विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 March 2026

संताजी घोरपडे : भाग - ३४

 संताजी घोरपडे : भाग - ३४

अति जलद हालचाली करून संताजींनी मोगल ठाणेदार, सरदारांना त्रस्त करून सोडले होते. संताजींचे मोगलांना सतावून सोडणारे हल्ले जरी एकीकडे चालले होते तरी, त्यांच्या मनातून छत्रपती राजारामवरील राग गेला नव्हता. त्यांनी जिंजी पासून दूर राहूनही स्वराज्य रक्षणचे प्रयत्न जारीने सुरूच ठेवले होते. खुद्द छत्रपतींशी त्यांचे बिनसले असले तरी ते कर्तव्यापासून कधीच परावृत्त झाले नव्हते. त्यांची ही राजनिष्ठा अद्वितीय, उच्च कोटीची होती. सेनापती संताजींचे जीवन म्हणजे अपरंपार स्वराज्यनिष्ठा. स्वराज्य हित दक्षता उच्च कोटीची, सैनिकी शिस्त यांचा सुरेख त्रिगुणीत संगम होता.

हिंमतखानने हार मानली नव्हती. त्याने संताजीचा पाठलाग सुरूच ठेवला. नळदुर्ग जवळ दोनदा झटापटी झाल्या. अखेर संताजीने त्याला हुलकावणी देऊन आपल्या मुख्य केंद्राकडे परतत असताना, रायपूरचा टापू लुटला. संताजींच्या बातम्या बादशहाला पोहोचतच होत्या. मुत्सद्यांशी चर्चा करून उपाययोजनावर विचार करत होता.

त्यावेळी संताजी फौजेसह दुहेरी इलाख्यात होते. तो प्रांत कासिमखानच्या अखत्यारीत होता. औरंगजेबाने ज्यादा कुमक पाठवून संताजीचा पडाव करण्याची आज्ञा दिली. बादशाही गोटातील कासिम खानच्या हालचालीची वित्तम्बित बातमी आपल्या हेरांकडून संताजींना समजत असल्यामुळे, त्या प्रकारची योजना करून ते मोगल सैन्यांना भिडले. आपल्या योजनाबद्ध युद्धनीतीचा वापर करून कासिम खानला व रहुल्लाखानला जेरीस आणले. सतत तीन दिवस त्यांनी मोगल सैन्यांना अन्नाचा दाणा मिळू दिला नाही. चौथ्या दिवशी कसेबसे किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर काही सैनिकांना व जनावरांना अन्न व गवत मिळाले.

किल्ल्याबाहेर चकमकी सुरू असताना किल्ल्याची दारे बंद होते. त्यामुळे रसद खुंटली. मग हेतू पुरस्पर मोगलांनी मराठा सैनिकांत आवई उठवली की, हिम्मतखान कासिमखानच्या मदतीला भली मोठी फौज घेऊन येत आहे. पण संताजीवर काही परिणाम झाला नाही. उलट त्यांनी आपल्या फौजेची रचना बदलली. कासिम खानच्या बिकट अवस्थेचा वृत्तांत बादशहाला दररोज मिळत होता. एकट्या कासिमकडून आपले ईस्पित साध्य होणार नाही, म्हणून त्याने आपल्या भरवशाचे दोन सरदार तातडीने कासिम खानच्या मदतीला पाठवले. कासिमखानने खानजादा खानचे जंगी स्वागत केले. ह्या सर्व बातम्या संताजींना पोहोचतच होत्या. त्याच्यासाठी मेजवानीचा बेत केला. संताजीने आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या करून तीन दिशांना रवाना केल्या. त्यांची योजना होती मेजवानीच्या जागेवर हल्ला चढवायचा. अनपेक्षित हल्ल्याने दोन्ही खान गडबडून गेले. काशीद खान पळून गेला. कासिमखान गायब झाल्यावर रहुल्ला खान व सफशिक खानने कसातरी किल्ल्यात प्रवेश मिळवून जीव वाचवला. उपासमारीला कंटाळून काही सैनिक गढीच्या भिंतीवरून उड्या मारून मराठ्यांच्या आश्रयाला आले.

काही दिवसांनी किल्ल्यावर रोगराई पसरली. सर्वत्र घाण साचली होती.त्यातच अन्न पाण्याची टंचाई. त्यामुळे सैनिक अगदी मेटाकुटीला आले. त्यातच कासिम खान मरण पावला. काहींचे म्हणणे त्याने स्वतः विष घेतले. ते काही असले तरी दुहेरीचा पराभव आणि संताजी घोरपडेचा त्याने घेतलेला धसका त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरले होते.

रहुल्लाखान खान, खाजखानाखान व इतर मोगल सरदार संताजीला शरण आले. शेवटी दोन लाख होनवर तडजोड झाली. अंगावरील वस्त्रानिशी मोगल सरदार बाहेर पडले. बाकीच्या लोकांना जीवदान देऊन त्यांना सोडण्यात आले. दुहेरीच्या किल्ल्यावर भगवा फडकला. २८ लाख होनच्या किमतीच्या वस्तू. संपत्ती, जडजवाहीर मराठ्यांच्या हाती पडले.

दुहेरीच्या पराभवाच्या बातमीने बादशहा अगदी प्रक्षुब्ध झाला. संताजीचा बिमोड करण्याची प्रतिज्ञा केली. बादशहाने आपल्याला नेस्तनाबूत करण्याचे ठरवल्याची बातमी संताजीला समजली असल्याने कापशीला असलेल्या कुटुंबाच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली. नारोला तशा सूचना दिल्या.

कापशीत काही दिवस मुक्काम करून संताजी कर्नाटकात आले. फौजेची जुळवाजुळ करून औरंगाबादच्या दिशेने कूच केले. वाटेत आडवी येणारी मोगलांची ठाणे उध्वस्त करून, लुट घेऊन मराठ्यांच्या फौजेने औरंगाबाद गाठले. तापी नदीवरील संपन्न समृद्ध असलेले नगर मोगलांचे प्रमुख ठाणे होते. बऱ्हाणपूरवर संताजीचा डोळा होताच. संताजींनी बऱ्हाणपूर घेतले व बऱ्हाणपूरच्या सुभेदाराकडे चौथाईची मागणी केली. पण बादशहाने मागणी फेटाळून लावली. संताजीपुढे त्याचा टिकाव लागला नाही. सुभेदाराला कैद करण्यात आले. बऱ्हाणपूर संताजीच्या ताब्यात आले.

भरपूर संपत्ती, जडजवाहीर यांची मराठ्यांनी मनसोक्त लूट केले. बातमी समजताच बादशहाचा संताप शिगेला पोहोचला. त्याने संताजींचे परिपत्य करण्यासाठी तात्काळ गाजीउद्दीनखान सरदारला धाडले. पण तो तिथे पोहोचेपर्यंत मराठे पसार झाले होते.

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

No comments:

Post a Comment

संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१

  संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१ कारखेलच्या जंगलात भूमिगत असलेल्या संताजीच्या पाळतीवर नागोजी माने होता. ज्याने आपल्या कुळाचे क्षास्त्रतेज दा...