संताजी पुढे म्हणाले, "आम्हाला दुःख, खंत एकच आहे की, महाराजांना कैद करावे लागले, हे आमचे दुर्भाग्य!"
ताराऊ म्हणाल्या, "महाराज, ऐकलंत?"
राजाराम महाराज म्हणाले, "राणी सरकार, राजकारण बायकांचा विषय नाही. प्रत्येक वेळी ओंजळीने पाणी पिण्यास अजून आमची बुद्धी भ्रष्ट झाली नाही. ठीक! ठीक! आम्ही सावध झालो. उठा संताजीराव...
आणि आम्हाला मिळालेल्या राजमंडळाच्या अध्यक्षपदाचा वापर करून बोलतोय, संताजी, तुम्ही तुमच्या मुलाखत जा. घरी दारी फार शत्रू निर्माण करून ठेवलेत. आम्ही वातावरण निवळल्यावर तुम्हाला बोलावून घेऊ."
"येतो मातोश्री!"
संताजी जायला निघाले तोच, ताराबाई म्हणाल्या, "संताजी एक शपथ घेऊन जायचंय!"
"कोणती शपथ मातोश्री?"
"आतापर्यंत या दरबारातील बेबनावाची खबर बादशहाला मिळाली असेल. तो या बिघाडाचा पुरेपूर फायदा घ्यायचा प्रयत्न करेल. तुम्हाला दख्खनची सुभेदारी देतो म्हणेल."
"मातोश्री, देतो म्हणेल नाही, देतोच म्हणाला. तुमच्या या लबाड झुल्फीकारखान बरोबर कित्येक वेळा निरोप पाठवले. पण हा संताजी विकाऊ नाही. त्याने मोठमोठ्या रकमा, सनदा, वतने देण्याचे अमिष दाखवले. पण मी बधलो नाही."
महाराणी म्हणाल्या, "संताजीराव तुम्ही आज जरी घोरपडे नाव लावत असलात तरी, तुमचे पूर्वज भोसलेच होते. आमच्याच घराण्यातले."
"मातोश्री! हे मी जाणतो. म्हणूनच माझा जीव तिळ तिळ तुटतो." गदगदल्या आवाजात संताजी म्हणाले.
"या सावध रहा. स्वतःला सांभाळा."
दोघांनाही मुजरा करून संताजी घोरपडे निघून गेले.
महाराज म्हणाले, "ताराऊ, तुम्ही त्याला शब्द देऊन चुकलात. पण मी संताजीची गय करणार नाही. त्याच्या उर्मट, बेशिस्त वर्तनाबद्दल आम्ही त्याला शिक्षा देणारच. त्याला दोन वेळा माफ केले. आता त्याला दरबारात जागा मिळणार नाही."
गंभीर स्वरात ताराबाई म्हणाल्या, "आपण छत्रपती आहात. काहीही ठरवायला आणि करायला मुख्त्यार आहात. पण एक इशारा देऊन ठेवते, औरंगजेबाला धडकी भरवणारा हा असा हा एकच मोहरा आपल्या दरबारात आहे. तो नुसता पराक्रमीच नाही तर आपल्या गादीबद्दल तितकीच कडवी निष्ठा बाळगणारा सुद्धा! म्हणून प्रसंगी त्याचे शंभर अपराध पोटात घालून सांभाळले पाहिजे."
कैवारकुटीच्या पराभवामुळे महाराज आणि धनाजी जाधव यांच्या लक्षात एक गोष्ट आली, ती म्हणजे संताजींचा समोरासमोर सरळ सरळ पराभव करणे सोपे नाही. म्हणूनच धनाजीने संताजीच्या सैन्यात फितुरी करण्याचे ठरवले. तसेही संताजींच्या कडक शिस्तीमुळे त्यांच्या सैन्यात, सरदारात असंतोष होताच. धनाजीने आपले जाळे पद्धतशीर पसरवले. धनाजीने पूर्वीचे तंत्र अमलात आणून राजाराम महाराजांना भरीस घालणे सुरू केले.
महाराजांना मुजरा करीत धनाजी म्हणाले, "महाराज, संताजीचे बळ त्याच्या सैन्यात आहे. तीच काढून घ्यायची पक्की तजविज करून आलोय. २०००० फौजेचा टेंभा मिळवणाऱ्या संताजी जवळ ५०० देखील स्वार उरणार नाही. संताजी पुढे निघाला की, माझी फौज त्याच्या पाठीवर कोसळणार. पुढून मोगल सरदार गाझीउद्दीन फिरजजंग आणि लल्फुल्ला खान दहा-बारा हजार फौजेनिशी चाल करून येतील. आमच्या दोघांच्या फौजा मिळून संताजी व त्याच्या सैन्याच्या पार बिमोड करून त्याला रानावनात पळायला लावतो. मोगल आणि मराठे एकत्र येऊन त्याला बरबाद करायला टपले आहेत. शिवाय नागोजी माने त्याच्या पाळतीवर आहेतच. त्याची बायको राधा वहिनीने तर आपला भाऊ अमृतराव निंबाळकर याच्या बदल्यात संताजीला ठार करण्याची शपथ घेतली आहे."
राजाराम म्हणाले नाही, "धनाजीराव' संताजींना ठार करावे अशी आमची इच्छा नाही. फक्त त्यांची मग्रुरी उतरेपर्यंत कैदेत ठेवावे."
"महाराज, आता ते आपल्या हाती राहिले नाही. तो खतरनाक लढवय्या व भडक माथ्याचा आहे. लढाईत तो जिवंत गवसणे कठीण आहे. तो बेसावध असतानाच हल्ला केला तरच..."
"नाही धनाजीराव. असं घडतं कामा नये. संताजींबद्दल आमच्या मनात राग जरूर आहे. पण त्याचा अद्भुत पराक्रम आणि कडवी निष्ठेची यावेळी आम्हाला गरज आहे."
"महाराज, आता आपल्या हाती काहीच राहिले नाही. लल्फुल्लाला सांगू शकत नाही. शिवाय नागोजी माने कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही. आपण चिंता करू नये. फक्त दुरुन पाहत रहा."
संताजी घोरपडे हे शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेले महाराजांचे शिष्य होते. संभाजी राजेंच्या क्रूर हत्येनंतर संताजींनी औरंगजेबच्या छावणीचे कळस कापून त्याला दाखवून दिले की मराठ्यांचा राजा मारला तरी, तो मराठ्यांचा पराक्रम, शौर्य आणि धाडस मारू शकणार नाही. पण दुर्दैव की, या सेनापती संताजीना खुद्द स्वतः छत्रपती राजाराम महाराजांशी लढाई करावी लागली.
नमोस्तुते!
संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख
No comments:
Post a Comment