जयपूरची गादी आणि मराठ्यांचे वर्चस्व..!!
१७५१ साली जयाप्पा शिंदे आणि मल्हारराव होळकर आपली मोठी फौज घेऊन जयपूरवर चालून गेले. मराठ्यांची ही फौज पाहून जयपूरचा राजा ईश्वरसिंग इतका घाबरला की त्याने स्वतःच आत्महत्या केली.
ईश्वरसिंगाच्या मृत्यूनंतर आता जयपूरसारख्या मोठ्या राज्याच्या गादीवर कोण बसणार, याचा निर्णय पूर्णपणे मराठ्यांच्या हातात आला. शिंदे आणि होळकरांनी जयपूरच्या राजकारणाची सूत्रे स्वतःच्या हातात घेतली आणि आपल्या मर्जीतील माधवसिंगाला जयपूरच्या गादीवर बसवले. एवढेच नाही, तर राजा बनवल्याच्या बदल्यात त्यांनी माधवसिंगाकडून मागची सगळी थकीत बाकी आणि नवी खंडणी वसूल केली.
पेशवे दप्तरातील नोंद-
"जैपुरास मुकाम आलियावर ईश्वरसिंग लयातें पावले. माधोसिंग याची राज्यस्थापना झाली. खंडणीचा व गुदस्ताची बाकी सुधा करार जाला ते वृत शेवेसी लिहून पाठविले आहे... प्रस्तुत राजे माधोसिंग यानीं पैगाम करून पूर्ववतप्रमाणे सलूख राखिला."
ज्या सवाई माधवसिंगाने पुढे मराठ्यांशी गद्दारी केली, त्याला त्याच जयपूरचा राजा बनवणारे खुद्द जयाप्पा शिंदे आणि मल्हारराव होळकर होते. राजपुतान्यात कोणाला राजा करायचे, ही ताकद मराठ्यांच्या तलवारीत होती!
संदर्भ-
१. पेशवे दप्तर भाग २१, पत्र क्रमांक ४०, पृष्ठ क्रमांक ३८ (१२ फेब्रुवारी १७५१)


No comments:
Post a Comment