पावसाळा संपताच, दसऱ्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील सर्व मुत्सद्दी, सेनानी अमात्य रामचंद्र पंतांच्या नेतृत्वाखाली मोगलांशी लढायला सज्ज झाले. मोगलांना मराठी ठेचू शकतात, ही भावना मराठ्यांमध्ये रुजली. संतांजी, धनाजींनी आपापल्या मोहिमांची योजना आखून रामचंद्र पंतांच्या आज्ञेनुसार सीमोल्लंघन केले.
जिंजी ते मद्रास पर्यंतचा कर्नाटकचा अफाट भूप्रदेश संताजींच्या अखत्यारीत होता. धनाजीनेही आपली मोहीम याच भागात करण्याचे ठरवले. ठिकठिकाणी मोगलांचा समाचार घेत, त्यांची ठाणी, चौका उडवून देत, प्रत्येकाकडून चौथाईच्या खंडण्या वसूल करत, हे उभय सेनानी महाराजांच्या दर्शनाला जिंजीत जाण्यास निघाले. त्याआधी संताजीने उत्तर कर्नाटकातील बेळगावच्या पूर्वेस अदमासे २० कोसावर असलेल्या रामदुर्ग किल्ल्याला वेढा दिला.
संताजीने रामदुर्गला वेडा दिल्याचे कळताच, बादशहाने तातडीने विजापूरचा सुभेदार नसूल्ला खानला रामदुर्गच्या किल्लेदाराच्या मदतीस पाठवले, आणि हिम्मतखानलाही. पण हे दोघेही पोहोचण्याआधीच संताजीने रामदुर्गाचा वेढा उठवून दक्षिण दिशेने गदगकडे कूच केले. संताजीच्या गनिमी काव्याने मोगलांची पुरती दमछाक होत होती. जिथे तिथे नामुष्की पदरी पडत होती. बादशहाच्या कित्येक नामांकित सरदारांनी देखील हाय खाल्ली होती. इकडे छावणीत बादशहा दिवसेंदिवस अस्वस्थ होऊ लागला.
बादशहाला संताजीच्या पडावाबरोबरच जिंजीचा पाडाव करायचा होता. छत्रपती राजाराम महाराजांचा पाडाव झाला तर, मराठ्यांमध्ये दुहीची आग पेटवून महाराष्ट्र उध्वस्त करता आला असता. ते तर साधले नाहीच, उलट कर्नाटकात मराठ्यांची शक्ती वाढली. औरंगजेबच्या डोळ्यात संताजी सलत होते. तुळापूर छावणीचे सुवर्ण कलश संताजीने नेल्यापासून मोगलांच्या निःपाताची शपथ घेतलेले संताजी त्याचे लक्ष बनले होते. प्राप्त परिस्थितीत संताजीला संपवणारा एकच हिम्मतखान हा सेनानी होता. या अगोदर हिम्मतखान आणि संताजी मध्ये अनेक वेळा झटापटी झाल्या. पण संताजी योग्य वेळी रणांगणातून पसार होत असल्यामुळे संताजीवर मात करण्याचे फसवे समाधान मोगरांना मिळत होते.
हिंमतखानला पाठीवर घेऊन संताजींची घोडदौड चालूच होती. संताजीने गदगहून चित्रदुर्गाला वेढा दिला आणि चित्रदुर्ग हस्तगत केला. तोच हिम्मतखानच्या हालचालीचा सुगावा लागला. संताजींनी आपल्या सैन्याचे दोन भाग केले. दोन्ही तुकड्यांनी दोन निरनिराळ्या दिशांनी हिम्मतखानवर चाल केली. दोन्ही सैन्यात घनघोर युद्ध झाले. लढाईचा जोर पाहून संताजीची राखीव बंकरदाज सेना हिंमतखानवर तुटून पडली. एका बंदुकीच्या गोळीने हिंमतखानचा बळी घेतला. त्याचे हत्ती, घोडे आणि साहित्य संताजींच्या हाती सापडले. मोगल जमादार अविबाकी हा निसटण्याच्या बेतात असताना मराठ्यांच्या हाती लागला. त्याचा मुलगाही लढाईत कामी आला. मोगल सैन्यांत सेनापतीच नसल्यामुळे, सैन्याने माघार घेऊन जीव वाचून सर्व तिथेच टाकून पळून गेले.
तिन्ही त्रिकाळ संताजीच्या मागे असलेला हिंमतखान गतप्राण झाल्यामुळे, मोगलांविरुद्धची अर्धी लढाई जिंकल्याचे समाधान संताजींना लाभले.
आपले आध्यात्मिक गुरु मेरू स्वामींचे मनोमन चिंतन केले. अत्यंत कठीण समयी स्वामींनी संताजींवर कृपादृष्टी केली होती. जणू त्यांचा प्रसाद म्हणून की काय न मागता संताजींना पुनश्च सेनापती पद प्राप्त झाले होते. म्हणूनच संताजी घोरपडेंची जेवढी निष्ठा छत्रपतींच्या गादीशी होती, तेवढीच मेरु स्वामींशी होती.
हिम्मतखान पडल्याची बातमी व त्याच्या सैन्याला बसवपट्टणच्या किल्ल्यात अडकवून ठेवल्याची बातमी बादशहाला मिळाली. त्याच दरम्यान हमीउद्दीनने अनोदीच्या किल्ल्यात अवजड सामान ठेवून तो स्वतः बसवपट्टणकडे निघाला. संताजींना कळताच आपल्या फौजेंनिशी हमीउद्दीनच्या समाचारास निघाले. बसवपट्टनपासून सात कोसावर दोन्ही सैन्यांमध्ये लढाई जुंपली. प्रसंग पाहून हमीउद्दीनने माघार घेतली, पण मराठे आपल्या तळावर निघाले असता, त्यांच्यावर पिछाडीने हल्ला केला .
पाठलाग होत असल्याचे सेनापतीच्या ध्यानी आले होते. संताजींनी गनिमी काव्याचा उपयोग करून आपल्या सेनेच्या तुकड्या करून त्यांना अशा ठिकाणी ठेवले होते की, त्या चक्रातून मोगल सैन्याला बाहेर पडणे अवघड झाले. संताजीकडून मोगल सरदारांना एकसारखा पराभव पत्करावा लागत होता. पण हमीउद्दीन मात्र आपण सतत विजय होत असल्याचे बातमीपत्र बादशहाला पाठवत होता.
पण त्याचे खोटेपणा लवकरच उघडकीस आले. हमीउद्दीन खानला संताजीकडून जबरदस्त पराभव पत्करावा लागला. बसवपट्टणचा विजय म्हणजे संताजी घोरपडे यांच्या गनिमी काव्याचा आदर्श नमुना होता.
छत्रपती संभाजी राजेंच्या हत्येनंतर हिंदवी स्वराज्याच्या आणीबाणीच्या काळात संताजी घोरपडे यांनी अतुल पराक्रम गाजवून मोगलांच्या मगर मिठीतून मराठेशाहीला वाचवले होते. मी मी म्हणणाऱ्या बलाढ्य मोगल सरदारांना नामोहरण केले होते. मोघलांच्या अद्यावत तोफखाना, दारूगोळ्या पुढे संताजीने आपल्या तलवारीची जबरदस्त दहशत निर्माण केली होती. बसवपट्टणला मोगलांचा जबरदस्त पराभव करून आपल्या पराक्रमावर कळस चढवला. या लढाईत एकूण ७५ लाखाची लूट जिंजीला स्वराज्य हितासाठी जमा केली.
संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख
नमोस्तुते!
No comments:
Post a Comment