केवढा अनर्थ ओढवला असता?"

"राणीसाहेब, तुमचे म्हणणे असे आहे का? की, घोरपडेंचे या हिंदवी स्वराज्यावर फार मोठे उपकार झाले म्हणायचे. तर मग संताजीचा सन्मान करावा अशी तुमची इच्छा आहे?"

त्याचे बोलणे चालू असतानाच खंडो बल्लाळ धावत येऊन म्हणाला, "संताजी घोरपडे येत आहे."

संताजींनी दरबारात प्रवेश करताच, ताराबाई म्हणाल्या, "संताजी, हा काय प्रकार आहे? किती वेळ चुकत राहणार आहात? मागल्या वेळी स्वारींनी तुमची समजूत काढण्यासाठी विठ्ठल निळकंठांना पाठवले होते. शंकराजींनी हिताचे बोल सांगितले होते. तुम्हीच सांगा, तुम्हाला कोणी आणि किती प्रसंगी सांभाळावे?"

"मातोश्री, खाजगीत बोलावून आम्हाला खडसावयचे होते. माझी चूक असती तर स्वतः प्रायश्चित्त घेतलं असतं. पण महाराज धनाजी आणि निंबाळकराला घेऊन खुद्द स्वतः जातीने माझ्यावर चालू झाले. महाराज एकटे चालून आले असते तर त्यांच्यासमोर समशेर टाकून शरणागती पत्करली असती." मनातले सर्व संताजी घडा घडा बोलत होते...

त्या म्हणाल्या, "धनाजीरावांना पळवून लावले. कैद झालेल्या अमृतराव निंबाळकरांना हत्तीच्या पायी दिले आणि खुद्द महाराजांना कैद करून इथे आणून सोडले." ताराबाईच्या आवाजात खंत होती.

"मातोश्री, तुम्ही तरी मला समजून घ्या. धनाजीला मोठेपणा तुम्ही लोकांनी दिला. एरवी तो पळपुटा सेनानी मला अद्दल द्यायला निघाला, म्हणून मला त्याला तसाच जबरदस्त तडाखा देणे भाग होते. शत्रूंच्या घोड्यांना देखील हा संताजी पाण्यात दिसतो म्हणतात. आणि हा धनाजी कारण नसताना मला पाण्यात पाहतो. अमृतराव त्या नागोराव मानेचा मेहुणा..तो इतका स्वार्थी, लोभी, विश्वासघातकी आहे की या चार वर्षात तीन वेळा मोगलांना जाऊन मिळाला. आणि परत भीक मागत स्वामींच्या पायाशी केवळ वतनासाठी आला. त्याला सैन्यात ठेवण्याचा महाराजांचा हुकूम आला. कसा ठेवायचा? आम्ही त्याला सैन्यात घेतले असते तर आमच्या शिपाई आमच्यावर विश्वास ठेवतील का? त्याला हत्तीच्या पायी दिले यात आम्ही काहीच गैर केलं नाही."

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

No comments:

Post a Comment

रास्ते घराण्यातील शिक्का 🚩🚩🚩

  रास्ते घराण्यातील शिक्का सदर शिक्का मोर्तब याचे महत्व त्या व्यक्तीच्या इतिहासातील कामगिरीवर लष्करी व मूलखी कारभारातील योगदानावर आधारलेला अ...